1
जगाची उत्पत्ति होण्यापूर्वी शब्द अस्तित्वात होता. तो शब्द देवाबरोबर होता. आणि शब्द देव होता.
तो शब्द सुरूवातीपासूनच देवाबरोबर होता.
त्याच्याद्वारे (शब्दाच्या) सर्व काही निर्माण करण्यात आले त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही.
त्याच्यामध्ये जीवन होते. ते जीवन जगातील लोकांसाठी प्रकाश (समजबुद्धी, चांगुलपण) असे होते.
हा प्रकाश अंधारात प्रकाशतो. पण त्या प्रकाशाला अंधाराने पराभूत केले नाही.
योहान नावाचा एक मनुष्य होता. देवाने त्याला पाठवीले.
तो लोकांना प्रकाशाविषयी (ख्रिस्ताविषयी) सांगण्यासाठी आला. यासाठी की, योहानाकडून प्रकाश विषयी ऐकून लोकांनी विश्वास ठेवावा.
योहान तो प्रकाश नव्हता, परंतु लोकांना प्रकाशाविषयी सांगण्यासाठी योहान आला.
खरा प्रकाश जगात येणार होता. हा प्रकाश सर्व लोकांना प्रकाश देतो.
शब्द अगोदरच जगात होता. त्याच्याद्वारेच जग निर्माण झाले. परंतु जगाने त्याला ओळखले नाही.
तो जगात आला, जे त्याचे स्वत:चे होते त्या लोकांकडे आला, परंतु त्याच्या स्वत:च्याच लोकांनी त्याला आपले मानले नाही.
काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला.
ही मुले लहान बालके जन्मतात तशी जन्मली नाहीत. त्यांचा जन्म आईवडिलांच्या इच्छेने किंवा योजनेमुळे झाला नाही, तर त्यांचा जन्म देवाकडून झाला.
शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला. आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते देवपित्याच्या एकमेव अशा पुत्राचे गौरव ख्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही. तो शब्द कृपा (दयाळूपणा) आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता.
योहानाने त्याच्याविषयी लोकांना सांगितले. योहान म्हणाला, “ज्याच्याविषयी मी सांगत आहे तो हाच. मी म्हणालो, माझ्यानंतर येणारा माझ्याहून थोर आहे, तो मोझ्या अगोदरपासुन आहे.”
शब्द (ख्रिस्त) हा कृपा (दयाळूपणा) व सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. त्याच्याकडून आम्हांला भरपूर आशीर्वाद मिळाले.
मोशेद्वारे नियमशास्त्र दिले, पण दया व सत्याचा मार्ग ही येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त झाली.
कोणाही मनुष्याने आतापर्यत देवाला कधी पाहिले नाही. परंतु एकमेव देव (येशू) जो बापाच्या उराशी आहे, तो पुत्राद्वारे आम्हांला प्रकट झाला आहे.
यरूशलेम येथील यहूदी लोकांनी योहानाकडे काही याजक व लेवी ह्यांना पाठविले. “तू कोण आहेस?” हे विचारण्यासाठी यहूदी लोकांनी त्यांना पाठविले.
योहान अगदी मोकळेपणाने बोलला. त्याने उत्तर देण्यास नकार दिला नाही. तो स्पष्टपणे म्हणाला, ‘मी ख्रिस्त नाही.” योहानाने लोकांना तेच सांगितले.
यहूदी लोकांनी योहानाला विचारले, “तर मग तू कोण आहेस? तू एलीया आहेस काय?” योहानाने उत्तर दिले, “नाही, मी एलीया नाही.” यहूदी लोकांनी विचारले, ‘तू संदेष्टा आहेस काय?” योहानाने म्हटले, ‘नाही, मी संदेष्टा नाही.”
यावर यहूदी लोक म्हणाले, “तू कोण आहेस?” तुझ्याविषयी आम्हांला सांग. ज्या लोकांनी आम्हांला पाठविले, त्यांना आम्ही काय उत्तर द्यावे हे तू आम्हांला सांग. तू स्वत:ला कोण म्हणवितोस?”
योहानाने त्यांना यशया संदेष्ट्याच्या शब्दात सांगितले, ‘मी वैराण रानात ओरडणाऱ्या मनुष्याची वाणी आहे: ‘प्रभूसाठी सरळ मार्ग तयार करा.’ “ यशाया 40:3
परूशी लोकांनी या यहूदी लोकांना पाठविले होते.
हे लोक योहानाला म्हणाले, “तू म्हणतोस की, मी ख्रिस्त नाही; मी एलीया नाही किंवा मी संदेष्टाही नाही, मग तू लोकांचा बाप्तिस्मा का करतोस?”
योहानाने उतर दिले, “मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. परंतु तुम्हांला माहीत नाही असा एक मनुष्य येथे तुमच्यात आहे.
माझ्यानंतर येणारा तो हाच मनुष्य आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याइतकीही माझी लायकी नाही.”
यार्देन नदीपलीकडील बेथानी गावात या सर्व गोष्टी घडल्या. योहान तेथेच लोकांचा बाप्तिस्मा करीत असे.
दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला आपणांकडे येताना पाहिले. योहान म्हणाला, “पाहा, हा देवाचा कोकरा. जगाचे पाप वाहून नेणारा.
याच्याविषयी मी बोलत होतो. मी म्हणालो, ‘माझ्यानंतर एक मनुष्य येणार आहे. परंतु तो माझ्याहून थोर आहे. तो माझ्या अगोदरपासून आहे. तो सदाजीवी आहे.’
तो कोण होता हे मलाही माहीत नव्हते. परंतु मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो यासाठी की, येशू हाच ख्रिस्त आहे हे इस्राएलाला (यहूदी लोकांना) कळावे.”
म्हणून मी लोकांना सांगतो: ‘तो (येशू) देवाचा पुत्र आहे.’ “
दुसऱ्या दिवशी योहान पुन्हा तेथे आला. योहानाबरोबर त्याचे दोन शिष्य होते.
योहानाने येशूला जाताना पाहिले, योहान म्हणाला, “पाहा हा देवाचा कोकरा!”
योहान हे बोलत असता त्या दोघा शिष्यांनी ऐकले, म्हणून ते योहानाचे शिष्य येशूच्या मागे गेले.
येशूने मागे वळून पाहिले तो दोघेजण आपल्यामागे येत आहेत असे त्याला दिसले. येशूने विचारले, “तुम्हांला काय पाहिजे?” ते दोघे म्हणाले, “गुरुजी (रब्बी), तुम्ही कोठे राहता?”
येशूने उतर दिले, “माझ्याबरोबर या म्हणजे तुम्हांला दिसेल.” तेव्हा ते दोघेजण येशूबरोबर गेले. येशु राहत होता ती जागा त्यांनी पाहिली. ते त्या दिवशी येशूबरोब तेथे राहिले. त्यावेळी सुमारे दुपारचे चार वाजले होते.
येशूविषयी योहानाकडून ऐकल्यावर ते दोघे जण येशूच्या मागे गेले. त्यांच्यापैकी एकाचे नाव अंद्रिया होते. अंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ.
अंद्रियाने पहिली गोष्ट ही केली की, आपला भाऊ शिमोन याला शोधून काढले. अंद्रिया शिमोनाला म्हणाला, “आम्हांला मशीहा सापडला आहे.”
शिमोनाला घेऊन अंद्रिया येशूकडे आला. शिमोनाकडे पाहून येशू म्हणाला, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफा म्हणतील.”
दुसऱ्या दिवशी येशूने गालील प्रांतात जाण्याचे ठरविले. तेव्हा तो फिलिप्पाला भेटला, येशु त्याला म्हणाला, “माझ्यामागे ये.”
जसे अंद्रिया व पेत्र तसाच फिलिप्पही बेथसैदा या गावचा होता.
फिलिप्प नथनेलास भेटला व म्हणाला, “मोशेने नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्याची आठवण कर. जो येणार आहे त्या मनुष्याविषयी मोशेने व संदेष्ट्यांनीही लिहिले. तो आम्हांला सापडला आहे. त्याचे नाव येशू आहे, तो योसेफाचा पुत्र असून नासरेथ गावचा आहे.”
परंतु नथनेल फिलिप्पाला म्हणाला. “नासरेथ! नासरेथमधून काही चांगले निघेल काय?” फिलिप्प म्हणाला, “येऊन पहा.”
येशूने नथनेलाला आपल्याकडे येताना पाहिले, येशू म्हणाला, “हा येत असलेला मनुष्य खरोखर देवाच्या लोकांपैकी एक आहे. त्याच्यात खोटे काहीच नाही.”
“तुम्ही मला कसे ओळखता?” नथनेलाने विचारले. येशूने उत्तर दिले, “तू अंजिराच्या झाडाखाली उभा होता. तेव्हाच मी तुला पाहिले. फिलिप्पने तुला माझ्यााविषयी सांगण्यापूर्वीच.”
मग नथनेल येशूला म्हणाला, “रब्बी (गुरूजी) तुम्ही देवाचे पुत्र आहात. तुम्ही इस्राएलाचे राजे आहात.
येशू नथनेलला म्हणाला, “तू अंजिराच्या झाडाखाली उभा असतानाच मी तुला पाहिले, असे मी सांगितले म्हणून तुझा माझ्यावर विश्वास बसला. परंतु यापेक्षा मोठमोठ्या गोष्टी तू पाहशील!”
येशू पुढे म्हणाला, “खरे तेच मी तुला सांगतो. स्वर्ग उघडलेला तुम्ही सर्व जण पाहाल. देवदूत वर चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल.”
2
दोन दिवसांनी गलीलातील काना गावी एक लग्न होते. येशूची आई तेथे होती.
येशू व त्याचे शिष्य यांनाही लग्नाला बोलाविले होते.
लग्नात पुरेसा द्राक्षारस नव्हता. सगळा द्राक्षारस संपला. तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.”
येशूने उतर दिले, “आई, तू मला यात का गुंतवितेस? माझी वेळ अजून आलेली नाही.”
येशूची आई नोकरांना म्हणाली, “येशू तुम्हांला सांगेल तसे करा.”
त्या ठिकाणी दगडाचे सहा मोठे रांजण होते, यहूदी लोक विशेष विधीप्रसंगी धुण्यासाठी पाणि ठेवण्यासाठी हे रांजण वापरीत असत. प्रत्येक रांजणात वीस ते तीस बादल्या पाणी मावत असे.
येशू नोकरांना म्हणाला, “हे रांजण पाण्याने भरा.” मग नोकरांनी ते रांजण काठोकाठ भरले.
मग येशू नोकरांना म्हणाला, “आता यातील काही पाणी काढा आणि ते भोजनप्रमुखाकडे न्या.” मग नोकर ते पाणी घेऊन भोजनप्रमुखाकडे गेले.
मग लग्नसमारंभातील भोजनप्रमुखाने ते चाखून पाहिले, तर पाण्याचा द्राक्षारस झालेला होता. तो द्राक्षारस कोठून आला हे त्या माणसाला माहीत नव्हते. परंतु ज्या नोकरांनी ते पाणी नेले होते त्यांना तो द्राक्षारस कोठून आला होता हे माहीत होते. लग्नसमारंभाच्या भोजनप्रमुखाने वराला बोलाविले.
तो वराला म्हणाला, “लोक नेहमी उत्तम द्राक्षारस पहिल्यांदा वाढतात. नंतर पाहुणे भरपूर प्याले म्हणजे मग लोक हलक्या प्रतीचा वाढतात. परंतु तू तर उत्तम द्राक्षारस अजून राखून ठेवला आहेस.”
स्वर्गीय सामर्थ्याचे चिन्ह म्हणून येशूने केलेला हा पहिला चमत्कार होता. गालीलातील काना येथे येशूने हा चमत्कार केला. आणि येशूने आपली महानता दाखवून दिली. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
नंतर येशू कफर्णहूम गावी गेला. येशूची आई, भाऊ व त्याचे शिष्य त्याच्यासोबत गेले. ते सर्व काही दिवस कफर्णहूमास राहिले.
यहूदी लोकांचा वल्हांडण सण अगदी जवळ आला होता, म्हणून येशू यरुशलेमला गेला.
येशू यरुशलेम येथील मंदिरात गेला. येशूला मंदिरात गुरे, मेंढ्या आणि कबुतरे विकणारी माणसे दिसली. काही माणसे मेज मांडून बसल्याचे त्याने पाहिले. ती माणसे लोकांना पैसे बदलून देण्याचा व्यापार करीत होती.
येशूने दोऱ्यांचे तुकडे जोडून एक चाबूक तयार केला. मग येशूने त्या सर्वंना तसेच मेंढ्यांना व गुरांना मंदिरातून हाकलून दिले. लोकांच्या पैशाचा व्यापार करणाऱ्यांचे मेज उलथेपालथे केले आणि त्यांचे पैस विस्कटून टाकले.
येशू कबुतरे विकणान्यांना म्हणाल, “या सर्व गोष्टी येथून घेऊन जा. माझ्या पित्याचे घर विकणाऱ्याची व विकत घेणाऱ्याची बाजारपेठ बनवू नका!”
हे घडले तेव्हा येशूच्या शिष्यांना पवित्र शास्त्रात जे लिहिले होते त्याची आठवण झाली: “तुझ्या मंदिराच्या आवेशाने मला ग्रासून टाकले जाईल” स्तोत्र. 69:9
यहूदी लोक येशूला म्हणाले, “एखादा चमत्कार करुन आम्हांला चिन्ह दाखवा. आणि या गोष्टी करण्याचा तुम्हांला अधिकार आहे हे सिद्द करा.”
येशूने उत्तर दिले, “हे मंदिर नष्ट करा म्हणजे मी ते तीन दिवसांत पुन्हा उभारीन.”
यहूदी लोक म्हणाले, “लोकांना हे मंदिर बांधण्यासाठी शेहेचाळीस वर्षे लागली! आणि तुम्ही ते तीन दिवसांत बांधू शकता यावर तुमचा खरोखरच विश्वास आहे काय?”
(परंतु येशू मंदिराविषयी म्हणजे स्वत:च्या शरीराविषयी बोलला.
नंतर येशू मेलेल्यांतून पुन्हा उठविला गेला, तेव्हा त्याच्या शिष्यांना तो हे बोलल्याचे आठवले. आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्याविष्यी लिहिलेल्या पवित्र शास्त्रावर आणि जे शब्द येशू बोलला त्यावर विश्वास ठेवला.)
वल्हांडण सणासाठी येशू यरुशलेमात होता. पुष्कळ लोकांनी येशूवर विश्वास ठेवला कारण तो करीत असलेले चमत्कार त्यांनी पाहिले.
परंतु येशूने त्यांच्यावर भरवसा ठेवला नाही. कारण येशूला त्यांचे विचार माहीत होते.
लोकांविषयी कोणी येशूला सांगावे याची त्याला काहीच गरज नव्हती. लोकांच्या मनात काय आहे हे येशू जाणून होता.
3
निकदेम नावाचा एक मनुष्य होता. निकदेम परुशी लोकांपैकी एक असून तो यहूदी लोकांचा एक महत्वाचा पुढारी होता.
एका रात्री निकदेम येशूकडे आला आणि म्हणाला, “रब्बी, तुम्ही देवाकडून पाठविलेले शिक्षक आहात हे आम्हांला माहीत आहे. कारण तुम्ही जे चमत्कार करता ते देवाच्या मदतीशिवाय कोणाही माणसाला करता येणार नाहीत.”
येशूने उत्तर दिले, ‘मी तुम्हांला खरे सांगतो प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म झालाच पाहिजे. जर एखाघा माणसाचा नव्याने जन्म झाला नाही, तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही.’
निकदेम म्हणाला. “जर एखादा माणूस म्हातारा असेल तर त्याचा नव्याने जन्म कसा होईल? तो आपल्या आईच्या उदरात परत जाऊ शकत नाही! म्हणून त्या व्यक्तीचा दुसऱ्यांदा जन्म होणारच नाही!”
येशूने उत्तर दिले. ‘मी तुम्हांला खरे सांगतो: मनुष्याचा पाण्याने आणि आत्म्याने जन्म झाला नाही तर त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे शक्यच नाही.
मनुष्य मानवी आईवडिलांच्या उदरी जन्माला येतो. परंतु त्याच्या आत्मिक जीवनाचा जन्म पवित्र आत्म्यापासून होतो.
तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे म्हणून मी तुम्हांला सांगितल्याबहल आश्चर्यचकित होऊ नका.
वाऱ्याला वहायला पाहिजे तिकडे तो वाहतो, वारा वाहताना तुम्हांला त्याचा आवाज ऐकू येतो. पहंतु वारा कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही. आत्म्यापासून जन्म पावलेल्या प्रत्थेक माणसाचे असेच असते.”
कदेम म्हणाला, “हे सारे कसे शक्य आहे?”
येशू म्हणाला, “तुम्ही इस्राएलाचे प्रमुख शिक्षक आहात. तरीही तुम्हांला या गोष्टी कळत नाहीत काय?
मी तुम्हांला खरे तेच सांगतो. आम्हांला जे माहीत आहे त्याविषयी आम्ही बोलतो, जे पाहिले त्याविष्यी आम्ही सांगतो. परंतु आम्ही जे सांगतो ते तुम्ही लोक मानीत नाही.
मी तुम्हांला जगातील गोष्टाविषयी सांगितले पण तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही. मग जर मी तुम्हांला स्वर्गातील गोष्टाविषयी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणारच नाही!
मनुष्याचा पुत्र असा एकमेव आहे जो वर स्वर्गात जेथे होता तेथे गेला आणि स्वर्गातून उतरुन खाली आला.”
“मोशेने अरण्यात असताना सापाल उंच केले. मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे.
अशासाठी की जो कोणी मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळू शकते.”
होय, देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे.
देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले. जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठविला नाही, तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले.
जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय (दोषी ठरविले जाणे) होणार नाही. परंतु जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय झाल्यासारखाच आहे. कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला नाही.
ज्य वस्तुस्थितीच्या आधारे लोकांचा न्याय केला जातो ती ही जगामध्ये प्रकाश आला परंतु लोकांना प्रकाश नको होता. त्यांना अंधार पाहिजे होता. कारण लोक वाईट कृत्ये करीत होते.
वाईट कृत्ये करणारा प्रत्येक जण प्रकाशाचा द्वेष करतो. तो प्रकाशाकडे येत नाही. कारण त्याने केलेली सर्व वाईट कृत्ये तो प्रकाश उघड करील.
परंतु जो सत्य मार्गाने चालतो तो प्रकाशाकडे वळतो. आणि त्याने केलेली कामे देवाकडून झाली होती हे तो प्रकाश दाखवून देईल.
त्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य यहूदीया प्रांतात गेले. तेथे येशू आपल्या शिष्यांसह राहिला आणि लोकांचे बाप्तिस्मे केले.
योहान हा एनोन गावात लोकांचा बाप्तिस्मा करीत असे. एनोन गाव शालिमनगराजवळ आहे. तेथे भरपूर पाणी असल्याने योहान लोकांचा बाप्तिस्मा तेथे करीत असे. बाप्तिस्मा करुन घेण्यासाठी लोक तेथे येत असत.
(योहान तुरुंगात जाण्याच्या अगोदर हे घडले.)
योहानाच्या काही शिष्यांचा दुसऱ्या यहूदी लोकांशी वादविवाद झाला. नियमशास्रात सांगितलेल्या शुद्धीकहणाच्या विधीविष्यी ते वाद घालीत होते.
म्हणून ते शिष्य योहानाकडे आले व म्हणाले, रब्बी, यार्देन नदीच्या पलीकडे जो मनुष्य तुमच्याबरोबर होता तो आठवतो? तुम्ही त्याच्याविषयी साक्ष देखील दिली. तो मनुष्य लोकांना बाप्तिस्मा देत आहे, व पुष्कळजण त्याच्याकडे जात आहेत.
योहानाने उतर दिले, “देव जे देतो तेच माणसाला मिळते.
मी हे सांगताना तुम्ही स्वत:च ऐकले आहे की, ‘मी ख्रिस्त नाही. त्याच्याकरित मार्ग तयार करण्यासाठी देवाने ज्याला पुढे पाठविले तो मी आहे’.
ज्याला वधू असते तो वर असतो, वरााला मदत करणारा वराचा मित्र वराची वाट पाहतो आणि वेगळया आवाजामुळे त्याच्या येण्याची चाहूल लागते काय, ते कान देऊन ऐकतो. वराची वाणी आली म्हणजे त्याच्या मित्राला आनंद होतो. तसाच आनंद मला वाटत आहे. आणि माझ्या आनंदाची वेळ आता आलेली आहे.
तो महान व्हावा आणि मी लहान व्हावे हे योग्यच आहे.”
“जो (येशू) वरुन येतो तो इतर सर्वांहून थोर आहे. जो मनुष्य या जगापासून आला आहे तो जगाचा आहे. तो जगातल्याच गोष्टीविषयी बोलतो, परंतु जो स्वर्गातून आला तो (येशू) इतर लोकांहून थोर आहे.
त्याने जे ऐकले व पाहिले त्याविषयी सांगतो. परंतु तो सांगातो त्या गोष्टी कोणी स्वीकारीत नाहीत.
तो (येशू) जे सांगतो ते मान्य करणारा माणूस, देव सत्य आहे याचा पुरावाच देतो.
देवाने त्याला (येशूला) पाठविले. आणि देव सांगतो त्याच गोष्टीविषयी तो सांगतो. कारण देव त्याला आत्म्याने पूर्णपणे भरतो.
पिता पुत्रावर प्रीति करतो, पित्याने सर्व गोष्टींवरील अधिकार पुत्राला दिलेला आहे.
जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळते, पंरतु जो पुत्राची आज्ञा पाळीत नाही त्याला अनंतकाळचे जीवन कधीही मिळणार नाही. उलट देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.”
4
परुश्यांनी हे ऐकले की, येशू योहानापेक्षा अधिक लोकांना बाप्तिस्मा देऊन शिष्य करुन घेत आहे.
(परंतु खरे पहता, येशू स्वत: बाप्तिस्मा देत नसे, तर न्याचे शिष्य त्याच्या वतीने लोकांना बाप्तिस्मा देत असत.) परुश्यांनी आपणांविषयी ऐकले आहे हे येशूला समजले.
म्हणून येशू यहूदीयातून निघून परत गालील प्रांतात गेला.
गालीलाकडे जाताना येशूला शोमरोन प्रांतातून जोवे लागले.
शोमरोनातील सूखार नावाच्या गावात येशू आला. याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ हे गाव आहे.
याकोबाची विहीर तेथे होती. लांबच्या प्रवासामुळे येशू थकला होता. म्हणून येशू विहीरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती.
तव्हा पाणी नेण्यासाठी एक शोमरोनी स्त्री त्या विहीरीवर आली. येशू तिला म्हणाला. “मला प्यावयास पाणी दे.’
हे घडले तेव्हा येशूचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेले होते.
ती शोमरोनी स्त्री म्हणाली, “तुम्ही यहूदी आहात आणि मी तर एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही माझ्या हातून पाणी प्यावयास मागता याचे मला मोठे आश्चर्य वाटते.” (यहूदी लोकांचे शोमरोनी लोकांशी सलोख्याचे संबंध नव्हते. )
येशूने उत्तर दिले, “देव काय दान देतो याविषयी तुला माहीत नाही आणि तुझ्या हातून पाणि मागणारा कोण हे देखील तुला माहीत नाही. तुला जर या गोष्टी माहीत असत्या तर तूच माझ्याकडे मागितले असतेस. आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते.”
ती म्हणाली, “महाराज, जिवंत पाणी तुम्हांला कोठून मिळणार? विहीर तर फार खोल आहे. आणि पाणी काढण्यासाठी तुमच्याजवळ पोहरा वगैरे काही नाही.
आमचा पिता (पूर्वज) याकोब याच्यापेक्षाही तुम्ही मोठे आहात काय? याकोबानेच ही विहीर आम्हांला दिली. ते स्वत: या विहीरीचे पाणी पीत असत, शिवाय त्यांची मुले व गुरेढोरे याच विहीरीचे पाणी पीत असत.”
येशू म्हणाला, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल.
परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल. त्या पाण्यामुळे त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल.”
ती स्त्री येशूला म्हणाली, महाराज, “ते पाणी मला द्या, म्हणजे मला पुन्हा तहान लागणार नाही. आणि पाणी आणण्यासाठी मला इकडे परत यावे लागणार नाही.”
येशूने तिला सांगितले. “जा, तुझ्या पतीला घेऊन इकडे ये!”
ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” येशू तिला म्हणाला, “हे तू बरोबर सांगिलेस की, तुला नवरा नाही.
खरे तर तुझे पाच पती झाले, आणि आता तू ज्याच्याबरोबर राहतेस तो तुझा पती नाही. तेव्हा तू मला सत्यच सांगितलेस.”
ती स्त्री म्हणाली, “महाराज, मला आता कळले की, तुम्ही एक संदेष्टा आहात.
आमचे वाडवडील या डोंगरावर उपासना करीत. परंतु तुम्ही यहूदी लोक म्हणता की, यरुशलेम हीच ती जागा आहे जेथे लोकांनी उपासना केली पाहीजे.”
येशू म्हणाला, “बाई, माझ्यावर विश्वास ठेव! अशी वेळ येत आहे की, आपल्या पित्याची (देवाची) उपासना करण्यासाठी यरुशलेमला अगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही.
जे तुम्हांला समजत नाही त्याची तुम्ही शोमरोनी उपासना करता. आम्ही यहूदी लोक कशाची उपासना करतो हे आम्हांला चांगले कळते, कारण यहूदी लोकांकडूनच तारण येते.
असा काळ येत आहे की, खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपालना करतील. तशी वेळ आता आलेली आहे. आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत.
देव आत्मा आहे. म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे.”
ती स्त्री म्हणाली, “मशीहा येणार आहे हे मला माहीत आहे. मशीहा येईल तेव्हा तो आम्हांला प्रत्थेक गोष्ट समाजावून सांगेल.”
.येशू म्हणाला, “ती व्यक्ति तुझ्याशी आता बोलत आहे. मीच तो मशीहा आहे.”
तेवढ्यात येशूचे शिष्य गावातून परत आले. येशू एका बाईशी बोलत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. परंतु “तुम्हांला काय पाहिजे?” अगर “तुम्ही तिच्याशी का बोलत आहात?” असे त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही.
मग ती स्त्री आपली पाण्याची घागर तशीच विहिरीवर सोडून परत गावात गेली. तिने गावांतील लोकांना सांगितले,
एका मनुष्याने मी आतापर्थेत जे काही केलेले आहे ते सर्व सांगितले. त्याला भेटायला चला. कदाचित तो ख्रिस्त असेल.
मग लोक गावातून बाहेर पडले आणि येशूला भेटायला आले.
ती स्त्री गावात होती तेव्हा येशूचे शिष्य त्याला विनवणी करु लागले, “गुरुजी, दोन घास खाऊन घ्या!”
परंतु येशूने उत्तर दिले. “माझ्याजवळ खावयाला जे अन्न आहे त्याविषयी तुम्हांला काहीच माहिती नाही.”
म्हणून शिष्य एकमेकांना विचारु लागले, “येशूला कोणीतरी अगोदरच काही खावयास आणून दिले काय?”
येशू म्हणाला, “ज्याने मला पाठवीले त्याच्या ईच्छेप्रमाणे करणे हेच माझे अन्न! त्याने मला दिलेले काम पूर्ण करणे हेच माझे अन्न होय.
जेव्हा तुम्ही पेरणी करता तेव्हा तुम्ही नेहमी म्हणता, ‘पीक गोळा करायला अजून चार महिने आहेत.’ परंतु मी तुम्हांला सांगतो, तुम्ही तुमचे डोळे उघडा. लोकांकडे पाहा. पीक तयार असलेल्या शेतांसारखेच ते आहेत.
आताही पीक कापणाऱ्या मजुराला मजुरी दिली जात आहे, तो अनंतकाळासाठी पीक गोळा करीत आहे. म्हणून आता पेरणी करणारा कापणी करणारासह आनंदी आहे.
‘एक पेरणी करतो तर दुसरा कापणी’ असे जे आपण म्हणतो ते किती खरे आहे.
ज्या पीकासाठी तुम्ही मेहनत केली नाही, त्याची कापणी करण्यासाठी मी तुम्हांस पाठविले. दुसऱ्या लोकांनी काम केले आणि त्यांनी केलेल्या श्रमाचा फायदा तुम्हांस मिळतो.”
त्या गावातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. त्या स्त्रीने येशूविषयी जे सांगितले त्यावरुन त्यांनी विश्वास ठेवला. तिने त्यांना सांगितले होते, “मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली.”
शोमरोनी लोक येशूकडे आले. त्यांनी येशूला त्यांच्याबरोबर राहण्याची विनंती केली. म्हणून येशू तेथे दोने दिवास राहिला.
आणखी पुष्कळ लोकांनी येशूच्या शिक्षणामुळे विश्वास ठेवला.
ते लोक त्या स्त्रीला म्हणाले, “पहिल्यांदा तू जे आम्हांला सांगितलेस त्यामुळे आम्ही येशूवर विश्वास ठेवला. परंतु आता आम्ही स्वत:च त्याचे बोलणे ऐकले त्यामुळे विश्वास ठेवतो. आता आम्हांला कळले की, खरोखर हाच मनुष्य जगाचे तारण करील.”
दोन दिवसांनी येशू तेथून निघाला आणि गालील प्रांतात गेला.
(पर्वीच येशू म्हणाला होता की, संदेष्ट्याला त्याच्या देशात मान मिळत नाही.)
येशू जेव्हा गालीलात आला तेव्हा तेथील लोकांनी त्याचे स्वागत केले. वल्हांडण सणाच्या दिवसात यरुशलेम येथे येशूने केलेली सर्व कामे लोकांनी पाहिली होती. कारण ते लोकही सणानिमित तेथे गेले होते.
येशू पुन्हा गालीलातील काना गावाला भेट देण्यास गेला. काना गावीच येशूने पाण्याचे द्राक्षारसात रुपांतर केले होते. तेथे राजाचे जे मुख्य आधिकारी होते त्यापैकी एक आधिकारी कफर्णहूम नगरात राहत होता, या माणसाचा मुलगा आजारी होता.
येशू यहूदीयातून आला आहे आणि आता तो गालीलातच आहे हे त्या अधिकाऱ्याने ऐकले. म्हणून तो मनुष्य येशूकडे काना गावी गेला. येशूने कफर्णहूम तेथे येऊन आपल्या मुलाला बरे करावे म्हणून त्याने याचना केली. कारण त्याचा मुलगा जवळजवळ मेला होता.
येशू त्याला म्हणाला, “चमत्कार आणि अदभुत कामे पाहिली तरच तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवाल.”
राजाचा अधिकारी म्हणाला, “महाराज, माझा लहान मुलगा मरण्यापूर्व माझ्या घरी चला.
येशूने उतर दिले, “जा, तुझा मुलगा वाचेल.” येशूने सांगितले त्यावर विश्वास ठेवून तो मनुष्य घरी गेला.
तो घरी चाललेला असताना वाटेतच त्याचे नोकर त्या माणसाला भेटले. त्यांनी त्याला सांगितले, “तुमचा मुलगा बरा आहे.”
त्या मनुष्याने विचारले, “माझ्या मुलाला कधीपासून बरे वाटू लागले?” नोकर म्हणाले, “काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याचा ताप उतरला.”
“तुझा मुलगा वाचेल” असे एक वाजण्याच्या सुमारासच येशूने सांगितले होते, हे त्या मुलाच्या वडिलांना माहीत होते. म्हणून त्याने व त्याच्या घरातील सर्वांनी येशूवर विश्वास ठेवला.
यहुदीयातून गालील प्रांतात आल्यानंतर येशूने केलेला हा दुसरा चमत्कार.
5
नंतर एका यहुदी सणासाठी येशू यरुशलेमला गेला.
यरुशलेमात एक तळे आहेत. त्या तव्व्याला लागून पाच पडव्या आहेत. (होत्या) यहूदिभाषेत। त्या तव्वयाला बेथेझाथा म्हणत. हे तळे मेंढरे नावाच्या वेशीजवळ आहे.
तव्व्यालगतच्या पडव्यामध्ये अनेक रोगी पडून असत. त्यात काही आंधळे, लंगडे व काही पांगळे होते.
कारण की देवदूत वेळोवेळी तव्व्यात उतरुन पाणी हालवीत असे आणि पाणी हालविल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणताही रोग असेला तरी तो बरी होत असे.
तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला एक रोगी पडून होता.
येशूने त्याला तेथे पडलेला पाहिले, तो मनुष्य तेथे बराच काळ पडून असावा हे येशूने ओळखले. म्हणून येशूने त्या मनुष्याला विचारले. “तुला बरे व्हावयाला पाहिजे का?”
त्या आजारी मनुष्याने उत्तर दिले, “महाराज, पाणी हालते तेव्हा त्यात घेऊन जाण्यासाठी माझ्याजवळ कोणीच व्यक्ति नाही. सर्वांत अगोदर पाण्यात उतरण्यासाठी मी निघालो की, माझ्या अगोदर दुसराच रोगी पाण्यात उतरतो.”
मग येशू म्हणाला, “उठून उभा राहा! आपली खाट उचल आणि चालू लाग.”
तेव्हा तो रोगी ताबडतोब बरा झाला, तो आपली खाट उचलून चालू लागला. हे सर्व ज्या दिवशी घडले तो शब्बाथाचा दिवस होता.
म्हणून बऱ्या झालेल्या त्या मनुष्याला यहुदी म्हणाले, “आज शब्बाथाचा दिवस आहे. शब्बाथाच्या दिवशी तू आपली खाट उचलून नेणे आपल्या नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”
परंतु तो मनुष्य म्हणाला, “ज्याने मला बरे केले, त्यानेच मला सांगितले की, तू आपली खाट उचल आणि चालू लाग.”
यहुदी लोकांनी त्या मनुष्याला विचारले. “तुला आपली खाट उचलून चालायला कोणी सांगितले?”
परंतु तो कोण होता हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला माहीत नव्हते त्या ठिकाणी बरेच लोक होते, आणि येशू तेथून निघून गेला होता.
त्यानंतर तो मनुष्य येशूला मंदिरात भेटला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, “पाहा, आता तू बरा झाला आहेस. पण पाप करण्याचे सोडून दे. नाही तर तुझे अधिक वाईट होईल!”
नंतर तो मनुष्य तेथून निघाला आणि त्या यहूदी लोकांकडे परत गेला. त्याने त्यांना सांगितले की, ज्याने त्याला बरे केले तो येशू आहे.
येशू शब्बाथ दिवशी या गोष्टी करीत होता म्हणून यहूदी लोक यशूशी दुष्टपणे वागू लागले.
परंतु येशू यहूदी लाकांना म्हणाला, “माझा पिता नेहमीच काम करीत असतो व म्हणून मीही काम करेतो”.
यावरुन यहूदी लोकांचा येशूला जिवे मारण्याचा पक्क ा निश्चय झाला. ते म्हणाले, “पहिली गोष्ट ही की, येशू शब्बाथासंबंधीचा नियम मोडतो. दुसरे, ‘देव माझा पिता आहे!’ असे तो म्हणाला. तो स्वत:ची देवाशी बरोबरी करतो”.
परंतु येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे सांगतो. पुत्र जरी सर्व करु शकत असला, तरी पित्याच्या इच्छेला डावलून एकटा काही करु शकत नाही. पिता करतो त्या गोष्टी पुत्रही करेतो.
पिता पुत्रगवर प्रीति करतो आणि ज्या गोष्टी पिता करतो त्या सर्व तो पुत्राला दाखवितो. हा मनुष्य बरा झाला, परंतु यापेक्षाही मोठमोठ्या गोष्टी करण्याचे पिता पुत्राला दाखवील. तेव्हा तुम्ही सर्व जण चकित व्हाल.
पिता लोकांना मेलेल्यांतून उठवितो आणि जीवन देतो. तसेच पुत्रही त्याला, ज्यांना द्यायला पाहिजे, त्यांना जीवन देतो.
याशिवाय, पिता कोणाचाही न्याय करीत नाही. परंतु न्याय करण्याचा सर्व अधिकार पित्याने पुत्राला दिलेला आहे.
देवाने हे अशासाठी केले की, लोक जसा पित्याचा सन्मान करतात, तसा त्यांनी पुत्राचाही करावा. जर कोणी पुत्राचा मान राखीत नाही, तर तो पित्याचाही मान राखीत नाही. पित्यानेच पुत्राला पाठविले आहे.
मी तुम्हांला खरे तेच सांगतो: जो माझे ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकालचे जीवन मिळेल. त्याला दोषी ठरविले जाणार नाही. तर त्याने मरणातून निघून जीवनात प्रवेश केला आहे.
मी तुम्हांला खरे सांगतो. अशी महत्वाची वेळ येत आहे. ती वेळ जवळजवळ आलेलीच आहे. जे लोक पापामध्ये मृत आहेत ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि देवाच्या पुत्राकडून ऐकलेल्या गोष्टी जे लोक स्वीकारतील त्यांना अनंतकाळचे जीवन मिळेल.
खुद्द पित्यापासून (देवापासून) जीवनाचा लाभ होतो. म्हणून पित्याने पुत्रालाही जीवन देण्याची देणगी दिली आहे.
आणि पुत्राने सर्व लोकांचा न्यायनिवाडा करावा असा अधिकार पित्याने पुत्राला दिला आहे. कारण तो पुत्र मनुष्याचाही पुत्र आहे.
तुम्ही याचे आश्चर्य मानू नका. अशी वेळ येत आहे की, सर्व लोक जे मेलेले आहेत व आपल्या कबरेतन आहेत ते त्याची वाणी ऐकतील.
मग ते आपल्या कबरेतून बाहेर येतील. ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात चांगली कामे केली, ते उठतील आणि त्यांना अनंतकाळचे जीवन मिळेल. परंतु ज्या लोकांनी वाइट कामे केली ते शिक्षा भोगण्यासाठी उठतील.
“मी एकटा काहीच करु शकत नाही. मला सांगितल्याप्रमाणेच मी न्याय करतो, म्हणून माझा न्याय योग्य आहे. कारण मी स्वत:च्या समाधानासाठी नाही; परंतु ज्याने मला पाठविले त्याच्या समाधानासाठी न्याय करतो.”
“जर मी स्वत:च माझ्याविषयी लोकांना सांगितले तर लोक त्या गोष्टी मानणार नाहीत.
परंतु लोकांना याविषयी सांगणारा दुसरा एक जण आहे. आणि तो माझ्याविषयी ज्या गोष्टी सांगतो त्या खऱ्या आहेत, हे मला माहीत आहे.”
तुम्ही योहानाकडे काही लोकांना पाठविले आणि सत्याविषयी त्याने तुम्हांला सांगितलेच आहे.
माझ्याविषयी लोकांना सांगण्यास मला कोणाही माणसाची गरज नाही. परंतु तुमचे तारण व्हावे म्हणून मी या गोष्टी तुम्हांला सांगतो.
पेटलेला दिवा प्रकाश देतो, तसाच योहान होता आणि तुम्हांला त्याच्या प्रकाशाकडून काही काळ आनंद मिळाला.”
“परंतु मजजवळ माझ्याविषयी योहानापेक्षाही मोठा पुरावा आहे. जी कामे मी करतो तीच माझा पुरावा आहेत. या गोष्टी माझ्या पित्याने मला करण्यासाठी दिलेल्या आहेत. त्या गेष्टींवरुन हे सिद्ध होते की, पित्याने मला पाठविले आहे.
आणि ज्या पित्याने मला पाठविले त्याने स्वत:ही माझ्याविषयी साक्ष दिलेली आहे. परंतु तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही, तो कसा दिसतो हे तुम्ही कधी पाहिले नाही.
पित्याची शिकवण तुमच्यामध्ये राहात नाही. कारण पित्याने ज्या एकाला तुमच्याकडे पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही,
तुम्ही शास्त्राचा काळजीपूर्वक अभ्यास करता. त्या शास्त्राच्या द्वारे आपल्याला अनंतकाळचे जीवन मिळते, असे तुम्हांला वाटते, तेच शास्त्र माझ्याविषयी सांगते!
तरी तुम्ही अनंतकालचे जीवन मिळण्यासाठी मजकडे येण्यास नकार देता.”
“मला माणसांकडून स्तुति नको.
पण मी तुम्हांला ओळखतो- तुम्हांमध्ये देवाविषयी प्रीति नाही हे मल माहीत आहे.
मी माझ्या पित्यापासून आलो आहे- मी त्याच्यावतीने बोलतो. परंतु तरीही तम्ही मला स्वीकारीत नाही. पण जर दुसरा कोणी मनुष्य फत्त स्वत:विषयी सांगत आला, तर मात्र तुम्ही त्याचे मानाल.
तुम्हांला एकमेकांकडून स्तुति करवून घ्यायला आवडते. परंतु एकाच देवाकडून होणारी स्तुति मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही कधी करीत नाही, मग तुम्ही माझ्यावर कसा काय विश्वास ठेवाल?
मी पित्यासमोर उभा राहून तुम्हांला दोषी ठरवीन असे समजू नका. तुमजे चुकते असे मोशेच तुम्हांला म्हणतो, आणि मोशे आपले तारण करील अशी तुम्हांला आशा आहे.
जर तुम्ही खरोखरच मोशेवर विश्वास ठेवला आहे, तर तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवाल. कारण खुद्य मोशेनेच माझ्याविषयी लिहिले आहे.
परंतु मोशूने जे लिहिले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही, तर मी सांगतो त्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू शकणारच नाही.”
6
नंतर येशू गालील (किंवा तिबिर्या) सरोवराच्या पलीकडे गेला.
तेव्हा पुष्कळ लोक येशूच्या मागे गेले. कारण येशूने अनेक आजारी लोकांना बरे केले. व निरनिराळ्या मार्गांनी आपले जे सामर्थ्य दाखविले ते लोकांनी पाहिले. म्हणून ते त्याच्यामागे गेले.
मग येशू टेकडीच्या वर चढून गेला. तो आपल्या शिष्यांसह तेथे बसला.
त्याच सुमारास यहूदी लाकांचा वल्हांडण सण जवळ आला होता.
येशूने नजर वर करुन पाहिले तो लाकांचा मोठा समुदाय आपणांकडे येताना त्याला दिसला. येशू फिलिप्पाला म्हणाला, “आपण या लोकांना पुरेशा भाकरी कोठून विकत आणाव्या बरे?”
(फिलिप्पची परीक्षा पाहण्यासाठी येशूने त्याला हा प्रश्न विचारला, कारण आपण काय करायचे याचा विचार येशूने अगोदरच करुन ठेवला होता.)
फिलिप्पने उत्तर दिले, “येथील प्रत्येकाला थोडी थोडी भाकर दिली तरी या सर्वांना पुरेशा भाकर विकत घेण्यासाठी आपणा सर्वांना महिनाभर काम करावे लागेल.”
आंद्रिया नावाचा दुसरा एक शिष्य तेथे होता. आंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ होता.
आंद्रिया म्हणाला, “येथे असलेल्या एका लहान मुलाजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन लहान मासे आहेत. परंतु इतक्या लोकांना त्या पुरणार नाहीत.”
येशू म्हणाला, “लोकांना खाली बसण्यास सांगा.” ती बरीच गवताळ अशी जागा होती. तेथे खाली बसलेले सुमारे पाच हजार पुरुष होते.
मग येशूने त्या भाकरी हातात घेतल्या; येशूने भाकरीबद्दल देवाचे उपकार मानले आणि त्या तेथे बसलेल्या लोकांना दिल्या. मासे घेऊन त्याने तसेच केले. येशूने लोकांना पाहिजे तितके खाऊ दिले.
सर्व लोकांना खाण्यासाठी भरपूर होते. जेवण झाल्यावर येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “लोकांनी खाऊन उरलेले भाकरींचे व माशांचे तुकडे गोळा करा. काहीही वाया जाऊ देऊ नका.”
म्हणून शिष्यांनी उरलेले तुकडे जमा केले. लोकांनी जेवायाला सुरुवात केली, तेव्हा जवाच्या फत्त पाच भाकरी तेथे होत्या. शिष्यांनी उरलेल्या तुकडचांच्या बारा टोपल्या भरल्या.
येशूने केलेला हा चमत्कार लोकांनी पाहिला, तेव्हा ते म्हणाले, “जगात येणारा संदेष्टा तो खरोखर हाच असला पाहिजे.”
आपण राजा बनावे असे लोकांला वाटते हे येशूला माहीत होते. येशूला आपला राजा करावे असा बेत लोकांनी केला. तेव्हा येशू तेथून निघून एकटाच डोंगराळ भागात गेला.
त्या संध्याकाळी येशूचे शिष्य (गालील) सरोवराकडे गेले.
शिष्य एका नावेत बसून सरोवरापलीकडील कफर्णहूम नगराकडे निघाले. आता अंधार पडला होता आणि येशू अजून त्यांच्याकडे आलेला नव्हता.
वारा फारच जोराने वाहत होता आणि सेरोवरात मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या होत्या.
त्यांनी नाव तीन ते चार मैल वल्हवीत नेली तेव्हा त्यांना येशू नावेकडे येताना दिसला. तो सरोवराच्या पाण्यावरुन चालत होता, तो नावेकडेच येत होता. तेव्हा शिष्य घाबरले.
परंतु येशू त्यांना म्हणाला. “मी आहे, भिऊ नका.”
येशू असे बोलल्यावर त्यांनी आनंदोने येशूला नावेत घेतले. आणि त्यांना जायचे होते त्या ठिकाणी नाव लगेच येऊन काठाला लागली.
दुसरा दिवस उजाडला. काही लोक सरोवराच्या दुसऱ्या काठावर राहिले होते. त्या लोकांना माहीत होते की, येशू शिष्यांबरोबर नावेतून गेलेला नव्हता, त्यांना समजले की, येशूचे शिष्य नावेत बसून निघून गेलेत आणि तेथे असलेली तेवढीच एक नाव होती हेही त्यांना ठाऊक होते.
पण मग तिबिर्याहून आणखी काही नावा आल्या. आदल्या दिवशी ज्या ठिकाणी लोकांनी अन्न खाल्ले त्या ठिकाणी त्या नावा येऊन काठाला लागल्या. प्रभू येशूने देवाचे उपकार मानल्यावर लोकांनी भाकरी खाल्ल्या तीच ही जागा होती.
आता येशू किंवा त्याचे शिष्य तेथे नाहीत हे लोकांनी पाहिले. म्हणून लोक नावांमध्ये बसले आणि कफर्णहूमला गेले. त्यांना येशूला शोधायचे होते.
लोकांना येशू सरोवराच्या दुसऱ्या काठावर भेटला. लोक म्हणाले, “गुरुजी, तुम्ही इकडे कधी आलात?”
येशूने उत्तर दिले, “तुम्ही माझा शोध का करता? माझे सामर्थ्य सिद्ध करणारे चमत्कार पाहिले म्हणून तुम्ही माझा शोध करता का? मी तुम्हांस खरे सांगतो, तुम्ही मला शोधता, कारण तुम्ही भाकरी खाल्या आणि तुमची तृप्ती झाली.
ऐहिक अन्न नाश पावते. म्हणून नाश पावणाऱ्या अन्नासाठी कष्ट करु नका. परंतु जे अन्न कायम टिकते आणि अनंतकाळचे जीवन देते, अशा अन्नासाठी तुम्ही कष्ट करा. मनुष्याचा पुत्र ते अन्न तुम्हांला देईल. देव जो पिता याने दाखवून दिले आहे की, तो मनुष्याच्या पुत्राबरोबर आहे.
लोकांनी येशूला विचारले, “आम्ही कोणत्या गोष्टी कराव्यात अशी देवाची इच्छा आहे?”
येशूने उत्तर दिले, “तुम्ही जे काम करावे अशी देवाची इच्छा आहे, ते हेच की, देवाने ज्याला पाठविले, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”
मग लोक येशूला म्हणाले, “देवाने तुम्हांलाच पाठविले आहे हे पटविण्यासाठी तुम्ही कोणता चमत्कार कराल? तुम्हांला एखादा चमत्कार करताना जर आम्ही पाहिले तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू. तुम्ही काय कराल?
अरण्यात आमच्या पूर्वजांनी देवाने दिलेला मान्ना खाल्ला. पावित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, देवाने त्यांना स्वर्गातील भाकर खायाला दिली.”
येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो. मोशेने तुमच्या लोकांना स्वर्गातील भाकर दिली नाही. माझा पिता तुम्हांला खरी स्वर्गीय भाकर देतो.
देवाची भाकर कोणती? देवाची भाकर म्हणजे जो स्वर्गातून खाली उतरतो आणि जगाला जीवन देतो, तोच ती भाकर.”
ते लोक येशूला म्हणाले, “महाराज, आम्हांला हीच भाकर नेहमी द्या.”
मग येशू म्हणाला. “मीच ती जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.
मी तुम्हांला पूर्वीच सांगितले की, तुम्ही मला पाहिले, तरीही विश्वास ठेवीत नाही.
पिता माझे लोक मला देतो. त्यातील प्रत्येकजण माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रत्याकाला मी स्वीकारीन.
मी स्वर्गातून खाली आलो, ते नेहमीच देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. मला पाहिजे ते करायला मी आलो नाही.
देवाने मला दिलेल्या लोकांपैकी एकालाही मी गमवू नये. परंतु त्या सर्वांना मी शेवटच्या दिवशी जिवंत असे उठवायला हवे. ज्याने मला पाठविले त्याची मी हेच करावे अशी इच्छ आहे.
पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्थेक व्यक्तीला अनंतकाळचे जीवन आहे. मी त्या व्यक्तीला शेवटच्या दिवशी उठवीन, हेच माझ्या पित्याल हवे.”
मग यहुदी लोक येशूविरुद्द कुरकुर करु लागले. कारण “स्वर्गातून खाली आलेली भाकर मी आहे” असे तो म्हणाला.
यहूदी लोक म्हणाला, “हा येशू आहे. आपण त्याच्या आईवडिलांना ओळखतो. येशू तर योसेफाचाच पुत्र आहे. ‘मी स्वर्गातून खाली आलो आहे’ असे तो कसे काय म्हणू शकतो?”
पण येशूने उत्तर दिले, “आपापसात कुरकूर करु नका.
पित्यानेच मला पाठिले आहे. पिताच लोकांना माझ्याकडे पाठवितो, त्या लोकांना मी शेवटच्या दिवशी परत उठवीन. पित्याने जर एखाद्या व्यक्तीला आकर्षित केले नाही, तर ती व्यक्ति माझ्याकडे येऊ शकत नाही.
संदेष्टयांनी असे लिहिले आहे की, ‘देव सर्व लोकांना शिक्षण देईल.’ लोक देवाचे ऐकतात आणि त्याच्याकडून शिक्षण घेतात, तेच लोक माझ्याकडे वळतात.
देवाने ज्याला पाठिले त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणीही देवाला पाहिले नाही. फक्त त्यानेच देवाला पाहिले आहे.
मी तुम्हांला खरे तेच सांगतो, “जो विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळाले आहे.
मी जीवन देणारी भाकर आहे.
तुमच्या वाडवडिलांनी अरण्यांत असताना देवाने दिलेला मान्ना खाल्ला. परंतु इतर सर्व लोकांप्रमाणेच ते मरण पावले.
जी स्वर्गातून उतरते ती भाकर मी आहे. जर ही भाकर कोणी खाईल तर तो कधीच मरणार नाही.
स्वर्गातून खाली उतरलेली जिवंत भाकर मी आहे. जर कोणी ती भाकर खाईल तर तो अनंतकाळासाठी जिवंत राहील. आणि ती भाकर म्हणजे माझे शरीर आहे. जगातील लोकांना जीवन मिळावे मी माझे शरीर देईन.”
नंतर यहुदी आपापसात वाद घालू लागले. ते म्हणाले, “हा मनुष्य आपले स्वत:चे शरीर आम्हांला कसे काय खायला देऊ शकेल?”
येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे शरीर खाल्ले पाहिजे आणि त्याचे रक्त प्याले पाहिजे. जर तुम्ही हे करणार नाही, तर तुमच्यात खरे जीवन नाही.
जो कोणी माझे शरीर खातो आणि माझे रक्त पितो, त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल. शेवटच्या दिवशी मी त्याला उठवीन.
माझे शरीर खरे अन्न आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे.
जो माझे शरीर खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो.
पित्याने मला पाठविले. तो जिवंत आहे आणि पित्यामुळे मीही जगतो. म्हणून जो कोणी मला खातो तो माझ्यामुळे जिवंत राहील.
आपल्या वाडवडिलांनी अरण्यांत जी भाकर खाल्ली, त्या भाकरीसारखा मी नाही. त्यांनी ती भाकर खाल्ली परंतु इतर सर्व लोकांप्रमाणेच ते मरुन गेले. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. जो कोणी ही भाकर खाते तो अनंतकाळ जगेल.”
कफर्णहूम नगरातील सभास्थानात शिक्षण देताना येशूने या सर्व गोष्टी सांगितल्या.
येशूच्या शिष्यांनी हे ऐकले, त्यांपैकी अनेकजण म्हणाले, “हे शिक्षण स्वीकारण्यास फार कठीण आहे. कोण हे शिक्षण मान्य करील?”
आपले शिष्य याविषयी कुरकूर करीत आहेत, हे येशूने ओळखले. म्हणून तो त्यांना म्हणाला. “ही शिकवण तुम्हांला त्रासदायक वाटेल काय?
तर मग मनुष्याचा पुत्र जेथून आला तेथे परत जाताना पाहून तुम्हांला तसेच त्रासदायक वाटेल काय?
शरीराद्दरे मनुष्याला जीवन मिळत नाही. परंतु आत्म्याकडून ते जीवन मिळते. मी तुम्हांला सांगितलेल्या गोष्टी आत्म्याविषयी आहेत, म्हणूनच या गोष्टीपासून जीवन मिळते.
परंतु तुमच्यातील काहीजण विश्वास ठेवीत नाहीत.’ जे लोक विश्वास ठेवीत नव्हते, ते येशूला माहीत होते. येशूला हे अगदी सुरुवातीपासूनच माहीत होते. आणि जो मनुष्य त्याचा विश्वासघात करणार होता, तोही त्याला माहित होता.
येशू म्हणाला, “म्हणूच मी तुम्हांला म्हटले की, जर पिता एखाघा व्यक्तीला माझ्याकडे येऊ देत नसेल तर ती व्यरक्ती येणारच नाही.”
येशूने हे सर्व सांगितल्यावर त्याच्या शिष्यांपैकी बरेच जण त्याल सोडून गेले; येशूच्या मागे जाण्याचे त्यांनी सोडून दिले.
नंतर येशूने आपल्या बारा शिष्यांना विचारले, “तुम्हांलासुद्धा मला सोडून जावेसे वाटते काय?”
शिमोन पेत्राने उत्तर दिले, “प्रभुजी आम्ही कोठे जाणार? अनंतकलच्या जीवनाची वचने तर तुमच्याजवळ आहेत.
आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. तुम्ही पवित्र व्यक्ति आहात हे आम्हांला माहीत आहे.”
मग येशूने उत्तर दिले, “तुम्हा बारा जणांना मी निवडले. पण तुमच्यातील एक सैतान आहे.”
शिमोन इस्कर्योत याचा मुलगा यहूदा याच्याविषयी येशू बोलत होता. यहूदा बारा शिष्यांपैकी एक होता. परंतु पुढे हाच यहूदा येशूच्या विरुद्ध उठणार होता.
7
यानंतर येशू गालील प्रांतात फिरला. येशूला यहूदीया प्रांतातूल प्रवास करायला नको होता, कारण तेथील काही यहूदी लोकांना येशूला जिवे मारायचे होते.
यहूदी लोकांचा मंडपाचा सण जवळ आला होता.
म्हणून येशूचे भाऊ त्याला म्हणाले, “तू येथून सणासाठी यहूदीयात जा. म्हणजे तू करतोस ते चमत्कार तेथे तुझे शिष्य पाहू शकतील.
लोकांना माहिती व्हावी असे एखाघाला वाटत असेल तर त्याने तो करतो ती कामे लपवू नयेत. तू जगाला प्रगट हो. तू जे चमत्कार करतोस ते त्यांना पाहू दे.”
येशूच्या भावांनीसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.
येशू आपल्या भावांना म्हणाला. ‘माझी योग्य वेळ अजून आलेली नाही. पण तुम्ही जाण्यासाठी मात्र कोणतीही वेळ योग्य असेल.
जग तुमचा द्वेष करु शकत नाही. परंतु जग माझा द्वेष करते. कारण जगातील लोक वाईट कामे करतात हे मी त्यांना सांगातो.
तेव्ह तुम्ही सणासाठी जा. मी आत्ताच सणाला येणार नाही. माझी योग्य वेळ अजून आली नाही.”
हे सांगितल्यानंतर येशू गालीलातच राहिला.
म्हणून येशूचे भाऊ सणासाठी तेथून निघून गेले. ते गेल्यावर मग येशूही गेला. परंतु येशूने हे लोकांना उघडपणे दाखविले नाही.
सणाच्या काळात यहूदी लोक येशूचा शोध करीत होते. यहूदी म्हणाले, “तो मनुष्य कोठे आहे?”
लोकांचा मोठा जमाव त्या ठिकाणी जमा झालेला होता. त्यांतील अनेक लोक येशूविषयी आपसांत बोलत होते. काही म्हणाले, “तो चांगला मनुष्य आहे.” परंतु दुसरे काहीजण म्हणाले, “नाही, तो लोकांना ठकवितो.”
परंतु लोकांपैकी कोणीच येशूविषयी उघडपणे बोलायला धजत नव्हते. लोकांन यहूदी पुढाऱ्यांची भीति वाटत होती.
अर्धअधिक सण पार पडला होता तेव्हा येशू मंदिरात गेला आणि तेथे लोकांना शिक्षण देण्यास त्याने सुरुवात केली.
यहूदी लोकांना मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, “हा माणूस शाळेत कधी शिकला नाही. हे एकढे तो कोठून शिकला?”
येशूने उत्तर दिले, “मी ज्या गोष्टी शिकवितो त्या माझ्या स्वत:च्या नाहीत. माझी शिकवण मला पाठविणाऱ्या पित्याकडून आलेली आहे.
जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो त्याला माझी शिकवण देवाकडून आहे हे कळेल. त्याला हे कळेल की, माझी शिकवण माझी स्वत:ची नाही.
जो कोणी स्वत:च्या कल्पना शिकवितो, तो स्वत:ला मानसन्मान मिळावा असा प्रयत्न करतो, परंतु ज्याने मला पाठविले त्याचा सन्मान करण्याचा जो प्रयत्न करतो तोच माणूस सत्य सांगतो. त्याचे काहीच खोटे नसते.
मोशेने तुम्हांला नियमशास्त्र दिले. खरे ना? परंतु तुमच्यातील कोणी नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही का बरे मला जिवे मारायला पाहता?”
लोकांनी उत्तर दिले. “तुम्हांला भूत लागले आहे. आम्ही काही तुम्हांला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत नाही.”
येशू त्यांना म्हणाला, “मी एक चमत्कार केला आणि तुम्ही सारे चकित झालात.
मोशेने तुम्हांला सुंतेचा नियम दिला. परंतु खरे पाहता सुंता मोशेपासून आलेली नाही. ती मोशेच्या आधीच आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे. म्हणून कधी कधी शब्बाथ दिवशीही तुम्ही मुलांची सुंता करता.
याचा अर्थ मोशेच्या नियमांचे पालन करण्यासाठी शब्बाथ दिवशीही बालकाची सुंता करता येते. मग मी शब्बाथ दिवशी एका माणसाचे संपूर्ण शरीर बरे केले तर तुम्ही माझ्यावर का रागावता?
वरवर पाहून न्याय करु नका. तर खरोखर काय बरोबर आहे याची कसून शहानिशा करुन योग्य प्रकारे न्याय करा.”
मग यरुशलेमात राहणारे काही लोक म्हणाले, “याच माणसाला लोक जिवे मारण्याच्या प्रयत्नात आहेत.
परंतु सर्व लोक आपल्याला पाहू आणि ऐकू शकतील अशा ठिकाणी हा शिक्षण देत आहे. आणि शिक्षण देताना त्याला थांबविण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही. कदाचित हा खरोखरच ख्रिस्त आहे असे पुढारी लोकांनी ठरविले असेल.
परंतु हा माणूस कोठून आला आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि खरोखरचा ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठून येईल हे कोणालाच कळणार नाही.’
अजूनही येशू मंदिरात शिक्षण देत होता. येशू म्हणाला, “होय, तुम्ही मला ओळखता आणि मी कोठला हेही तुम्हांला माहीत आहे. परंतु मी स्वत:च्या अधिकाराने आलो नाही. जो खरा देव आहे त्याने मला पाठविले. तुम्ही त्याला ओळखीत नाही.
पण मी त्याला ओळखतो. मी त्याच्याकडून आलो आणि त्यानेच मला पाठविले.”
येशू हे बोलला तेव्हा लोकांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही त्याला धरु शकला नाही, कारण त्याला मारले जाण्याची वेळ अजून आली नव्हती.
1परंतु लोकांपैकी पुष्कळ जणांनी येशूवर विश्वास ठेवला. लोक म्हणाले, “आम्ही ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहोत. ख्रिस्त आला तर या मनुष्याने केले त्याहून जास्त चमत्कार तो करुन दाखवील काय? नाही! म्हणून हाच ख्रिस्त असला पाहिजे.”
लोक येशूविषयी जे बोलत होते ते परुश्यांनी ऐकले. म्हणून मुख्य याजक आणि परुशी यांनी येशूला अटक करण्यासाठी मंदिराचे शिपाई पाठविले.
मग येशू म्हणाला, “मी तुम्हा लोकांबरोबर आणखी थोडा काळ राहीन. नंतर ज्याने मला पाठविले, त्याच्याकडे मी परत जाईन.
तुम्ही माझा शोध कराल पण मी तुम्हांला सापडणार नाही.”
यहूदी आपापसात म्हणाले, “हा माणूस असा कोठे जाणार आहे की जेथे आपण त्याला शोधू शकणार नाही? ग्रीक शहरात राहणाऱ्या यहूदी लोकांकडे हा जाईल काय? तो तेथील ग्रीक लोकांना शिक्षण देईल काय?
हा माणूस म्हणतो, ‘तुम्ही माझा शोध कराल परंतु मी तुम्हांला सापडणार नाही.’ तो असेही म्हणतो, ‘जेथे मी आहे तेथे तुम्ही येऊ शकत नाही.’ याचा अर्थ काय?”
सणाचा शेवटचा दिवस आला. तो फार महत्वाचा दिवस होता. त्या दिवशी उभे राहून येशू मोठयाने म्हणाला, “ज्याला तहान लागली असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.
जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवील तर त्याच्या अंत:करणातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” असे पवित्र शास्त्र सांगते.
येशू आत्म्याविषयी बोलत होता. लोकांना अजून पवित्र आत्मा देण्यात आला नव्हता. कारण येशू अजून मरण पावला नव्हता आणि गौरवात उठविला गेला नव्हता. परंतु नंतर येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तो मिळणार होता.
येशूने सांगितलेल्या या गोष्टी लोकांनी ऐकल्या. काही लोक म्हणाले, “हा माणूस खरोखरच संदेष्टा आहे.
दुसरे म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.” तर दुसरे काहीजण म्हणाले, “ख्रिस्त हा गालील प्रांतातून येणार नाही.”
पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की, “ख्रिस्त दावीद राजाच्या घराण्यातून येईल.”
आणि पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की, “दावीद राजा राहत असे त्या बेथलहेम गावातून ख्रिस्त येईल.” तेव्हा येशूमुळे लोकांचे एकमत होईना.
काहींना येशूला अटक करायचे होते पण तसा प्रयत्न कोणीच केला नाही.
मदिराचे शिपाई मुख्य याजकांकडे आणि परुश्यांकडे परत गेले. मुख्य याजकांनी व परुश्यांनी शिपायांना विचारले, “तुम्ही येशूला का आणले नाही?”
मंदिराचे शिपाई म्हणाल, “तो बोलतो त्या गोष्टी कोणत्याही मानवी शब्दांपेक्षा महान आहेत!”
मग परुशी म्हणाले, “म्हणजे येशूने तुम्हांलासुद्धा मूर्ख बनविले!
पुढाऱ्यांपैकी एकाने तरी येशूवर विश्वास ठेवला का? नाही! आम्हा परुश्यांपैकी एकाने तरी त्याच्यावर विश्वास ठेवला का? नाही!
परंतु बाहेरच्या लोकांना नियसशास्त्राची माहिती नाही, त्यांच्यावर देवाचा कोप होईल!”
परंतु त्या घोळक्यात निकदेम हजार होता. यापूर्वी हा निकदेमच येशूला भेटायला आला होता निकदेम म्हणाला.
“एखघा माणसाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय त्याला आपल्या नियसशास्त्राप्रमाणे दोषी ठरवता येत नाही.” त्याने काय केले हे कळल्याशिवाय आपण त्याचा न्याय करु शकत नाही.”
यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “तू सुद्धा गलील प्रांतामधील आहेस काय? पवित्र शास्त्र वाचून पाहा! गालीलातून एकही संदेष्टा येणार नाही. हे तुला कळेल.”
नंतर ते सर्व यहूदी पुढारी आपापल्या घरी गेले.
8
येशू जैतुनाच्या डोंगरावर निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच येशू परत मंदिरात गेला. सर्व लोक येशूकडे आले. येशू बसला आणि त्याने लोकांना शिक्षण दिले.
नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी एका स्त्रीला घेऊन तेथे आले. त्या स्त्रीला व्यभिचाराचे पाप करताना पकडले होते. या यहूदी लोकांनी त्या स्त्रीला बळजबरीने लोकांपुढे उभे केले.
ते येशूला म्हणाले ‘गुरूजी, जो हिचा नवरा नाही, अशा माणसाशी व्यभिचार करताना ह्या स्त्रीला पकडले.
मोशेच्या नियमशस्त्रात अशी आज्ञा दिलेली आहे की, असे कर्म करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आम्ही धोंडमार करुन जिवे मारले पाहिजे. आम्ही काय करावे असे तुमचे मत आहे?”
येशूला पेचात पकडावे म्हणून यहूदी लोकांनी हा प्रश्न विचारला होता. काही तरी चुकीचे बोलताना येशूला धरावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे मग त्यांना येशूवर आरोप ठेवता आला असता. पण येशूने गुडघे टेकले व आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला.
हूदी पुढारी येशूला प्रश्न विचारीतच राहिले, म्हणून येशू मान वर करुन त्यांच्याकडे पाहत म्हणाला, “ज्याने कधीच पाप केले नाही असा एकतरी मनुष्य येथे आहे काय? निष्पाप मनुष्य या स्त्रीवर पहिला दगड फेकू शकतो.”
मग येशूने पुन्हा गुडघे टेकले व जमिनीवर लिहू लागला.
येशूचे हे शब्द ज्या लोकांनी ऐकले, ते एक एक करुन निघून जाऊ लागले. जे वयस्कर होते ते अगोदर गेले. मग इतर लोक गेले. येशू एकटाच त्या स्त्रीसह तेथे राहिला होता. ती त्याच्यासमोर उभी होती.
येशूने पुन्हा वर पाहिले आणि तिला विचारले, “बाई, ते सर्व लोक निघून गेले आहेत, त्यातील एकानेही तुला दोषी ठरविले नाही काय?”
त्या स्त्रीने उत्तर दिले. ‘महाराज, मला कोणीही दोषी ठरविले नाही.’ मग येशू म्हणाला, ‘मग मीही तुझा न्याय करीत नाही. आता तू जाऊ शकतेस, पण परत पाप करु नकोस.’ ------------------------------- (वचने 7:53 ते 8:11 अति जुन्या व उत्तम ग्रीक प्रतीमध्ये ही वचने नाहीत)
नंतर येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे, जो माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात राहणार नाही. त्या माणसाजवळ जीवन देणारा प्रकाश राहील.”
परंतु परुशी लोक येशूला म्हणाले, “जेव्हा तुम्ही स्वत: आपल्याविषयी बोलता, तेव्हा ह्या गोष्टी खऱ्या आहेत असे म्हणणारे तुम्ही एकटेच असता. तेव्हा तुम्ही सांगता त्या गोष्टी आम्ही स्वीकारु शकत नाही.”
येशूने उत्तर दिले, “होय, मी स्वत:च माझ्याविषयी हा गोष्टी सांगत आहे. परंतु मी सांगतो त्या गोष्टीवर लोक विश्वास ठेवू शकतील. कारण मी कोठून आलो हे मला माहीत आहे व कोठे जाणार हे मला माहीत आहे. मी तुमच्यासारखा नाही. मी कोठून आलो व कोठे जाणार हे तुम्हांला माहीत नाही.
तुम्ही एखाद्याचा न्याय करता तसाच माझाही करता. मी कोणाचा न्याय करीत नाही.
पण जर मी न्याय केला तर त्यात माझा न्याय खरा असतो. कारण जेव्हा मी न्याय करतो तेव्हा मी एकटा नसतो. ज्या पित्याने मला पाठविले, तो माझ्याबरोबर असतो.
तुमचे स्वत:चेच नियमशास्त्र असे म्हणते की, दोन साक्षीदार एकाच गोष्टीविषयी साक्ष देतात तेव्हा ते काय म्हणतात, ते तुम्हांला स्वीकारावेच लागते.
स्वत:विषयी बोलणाऱ्या दोघा साक्षीदारांपैकी मी एक साक्षीदार आहे. आणि ज्या पित्याने मला पाठविले, तो दुसरा साक्षीदार आहे.”
लोकांनी येशूला विचारले, “तुमचा पिता कोठे आहे.?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला अगर माझ्या पित्याला ओळखत नाही. जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.”
येशू मांदिरात शिक्षण देत असता या गोष्टी बोलला. ज्या पेटीत लोक पैसे टाकीत त्या पेटीजवळच तो होता. परंतु येशूला कोणी अटक केली (पकडले) नाही. कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती.
येशू पुन्हा लोकांना म्हणाला, “मी लवकरच तुम्हांला सोडून जाईन. तुम्ही माझा शोध कराल, परंतु तुम्ही आपल्या पापात मराल. मी जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही.”
म्हणून यहूदी लोक एकमेकांस विचारु लागले. “येशू स्वत:ला ठार करणार नाही ना? यासाठी तो असे म्हणाला का, ‘की मी जाणार आहे, तिकडे तुम्ही येऊ शकणार नाही?’
पण येशू म्हणाला, “तुम्ही लोक येथील खालचे आहात. पण मी वरचा आहे. तुम्ही या जगाचे आहा; परंतु मी या जगाचा नाही.
तुम्ही आपल्या पापात मराल असे मी म्हणालो, होय. ‘मी आहे’ यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही, तर तुम्ही पापात मराल.”
यहूदी लोकांनी विचारले. “मग तुम्ही कोण आहात?” येशूने उत्तर दिले, “मी सुरुवातीपासून तुम्हांला सांगत आलो तोच मी आहे.
तुमच्याविषयी बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत. मी तुमचा न्याय करु शकतो. परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडून ऐकलेल्या गोष्टीच मी लोकांना सांगतो. आणि तो सत्य सांगतो.”
येशू कोणाविषयी बोलत आहे, हे लोकांना समजेना. येशू त्यांन पित्याविषयी सांगत होता.
म्हणून येशू लोकांना म्हणाला. “तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल (वधस्तंभावर ठार माराल). मग तो मी आहे हे समजू शकाल. मी ज्या गोष्टी करतो त्या माझ्या स्वत:च्या अधिकारात करीत नाही, हे तुम्हांला समजेल. तुम्हांला समजेल की, ज्या गोष्टी मला पित्याने शिकविल्या त्याच गोष्टीविषयी मी बोलतो.
ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे. त्याला ज्यामुळे संतोष होतो तेच मी नेहमी करतो. म्हणून त्याने मला एकटे सोडले नाही.”
येशू या गोष्टी बोलत असता अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, त्या यहूदी लोकांना तो म्हणाला, “तुम्ही जर नेहमी माझ्या शिकवणुकीचे पालन कराल, तरच तुम्ही माझे खरे शिष्य आहात.
मग सत्य काय आहे हे तुम्हांला समजेल. आणि सत्य तुम्हांला मोकळे करील.”
यहूदी लोकांनी उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे लोक आहोत आणि आम्ही कधीच गुलाम नव्हतो तर आम्ही मोकळे होऊ असे तुम्ही का म्हणता?”
येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो, जो प्रत्येक पाप करतो तो गुलाम आहे. पाप त्याचा मालक आहे.
गुलाम कुटुंबात कायमचा राहत नाही. परंतु पुत्र कायमचा आपल्या कुटुंबात राहतो.
म्हणून जर पुत्र तुमजी सुटका करतो, तर तुम्ही खरोखरच मोकळे व्हाल.
तुम्ही अब्राहामाचे लोक आहात हे मला माहीत आहे. परंतु तुम्ही मला जिवे मारावयास टपलेले आहात. कारण तुम्हांला माझे शिक्षण स्वीकारायला नको आहे.
माझ्या पित्याने जे काही मला दाखवून दिले, तेच मी तुम्हांला सांगत आहे. परंतु तुमच्या पित्याने तुम्हांला सांगितले तेच तुम्ही करता.”
यहूदी लोकांनी उत्तर दिले. “आमचा पिता अब्राहाम आहे.” येशू म्हणाला, “तुम्ही जर खरोखरच अब्राहामाची संतति असता तर अब्राहामाने केल्या त्याच गोष्टी तुम्ही केल्या असत्या.
देवाकडून जे सत्य ऐकले ते तुम्हांला सांगणारा मी एक मनुष्य आहे. परंतु तुम्ही मला जिवे मारायला पाहता. अब्राहामाने तसे केले नाही.
पण अब्राहामाने जे केले नाही ते तुम्ही करता याचा अर्थ तुम्ही त्याची मुले नाहीत तर तुमचा पिता अब्राहाम नसून कोणी वेगळा आहे.” परंतु यहूदी म्हणाले, “ज्या मुलांना आपला पिता कोण आहे ते माहीत नाही त्यांच्यासारखे आम्ही नाही! देव आमचा पिता आहे. तोच एक आमचा पिता आहे.”
येशू त्या यहूदी लोकांना म्हणाला, “जर देव खरोखरच तुमचा पिता असता, तर तुम्ही माझ्यावर प्रीति केली असती. मी पित्याकडून आलो आणि आता मी येथे आहे. मी माझ्या स्वत:च्या अधिकारात आलो नाही. देवानेच मला पाठिले.
मी म्हणतो, मी देत असलेली शिकवण तुम्हांला समजत नाही का? कारण की तुम्हांला माझी शिकवण स्वीकारता येत नाही.
तुमचा पिता सैतान आहे. तुम्ही त्याचे आहात, त्याला करायला पाहिजे तेच तुम्ही करता. सैतान सुरुनातीपासूनच खुनी आहे. सैतान सत्याच्या विरूद्ध आहे. आणि सैतानाच्या ठायी सत्य नाही. तो सांगतो त्या लबाड्याप्रमाणेच तो आहे. सैतान लबाड आहे. आणि तो असत्याचा पिता आहे.
मी सत्य बोलतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवित नाही.
मी एखाद्या पापाविषयी दोषी आहे असे तुमच्यातील कोणी सिद्ध करु शकेल काय? जर मी सत्य सांगतो तर तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवीत नाही?
जो देवाचा आहे, तो देवाचे म्हणणे ऐकतो. परंतु तुम्ही देवाचे म्हणणे ऐकत नाही. कारण तुम्ही देवाचे लोक नाहीत.”
यहूदी म्हणाले, “तुम्ही शोमरोनी आहात, तुम्हांला भूताने पछाडले आहे, असे आम्ही म्हणालो तर आम्ही म्हणतो तेच बरोबर नाही काय?”
येशूने उत्तर दिले. “मला भूत लागले नाही, मी तर आपल्या पित्याचा मान राखतो. परंतु तुम्ही माझा मान राखीत नाही.
स्वत:ला सन्मान मिळविण्याचा प्रयत्न मी करीत नाही. माझा सन्मान व्हावा असे एकाला (देवाला) वाटते. तोच न्यायाधीश आहे.
मी तुम्हांला खरे तेच सांगतो. जो कोणी माझ्या शिक्षणाचे पालन करतो तो कधीही मरणार नाही.
यहूदी लोक म्हणाले, “तुमच्यात खरोखर भूत संचारले आहे. हे आता आम्हांला माहीत झाले. अब्राहाम आणि संदेष्टे मेले. परंतु तुम्ही म्हणता, ‘जो माझ्या शिकवणूकीचे पालन करतो तो कधीच मरणार नाही.’
तुम्ही आमचा पिता अब्राहाम याच्यापेक्षाही थोर आहात असे तुम्हांला वाटते काय? अब्राहाम मेला, तसेच संदेष्टेही मेले. तुम्ही स्वत:ला समजता तरी कोण?”
येशूने उत्तर दिले, “जर मी स्वत:च स्वत:चा सन्मान केला तर त्या सन्मानाला काहीच अर्थ नाही. माझा पिता माझा सन्मान करतो. तो आमचा देव आहे असे तुम्ही म्हणता.
परंतु तुम्ही खरोखर त्याला ओळखीत नाही. पण मी त्याला ओळखतो. तो सांगतो त्याचे पालन मी करतो. मी त्याला ओळखीत नाही असे जर मी म्हणालो, तर तुम्ही लबाड आहात तसा मीही लबाड ठरेन. परंतु मी त्याला नक्कीच ओळखतो. आणि तो जे काही सांगतो त्याचे पालन करतो.
माझ्या येण्याचा दिवस पाहण्याच्या आशेने तुमचा पिता अब्राहाम आनंदित झाला होता. त्याने तो दिवास पाहिला आणि त्याला आनंद झाला.”
यहूदी लोक येशूला म्हणाले. “तुम्ही अब्राहामाला कधीच पाहिले नाही. तुम्ही पन्नास वर्षांचेही नाही!”
येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो: अब्राहामाच्या जन्मापूर्वि पासून मी आहे.”
जेन्हा येशू असे बोलला तेव्हा लोकांनी त्याला मारण्यासाठी दगड उचलले. पण येशू गुप्त झाला आणि नंतर मंदिरात निघून गेला.
9
येशू चालला असताना त्याने एक आंधळा मनुष्य पाहिला. हा मनुष्य त्याच्या जन्मापासून आंधळा होता.
येशूच्या शिष्यांनी त्याला विचारले, “गुरुजी, हा मनुष्य आंधळा जन्मला. परंतु तो कोणाच्या पापामुळे आंधळा जन्मला? त्याच्या स्वत:च्या का त्याच्या आईवडिलांच्या पापामुळे?”
येशूने उत्तर दिले, “त्याच्या स्वत:च्या पापामुळे अगर त्याच्या आईवडीलांच्या पापामुळे हा आंधळा झाला नाही. मी याला बरे करताना लोकांना देवाचे सामर्थ्य दाखविता यावे म्हणून हा आंधळा जन्मला.
दिवस आहे तोपर्यंत, ज्याने मला पाठविले त्याचे काम आपण करीत राहिले पाहिजे. रात्र येत आहे आणि रात्री कोणी काम करु शकत नाही.
मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”
असे बोलल्यानंतर, येशू मातीवर थुंकला. त्याने त्या थुंकीने चिखल केला, आणि त्या चिखलाचा गोळा करुन त्याने त्या माणसाच्या डोळ्यांवर ठेवला.
मग येशूने त्या मनुष्याला सांगितले, “जाऊन शिलोह तळ्यात डोळे धू.” (शिलोह म्हणजे पाठविलेला) म्हणूने तो मनुष्य त्या तळ्यापाशी गेला. त्याने डोळे धुतले आणि तो परत आला, तेव्हा त्याला चांगले दिसू लागले होते.
काही लोकांनी त्याला भीक मागताना पूर्वी पाहिले होते. ही माणसे आणि त्याचे शेजारी म्हणाले, “पाहा! येथे बसून भीक मागत असे तो मनुष्य हाच आहे ना?”
लोकांनी विचारले, “अरे असे घडले तरी काय? तुला कसे दिसू लागले?”
त्या मनुष्याने उत्तर दिले. “लोक ज्याला येशू म्हणतात त्याने थोडा चिखल केला. त्याने तो चिखल माझ्या डोळ्यांवर लावला. मग येशूने मला शिलोह तळ्याकडे जाऊन धुण्यास सांगितले. म्हणून मी शिलोह तळ्यावर जाऊन डोळे धुतले. आणि मग मला दिसू लागले.”
लोकांनी त्या मनुष्याला विचारले, “तो मनुष्य कोठे आहे?” त्या मनुष्याने उत्तर दिले, “मला माहीत नाही.”
मग लोकांनी परुशी लोकांकडे त्या मनुष्याला नेले. हाच पूर्वी आंधळा मनुष्य होता.
येशूने चिखल करुन त्या मनुष्याचे डोळे बरे केले होते. ज्या दिवशी येशूने हे केले तो शब्बाथ दिवस होता.
म्हणून आता परुशी लोक त्या मनुष्याला विचारु लागले, “तुला कसे काय दिसू लागले?” त्या मनुष्याने उत्तर दिले, “त्याने माझ्या डोळ्यांवर चिखल लावला. मी डोळे धुतले आणि आता मी पाहू शकतो.”
परुश्यांतील काही लोक म्हणाले, “हा मनुष्य शब्बाथाचा नियम पाळीत नाही. म्हणून तो देवापासून नाही.” द्सरे लोक म्हणाले, “परंतु एखादा मनुष्य पापी असेल तर त्याला असे चमत्कार करताच येणार नाहीत.” याविषयी त्या यहूदी लोकांचे एकमत होईना.
मग यहूदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला पुन्हा विचारले, “त्या मनुष्याने तुला बरे केले, आणि आता तुला दिसते, तर त्याच्याविषयी तुला काय म्हणायचे आह?” त्या मनुष्याने उत्तर दिले, “तो एक संदेष्टा आहे.
हे या माणसाच्या बाबतीत घडले आहे यावर यहूदी लोकांचा विश्वासच बसेना, हा मनुष्य आंधळा होता आणि आता त्याला दिसते या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसत नव्हता. नंतर त्यांनी त्या मनुष्याच्या आईवडिलांना बोलावून घेतले.
यहुदी लोकांनी त्याच्या आईवडिलांना विचारले, “हा तुमचाच मुलगा आहे काय? तुम्ही म्हणता हा जन्मापासून आंधळा होता तर आता याला कसे काय दिसू लागले?”
त्याच्या आईवडिलांनी उत्तर दिले, “हा आमचाच मुलगा आहे. आणि तो आंधळाच जन्माला आला हे आम्हांला माहीत आहे.
परंतु त्याला आता कसे दिसायला लागले आणि त्याचे डोळे कोणी बरे केले हे आम्हांला माहीत नाही. त्यालाच विचारा. तो स्वत: बद्दल सांगण्याइतका सुज्ञ झाला आहे.
त्याचे आईवडील असे म्हणाले कारण त्यांना यहूदी धर्मपुढाऱ्यांची फार भीति वाटत होती. येशू हा ख्रिस्त आहे, असे जो कोणी म्हणेल, त्याला शिक्षा करायची असे यहूदी पुढाऱ्यांनी अगोदरच ठरवून ठेवलेले होते. अशा लोकांना यहूदी पुढारी सभास्थानाबाहेर घालवू शकत होते.
म्हणून ‘त्यालाच विचारा तो आता मोठा झाला आहे’ असे त्या मनुष्याचे आईवडील म्हणाले.
मग जो जूर्वी आंधळा होता त्याला यहूदी पुढाऱ्यांनी पुन्हा बोलाविले. ते त्याला म्हणाले, “तुला बरे केले म्हणून तू देवाला गौरव द्यावे. हा मनुष्य पापी आहे हे आम्हांला माहीत आहे.”
त्या मनुष्याने उत्तर दिले, “तो पापी आहे की नाही हे मला माहीत नाही. परंतु हे मला नक्की माहीत आहे की, मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते.”
यहूदी पुढाऱ्यांनी विचारले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे बरे केले?”
त्या मनुष्याने उत्तर दिले. “ते मी तुम्हांला अगोदरच सांगितले आहे. परंतु तुम्ही माझे ऐकत नाही. पुन्हा तुम्हांला ते ऐकावेसे वाटते काय? तुम्हांलाही त्याचे शिष्य व्हावयाची इच्छा आहे काय?”
यहूदी पुढारी फार संतापले आणि त्याला फारच वाईट रीतीने बोलू लागले. ते त्याला म्हणाले, “तू त्याचा शिष्य आहेस. आम्ही तर मोशेचे शिष्य आहोत.
देव मोशेशी बोलत असे हे आम्हांला माहीत आहे. परंतु हा मनुष्य कोण, कोठून आला हे आम्हांला माहीत नाही.”
त्या मनुष्याने उत्तर दिले, “ही फारच विचित्र गोष्ट आहे. येशू कोठून आला हे तुम्हांला माहीत नाही. परंतु त्याने माझे डोळे बरे केले.
देव पापी लोकांचे ऐकत नाही हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण जो त्याची उपासना करतो आणि त्याची आज्ञा पाळतो त्याचेच तो ऐकेल.
जो मनुष्य जन्मजात आंधळा होता, त्याला दृष्टी येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हा मनुष्य देवाकडूनच आला असला पाहिजे. जर तो देवाकडूल आला नसता तर त्याला असे काहीच करता आले नसते.”
यहूदी पुढाऱ्यांनी उतर दिले, “तू तर पापात जन्मला आहेस तू आम्हांला शिकवू पाहतोस काय?” आणि यहूदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला तेथून हुसकून लावले.
यहूदी पुढऱ्यांनी त्या मनुष्याला बळजबरीने हुसकावून लावले, हे येशूने ऐकले, म्हणून येशू त्या मनुष्याला भेटला आणि म्हणाला, “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय?”
त्या मनुष्याने विचारले, “महाराज, हा मनुष्याचा पुत्र कोण? मला सांगा, म्हणजे मला त्याच्यावर विश्वास ठेवता येईल.”
येशू त्याला म्हणाला, “तू त्याला अगोदरच पाहिले आहेस. मनुष्याचा पुत्र आता तुझ्याशी बोलत आहे.”
“होय, प्रभु, मी विश्वाास ठेवतो.” त्या मनुष्याने उत्तर दिले. मग त्या मनुष्याने खाली वाकून येशूला वंदन केले.
येशू म्हणाल, “जगाचा न्याय व्हावा म्हणून मी जगात आलो आहे. मी आलो आहे तो यासाठी की, जे आंधळे आहेत त्यांना दिसावे. आणि आम्हांला पाहता येते असे वाटणारे आंधळे व्हावेत.”
परुश्यांतील काही जण येशूच्या आजूबाजूला होते. त्यांनी येशूला हे बोलताना ऐकले. आणि त्यांनी विचारले, “काय, आम्हीसुद्धा आंधळे आहोत असे तुला म्हणायचे आहे काय?”
येशू म्हणाला, “तुम्ही जर खरोखरच आंधळे (समज नसलेले) असता, तर तुम्ही पापाबद्दल दोषी ठरला नसता. परंतु ‘आम्हांस दिसते’ असे तुम्ही म्हणता (तुम्ही काय करता हे जाणता) म्हणून तुम्ही दोषी आहात.”
10
येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो. जेव्हा एखादा मनुष्य मेंढवाड्यात प्रवेश करतो, तेव्हा त्याने दाराचाच उपयोग करावा. जर तो दुसऱ्या मार्गाने चढतो तर तो लुटारु आहे. तो मेंढरे चोरण्याचा प्रयत्न करीत आहे.
परंतु मेंढरांची काळजी घेणारा दारातूनच आत जातो, तो मेंढपाळ आहे.
दारावरचा पहारेकरी मेंढपाळासाठी दार उघडतो आणि मेंढरे आपल्या मेंढपाळाचा आवाज ऐकतात, मेंढपाळ आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाका मारतो, आणि त्यांना तो बाहेर घेऊन जातो.
आपली सर्व मेंढरे बाहेर पडल्यावर तो त्यांच्या पुढे पुढे चालतो. (त्यांचे नेतृत्व करतो). मेंढरे त्याच्या मागोमाग जातात. कारण ती त्याचा आवाज ओळखतात.
अनोळखी माणसांच्या मागे मेंढरे कधीच जाणार नाहीत. ती त्या माणसापासून दूर पळून जातील. कारण त्यांना त्यांचा आवाज परिचयाचा नसतो.
येशूने लोकांना हा दाखला सांगितला. परंतु तो काय सांगत आहे हे लोकांना समजले नाही.
म्हणून येशू पुन्हा म्हणाला. “मी तुम्हांला खरे सांगतो. मी मेंढरांचे दार आहे.
माझ्या अगोदर आलेले सर्व चोर व लुटारु होते. मेंढरांनी त्यांचे आवाज ऐकले नाहीत.
मी दार आहे. जो माझ्याद्वारे आत जातो त्याचे तारण होईल. त्याला आत येता येईल व बाहेर जाता येईल. त्याला पाहिजे ते सर्व त्याला मिळेल.
चोर चोरी करायला, ठार मारायला आणि नाश करायला येतो. परंतु मी जीवन देण्यासाठी आलो. असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे.
“मी चांगाला मेंढपाळ आहे. चांगला मेंढपाळ आपल्चा मेंढरासाठी स्वत:चा जीव देतो.
ज्याला मजुरी देऊन मेंढरे राखायला ठेवलेले असते तो मेंढपाळापेक्षा निराळा असतो. मजुरीवर मेंढरे राखणारा कळपाचा मालक नसतो. मेंढपाळ हाच कळपाचा मालक असतो. म्हणून मजुरीवर काम करणार माणूस लांडगा येताना पाहून मेंढरे सोडतो आणि पळून जातो. मग लांडगा मेंढरांवर हल्ला करुन त्यांची दाणादाण करतो.
मजूर पळून जातो कारण तो रोजंदारीवरचा कामगार असतो, तो मेंढरांची खरी काळजी करीत नाही.
माझी दुसरीही मेंढरे आहेत ती येथे या कळपात नाहीत. त्यांनाही मला मार्गदर्शन केले पाहिजे. ते माझा आवाज ऐकतील आणि भविष्यकाळात एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.
मी आपला जीव देतो म्हणून माझा पिता मजवर प्रीति करतो. मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो.
तो कोणी माझ्यापासून घेत नाही. मी माझा स्वत:चा जीव स्वत:च्या इच्छेने देतो. माझा जीव देण्याचा मला अधिकार आहे. आणि मला तो परत घेण्याचाही अधिकार आहे. हेच करण्याची माझ्या पित्याने मला आज्ञा दिली आहे.”
येशूने सांगितलेल्या ह्या गोष्टींमुळे यहूदी लोकांचे आपापसात एकमत होईना.
यहूदी लोकांपैकी पुष्कळजण म्हणाले, ‘याला भूत लागले आहे. म्हणून याचे डोके ठिकाणावर नाही. त्याचे का ऐकावे?”
परंतु दुसरे काही जण म्हणाले, “हा करतो तशा गोष्टी भूताने डोके फिरविलेला मनुष्य करीत नाही. भूत आंधळ्या माणसाचे डोळे बरे करील काय? मुळीच नाही!”
यरुशलेमात साजरा होणारा समर्पणाचा सण जवळ आला. तो हिवाळा होता.
येशू मंदिरातील शलमोनाच्या देवडीत त होता.
यहूदी लोक येशूच्याभोवती जमा झाले, आणि म्हणाले. “किती दिवस तुम्ही आम्हांला असे गोंधळात ठेवणार आहात? जर तुम्हीच ख्रिस्त असाल तर आम्हांला तसे स्पष्टच सांगा!”
येशूने उत्तर दिले, ‘मी तुम्हांला आधीच सांगितले. परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामे करतो, ती कामे सुध्दा मी कोण आहे याची साक्ष देतात.
पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. कारण माझी मेंढरे (लोक) नाहीत.
माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो. आणि ती माझ्यामागे येतात.
मी माझ्या मेंढरांना अनंतकाळचे जीवन देतो. ती कधीच मरणार नाहीत. आणि त्यांना कोणीच माझ्या हातून हिरावून घेणार नाही.
माझ्या पित्याने माझी मेंढरे माझ्या हाती दिली आहेत. तो सर्वांहून थोर आहे. माझ्या पित्याच्या हातून ती कोणी हिरावून घेणार नाही.
माझा पिता आणि मी एक आहोत.”
तेव्हा यहूदी पुढाऱ्यांनी येशूला ठार मारण्यासाठी पुन्हा धोंडें उचलले.
परंतु येशू त्यांना म्हणाला, “पित्यापासून आलेल्या कितीतरी चांगल्या गोष्टी मी केल्या. त्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत. त्यापैकी कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही मला जिवे मारीत आहात?”
यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी आम्ही तुम्हांला मारीत नाही. परंतु तुम्ही ज्या गोष्टी बोलता त्या देवाविरुद्ध आहेत. तुम्ही फक्त मानव आहात, पण स्वत:ला देवासारखेच आहोत असे मानता! आणि म्हणून आम्ही तुम्हांला धोंडमार करुन ठार करीत आहोत!”
येशूने उत्तर दिले, “तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे; ‘मी म्हणालो, तुम्ही देव आहात’
ज्या लोकांना देवाने त्याची आज्ञा वचने दिली त्यांच्याविषयी ते सांगते. पवित्र शास्त्रात त्या लोकांना देवाने असे म्हटले आणि पवित्र शास्त्र नेहमीच खरे आहे.
त्याच्या कामासाठी देवाने मला निवडले. देवाने मला जगात पाठविले. मी देवाचा पुत्र आहे. आणि तुम्ही म्हणता, मी बोलतो त्या गोष्टी देवाविरूद्ध आहेत,
जे माझा पिता करतो ते जर मी करत नाही, तर तुम्ही माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका.
परंतु माझा पिता करतो तीच कृत्यांवर जर मी करतो, तर मी करतो त्या माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण मी करतो त्या गोष्टींवर तरी विश्वास ठेवा. मग तुम्ही ओळखाल आणि समजून घ्याल की, पिता माइयामध्ये आहे, आणि मी पित्यामध्ये आहे.”
यहूदी लोकांनी येशूला पुन्हा धरण्याचा प्रयत्न केला. परंतु येशू त्यांच्यातून निघून गेला.
मग येशू यार्देन नदी ओलांडून माघारी गेला. येशु जथे योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे तेथे गेला. येशू तेथेच राहिला.
आणि पुष्कळ लोक त्याच्यकडे आले. लोक म्हणाले, “योहानाने कधी चमत्कार केला नाही. परंतु योहानाने या मनुष्याविषयी जे सांगितले ते खरे आहे.”
आणि त्याठिकाणी अनेक लोकांनी येशूवर विश्वास ठेवला.
11
लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो बेथानी गावात राहत होता. याच गावात मार्था आणि मरीया राहत होत्या.
ज्या मरीयेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे पाय आपल्या केसांनी पुसले तिचा हा भाऊ होता.
त्या बहिणींनी येशूला निरोप पाठविला की, हे प्रभु ज्याच्यावर तू प्रीति करतोस तो आजारी आहे.
पण येशूने हे ऐकून म्हटले, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. याद्वारे देवाचे गौरव व्हावे यासाठी हा आजार आहे.”
येशू मार्था, मरीया व लाजर यांच्यावर प्रीति करीत असे.
म्हणून तो आजारी आहे हे ऐकल्यावरही तो होता त्याच ठिकाणी दोन दिवस राहिला.
नंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण यहूदीयात परत जाऊ.”
शिष्य त्याला म्हणाले, “गुरुजी, यहूदी आपणांस दगडमार करु पाहत होते आणि आपण पुन्हा तेथे जात आहात काय?”
येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास असतात की नाहीत? जर एखादा दिवसा चालतो, तर त्याला ठेच लागत नाही. कारण तो या जगाचा प्रकाश पाहतो.
पण जर कोणी रात्री चालतो, तर त्याला ठेच लागते कारण त्याच्याकडे प्रकाश नसतो.”
या गोष्टी बोलल्यानंतर तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे. पण मी त्याला झोपेतून जागे करावे तरीही जात आहे.”
तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले, “प्रभु, तो झोपी गेला असेल तर बरा होईल.”
पण येशू खरे तर त्याच्या मरणाविषयी बोलला होता. पण तो त्याच्या नेहमीच्या झोपेविषयी बोलत आहे, असे त्यांना वाटले.
तेव्हा येशूने त्यांना स्पष्ट सांगितले, “लाजर मेला आहे.
आणि मी तेथे नव्हतो म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो. यासाठी की तुम्ही विश्वास धरावा. आपण त्याच्याकडे जाऊ या.”
तेव्हा दिदुम म्हटलेला थोमा शिष्यांना म्हणाला, “आपणही त्याच्याबरोबर जाऊ या अशासाठी की आपणही त्याच्याबरोबर मरु.”
येशू आल्यावर त्याला समजले की, लाजराला चार दिवसांपूर्वीच कबरेत ठेवण्यात आले आहे.
बेथानी यरुशलेमापासून तीन किलोमीटर अंतरापेक्षा कमी होते.
आणि पुष्कळसे यहुदी मार्था, मरीयेकडे त्यांचा भाऊ मेला याबद्दल सांत्वन करण्यासठी आले होते.
जेव्हा मार्थाने ऐकले की, आपल्या घरी येशू येत आहे तेव्हा ती त्याला भेटायला बाहेर गेली, पण मरीया घरातच राहिली.
‘प्रभु’ मार्था येशूला म्हणाली, “तू जर येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता,
पण मला माहीत आहे की, तू जे मागशील ते देव तुला देईल.”
येशू म्हणाला, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”
मार्था म्हणाली. “मला माहीत आहे शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळेस तो पुन्हा उठेल.”
येशू तिला म्हणाला, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल.
आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो. तो कधीच मरणार नाही. तू यावर विश्वास ठेवतेस काय?”
‘होय प्रभु.’ ती त्याला म्हणाली, “तू ख्रिस्त आहेस असा मी विश्वास धरते. तू या जगात आलेला आहे देवाचा पुत्र आहेस.”
आणि असे म्हटल्यानंतर ती परत गेली आणि आपली बहीण मरीया हिला एका बाजूला बोलाविले आणि म्हणाली, “गुरुजी येथे आहेत. आणि ते तुला विचारीत आहेत.”
जेव्हा मरीयेने हे ऐकले तेव्हा ती लगेच उठली आणि त्याच्याकडे गेली.
आता तोपर्थंत येशू त्या खेड्याच्या आत आला नव्हता. तर मार्था त्याला भेटली, तेथेच अजूनपर्थंत होता.
तेव्हा जे यहूदी तिच्या घरात तिचे सांत्वन करीत होते ते, मरीया लगबगीने उठून बाहेर गेली असे पाहून ती कबरेकडे शोक करायला गेली असे समजून तिच्यामागे गेले.
मग जेथे येशू होता तेथे मरीया आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, “प्रभु, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.”
मग येशू तिला रडताना पाहून व तिच्याबरोबर असलेल्या यहूद्यांनाही रडताना पाहून आत्म्यात व्याकुळ झाला व हेलावून गेला.
तो म्हणाला, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?” ते म्हणाले, “प्रभु, या आणि पाहा.”
येशू रडला.
तेव्हा यहूदी म्हणाले, “पहा! त्याला तो किती आवडत होता.”
पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले, त्या या मनुष्याला लाजराला मरणापासून वाचविता येऊ नये काय?”
मग येशू पुन्हा अंत:करणात विव्हळ झाला असता कबरेकडे आला. ती गुहा होती, आणि तिच्यावर दगड लोटला होता.
येशूने म्हटले, “हा दगड काढा.” मार्था म्हणाली, “पण प्रभु, लाजर मरुन चार दिवस झाले आहेत, त्याला आता दुर्गंधी येत असेल.” ती मृत लाजराची बहीण होती.
येशूने तिला म्हटले, “जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
मग त्यांनी दगड बाजूला केला. तेव्हा येशू वर पाहून म्हणाला, “पित्या, तू माझे ऐकले, म्हणून मी तुझे उपकार मानतो.
आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहीत आहे, पण जो लोकसमुदाय आजूबाजूला उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो. यासाठी की तू मला पाठविले आहेस यावर त्यांनी विश्वास ठवावा.”
असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, “लजरा, बाहेर ये.”
मग जो मेला होता तो लाजर जिवंत होऊन बाहेर आला. त्याचे हात पाय वस्त्रांनी बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते. येशू लोकांना म्हणाला. “त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या.”
जे यहूदी मरीयेकडे आले होते, त्यांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
पण त्यांच्यातील काहींनी परुश्यांकडे जाऊन येशूने जे केले होते ते त्यांना सांगितल.
तेव्हा मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवून म्हटले, हा मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे.
आम्ही त्याला असेच राहू दिले तर सर्व लोक त्याच्यार विश्वास ठेवतील आणि रोमी येऊन आमचे मंदिर व राष्ट्र दोन्हीही घेतील.”
तेव्हा त्यांच्यातील कयफा नावाचो व्यक्ति त्या वर्षी प्रमुख याजक होती. तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच माहिती नाही!
तुम्ही हे लक्षात घेत नाही की, सर्व लोकांसाठी एका माणसाने मरणे हे सर्व राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा हिताचे आहे.”
तो हे स्वत: होऊन बोलला नाही तर त्यावर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे.
केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की, त्याने देवाच्या पांगलेल्यांना एकत्र करावे, म्हणून तो मरणार आहे.
म्हणून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याची मसलत केली.
यामुळे येशू तेव्हापासून उघडपणे यहूघांमध्ये फिरला नाही. त्याऐवजी तो रानाजवळच्या प्रदेशातील ऐफ्राईम नावाच्या नगरात गेला व तेथे शिष्यांसह राहिला.
तेव्हा यहूघांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि सणाअगोदर पुष्कळ लोक आपणांस शुद्ध करायला देशातून वर यरुशलेमेस गेले.
ते येशूचा शोध करीत राहीले, आणि मंदिरात उभे असताना एकमेकास म्हणाले, “तुम्हाला काय वाटते? तो सणाला येणार नाही काय?’
पण मुख्य याजक व परुश्यांनी अशी आज्ञा केली होती की, येशू कोठे आहे हे ज्याला कळेल त्याने त्यांना कळवावे, म्हणजे ते त्याला पकडू शकतील.
12
मग येशू वल्हांडण सणाच्या अगोदर सहा दिवस असताना बेथानीस आला. येशूने ज्याला मेलेल्यातून उठविले होते तो लाजर तेथे होता.
म्हणून तेथे त्यांनी त्याच्यासाठी संध्याकाळचे भोजन आयोजित केले. मार्था जेवण वाढत होती आणि लाजर त्यांच्याबरोबर जेवायला बसला होता.
तेव्हा मरीयेने अर्धा किलो शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या पायावर ओतले व आपल्या केसाने त्याचे पाय पुसले व सर्व घर त्या सुवासाने भरले.
पण त्याच्या शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर त्याचा विश्वासघात केला होता, त्याने विरोध केला. म्हणून तो म्हणाला,
“हे सुगंधी द्रव्य विकून आलेले पैसे गरिबांना का देण्यात आले नाहीत? ते तेल चांदीच्या तीनशे रुपयाच्या किमतीचे होते.”
गरिबांचा कळवळा आला म्हणून त्याने असे म्हटले नाही, तर तो चोर होता आणि त्याच्याजवळ पेटी होती व तिच्यात जे पैसे टाकण्यात येत, ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला.
“तिला एकटे सोडा,” येशूने उत्तर दिले, “मला पुरण्याच्या दिवसासाठी ते तेल राखून ठेवण्यात आले.
तुमच्यात गरीब नेहमीच असतील, पण मी तुमच्यात नेहमी असणार नाही.”
मग तो तेथे आहे हे यहूदीयांतील बऱ्याच जणांना कळले. तेव्हा फक्त येशूसाठीच नव्हे तर ज्याला त्याने मेलेल्यातून उठविले होते त्या लाजराला पाहावे म्हणून ते आले.
तेव्हा मुख्य याजकांनी लाजराला मारण्याचा कट केला.
कारण त्याच्यामुळे पुष्कळ लोक येशूकडे जात होते व त्याच्यावर विश्वास ठेवीत होते.
दुसऱ्या दिवशी सणासाठी आलेल्या मोठ्या जमावाने ऐकले की येशू यरुशलेमकडे येत आहे.
त्यांनी खजुरीच्या झाडाच्या फांद्या घेतल्या आणि त्याला भेटण्यास गेले. ते ओरडून जयघोष करीत होते. “होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा धन्यावदित असो! इस्राएलचा राजा धन्यवादित असो! स्तोत्र. 118:25-26
येशूला एक शिंगरु दिसले त्यावर तो बसला. आणि संदेष्ट्यांनी लिहिल्याप्रमाणे हे झाले. ते असे:
“सीयोनेच्या कन्ये, भिऊ नको; पहा, तुझा राजा येत आहे; गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.” जखऱ्या 9:9
सुरवातीला शिष्यांना या गोष्टी समजल्या नाहीत पण येशूचे गौरव झाल्यावर त्यांना जाणीव झाली की, त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि त्यांनी या गोष्टी त्याच्यासाठी केल्या.
मग जो जमाव त्याने लाजरला कबरेतून आणलेले व मरणातून उठविलेले पाहत होता तो जमाव सातत्याने त्याच्याविषयी सांगत होता.
पुष्कळ लोक त्याला जाऊन भेटले कारण त्याने तो चमत्कार केला होते हे त्यांनी ऐकले होते.
म्हणून परुशी एकमेकांस म्हणाले, “पहा, याच्यापुढे आपले काही चालत नाही. सगळे जग त्याच्यामागे चालले आहे!”
आता सणाच्या वेळी उपासनेसाठी जे लोक वर गेले होते त्यांच्यात काही ग्रीक होते.
ते फिलिप्पाकडे आले, जो गालीलातील बेथसैदा येथील होता, त्यांनी विनंति केली, “महाराज, येशूला पाहावे अशी आमची इच्छा आहे.”
फिलिप्प अंद्रियाकडे हे सांगण्यास गला; नंतर अंद्रिया व फिलिप्प यांनी येशूला सांगितले.
येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.
मी तुम्हांला खरे सांगतो, गव्हाचा दाणा भूमीत पडून मेला नाही, तर एकटाच राहतो, पण तो मेला तर पुष्कळ फळ देतो.
जो आपल्या जिवावर प्रीति करतो तो त्याला गमावेल पण जो या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याला अनंतकाळाच्या जीवनासाठी राखील.
जो कोणी माझी सेवा करतो त्याने मला अनुसरले पाहिजे. जेथे मी असेन तेथे माझे सेवकही असतील. जो माझी सेवा करतो त्याचा सन्मान माझा पिता करील.”
“माझे अंत:करण व्याकूळ झाले आहे. आणि मी आता काय सांगू? “पित्या माझी या घटकेपासून सुटका कर? केवळ याच कारणासाठी या वेळेला मी आलो.
पित्या, तुझे गौरव कर!” तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “मी त्याचे गौरव केले आहे व पुन्हाही त्याचे गौरव करीन.”
जो जमाव तेथे होता त्याने हे ऐकले व म्हटले, “गडगडाट झाला.” दुसरे म्हणाले, देवदूत त्याच्याशी बोलला.
येशू म्हणाला, “हा आवाज तुमच्यासाठी होता. माझ्यासाठी नव्हे.
या जगाचा न्याय होण्याची आता वेळ आली आहे. या जगाच्या राजकुमारला हाकलून देण्यात येईल.
परंतु मी, जेव्हा पृथ्वीपासून वर उचलला जाईन, तेव्हा मी सर्व लोकांना माझ्याकडे ओढीन.”
त्याने हे यासाठी म्हटले की कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार आहे हे त्याला दाखवायचे होते.
जमाव म्हणाला, “ख्रिस्त सर्वकाळ राहतो असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे तुम्ही का म्हणता? मनुष्याचा पुत्र कोण आहे?”
मग येशू त्यांना म्हणाला. “आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्यामध्ये असणार आहे. तुमच्यामध्ये प्रकाश आहे तोपर्यंत तुम्ही चाला. यासाठी की अंधाराने तुमच्यावर मात करु नये. कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही.
तुम्ही प्रकाशाची मुले व्हावे म्हणून तुम्हांला प्रकाश आहे तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवा.” येशू या गोष्टी बोलला, मग तो निघून गेला. आणि त्यांच्यापासून गुप्त राहिला.
येशूने इतके चमत्कार त्यांच्यासमोर केलेले असतानाही ते त्याच्यावर विश्वास ठेवीनात.
यासाठी की, यशया संदेष्टेयाचे वचन पूर्ण व्हावे: “प्रभु, आमच्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे. आणि प्रभूचा हस्तप्रताप कोणास प्रगट झाला आहे?” यशया 53:1
या कारणासाठी त्यांनी विश्वास ठेवला नाही, जसे यशया एके ठिकाणी म्हणतो,
“त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, व अंत:करणाने समजू नये, फिरू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले आणि त्यांचे अंत:करण कठीण केले आहे.” यशया 6:10
यशया असे म्हणाला, कारण त्याने त्याचे गौर0व पाहिले आणि तो त्याच्याविषयी बोलला.
तरीही अधिकाऱ्यातील पुष्कळंानी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आपणांस सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परुश्यांमुळे त्यांनी हे पत्करले नाही.
कारण त्यांना देवाच्या गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक आवडले.
तेव्हा येशू मोठ्याने बोलला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवतो असे नाही, तर ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो.
आणि जो मला पाहतो, तो ज्याने मला पाठविले त्याला पाहतो.
मी प्रकाश असा जगात आलो आहे. यासाठी की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये.
“आणि जो कोणी माझी वचने ऐकून पाळीत नाही, त्याचा न्याय मी ठरवीत नाही. कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी आलो नाही, तर जगाच्या तारणासाठी आलो आहे.
जो माझा स्वीकार करीत नाही व माझ्या वचनाप्रमाणे वागत नाही त्याचा न्याय करणारा कोणी एक आहे, जे वचन मी बोललो तेच शेवटच्या दिवशी त्याचा न्याय करील.
कारण मी स्वत:हून बोललो असे नाही तर मी काय सांगावे व काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठविले, त्यानेच मला आज्ञा केली आहे.
आणि त्याची आज्ञा अनंतकाळचे जीवन आहे. हे मला ठाऊक आहे, म्हणून जे काही मी बोलतो ते जसे पित्याने मला सांगितले तसेच बोलतो.”
13
मग वल्हांडण सणापूर्वी येशूने आपण या जगातून निघून पित्याकडे जावे असा समय आला आहे, हे जाणून आपले स्वत:चे लोक जे जगात होते त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रीति केली.
मग संध्याकाळचे भोजन होण्याच्या वेळेस सैतानाने शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत याच्या मनात त्याला शत्रूंच्या हाती घावे असे आधीच घालून दिले असताना,
आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो आणि आता देवाकडे जातो हे ओळखून,
येशू जेवणावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन आपल्या कमरेस बांधला.
मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला. आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने पुसू लागला.
मग तो शिमोन पेत्राकडे आला; पण पेत्र त्याला म्हणाला, ‘प्रभु, तू माझे पाय धुणार काय?”
येशूने उत्तर दिले, “मी आता जे करीत आहे, ते तुला आता कळणार नाही, तर पुढे तुला कळेल.” 8पेत्र त्याला म्हणाला, “तू माझे पाय कधीही धुवायचे नाहीत.” येशूने उत्तर दिले, “जर मी तुझे पाय धुतले नाहीत तर तुला माझ्या बरोबर वाटा नाही.”
शिमोन पेत्राने उत्तर दिले,
“मग प्रभु माझे पायच नव्हे तर हात व डोकेही धुवा.”
येशूने उत्तर दिले, “ज्याची आंघोळ झाली आहे, त्याचे फक्त पाय धुतले तरी चालेल, कारण तो स्वच्छच आहे. तुम्ही स्वच्छ आहात पण सर्वच नाहीत.”
आपल्याला कोण धरून देणार हे येशूला माहीत होते, म्हणून “तुम्ही सर्वच शुद्ध नाहीत” असे तो म्हणाला.
जेव्हा त्याने त्याचे पाय धुण्याचे संपविले तेव्हा त्याने आपली बाह्यावस्त्रे घातली व आपल्या जागेवर आला. त्याने त्यांना विचारले, “मी काय केले हे तुम्हांला समजले काय?’
तुम्ही मला ‘गुरुजी’ आणि ‘प्रभु’ म्हणता आणि योग्य म्हणता, कारण मी तोच आहे.
म्हणून मी जो प्रभु आणि गुरु असूनही मी तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुवावे.
कारण जसे मी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला उदाहरण घालून दिले.
मी खरे सांगतो, दास आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नाही आणि पाठविलेला ज्याने पाठविले त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही.
या गोष्टी जर तुम्ही समजता आणि त्या तुम्ही जर केल्या तर तुम्ही आशीर्वादित आहात.
“मी तुम्हां सर्वाविषयी बोलत नाही. ज्यांना मी निवडले ते मला माहीत आहेत.” परंतु पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे तसे घडलेच पाहिजे: ‘जो माझी भाकर खातो त्याने माझ्यावर आपली टाच उचलली आहे.’
हे होण्याअगोदरच मी तुम्हांस सांगतो, यासाठी की जेव्हा हे होईल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा, की मी तो आहे.
मी तुम्हांस खरे सांगतो ज्या कोणाला मी पाठवितो त्याला जो स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो.”
असे बोलल्यावर येशू आपल्या आत्म्यात व्याकुळ झाला आणि उघडपणे म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यातील एकजण मला धरून देईल.”
तेव्हा तो कोणाविषयी बोलतो असा संशय धरून शिष्य एकमेकांकडे पाहू लागले.
आणि ज्याच्यावर येशू प्रीति करीत असे असा त्याच्या शिष्यातील एकजण येशूच्याजवळ खेटून बसला होता.
शिमोन पेत्राने त्या शिष्याला खुणावले आणि म्हणाला, “ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे विचार.”
तेव्हा तो तसाच येशूच्या अगदी जवळ असता त्याल म्हणाला, “प्रभु तो कोण आहे?”
येशूने उत्तर दिले, “ज्याला मी भाकरीचा तुकडा ताटात भिजवून देईन तोच तो आहे.” मग त्याने भाकरीचा तुकडा ताटात बुडवून घेतला व तो शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत याला दिला.
त्याने भाकरीचा तुकडा घेतला आणि सैतानाने त्याचा ताबा घेतला. मग येशूने त्याला म्हटले, “तुला जे करायचे आहे ते लवकर कर.”
पण त्याने त्याला काय सांगितले हे जेवणास बसलेल्यांपैकी कोणाला कळले नाही.
कारण यहूदाजवळ पैशाचा व्यवहार होता. काहींना वाटले येशू त्याला भोजनास जे पाहिजे ते आणण्यासाठी सांगत आहे किंवा गरिबाला काही देण्याविषयी सांगत आहे.
यहूदाने भाकर घेतल्याबरोबर तो बाहेर गेला कारण ती वेळ रात्रीची होती.
तो गेल्यावर येशू म्हणाला, “आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्याठायी देवाचे गौरव झाले आहे.
देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे गौरव लवकर करील.
“माझ्या मुलांनो, अजून थोडा वेळ मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहूद्यांस सांगितले की, जेथे मी जातो तेथे तुमच्याने येता येणार नाही, तसेच मी तुम्हांलाही आता सांगतो.
‘मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. जशी मी तुम्हांवर प्रीति केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीति करा.
तुमची एकमेकांवर प्रिति असली तर सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”
शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभु, तुम्ही कोठे जात आहात?” येशूने उत्तर दिले, “जेथे मी जातो तेथे तुझ्याने येता येणार नाही. पण नंतर तू माझ्यामागे येशील.”
पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याने आताच तुमच्या मागे का येता येणार नाही?’ मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे.”
मग येशूने उत्तर दिले, “तू खरोखर आपला जीव मजसाठी देशील? मी खरे सांगतो. तू मला तीन वेळा नाकारीपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”
14
‘तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.
माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, जागा नसत्या तर मी तुम्हांला सांगितले असते. कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो.
मी गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन, आणि तुम्हांला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.
आणि मी कोठे जातो तिकडे जाण्याचा मार्गही तुम्हांला ठाऊक आहे.”
थोमा येशूला म्हणाला, “प्रभु, तुम्ही कोठे जात आहात हे आम्हांला ठाऊक नाही. मग आम्हांला मार्ग कसा ठाऊक असणार?”
येशूने उत्तर दिले, “मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते.
जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते, आणि आतापासून तुम्ही त्याला ओळखता व त्याला पाहिले आहे.”
फिलिप्प येशूला म्हणाला, “प्रभु, आम्हांला पिता दाखवा, एकढेच आमचे मागणे आहे.
येशूने त्याला म्हटले, “फिलिप्पा, मी इतका वेळ तुमच्याजवळ असताना तू मला ओळखले नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्याला पाहिले आहे, तर मग ‘आम्हांला पिता दाखव’ असे तू कसे म्हणतोस?
मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या माझ्या स्वत:च्या नाहीत तर माझ्यामध्ये जो पिता आहे तो स्वत: कामे करतो.
मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे असा विश्वास धरा. नाहीतर मी केलेल्या कामावरून तरी माझ्यावर विश्वास ठेवा.
मी तुम्हांला खरे सांगतो मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील. कारण मी पित्याकडे जातो.
आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने माझ्याजवळ मागाल ते मी करीन यासाठी की, पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे.
जर तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन.”
“जर तुम्ही माझ्यावर प्रीति करित असाल, तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल.
आणि मी पित्याला सांगेन आणि तो तुम्हांला दुसरा साहाय्यकर्ता देईल, यासाठी की त्याने तुम्हांबरोबर सर्वकाळ राहावे.
साहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. जग त्याचा स्वीकार करू शकत नाहीत. कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही. पण तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो, तो तुमच्यामध्ये वास करील.
“मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्याकडे येईन.
आणखी काही वेळाने जग मला पाहणार नाही. परंतु तुम्ही मला पाहाल. मी जगतो आहे म्हणून तुम्हीही जगाल.
त्या दिवशी तुम्हांला जाणीव होईल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आहात मी तुमच्यामध्ये आहे.
ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो, तो असा आहे की जो माझ्यावर प्रीति करतो, त्याच्यावर पिता प्रीति करील. मीसुद्धा त्याच्यावर प्रीति करीन आणि स्वत:ला त्याच्यासाठी प्रगट करीन.”
मग यहूदा (यहूदा इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “पण प्रभु, तू आम्हांसमोर स्वत:ला का प्रगट करणार आहेस आणि जगासमोर का नाही?”
येशूने उत्तर दिले, “जर कोणी माझ्यावर प्रीति करतो तर तो माझी शिकवण पाळील, माझा पिता त्याच्चावर प्रीति करील. आम्ही त्याच्याकडे येऊ व त्याच्याबरोबर राहू.
जो माझ्यावर प्रीति करीत नाही, तो माझी शिकवण पाळणार नाही. हे शब्द जे तुम्ही ऐकता ते माझे नाहीत. ज्या पित्याने मला पाठविले त्याचे हे शब्द आहेत.”
“मी तुम्हांजवळ राहत असतानाच तुम्हांस या गोष्टी सांगितल्या आहेत.
तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो साहाय्यकर्ता म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांस सर्व शिकवील. आणि ज्या गोष्टी मी तुम्हांस सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण करून देईल.
“शांति मी तुमच्याजवळे ठेवतो, माझी शांति मी तुम्हांला देतो. जसे जग देते तशी शांति मी तुम्हांला देत नाही. तुमची अंत:करणे अस्वस्थ होऊ देऊ नका. आणि भिऊ नका.
‘मी जोते आणि तुम्हांकडे येणार आहे’ असे मी तुम्हांस सांगितले ते तुम्ही ऐकले आहे, जर तुमची माझ्यावर प्रीति असती तर मी पित्याकडे जातो याबद्दल तुम्ही आनंद केला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा महान आहे.
मी तुम्हांला हे घडण्यापूर्वी सांगितले आहे. यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा.
मी जास्त काळ तुमच्याशी बोलणार नाही. कारण या जगाचा अधिपती येत आहे, तरी त्याचा माझ्यावर अधिकार नाही.
परंतु जगाने हे शिकले पाहिजे की, मी पित्यावर प्रीति करतो आणि माझ्या पित्याने जी आज्ञा मला केलेली आहे, नेमके तसेच मी करतो. “चला आता, आपण निघू या.”
15
मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे.
तो माझ्यातील फळ न देणारी प्रत्येक फांदी तोडून टाकतो. ज्या प्रत्येक फांद्या फळ देतात त्यांनी अधिक फळ घावे म्हणून त्या द्राक्षवेलीला तो साफ करतो.
जे वचन मी तुम्हांला सांगितले, त्यामुळे तुम्ही आता स्वच्छ झालाच आहा.
तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हांमध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्यावचून त्याच्याने फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हांला फळ देता येणार नाही.
“मी वेल आहे, तुम्ही फाटे आहा, जो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो, तोच पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही होत नाही.
कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो. तो वाळून जातो मग त्याला गोळा करून अग्नीत टाकतात व ते जाळण्यात येते.
“तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे ते तुम्ही मागा म्हणजे ते तुम्हांस मिळेल.
तुम्ही पुष्कळ फळ दिल्यानेच माझ्या पित्याचे गौरव होते, आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.
जशी पित्याने माझ्यावर प्रीति केली आहे तशीच मीही तुम्हांवर प्रीति केली आहे. माझ्या प्रीतीत राहा.
ज्याप्रमाणे मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या म्हणून त्याच्या प्रीतित राहतो तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.
माझा आनंद तुम्हांमध्ये राहावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा, म्हणून मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत.
जशी मी तुम्हांवर प्रीति केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. ही माझी आज्ञा आहे.
आपल्या मित्रासाठी मरावे, यापेक्षा कोणाचीही प्रीति मोठी नाही.
मी आज्ञा करतो तसे तुम्ही वागता तर तुम्ही माझे मित्र आहात.
आता मी तुम्हांला सेवक म्हणत नाही, कारण आपला धनी काय करतो हे सेवकाला माहीत नसते, पण मी तुम्हांला मित्र म्हणतो कारण ज्या गोष्टी मी आपल्या पित्याकडून ऐकल्या त्या सर्व तुम्हांला कळविल्या आहेत.
तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले आणि नेमले आहे. यासाठी की, तुम्ही जाऊन फळ द्यावे. आणि तुमचे फळ टिकावे, यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांस द्यावे
तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी म्हणून या गोष्टी मी तुम्हांस आज्ञा देऊन सांगतो.
“जर जग तुमचा द्वेष करते, तर लक्षात ठेवा की, पहिल्यांदा जगाने माझासुध्दा द्वेष केलेला आहे.
तुम्ही जर जगाचे असता तर जगाने तुम्हावर, जशी ते स्वत:वर करतात तशी प्रीति केली असती, पण तुम्ही जगाचे नसल्याने, आणि तुमची जगातून निवड केल्याने, जग तुमचा द्वेष करते.
जे शब्द तुम्हांला सांगितले ते लक्षात ठेवा. कोणताही नोकर आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नसतो. त्यांनी जर माझी छळणूक केली तर ते तुमचीही करतील, त्यांनी जर माझी शिकवण पाळली तर ते तुमचीसुद्वा पाळतील.
माझ्या नावामुळे ते तुमच्याशी अशाप्रकारे वागतील, कारण ज्याने मला पाठविले, त्याला ते ओळखत नाहीत.
जर मी आलो नसतो आणि त्यांना सांगितले नसते तर ते पापबद्धल दोषी ठरले नसते. आता त्यांना त्यांच्या पापाविषयी सबब सांगता येणार नाही.
जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो.
मी त्या लोकांमध्ये अशा गोष्टी केल्या ज्या दुसऱ्या कोणीही केल्या नाहीत. मी जर त्या गोष्टी केल्या नसत्या, तर पापबद्धल ते दोषी ठरले नसते, पण आता त्यांनी ते चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही त्यांनी माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला.
परंतु नियमशास्त्रात लिहिलेले पूर्ण व्हावे म्हणून हे घडले: ‘कारण नसताना त्यांनी माझा द्वेष केला.’
“पित्यापासून मी साहाय्यकर्ता पाठवीन, साहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. तो पित्यापासन येतो. जेव्हा तो येतो तेव्हा तो माझ्याविषयी सांगतो.
आणि तुम्हीसुद्वा माझ्याविषयी लोकांना सांगाल. कारण तुम्ही माझ्याबरोबर सुरुवातीपासून आहात.”
16
मी हे सर्व तुम्हांला सांगितले आहे ते यासाठी की, तुम्ही माझ्यावरील विश्वासविषयी भुलविले जाऊ नये.
ते तुम्हांला सभास्थानाच्या बाहेर काढतील; खरे पाहता अशी वेळ येत आहे की, जो कोणी तुमचा जीव घेईल त्याला वाटेल की, आपण देवाची सेवाच करीत आहोत.
आणि ते तुम्हांला असे जरूर करतील कारण त्यांना पिता किंवा मी माहीत नाही.
मी तुम्हांला आता या गोष्टी सांगितल्या आहेत, म्हणून या गोष्टी घडण्याची वेळ येईल. तेव्हा मी तुम्हांला त्यांच्यविषयी सावध केले होते हे तुमच्या लक्षात येईल.
“परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडे आता मी जातो. ‘तरी तू कोठे जातोस’ असे तुम्हांतील कोणी मला विचारीत नाही.
पण या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या आहेत म्हणून तुमचे अंत:करण दु:खाने भरले आहे.
तरी तुम्हांस खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या हिताचे आहे कारण मी गेलो नाही तर साहाय्यकर्ता तुमच्याकडे येणार नाही. पण जर मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन.
आणि तो येऊन पाप, धार्मिकता आणि न्याय याविषयी जग दोषी आहे हे सिद्व करील.
मी पापविषयी सांगितले तर, लोक माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत. साहाय्यकर्ता (पवित्र आत्मा) त्यांना त्यांची जाणीव करून देईल
नीतिमत्वाविषयी मी पित्याकडे जात आहे. मी देवाशी प्रामाणिक असण्याचे तो साहाय्यकर्ता (पवित्र आत्मा) त्यांना पटवून देईल”
हा साहाय्यकर्ता जगाला न्यायाचे सत्य पटवून देईल. कारण या जगाच्या अधिपतीचा (सैतान) न्याय होऊन चुकला आहे.
“मला आणखी पुष्कळ सांगावयाचे आहे. तुम्हांला झेपणार नाही इतके सांगायचे आहे.
पण जेव्हा तो सत्याचा आत्मा येतो, तेव्हा तो तुम्हांला सर्व सत्यात मार्गदर्शन करील, तो त्याचे स्वत:चे असे काही बोलणार नाही, तो जे ऐकतो तेच तो बोलेल, आणि जे अजून यावयाचे आहे, त्याविषयी तो तुम्हांला सांगेल.
जे माझे आहे त्यातून घेऊन आणि ते तुम्हांला कळवून तो माझे गौरव करील.
जे सर्व पित्याचे आहे, ते माझे आहे. या कारणासाठीच मी म्हणालो, की आत्मा जे माझे आहे त्यातून घेईल आणि ते तुम्हांला कळवील.
‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, नंतर थोड्या वेळने तुम्ही मला पाहाल.’
त्याच्या शिष्यांतील काही जण एकमेकांस म्हणाले, “तो असे म्हणतो याचा अर्थ काय? थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही. मग थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. कारण मी पित्याकडे जात आहे!”
ते विचारतच राहिले, ‘थोड्या वेळाने’ याचा अर्थ काय? तो काय म्हणत आहे हे आम्हांला समजत नाही.”
येशूने पाहिले की, याविषयी त्यांना काही विचारायचे आहे. म्हणून तो त्यांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांना हे विचारीत आहात काय की, जेव्हा मी म्हणालो, ‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, आणि मग थोडया वेळाने तुम्ही मला पाहाल?’
मी तुम्हांला खरे सांगतो. जग आनंद करीत असताना तुम्ही रडाल आणि शोक कराल, तुम्ही दु:खी व्हाल, पण तुमेच दु:ख आनंदात बदलेल.
जन्म देणाऱ्या स्त्रीला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते. पण जेव्हा बाळ जन्मते तेव्हा ती सर्व वेदना विसरते. कारण एक बाळ या जगात जन्म घेते.
त्याप्रमाणे तुम्हाला आता खरोखर दु:ख आहे, पण मी तुम्हांला पुन्हा भेटेन, आणि तुम्ही आनंद कराल आणि कोणीही तुमचा आनंद हिरावून घेणार नाही.
त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे काही मागणार नाही, मी खरे सांगतो. माझ्या नावाने जे काही तुम्ही मागाल ते माझा पिता तुम्हांला देईल.
आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल.”
“जरी मी तुम्हांला रूपकाच्या भाषेत या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी मी आणखी अशा प्रकारची भाषा बोलणार नाही, पण साधेपणाने पित्याविषयी तुम्हांला सांगेन.
त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल, आणि मी तुमच्यासाठी पित्याकडे विनंति करीन असे मी म्हणत नाही.
कारण पिता स्वत: तुमच्यावर प्रीति करतो कारण तुम्ही माझ्यावर प्रीति केली व माझ्यावर विश्वास ठेवला की, मी देवापासून आलो.
मी पित्यापासून आलो आणि जगात प्रवेशलो आणि आता मी जग सोडत आहे, आणि पित्याकडे पुन्हा जात आहे.”
मग येशूचे शिष्य म्हणाले, “आता तुम्ही स्पष्टपणे बोलत आहात आणि रूपकाची भाषा वापरीत नाही.
आता आम्हांला पक्के समजले की, तुम्हांला सर्व माहीत आहे. आणि तुम्हाला कोणी प्रश्न विचारण्याचीसुद्वा आवश्यकता नाही, यामुळे आमचा विश्वास बसतो की, आपण देवापासून आला आहात.”
येशूने उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास धरू लागला काय?
पण अशी वेळ येत आहे आणि आली आहे, जेव्हा तुमची पांगापांग होईल. प्रत्येक जण त्याच्या घरी जाईल. तुम्ही मला एकटेच सोडाल, तरीही मी एकटा नाही कारण माझा पिता मजबरोबर आहे.”
‘मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत. यासाठी की माझ्यामध्ये तुम्हांला शांति मिळावी, या जगात तुम्हांला त्रास होईल, पण धीर धरा! मी जगावर मात केली आहे.”
17
येशूने हे बोलणे संपविल्यावर आपले डोळे आकाशाकडे लावले आणि प्रार्थना केली: “पित्या, वेळ आली आहे, पुत्राचे गौरव कर, यासाठी की, पुत्र तुझे गौरव करील.
तू त्याला जे दिले आहे त्या सर्वांना त्याने अनंतकालचे जीवन द्यावे यासाठी सर्व मनुष्यांवर तू त्याला अधिकार दिलास त्याप्रमाणे त्याने तुझे गौरव करावे.
आणि अनंतकाळचे जीवन हेच की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.
तू मला जे काम करायला दिले ते संपवून मी पृथ्वीवर तुला गौरविले.
तर आता हे पित्या, जग होण्यापूर्वी तुझ्याबरोबर जे गौरव मला होते त्याद्वारे तू स्वत:बरोबर माझे गौरव कर.”
“ज्यांना तू मला या जगातून दिलेस, त्यांना मी तुला प्रगट केले. ते तुझे होते, व तू त्यांना माझ्या स्वाधीन केलेस. आणि त्यांनी तुझे वचन पाळले,
आता त्यांना माहीत आहे की, जे काही तू मला दिले आहेस ते तुझ्यापासून येते.
कारण जी वचने तू मला दिली आहेस ती मी त्यांना दिली. आणि त्यांनी ती स्वीकारली, त्यांना निश्चितार्थाने माहीत होते की, मी तुझ्यापासून आलो आहे. आणि त्यांनी विश्वास ठेवला की तू मला पाठविले आहेस.
मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, मी जगासाठी प्रार्थना करीत नाही. तर ज्यांना तू माझ्या स्वाधीन केलेस, त्यांच्यासाठीच कारण ते तुझे आहेत.
माझ्याकडे जे काही आहे ते तुझे आहे आणि जे तुझे आहे ते माझे आहे. आणि त्यांच्याद्वारे गौरव माझ्याकडे आले आहे.
आणि यापुढे मी जगात नाही, ते जगात आहेत, आणि मी तुझ्याकडे येत आहे, हे पवित्र पित्या, जे नाव तू मला दिले आहेस, त्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे.
मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्थंत जे नाव तू मला दिलेस त्या तुझ्या नावात मी त्यांना राखले. आणि मी त्यांना संभाळले आणि ज्याने नाशाचा मार्ग निवडला होता त्याच्याशिवाय त्यांच्यातील कोणी नाश पावला नाही, हे यासाठी झाले की शास्त्रलेख पूर्ण व्हावा.
‘पण आता मी तुझ्याकडे येत आहे. आणि त्यांच्यामध्ये माझा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी सांगतो.”
“मी त्यांना तुझे शब्द दिले आहेत आणि जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी या जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत.
या जगातून तू त्यांना काढून घ्यावेस अशी माझी प्रार्थना नाही, पण दुष्टांपासून तू त्यांचे रक्षण करावेस.
जसा मी या जगाचा नाही, तसे तेसुद्धा या जगाचे नाहीत.
तू त्यांना सत्यात पवित्र कर, कारण तुझा शब्द हेच सत्य आहे.
जसे तू मला या जगात पाठविले तसे मी त्यांना या जगात पाठवितो.
त्यांच्यासाठी मी स्वत:ला पवित्र करतो यासाठी की तेसुद्वा खऱ्या अर्थाने पवित्र व्हावेत.
आणि मी फक्त त्यांच्यासाठीच विनंति करतो असे नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंति करतो.
यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे, पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसेच त्यांनी आम्हांमध्ये असावे. यासाठी की, तू मला पाठविले असा जगाने विश्वास धरावा.
आणि तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहो तसे त्यांनीही एक व्हावे.
मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये. ते पूर्णपणे ऐक्यात आणले जावेत यासाठी की, हे जगाला माहीत व्हावे की तू मला पाठविलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीति केलीस तशी मीही त्यांच्यावर केली.
‘हे पित्या, जे लोक तू मला दिलेस, त्यांनी मी जेथे आहे तेथे माझ्याबरोबर असावे असे मला वाटते. आणि त्यांनी माझे गौरव करावे, जगाच्या निर्मितीपूर्वी तू माझ्यावर प्रीति केली, म्हणून जे गौरव तू मला दिलेस, तेच हे गौरव आहे.
नीतिमान पित्या, जरी जग तुला ओळखत नाही, तरी मी तुला ओळखतो, आणि त्यांना माहीत आहे की, तू मला पाठविलेले आहेस.
मी त्यांना तुझा परिचय करून दिला आहे, व तुझी ओळख करून देतच राहीन यासाठी की जे प्रेम तू माझ्यावर करतोस ते त्यांच्यावरही करावेस आणि मी स्वत: त्यांच्यामध्ये असावे.”
18
या गोष्टी बोलल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती, त्या बागेत तो व त्याचे शिष्य गेले.
आणि त्याला धरून शत्रूच्या हाती देणार यहूदा यालाही ही जागा ठाऊक होती. कारण येशू आपल्या शिष्यांबरोबर नेहमी तेथे येत असे.
तेव्हा शिपायांची तुकडी, मुख्य याजकाचे काही अधिकारी, परुशी यांना वाट दाखवीत यहूदा तेथे बागेत आला. ते मशाल, कंदील आणि हत्यारे घेऊन आले होते.
मग येशू आपल्या बाबतीत जे काही होणार हे सर्व जाणून पुढे जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्हांला कोण पाहिजे?”
“नासरेथचा येशू.” ते म्हणाले. येशूने उत्तर दिल, “तो मी आहे” (आणि विश्वासघात करणारा यहूदा तेथे त्यांच्यामध्ये उभा होता)
जेव्हा येशू म्हणाला, “तो मी आहे,” ते मागे सरले आणि जमिनीवर पडले.
पुन्हा त्याने त्यांना विचारले, “तुम्हांला कोण पाहिजे?” आणि ते म्हणाले, “नासरेथचा येशू”
येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगितले की तो मी आहे. जर तुम्ही मला शोधत असाल तर या लोकांना जाऊ द्या.”
हे यासाठी घडले की, जे शब्द बोलण्यात आले होते. ते सर्व पूर्ण व्हावेत, “जे तू मला दिलेस त्यांतील एकही मी गमावला नाही.”
मग शिमोन पेत्र, ज्याच्याकडे तलवार होती, त्याने ती बाहेर काढली व मुख्य याजकाच्या सेवकाचा कान कापला (सेवकाचे नाव मल्ख होते)
येशूने पेत्राला आज्ञा केली, “तुझी तलवार तिच्या जागेवर ठेव! पित्याने दिलेला प्याला मी पिऊ नये काय?”
मग शिपायांची तुकडी व त्यांचा सरदार आणि यहूदी रक्षक यांनी येशूला अटक केली. त्याला त्यांनी बांधले आणि
त्याला प्रथम हन्नाकडे आणले. तो कयफा या प्रमुख याजकाचा सासरा होता. कयफा त्या वर्षीचा प्रमुख याजक होता.
आणि कयफा हाच असे म्हणणारा होता की सर्व माणसांसाठी एका माणसाने मरणे बरे.
शिमोन पेत्र व दुसरा शिष्य येशूच्या मागून चालले. कारण हा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता, म्हणून तो येशूच्या बरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात आत गेला.
परंतु पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला. म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन तेथे कामावर असणाऱ्या मुलीला सांगून पेत्राला आत आणले.
ती मुलगी पेत्राला म्हणाली, “तुही त्या मनुष्याच्या शिष्यांपैकी आहेस काय?” पेत्राने उत्तर दिले, “मी नाही.”
थंडी असल्याने नोकरांनी व रक्षकांनी स्वत:ला गरम राखण्यासाठी शेकोटी पेटविली होती व ते शेकत उभे राहिले होते. पेत्रही त्यांच्याबरोबर शेकत उभा राहिला होता.
तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिकवणुकीविषयी विचारले,
येशूने त्याला उत्तर दिले की, “मी उघडपणे जगाशी बोललो, सभास्थानात व मंदिरात जेथे सर्व यहूदी एकत्र जमतात तेथे मी नेहमी शिकविले आणि मी गुप्त असे काहीच बोललो नाही.
मला तू का विचारतोस? ज्यांनी माझी शिकवण ऐकली, त्यांना विचार, मी काय बोललो ते त्यांना माहीत आहे.”
येशूने असे म्हटले तेव्हा तेथे उभे असलेल्या रक्षकाने येशूला चपराक मारली. रक्षक म्हणाला, “तू प्रमुख याजकाला असे उत्तर देतोस काय?”
येशूने त्याला उत्तर दिले, “जर मी वाईट बोललो असेन तर तसे सांग की मी चुकीचे बोललो पण जर चांगले बोललो असलो तर तू मला का मारतोस?’
हन्नाने त्याला बांधलेलेच मुख्य याजक कयफाकडे पाठविले.
शिमोन पेत्र शेकत असता, त्याला विचारले गेले, “तू त्याच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना?” त्याने ते नाकारले, “मी नाही.”
मुख्य याजकाच्या नोकरांपैकी एकजण ज्याचा कान पेत्राने कापला होता त्याचा नातेवाईक होता. तो म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोब बागेत पाहिले नाही काय?”
पेत्राने पुन्हा ते नाकारले, आणि त्या क्षणी कोंबडा आरवला.
नंतर यहूदी येशूला कयफाच्या घरातून रोमन राजवाड्याकडे घेऊन गेले. तेव्हा पहाट झाली होती. आपण विटाळले जाऊ नये व वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते राजवाड्यात गेले नाहीत.
म्हणून पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही या माणसावर कोणता आरोप करीत आहात?”
तेव्हा त्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले, “हा जर दुष्कर्मी नसता तर आम्ही याला तुमच्या स्वाधीन केले नसते.”
मग पिलाताने त्यांना म्हटले, ‘तुम्ही याला घेऊन आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” यहूदी म्हणाले, “आम्हांला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.”
आपल्याला कसले मरण येणार हे सुचवून येशू जे वचन बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
मग पिलात पुन्हा राजवाड्यात गेला. येशूला बोलावले आणि विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?’
येशूने विचारले, “तू हे स्वत:हून विचारतोस की, दुसऱ्यांनी तुला माझ्याविषयी सांगितले.”
पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझे लोक आणि तुझ्या मुख्य याजकांनी तुला माझ्या हाती दिले, तू काय केले आहेस?”
येशू म्हणाला, “माझे राज्य या जगाचे नाही, जर ते असते तर यहूद्यांपासून माझी सुटका करण्यासाठी माझे सेवक लढले नसते का? पण माझे राज्य दुसऱ्या ठिकाणचे आहे.”
पिलात म्हणाला, “तर तू एक राजा आहेस!” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे तू म्हणतोस तेव्हा बरोबर म्हणतोस. खरे पाहता, या कारणासाठी मी जन्मलो आणि सत्याविषयी साक्ष देण्यासाठी मी या जगात आलो. जे सर्व सत्याच्या बाजूचे आहेत ते माझे ऐकतात.”
पिलताने विचारले, “सत्य काय आहे?” असे म्हणून तो पुन्हा यहूद्यांकडे गेल. आणि म्हणाला, “मला याच्यात काहीच अपराध सापडत नाही.
पण वल्हांडण सणात मी तुम्हांसाठी एकाला सोडावे अशी तुमच्यामध्ये रीत आहे. म्हणून मी तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?”
ते ओरडले, “नको, त्याला नको! ‘आम्हांला बरब्बाला सोडा!’ बरब्बा एक दरोडेखोर होता.
19
मग पिलाताने येशूला नेऊन फटके मारण्याची आज्ञा दिली.
आणि शिपायांनी काट्यांचा मुगुट गुंफून तो त्याच्या डोक्यात घातला, व त्याला जांभळे वस्त्र घातले.
ते त्याच्याजवळ वारंवार येऊन त्याला म्हणाले,’ ‘हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असोे!’ आणि त्यांनी त्याच्या तोंडावर मारले.
पुन्हा एकदा पिलात बाहेर आला आणि यहूद्यांना म्हणाला, “पाहा! मी त्याला बाहेर तुमच्याकडे आणत आहे, तुम्हांला हे समजावे म्हणून की, मला त्याच्यावर दोषारोप ठेवायला कोणतेच कारण सापडत नाही.”
जेव्हा येशू काट्यांचा मुगुट व जांभळी वस्त्रे घालून बाहेर आला, तेव्हा पिलात त्यांना म्हणाला, “हा पहा तो मनुष्य!”
मुख्य याजक व त्यांचे रक्षक त्याला पाहताक्षणीच मोठ्याने ओरडले, “त्याला वधस्तंभावर खिळा! वधस्तंभावर खिळा!” पण पिलाताने उत्तर दिले, “तुम्ही त्याला घ्या व वधस्तंभावर खिळा. माझ्या दृष्टीने त्याच्यावर आरोप ठेवणयास कोणतेही कारण मला दिसत नाही.”
यहूद्यांनी जोर देऊन म्हटले, “आम्हांला नियमशास्त्र आहे, आणि त्या नियमशास्त्राप्रमाणे त्याने मेलेच पाहिजे. कारण त्याने स्वत:देवाचा पुत्र असल्याचा दावा केला.”
जेव्हा पिलाताने हे ऐकले, तेव्हा तो अधिकच घाबरला.
आणि तो आत राजवाड्यात परत गेला. येशूला त्याने विचारले, “तू कोठून आला आहेस?” पण येशूने त्याला उत्तर दिले नाही.
पिलात म्हणाला, “तू माझ्याशी बोलण्यास नकार देतोस काय? तुला वधस्तंभावर खिळण्याची किंवा मुक्त करण्याची ताकद मला आहे, हे तुला समजत नाही का?”
येशूने उत्तर दिले, “जर वरून अधिकार देण्यात आला नसता, तर तुला माझ्यावर अधिकार नसता. म्हणून ज्याने मला तुझ्या स्वाधीन केले तो महान पापाचा दोषी आहे.”
तेव्हापासून पिलाताने येशूला सोडण्याचा प्रयत्न केला, पण यहूदी मोठमोठयाने ओरडत राहिले, “जर तुम्ही या माणसाला जाऊ दिले, तर तुम्ही कैसराचे मित्र नाही. जो कोणी स्वत: राजा असल्याचा दावा करतो, तो कैसराला विरोध करतो.”
जेव्हा पिलाताने हे ऐकले, तेव्हा त्याने येशूला बाहेर आणले आणि फरसबंदी नावाची जागा, जिला इब्री भोषेत ‘गब्बाथा’ म्हणतात तेथे तो न्यायासनावर बसला.
तो तर वल्हांडणाची तयारी करण्याचा दिवस असून दुपारची केळ झाली होती.
पिलात त्या यहूद्यांना म्हणाला, “पहा हा तुमचा राजा.” यहूदी ओरडले, “त्याला घेऊन जा! त्याला घेऊन जा! आणि वधस्तंभावर खिळून मारा!” पिलाताने त्यांना विचारले, “मी तुमच्या राजाला वधस्तंभी द्यावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “आम्हांला कैसराशिवाय दुसरा कोणी राजा नाही.”
मग त्याने त्याला वधस्तंभी खिळण्यासाठी त्यांच्या हाती दिले. मग शिपायांनी येशूचा ताबा घेतला.
येशूने स्वत:चा वधस्तंभ वाहिला. तो बाहेर कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी गेला. (इब्री भाषेत त्याला गुलगुथा म्हणतात.)
गुलगुथा येथे त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळ्यांनी ठोकले. त्यांनी आणखी दोन मनुष्यांनासुद्वा वधस्तंभावर खिळले. त्या दोघांना त्यांनी येशूच्या दोन्ही बाजूंना खिळले व मध्ये येशूला खिळले.
आणि पिलाताने एक वाक्य लिहिले आणि ते वधस्तंभावर लावले. त्यावर असे लिहिले होते की, “येशू नासरेथकर - यहूद्यांचा राजा”
ती पाटी भाषेत लिहिली होती. पुष्कळ यहूदी लोकांनी ती पाटी वाचली, कारण येशूला जेथे वधस्तंभावर देण्यात आले होते ते ठिकाण शहराच्या जवळ होते. तसेच ते लॅटीन, ग्रीक, आरामी भाषेतही होते.
यहुद्यांच्या मुख्य याजकांनी पिलाताला विरोध केला. ते म्हणाले, ‘यहूद्यांचा राजा’ असे लिहू नका, ‘तर हा मनुष्य यहूदी लोकांचा राजा आहे’ “असा दावा करतो, असे लिहा.”
पिलाताने म्हटले, “मी जे लिहिले ते लिहिले.”
जेव्हा शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळले, तेव्हा त्यांनी त्याची वस्त्रे घेतली. आणि चौघात ती वाटून घतली. फक्त अंतर्वस्त्रे ठेवली. हा पोशाख वरपासून खालपर्यंत पूर्ण विणलेला होता. त्याला शिवलेले नव्हते.
म्हणून ते एकमेकांस म्हणाले, “हा आपण फाडू नये, तर यासाठी चिठ्ठ्या टाकून कोणाला मिळतो ते ठरवू या.” हे यासाठी घडले की, पवित्र शास्त्रात जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे. “त्यांनी माझी वस्त्रे आपआपसांत वाटून घेतली आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकल्या.” स्तोत्र. 22:18 म्हणून शिपायांनी असे केले.
येशूच्या वधस्तंभाशोजारी त्याची आई, त्याच्या आईची बहीण, क्लोपाची आई मरीया आणि मरीया मग्दालिया उभ्या होत्या.
जेव्हा येशूने त्याच्या आईला तेथे पाहिले. आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीति होती तो जवळच उभ होता, तेव्हा तो त्याच्या आईला म्हणाला, “आई, हा तुझा मुलगा आहे,”
आणि त्या शिष्याला येशू म्हणाला, “ही तुझी आई आहे.” म्हणून त्या दिवसापासून या शिष्याने तिला आपल्या घरी नेले.
नंतर, हे ओळखून की आता सर्व पूर्ण झाले आहे, आणि पवित्र शास्त्रातील वचनांची परिपूर्ती व्हावी म्हणून, येशू म्हणाला, “मला तहान लागली आहे.”
तेथे एक आंब भरून ठेवलेले भांडे होते, म्हणून त्यांनी बोळा आंबेत बुडवून भरून एजोबाच्या काठीवर ठेवून त्याच्या तोंडला लावला.
येशू आंब घेतल्यावर म्हणाला, “पूर्ण झाले आहे.” मग त्याने आपले डोके लववून आपला आत्मा सोडून दिला.
तो तयारीचा दिवस होता व दुसऱ्या दिवशी विशेष शब्बाथाचा दिवस होता. शब्बाथ दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत अशी यहूदी लोकांची इच्छा होती. त्यांनी पिलाताला पाय तोडण्याची आणि शरीरे वधस्तंभावरून खाली घेण्याविषयी विचारले,
म्हणून शिपायांनी येऊन येशूबरोबर वधस्तंभी खिळलेल्या पहिल्याचे व नंतर दुसऱ्याचे पाय मोडून टाकले.
पण जेव्हा ते येशूकडे आले. तेव्हा त्यांना आढळून आले की, तो अगोदरच मेला आहे. तेव्हा त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत.
तरी शिपायांपैकी एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला, तेव्हा लगेच रक्त आणि पाणी बाहेर निघाले.
ज्या मनुष्याने हे पाहिले, त्याने साक्ष दिली आहे आणि त्याची साक्ष खरी आहे. त्याला माहीत आहे की, तो खरे बोलतो व तो साक्ष देतो यासाठी की, तुम्ही विश्वास धरावा.
या गोष्टी अशासाठी घडल्या की, पवित्र शास्त्राची परिपूर्ती व्हावी: “त्याचे एकही हाड मोडणार नाही.”
आणि दुसऱ्या शास्रभागात म्हटले आहे: “ज्याला त्यांनी भोसकले त्याला ते पाहतील.”
नंतर अरिमथाई येथील योसेफाने पिलातला येशूचे शरीर मागितले. योसेफ हा येशूचा शिष्य होता, पण गुप्त रीतीने, कारण त्याला यहूद्यांची भीति वाटत होती. पिलाताच्या परवानगीने तो आला व शरीर घेऊन गेला.
त्याच्याबरोबर निकदेम होता. याच मनुष्याने रात्रीच्या वेळी येशूची भेट घेतली होती. निकदेम शंभर पौंड गंधरस व अगरू घेऊन आला.
मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहूदी लोकांच्या प्रेत पुरण्याच्या रीतीप्रमाणे सुगंधित द्रव्यासहित तागांनी ते गुंडाळले.
जेथे त्याला वधस्तंभी मारले होते तेथे एक बाग होती. आणि त्या बागेत एक नवीन थडगे होते, व त्या थडग्यात आतापर्यंत कोणालाच ठेवलेले नव्हते.
तो यहूद्यांच्या सणाच्या पूर्वतयारीचा दिवस असल्याने व ते थडगे जवळ असल्याने त्यांनी येशूला तेथेच ठेवले.
20
मग रविवारी सकाळी अगदी पहाटे मरीया मग्दलिया थडग्याकडे आली आणि थडग्यावरून धोंड काढलेली आहे असे तिला आढळले.
म्हणून तिने शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीति होती तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन म्हटले, “त्यांनी प्रभुला थडग्यातून काढून नेऊन कोठे ठेवले हे आम्हांला माहीत नाही.”
मग पेत्र व दुसरा शिष्य हे निघाले व थडग्याकडे गेले.
तेव्हा ते दोघे बरोबर पळत गेले. आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे जाऊन त्याच्या आधी थडग्याजवळ पोहोचला.
आणि त्याने वाकून आत डोकावले. तेव्हा त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, पण तो आत गेला नाही.
मग शिमोन पेत्रही त्याच्यामागून आला व थडग्यात आत गेला.
तेव्हा तागाची वस्त्रे पडलेली आणि जो रुमाल त्याच्या डोक्याला होता, तो तागाच्या वस्त्राबरोबर नाही, तर निराळा एकीकडे गुंडाळलेला पडलेला त्याने पाहिला.
शेवटी तो दुसरा शिष्य जो थडग्याकडे पहिल्यांदा पोहोचला होता, तोसुद्वा आत गेला, त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला.
येशूने मरणातून पुन्हा उठणे आवश्यक आहे, हे त्यांना अजूनसुद्धा समजले नव्हते.
मग शिष्य त्यांच्या घरी गेले.
पण मरीया थडग्यासमोर रडत उभी राहिली, ती रडत असता आत डोकावण्यासाठी वाकली
आणि तिने दोन देवदूतांना पांढऱ्या पोशाखात जेथे येशूचे शरीर होते तेथे बसलेले पाहिले. एकजण डोके होते, तेथे बसला होता व एकजण पायाजवळ बसला होता.
त्यांनी तिला विचारले, “बाई तू का रडत आहेस?” ती म्हणाली, “ते माझ्या प्रभूला घेऊन गेले आहेत आणि मला माहीत नाही, त्यांनी त्याला कोठे ठेवले आहे.”
यावेळी ती पाठमोरी वळाली. तिने तेथे येशूला उभे असलेले पाहिले. पण तिला हे समजले नाही की तो येशू आहे.
तो म्हणाला, “बाई, तू का रडत आहेस? तू कोणाला शोधत आहेस?” तिला वाटले तो माळी आहे, ती म्हणाली, “दादा, जर तू त्याला कोठे नेले असशील, तर मला सांग तू त्याला कोठे ठेवले आहेस, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.”
येशू तिला म्हणाला, “मरीये” ती त्याच्याडे वळाली आणि अरेमी भाषेत मोठ्याने ओरडली, “रब्बनी!” (याचा अर्थ गुरुजी)
येशू तिला म्हणाला, “माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी अजून पित्याकडे गेलो नाही, तर माझ्या भावांकडे जा आणि त्यांना सांग: मी माझ्या पित्याकडे व तुमच्या पित्याकडे व माझ्या देवाकडे व तुमच्या देवाकडे जात आहे.”
मरीया मग्दालिया ही बातमी घऊन शिष्यांकडे गेली. “मी प्रभुला पाहिले आह!” आणि तिने त्यांना सांगितले की, त्याने या गोष्टी सांगितल्या आहेत.
आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य होते तेथील दार यहूदी लोकांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला व मध्ये उभा राहिला. त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांति असो.”
असे बोलल्यावर त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली, तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला.
पुन्हा येशू म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो! जसे पित्याने मला पाठवले आहे, तसे मी तुम्हांला पाठवितो.”
आणि असे म्हणून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि म्हणाला, “पवित्र आत्मा स्वीकारा.
जर तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली, तर त्याला पापक्षमा मिळेल. जर तुम्ही क्षमा केली नाही तर त्यांची क्षमा होणार नाही.”
आता थोमा (याला दिदुम म्हणत) बारा शिष्यांपैकी एक होता. येशू आला तेव्हा तो शिष्यांबरोबर नव्हता.
तेव्हा इतर शिष्यांनी त्याला सांगितले की, “आम्ही प्रभूला पाहिले आहे!” पण तो त्यांना म्हणाला, “त्याच्या हातांमधील खिळ्यांचे व्रण पाहिल्याशिवाय व खिळ्यांच्या व्रणांत माझे बोट घातल्याशिवाय व त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास धरणार नाही.”
एक आठवड्यानंतर येशूचे शिष्य त्या घरामध्ये पुन्हा बसले होते व थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दार बंद होते तरी येशू आत आला व त्यांच्यामध्ये उभा राहिला. आणि म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो.”
मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट इकडे कर व माझे हात पाहा आणि तुझा हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल. संशय सोड आणि विश्वास ठेव.”
थोमा त्याला म्हणाला, “माझा प्रभु आणि माझा देव!”
मग येशू त्याला म्हणाला, “तू मला पाहिले आहेस म्हणून तू विश्वास ठेवला आहेस, पण ज्यांनी मला पाहिले नाही तरीही त्यांनी विश्वास धरला ते धन्य आहेत.”
आणखी या पुस्तकात लिहिली नाहीत अशी पुष्कळ अदभुत चिन्हे येशूने त्याच्या शिष्यांच्या समवेत केली. ती या पुस्तकात लिहिली नाहीत.
पण ही लिहिली यासाठी की, तुम्ही विश्वास ठेवावा की, येशू हा ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे आणि विश्वास ठेवल्याने त्याच्या नावात तुम्हांला जीवन मिळेल.
21
नंतर येशू त्याच्या शिष्यांना पुन्हा दिसला. तो तिबीर्या सरोवराजवळ (जे गालीलात होते) त्या ठिकाणी दिसला. हे अशा प्रकारे घडले:
काही शिष्य एकत्र होते. ते म्हणजे शिमोन पेत्र, थोमा (दिदुम म्हणत तो), गालीलातील काना येथील नथनीएल, जब्दीचे मुलगे, व त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे दोघे असे ते होते.
शिमोन पेत्राने त्यांना म्हटले, “मी मासे धरायला जातो.” ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” नंतर ते बाहेर गेले व नावेत बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही मिळाले नाही.
दुसऱ्या दिवशी पहाटे येशू किनाऱ्यावर उभा राहिला. पण शिष्यांना समजले नाही की तो येशू आहे.
तो त्यांना म्हणाला, “मित्रांनो, तुम्ही काही मासे पकडले का?” त्यांनी उत्तर दिले, “नाही.”
तो म्हणाला, “तुमचे जाळे नावेच्या उजव्या बाजूला टाका व मग तुम्हांला काही मासे मिळतील.” जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा त्यांना पुष्कळ मासे मिळाल्यामुळे जाळे ओढता येईना.
तेव्हा येशूची ज्याच्यावर प्रीति होती तो पेत्राला म्हणाला, ‘तो प्रभु आहे!’ असे म्हणता क्षणीच पेत्राने कपडे गुंडाळले. (कारण त्याने कपडे काढले होते) व पाण्यात उडी मारली.
दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले कारण ते काठापासून दूर नव्हते, फक्त शंभर यार्ड होते.
जेव्हा ते किनाऱ्याला आले, त्यांनी कोळशांनी पेटविलेला विस्तव पाहिला व मासे आणि भाकर त्यावर ठेवलेली पाहिली.
येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या माशांतून काही मासे आणा.”
शिमोन पेत्राने नावेत जाऊन एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे काठास आणले. इतके मासे असतानाही जाळे फाटले नाही.
येशू त्यांना म्हणाला, ‘या, जेवा, “तेव्हा तो प्रभु आहे असे त्यांना समजले. म्हणून शिष्यांपैकी कोणी त्याला, तू कोण आहेस, हे विचारायला धजला नाही.
मग येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली. तसेच मासळीही दिली.
येशू मेलेल्यांतून उठल्यावर तो आपल्या शिष्यांस प्रगट होण्याची ही तिसरी वेळ.
मग जेव्हा त्यांनी खाणे संपविले, येशू पेत्राला म्हणाला, “योहानाच्या मुला, शिमोना, तू माझ्यावर या सर्वापेक्षा अधिक प्रीति करतोस काय?” तो म्हणाला, “होय प्रभु, तुम्हांला माहीत आहे की, मी तुमच्यावर प्रीति करतो.” येशू म्हणाला, “माझ्या कोकरांना चार.”
पुन्हा येशू म्हणाला, “शिमोना, योहानाच्या मुला, तू खरोखर माझ्यावर प्रीति करतोस का?” पेत्राने उत्तर दिले, “होय प्रभु तुम्हांला माहीत आहे की मी तुमच्यावर प्रीति करतो.” येशू म्हणाला, “माझ्या मेढरांची काळजी घे.”
तिसऱ्या वेळी तो त्याला म्हणाला, “शिमोना, योहानाच्या मुला, तू माझ्यावर प्रीति करतोस का?” पेत्र दु:खी झाला कारण येशूने त्याला तिसऱ्यांदा विचारले होते, ‘तू माझ्यावर प्रीति करतोस का?’ तो म्हणाला, “प्रभु, तुम्हांला सर्व गोष्टी माहीत आहेत, तुम्हांला माहीत आहे की, मी तुमच्यावर प्रीति करतो.” येशू म्हणाला, “माझ्या मेंढरांना चार.
मी खरे सांगतो, तू तरुण होतास, तेव्हा तू स्वत: पोशाख करून तुला जेथे पाहिजे तेथे जात होतास. पण जेव्हा तू म्हातारा होशील तेव्हा तू आपला हात लांब करशील, आणि दुसरा कोणीतरी तुला पोशाख घालील. आणि जेथे तुझी इच्छा नाही तेथे नेईल.”
तो कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार व देवाचे गौरव करणार हे सुचविण्यासाठी येशू हे बोलला. हे बोलल्यानंतर तो म्हणाला, “माइयामागे ये.”
मग पेत्राने वळून ज्या शिष्यावर येशू प्रीति करीत असे, तो त्यांच्यामागे येत होता. (हा तोच होता, जो भोजनाच्या वेळी येशूजवळ बिलगून बसला होता. आणि म्हणाला होता. “प्रभु, तुझा विश्वासघात कोण करणार आहे?)” त्याला पाहिले.
जेव्हा पेत्राने त्याला पाहिले, तेव्हा त्याने विचारले, ‘प्रभु, याचे काय?”
येशूने उत्तर दिले, “मी परत येईपर्येत त्याने जगावे अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय? तू मला अनुसर.”
या कारणामुळे अशी अफवा बंधुवर्गात पसरली की, हा शिष्य मरणार नाही, पण येशू असे म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, तो फक्त म्हणाला, “मी येईपर्यंत त्याने जिवंत राहावे, अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय?”
जो शिष्य या गोष्टीविषयी साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे. आणि त्याची साक्ष खरी आहे, हे आम्हांला माहीत आहे.
आणि येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कामे आहेत, ती एकेक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात ठेवायला जागा पुरणार नाही, असे मला वाटते.
- Lizenz
-
CC-0
Link zur Lizenz
- Zitationsvorschlag für diese Edition
- TextGrid Repository (2025). John the Evangelist. John (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A8A5-0