1

अहाबच्या मृत्यूनंतर मवाब इस्राएल पासून वेगळा झाला.
एकदा अहज्या आपल्या शोमरोनमधल्या घराच्या माडीवर बसला होता. तेव्हा तिथल्या लाकडी कठडयावरुन तो खाली पडला आणि जबर जखमी झाला. अहज्याने मग आपल्या सेवकांना बोलावले आणि सांगितले. “एक्रोनचे दैवत बाल-जबूब याच्या पुरोहितांना मी या दुखण्यातून बरा होईन का ते विचारुन या.”
पण एलीया तिश्बी याला परमेश्वराचा दूत म्हणाला, “राजा अहज्याने शोमरोनहून आपले काही दूत रवाना केले आहेत. त्यांना जाऊन भेट त्यांना म्हण, ‘इस्राएलचा देव परमेश्वर आहे. तेव्हा एक्रोनचे दैवत बाल-जबूब याला विचारायला का जाता?
राजा अहज्याला हा निरोप सांगा तू बाल-जबूब कडे आपले दूत पाठवलेस याबद्दल परमेश्वर काय म्हणतो ते ऐक तू आता अंथरुणावरुन उठणार नाहीस. तुला मरण येईल.”‘ मग एलीया उठला आणि अहज्याच्या सेवकांना त्याने जाऊन हा निरोप सांगितला.
तेव्हा ते दूत अहज्याकडे आले. अहज्याने त्यांना विचारले, “तुम्ही एवढ्या लौकर कसे आलात?”
ते अहज्याला म्हणाले, “आम्हाला एकजण भेटायला आला होता. त्याने आम्हाला तुमच्याकडे परत येऊन परमेश्वराचा हा निरोप सांगायला सांगितले, ‘इस्राएलात परमेश्वर आहे. तरी तू एक्रोनचे दैवत बाल-जबूब याच्याकडे आपल्या सेवकांना का पाठवलेस? ज्याअर्थी तू असे केलेस त्याअर्थी तू आता बरा होणार नाहीस. तू मृत्यू पावशील.”
अहज्या आपल्या दूतांना म्हणाला, “ज्याने तुम्हाला भेटून हे सांगितले तो दिसायला कसा होता?
तेव्हा ते दूत म्हणाले, “तो एक केसाळ माणूस होता आणि त्याने कातडयाचा कंबरपट्टा बांधला होता. तेव्हा अहज्या म्हणाला, “म्हणजे तो एलीया तिश्बी होता.”
अहज्याने आपला एक सरदार पन्नास माणसांसह एलीयाकडे पाठवला. हा सरदार एलीयाकडे गेला. एलीया तेव्हा एका डोंगराच्या माथ्यावर बसला होता. तो सरदार एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या माणसा (संदेष्ट्या), राजाने तुला खाली बोलावले आहे.”
एलीयाने या सरदाराला उत्तर दिले, “मी खरेच देवाचा माणूस (संदेष्टा) असेन तर आकाशातून अग्नी प्रकट होऊन तुला आणि या पन्नास जणांना भस्मसात करु दे.” तेव्हा आकाशातून अग्नी खाली आला आणि त्यात सरदारासह ती पन्नास माणसे जळून खाक झाली.
अहज्याने दुसऱ्या सरदाराला पन्नास जणांसह पाठवले. तो सरदार एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या माणसा, ‘खाली ये असा राजाचा निरोप आहे.”‘
एलीयाने त्या सर्वाना सांगितले “मी परमेश्वराचा माणूस असेन तर आकाशातून अग्नी उतरुन त्यात तुम्ही सर्व जळून जाल.” तेव्हा आकाशातून परमेश्वराचा अग्नी उत्पन्र झाला आणि त्यात ते सर्वजण जळून गेले.
अहज्याने तिसऱ्या सरदारला पन्नास जणांसह पाठवले. तो ही सरदार आपल्या बरोबरच्या लोकांसह एलीयाकडे आला. हा सरदार गुडघे टेकून बसला आणि एलीयाची त्याने विनवणी केली. तो म्हणाला, “हे देवाच्या माणसा, मी आणि माझ्याबरोबरचे हे पन्नासजण यांच्या प्राणांचे मोल तू जाणावेस.
आधीचे दोन सरदार आणि त्यांच्या बरोबरची पन्नास पन्नास माणसे आकाशातून आलेल्या अग्नीत नष्ट झाली. पण आता आमच्यावर दया कर आणि आम्हाला जीवदान दे.”
तेव्हा परमेश्वराचा दूत एलीयाला म्हणाला, “या सरदारबरोबर. जा व त्याला भिऊ नकोस.” तेव्हा एलीया त्या सरदाराबरोबर राजा अहज्याला भेटायला गेला.
एलीया अहज्याला म्हणाला, “इस्राएलचा देव परमेश्वर आहे. तरी तू एक्रोनच्या बाल-जबूबकडे माणसे का पाठवलीस? तू असे केलेस म्हणून तू आता अंथरुणावरुन उठणार नाहीस. तुला मरण येईल.”
अहज्या मरण पावला. परमेश्वराने एलीयाला सांगितले होते तसेच झाले. अहज्याला मुलगा नव्हता. तेव्हा अहज्यानंतर यहोराम राजा झाला. यहोशाफाटचा मुलगा यहोराम यहूदावर राज्य करत असताना दुसऱ्या वर्षी हा यहोराम राज्य करु लागला.
“इस्राएलाच्या राजांचा इतिहास’ या ग्रंथात अहज्या ने केलेली बाकीची कृत्ये लिहिलेली आहेत.

2

एका वावटळीद्वारे एलीयाला स्वर्गास परमेश्वराने घेऊन जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती. एलीया अलीशाबरोबर गिलगालला गेला.
एलीया अलीशाला म्हणाला, “तू येथेच थांब कारण परमेश्वराने मला बेथेलला जायला सांगितले आहे.” पण अलीशा म्हणाला, “परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की मी तुम्हाला अंतर देणार नाही.” तेव्हा ते दोघेही जण बेथेल येथे गेले.
तेव्हा संदेष्ट्यांचा बेथेलमधला एक गट अलीशाला येऊन भेटला. आणि म्हणाला, “आज तुझ्या स्वामीला परमेश्वर घेऊन जाणार आहे हे तुला माहीत आहे ना?” अलीशा म्हणाला, “होय, मला माहीत आहे, पण ह्या विषयासबंधी बोलू नका”
एलीया अलीशाला म्हणाला, “तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यरीहो येथे जायला सांगितले आहे.” पण अलीशा म्हणाला, “परमेश्वराची शपथ, मी तुम्हाला सोडून राहणार नाही.” तेव्हा ते दोघे यरीहोला गेले.
तेव्हा यरीहोचे संदेष्टे अलीशाकडे आले आणि म्हणाले, “परमेश्वर तुझ्या स्वामीला आज घेऊन जाणार आहे हे तुला माहीत आहे का?” अलीशा म्हणाला, “हो, मला कल्पना आहे, पण त्याबद्दल आता बोलू नका.”
एलीया अलीशाला म्हणाला, “तू तेथेच थांब कारण परमेश्वराने मला यार्देन नदीवर जायला सांगितले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वराची आणि तुमच्या आयुष्याची शपथ, मी तुम्हाला अंतर देणार नाही.” तेव्हा ते दोघे तसेच पुढे निघाले.
संदेष्ट्यांपैकी पन्रास जण त्यांच्या मागोमाग निघाले. एलीया आणि अलीशा यार्देन नदीजवळ थांबले. ते पन्नास जण मात्र बरेच लांब उभे राहिले.
एलीयाने आपला अंगरखा अंगातून काढला त्याची घडी घातली आणि पाण्यावर आपटली. त्याबरोबर पाणी मधोमध उजवीकडे आणि डावीकडे दुंभगले. अलीशा आणि एलीया मधल्या कोरडया वाटेने नदी पार करुन गेले.
नदी ओलांडल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर तुला माझ्याकडून काही हवे असल्यास सांग.” अलीशा म्हणाला, “तुमच्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”
एलीया म्हणाला, “ही तर फारच कठीण गोष्ट तू मागितलीस. मला तुझ्या जवळून घेऊन जातील तेव्हा तुला मी दिसलो तर हे शक्य आहे. नाहीतर नाही.”
एलीया आणि अलीशा बोलत बोलत पुढे चालले होते. तेवढयात अचानक काही घोडे आणि एक रथ तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी एलीया आणि अलीशाला एकमेकांपासून दूर केले. तो रथ आणि घोडे अग्नीप्रमाणे होते नंतर एका वावटळीमधून एलीया स्वर्गात गेला.
अलीशाने ते पाहिले आणि तो ओरडू लागला, “माझ्या बापा! माझ्या बापा! काय हा इस्राएलचा रथ आणि हे स्वर्गीय घोडे स्वार!” अलीशाला एलीयाचे पुन्हा कधीच दर्शन झाले नाही. अलीशाने दु:खाच्या भरात आपले कपडे फाडले.
एलीयाचा अंगरखा जमिनीवर पडला होता तो अलीशाने उचलला. अलीशाने पाण्यावर तडाका देऊन म्हटले, “एलीयाचा परमेश्वर देव कुठे आहे?”
अलीशाने पाण्यावर वार केल्याबरोबर पाणी डावीउजवीकडे दुभंगले. मग अलीशा नदी पार करुन गेला.
यरीहो येथील संदेष्ट्यांनी अलीशाला पाहिल्यावर ते म्हणाले, “एलीयाच्या आत्म्याचा आता अलीशात प्रवेश झाला आहे.” ते सर्वजण अलीशाला भेटायला आले. त्याला त्यांनी जमिनीपर्यंत लवून अभिवादन केले.
मग त्याला ते म्हणाले, “हे बघ, आमच्याकडे पन्नास एक चांगली माणसे आहेत. त्यांना जाऊन तुझ्या स्वामीचा शोध घेऊ दे. कदाचित् परमेश्वराच्या आत्म्याने एलीयाला वर नेऊन पुन्हा कोठेतरी डोंगर-दऱ्यांमध्ये टाकले असेल.” पण अलीशा म्हणाला, “नाही, आता एलीयाचा शोध घ्यायला माणसे पाठवू नका.”
पण त्या संदेष्ट्यांनी खूप मिनतवाऱ्या करुन अलीशाची पंचाईत करुन टाकली. शेवटी अलीशा म्हणाला, “ठीक आहे, पाठवा त्यांना एलीयाच्या शोधात.” मग त्या संदेष्ट्यांनी पन्नास जणांना एलीयाच्या शोधार्थ पाठवले. त्यांनी एलीयाचा तीन दिवस शोध घेतला पण त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला.
शेवटी ती माणसे यरीहो येथे अलीशा राहात होता तेथे आली. एलीयाचा शोध लागत नाही असे त्यांनी अलीशाला सांगितले. तेव्हा आपण या गोष्टीला नको म्हणत होतो असे अलीशाने त्यांना सांगितले.
एकदा त्या नगरातील माणसे अलीशाला म्हणाली, “हे नगर फार चांगल्या ठिकाणी वसले आहे हे तुम्ही पाहताच आहात पण इथले पाणी खराब आहे. त्यामुळे या जमिनीत पिके निघू शकत नाहीत.”
अलीशा त्यांना म्हणाला, “एक नवीन पात्र घेऊन या आणि त्यात मीठ घाला.” तेव्हा लोकांनी एक पात्र त्याला दिले.
अलीशा ते घेऊन त्या झऱ्याच्या उगमापाशी गेला. तिथे त्याने मीठ टाकले. मग तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘आता हे पाणी मी शुध्द करत आहे. आता या पाण्याने मृत्यू ओढवणार नाही की पिकाची वाढ खुंटणार नाही.”‘
अशाप्रकारे पाणी शुध्द झाले ते पाणी अजूनही चांगले आहे. अलीशा म्हणाला होता तसेच झाले.
अलीशा मग त्या नगरातून बेथेलला आला. तो डोंगर चढून जात होता आणि काही मुले गावातून डोंगर उतरत होती. त्यांनी अलीशाची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “अरे टकल्या वर जा, ए टकल्या, वर जा.”
अलीशाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि शापवाणी उच्चारली. त्याबरोबर जंगलातून दोन अस्वले बाहेर आली आणि त्यांनी या मुलांवर हल्ला केला. बेचाळीस मुलांच्या त्या अस्वलांनी चिंधडया केल्या.
अलीशाने बेथेल सोडून कर्मेल डोंगराचा रस्ता धरला. आणि तिथून मग तो शोमरोनला गेला.

3

अहाबाचा मुलगा यहोराम हा शोमरोन मध्ये इस्राएलचा राजा म्हणून सत्तेवर आला. यहोशाफाटचे ते यहूदाचा राजा म्हणून अठरावे वर्ष होते. यहोरामने बारा वर्षे राज्य केले.
यहोरामने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. पण आपल्या आईवडीलांसारखे त्याने केले नाही. आपल्या वडीलांनी बाल मूर्तीच्या पूजेसाठी जो स्तंभ उभारला होता तो त्याने काढून टाकला.
पण नबाटचा मुलगा यराबाम याने केली तीच पापे यहोरामनेही केली. शिवाय इस्राएल लोकांनाही ती करायला लावली. यराबामच्या पापात त्याने खंड पाडला नाही.
मेशा हा मवाबचा राजा होता. त्याच्याकडे मेंढयांचे बरेच कळप होते. एक लक्ष मेंढया आणि एक लक्ष एडके यांची लोकर तो इस्राएलच्या राजाला देत असे.
पण अहाबच्या मूत्यूनंतर तो इस्राएलच्या सत्तेपासून फुटून वेगळा झाला.
यहोराम मग शोमरोन मधून बाहेर पडला आणि त्याने सर्व इस्राएल लोकांना एकत्र केले.
यहूदाचा राजा यहोशाफाट याच्याकडे त्याने आपले दूत पाठवले. यहोरामने निरोप पाठवला, “मवाबच्या राजाने बंड केले आहे तेव्हा त्याच्यावर हल्ला करायला तुम्ही माझ्या बाजूने याल का?” यहोशाफाटने सांगितले, “होय, मी जरुर येईन तुझ्या माझ्यात काही भेदभाव नाही. माझे सैन्य, ते तुझे सैन्य माझे घोडे ते तुझे घोडे.”
“कोणत्या वाटेने हल्ला करायला जायचे” यहोशाफाटने यहोरामला विचारले. यावर, “अदोमच्या वाळवंटाच्या दिशेने” असे यहोरामने सांगितले.
इस्राएलचा राजा, यहूदा आणि अदोम यांच्या राजांबरोबर निघाला. सात दिवस त्यांनी वाटचाल केली. त्यांचे सैन्य, तसेच त्यांच्याबरोबरची जनावरे यांच्यासाठी पुरेसे पाणी नव्हते.
तेव्हा इस्राएलचा राजा यहोराम म्हणाला, “मवाबांच्या हातून पराभव पत्करावा लागावा म्हणून का परमेश्वराने आम्हा तीन राजांना एकत्र आणले आहे.?”
यावर यहोशाफाट म्हणाला, “येथे एखादा परमेश्वराचा संदेष्टा नक्कीच असला पाहिजे. आपण काय करावे असे परमेश्वराला वाटते ते आपण त्यालाच विचारु या.” यहोरामचा एक सेवक म्हणाला, “शाफाटचा मुलगा अलीशा इथेच आहे. एलीयाच्या हातावर तो पाणी घालत असे, त्याचा तो सेवक होता.”
यहोशाफाट म्हणाला, “अलीशाच्या मुखातून परमेश्वरच बोलतो.” मग इस्राएलचा राजा यहोराम, यहोशाफाट आणि अदोमचा राजा असे तिघे जण अलीशाकडे गेले.
अलीशा यहोरामला म्हणाला, “माझ्याकडून तुला काय पाहिजे? तू आपल्या वडीलांच्या किंवा आईच्या संदेष्ट्यांकडे जा.” तेव्हा इस्राएलच्या राजा अलीशाला म्हणाला, “नाही, आम्ही तुझ्याकडे आलो आहोत कारण मवाबांचा पराभव करायला आम्हा तीन राजांना परमेश्वराने एकत्र आणले आहे. आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे.”
अलीशा म्हणाला, “मी यहुदाचा राजा यहोशाफाट याचा आदर करतो व सर्वशक्तीमान परमेश्वराचा मी सेवक आहे. त्याला स्मरुन मी सांगतो की यहूदाचा राजा यहोशाफाट याच्यामुळे मी येथे आलो आहे. मी तुम्हाला खरे सांगतो जर यहूदाचा राजा यहोशाफाट इथे नसता तर मी तुझी दखलही घेतली नसती.
तेव्हा आता एखारुा वीणावादकाला इथे बोलावून आणा.” एक वादक येऊन वीणा वाजवू लागला तेव्हा परमेश्वराचे सामर्थ्य अलीशात आले.
मग अलीशा म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे: या खोऱ्यात जागोजाग खणून ठेवा
परमेश्वर म्हणतो तुम्हाला वारा, पाऊस काही दिसणार नाही पण तरीही हे खोरे पाण्याने भरुन जाईल. तुम्हाला आणि तुमच्या जनावरांना पाणी मिळेल.
परमेश्वराला एवढे करणे सोपे आहे. मवाबांचाही तुम्हाला तो पराभव करु देईल.
प्रत्येक तटबंदीच्या व चांगल्या बंदोबस्त आणि निवडक नगरांवर तुम्ही हल्ला कराल. प्रत्येक चांगला वृक्ष तुम्ही तोडून टाकाल, पाण्याचे झरे, विहिरी बुजवून टाकाल. दगडफेक करुन चांगल्या शेतांची नासाडी कराल.”
नंतर सकाळी, सकाळच्या यज्ञाच्या वेळी, अदोमच्या बाजूने पाण्याचा लोंढा आला आणि सगळे खोरे पाण्याने भरले.
राजे आपल्यावर हल्ला करायला आले आहेत हे मवाबच्या लोकांनी ऐकले तेव्हा त्यांनी आपल्याकडच्या युध्दात उतरता येण्याजोग्या सर्व पुरुषांना एकत्र केले. युध्दासाठी सज्ज होऊन ते सीमेवर जाऊन थांबले.
मवाबचे लोक त्या दिवशी भल्या पहाटे उठले. उगवत्या सूर्याची लाली खोऱ्यातल्या पाण्यात प्रतिबिंबित होऊन चमकत होती. तेव्हा मवाबी लोकांना ते रक्ताचे पाटच वाटले.
ते म्हणाले, “ते बघा रक्त! या राजांची आपापसात लढाई झालेली दिसते. त्यांनी परस्परांना मारले आहे. चला, आपण त्या मृतदेहावरील मौल्यवान वस्तू लुटून आणू.”
मवाबी लोक इस्राएलांच्या छावणीपाशी आले. तेव्हा इस्राएल लोकांनी बाहेर येऊन मवाबी सैन्यावर हल्ला केला. मवाबी लोक पळत सुटले. इस्राएल लोकांनी त्यांच्या पाठलाग करत त्यांच्या प्रदेशात शिरकाव केला.
इस्राएल लोकांनी त्यांची नगरे उध्वस्त केली. पिके उभी असलेल्या त्यांच्या शेतात दगडांचा मारा केला. झरे, विहिरी बुजवल्या. झाडे आडवी केली. कीर हरेसेथला वेढा घालून या नगराचाही पाडाव केला.
या लढाईला तोंड देणे आपल्याला जड जात आहे हे मवाबाच्या राजाने जाणले. तेव्हा त्याने तलवारधारी सातशे निवडक माणसे बरोबर घेतली आणि वेढा फोडून अदोमच्या राजाला तो मारायला निघाला पण त्याला ते जमले नाही.
मग मवाबच्या राजाने आपल्या थोरल्या मुलाला बरोबर घेतले. हा मुलगा त्याच्यानंतर गादीवर बसणार होता. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर या राजाने आपल्या मोठ्या मुलाचा यज्ञात बळी दिला. इस्राएल लोकांना या गोष्टीचा धक्काबसला. मवाबच्या राजाला सोडून ते आपल्या देशात चालते झाले.

4

संदेष्ट्यांपैकी एकजण वारला तेव्हा त्याची बायको विधवा झाली. ती अलीशाकडे रडत रडत आली, आणि म्हणाली, “माझा नवरा तुझा सेवक असल्यासारखा होता. परंतु आता तो मरण पावला आहे. परमेश्वराचा तो मान राखत असे हे तुला माहीत आहे. पण तो एका माणसाचे देणे लागत होता. तो माणूस आता माझ्या मुलांना गुलाम करुन घ्यायला येतो आहे.”
अलीशा म्हणाला, “मी तुला काय मदत करु? घरात तुझ्या जवळ काय आहे ते सांग.” तेव्हा ती बाई म्हणाली, “एका तेलाचा बुधला सोडला तर माझ्याजवळ काहीही नाही.”
यावर अलीशाने तिला सांगितले, “आता जा आणि सगळ्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी मागून आण. चांगली बरीचशी आण.
मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एका बाजूला ठेव.”
मग ती बाई अलीशाकडून निघून आपल्या घरी आली आणि तिने दार आतून लावून घेतले. फक्त ती आणि तिची मुलेच काय ती घरात होती. मुलांनी रिकामी भांडी आणली आणि ती त्यात तेल ओतत गेली.
अशी अनेक भांडी भरली शेवटी ती आपल्या मुलाला म्हणाली, “आणखी एक भांडे घेऊन ये.” पण एकही भांडे शिल्लक नव्हते तिचा एक मुलगा तिला म्हणाला, “आता एकही भांडे उरले नाही” त्यावेळी बुधल्यातले तेल संपले.
मग ती अलीशाकडे आली आणि तिने त्या परमेश्वराच्या माणसाला हे सांगितले. अलीशा तिला म्हणाला, “आता हे तेल वीक आणि कर्जफेड कर. उरेल त्या पैशावर तुझा आणि तुझ्या मुलांचा निर्वाह चालेल.”
एकदा अलीशा शूनेम येथे गेला. तेथे एक प्रतिष्ठित बाई राहात होती. तिने अलीशाला आपल्या घरी येऊन जेवायचा आग्रह केला. त्यामुळे अलीशा जेव्हा जेव्हा तिकडून जाई तेव्हा तेव्हा या बाईकडे जेवणासाठी मुक्काम करत असे.
एकदा ही बाई आपल्या नवऱ्याला म्हणाली, “पाहा आपल्या इथे नेहमी येतो तो अलीशा परमेश्वराचा पवित्र माणूस आहे, तो नेहमी आपल्या घरावरुन जातो.
तेव्हा त्याच्यासाठी वर एक लहानशी खोली बांधू या आणि एक पलंग, एक टेबल खुर्ची आणि दिव्याची सोय पण करु. म्हणजे तो जेव्हा येईल तेव्हा त्याला उतरायला ही खोली होईल.”
मग एक दिवशी अलीशा त्या घरी आला तेव्हा त्याने त्या खोलीत आराम केला.
अलीशाने तेव्हा आपला सेवक गेहजी त्याला त्या शूनेमच्या बाईला बोलावून आणायला सांगितले. त्याप्रमाणे गेहजीने त्या बाईला बोलावले. ती येऊन अलीशा पुढे उभी राहिली.
अलीशा आपल्या नोकराला म्हणाला, तिला सांग, “तू आमची चांगली बडदास्त ठेवली आहेस. तेव्हा मी तुझ्यासाठी काय करु? राजाशी किंवा सेनापतीशी बोलू का?” ती बाई म्हणाली, “मी सुखासमाधानाने माझ्या माणसांमध्ये राहात आहे.”
अलीशा गेहजीला म्हणाला, “आपण तिच्यासाठी काय करु शकतो?” गेहजी म्हणाला, “मला माहीत आहे की तिला मूलबाळ नाही आणि तिचा नवरा वृध्द आहे.”
मग अलीशा म्हणाला, “बोलाव तिला” गेहजीने पुन्हा तिला बोलावले ती येऊन दाराशी उभी राहिली.
अलीशा तिला म्हणाला, “पुढील वसंत ऋतुत याच सुमारास तू आपल्या पोटच्या मुलाला कुशीत घेऊन बसलेली असशील.” ती म्हणाली, “नाही, माझे स्वामी, तुम्ही परमेश्वराचे माणूस आहात, माझ्याशी खोटे बोलू नका.”
या बाईला दिवस राहिले. अलीशा म्हणाला त्याप्रमाणेच वसंतात तिने एका मुलाला जन्म दिला.
मुलगा मोठा होत होता. एकदा हा मुलगा शेतात कापणी चालेली असताना वडीलांना आणि इतर लोकांना भेटायला गेला.
तो वडीलांना म्हणाला, “माझे डोके पाहा किती भयंकर दुखत आहे.” यावर त्याचे वडील आपल्या नोकराला म्हणाले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.”
नोकराने मुलाला त्याच्या आईकडे पोचवले. दुपारपर्यंत हा मुलगा आईच्या मांडीवर बसला होता. मग तो मेला.
या बाईने आपल्या मुलाला परमेश्वराचा माणूस अलीशाच्या पलंगावर ठेवले. खोलीचे दार लावून घेतले आणि ती बाहेर पडली.
नवऱ्याला हाक मारुन ती म्हणाली, “एक नोकर आणि एक गाढव माझ्याबरोबर रुा. म्हणजे मी ताबडतोब, परमेश्वराच्या माणसाला (अलीशाला) भेटून येते.”
त्या बाईचा नवरा तिला म्हणाला, “आजच त्याच्याकडे कशाला जातेस? आज अमावास्या नाही की शब्बाथ नाही.” ती म्हणाली, “काही काळजी करु नका. सगळे ठीक होईल.”
मग गाढवावर खोगीर चढवून ती नोकराला म्हणाली, “आता चल आणि भरभर जाऊ मी सांगितल्या शिवाय वेग कमी करु नको!”
परमेश्वराच्या माणसाला (अलीशाला) भेटायला ती कर्मेल डोंगरावर गेली. अलीशाने तिला दुरुनच येताना पाहिले. तो गेहजी या आपल्या नोकराला म्हणाला, “बघ, ती शूनेमची बाई येतेय
पटकन धावत पुढे जा आणि तिची खबरबात विचार. तिचा नवरा, तिचा मुलगा यांचे कुशल विचार.” गेहजीने तिला सर्व विचारले, तिने सर्व काही ठीक असल्याचे सांगितले.
पण ती डोंगर चढून वर गेली. अलीशाला वंदन करुन त्याचे पाय धरले. तिला दूर करायला गेहजी पुढे झाला. पण अलीशा त्याला म्हणाला, “तू मधे पडू नको, ती काळजीत आहे. परमेश्वराने मला याबद्दल सांगितले नाही. या बाबतीत त्याने मला अंधारात ठेवले.” (त्याने ही बातमी माझ्यापासून लपवली)
मग ती शूनेमची बाई म्हणाली, “माझे स्वामी, मी मुलगा मागितला नव्हता. ‘मला खोटी आशा दाखवू नका’ असे मी म्हणाले होते.”
तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “चल, निघायची तयारी कर. माझी काठी बरोबर घे. कुणाशीही बोलत थांबू नको. कोणी तुला भेटले तर नमस्कार करण्यापुरताही थांबू नको. कोणाच्या अभिवादनाला उत्तर देऊ नको. माझ्या काठीने त्या मुलाच्या चेहऱ्याला स्पर्श कर.”
पण ती मुलाची आई म्हणाली, “परमेश्वराची शपथ आणि तुमची शपथ मी तुमच्या वाचून इथून हलणार नाही!” तेव्हा अलीशा उठला आणि तिच्याबरोबर निघाला.
अलीशा आणि ती बाई यांच्याअगोदरच गेहजी त्या घरी जाऊन पोचला. त्याने काठी त्या मुलाच्या चेहऱ्यावर टेकवली. पण ते मूल बोलले नाही की कसली चाहूल त्याला लागल्याचे दिसले नाही. तेव्हा गेहजी परत फिरला आणि अलीशाला म्हणाला, “मूल काही उठत नाही.”
अलीशा घरात आला. ते मूल त्याच्या अंथरुणावर मृतावस्थेत पडले होते.
अलीशाने खोलीत शिरुन दार लावून घेतले. आता खोलीत ते मूल आणि अलीशा अशी दोघंच होती. अलीशाने मग परमेश्वराची प्रार्थना केली.
अलीशा पलंगाजवळ आला आणि मुलाच्या अंगावर पालथा पडला. त्याने आपले तोंड मुलाच्या तोंडावर आणि डोळे मुलाच्या डोळ्यावर टेकवले. आपले हात त्याच्या हातावर ठेवले. अशा प्रकारे अलीशाने त्याला अंगाशी घेतल्यावर त्या मुलाच्या अंगात ऊब निर्माण झाली.
अलीशा मग खोलीतून बाहेर पडला आणि घरातल्या घरात एक चक्कर मारली. मग पुन्हा खोलीत शिरुन मुलाच्या अंगावर पालथा पडला. मुलाला एकापाठोपाठ सात शिंका आल्या आणि त्याने डोळे उघडले.
अलीशाने गेहजीला हाक मारुन त्या शूनेमच्या बाईला बोलवायला सांगितले. गेहजीने तिला तसे सांगितल्यावर ती अलीशासमोर येऊन उभी राहिली. अलीशा तिला म्हणाला, “घे आता मुलाला उचलून.”
यावर त्या शूनेमच्या बाईने खोलीत शिरुन अलीशाचे पाय धरले, मुलाला उचलून घेतले आणि बाहेर आली.
अलीशा गिलगाल येथे परत आला. तेव्हा त्या प्रदेशात दुष्काळ पडलेला होता. संदेष्ट्यांचा गट अलीशासमोर बसला होता. अलीशा आपल्या सेवकाला म्हणाला, “एक मोठे पातेले अग्निवर ठेव आणि या संदेष्ट्यांसाठी शाकभाजी कर.”
यावर एकजण रानात पाला गोळा करुन आणायला गेला. तेव्हा त्याला एक रानवेल दिसला. त्याची फळे तोडून त्याने ती फळे कापून अग्निवरच्या भांड्यात टाकली. परंतु ती फळे कशाची आहेत ते काही त्या संदेष्ट्यांना माहीत नव्हते.
मग ही शाकभाजी सर्वाना खायला दिली. खायला लागल्यावर सर्वजण अलीशाला ओरडून सांगायला लागले. “परमेश्वराच्या माणसा, या भांड्यात तर विष आहे.” शाकभाजी अपायकारक असल्याने त्यांना ते खाता येईना.
तेव्हा अलीशा म्हणाला, “थोडे पीठ आणा.” पीठ आणून दिल्यावर अलीशाने ते मोठ्या भांड्यात घातले. मग अलीशा म्हणाला, “आता हे सगळ्यांना वाढा.” आता त्या शाक भाजीत काही दोष राहिला नव्हता.
बाल-शालीश येथून एकदा एक माणूस आपल्या नव्या पिकाची भाकर परमेश्वराच्या माणसासाठी घेऊन आला. त्याने सातूच्या वीस भाकऱ्या आणि पोतेभरुन कोवळी कणसे आणली होती. तेव्हा अलीशा म्हणाला, “हे सर्व या लोकांना खायला दे.”
अलीशाचा सेवक म्हणाला, “काय? इथे तर शंभर माणसे आहेत. एवढ्या सगळ्यांना हे कसे पुरेल?” पण अलीशाने त्याला सांगितले, “तू खुशाल ते आहे तेवढे या सर्वांना दे. ‘ते पोटभर खातील आणि शिवाय त्यातून उरेल,’ असे परमेश्वर म्हणतो.”
मग अलीशाच्या नोकराने त्या संदेष्ट्यांसमोर सर्व अन्न ठेवले. त्यांनी ते पोटभर खाल्यावरही काही अन्न शिल्लक उरलेच. परमेश्वर म्हणाला तसेच झाले.

5

नामान हा अरामच्या राजाचा सेनापती होता. तो राजाच्या लेखी फार महत्वाचा माणूस माणूस होता कारण त्याच्या मार्फतच परमेश्वर अरामाच्या राजाला विजय मिळवून देत असे. नामान चांगला शूर वीर होता खरा, पण त्याला कोड होते.
अरामी सैन्याच्या बऱ्याच फौजा इस्राएलमध्ये लढाईवर गेल्या होत्या, तेथून त्या सैनिकांनी बरेच लोक गुलाम म्हणून धरुन आणले होते. एकदा त्यांनी इस्राएलमधून एक लहान मुलगीही आणली. ती पुढे नामानच्या बायकोची दासी झाली.
ती नामानच्या बायकोला म्हणाली, “आपल्या मालकांनी शोमरोनमधला संदेष्टा अलीशा याला भेटावे असे मला वाटते. तो यांचे कोड बरे करु शकेल.”
नामान मग अरामच्या राजाकडे गेला. त्याने राजाला ही इस्राएलची मुलगी काय म्हणाली ते सांगितले.
त्यावर राजा म्हणाला, “तू आत्ताच जा. इस्राएलच्या राज्यासाठी मी पत्र देतो.” तेव्हा नामान इस्राएलला निघाला. आपल्याबरोबर त्याने नजराणा घेतल्या. साडेसातशे पौंड चांदी, सहा हजार सुवर्णमुद्रा आणि दहा वस्त्रांचे जोड घेतले.
आपल्या राजाकडून त्याने इस्राएलच्या राजासाठी पत्रही घेतले. पत्रात म्हटले होते.” ... आणि पत्रास कारण की माझ्या सेवेतील नामान याला तुमच्याकडे पाठवत आहे. त्याचे कोड बरे करावे.”
इस्राएलच्या राजाने हे पत्र वाचले तेव्हा आपण दु:खी आणि हतबल झालो आहोत हे दाखवण्यासाठी त्याने आपले कपडे फाडून घेतले. तो म्हणाला, “मी परमेश्वर आहे की काय? छे छे! जीवन आणि मृत्यू यावर माझी सत्ता नाही. असे असताना अरामच्या राजाने कोड असलेल्या माणसाला उपचारासाठी माझ्याकडे का बर पाठवावे? तसा विचार केला तर यात काही तरी कारस्थान दिसते. अरामचा राजा काही तरी कुरबूर सुरु करायच्या विचारात आहे!”
राजाचे हे दु:खाने कपडे फाडणे आणि अस्वस्थ होणे संदेष्टा अलीशाच्या कानावर गेले. त्याने मग राजाला निरोप पाठवला, “तू कपडे का फाडलेस? (तू एवढा दु:खी का होतोस?) नामानला माझ्याकडे येऊ दे म्हणजे इस्राएलमध्ये संदेष्टा असल्याचे त्याला कळेल.”
तेव्हा नामान आपले रथ, घोडे यांसह अलीशाच्या घराशी आला आणि दाराबाहेर थांबला.
अलीशाने नोकरा मार्फत नामानला निरोप पाठवला, “तू जाऊन यार्देन नदीच्या प्रवाहात सात वेळा स्नान कर म्हणजे तुझी त्वचा रोगमुक्त होईल. तू निर्मळ, नितळ होशील.”
नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, “मला वाटले, अलीशा निदान बाहेर येईल, माझ्या समोर येऊन उभा राहील. त्याच्या परमेश्वर देवाचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवील आणि मला बरे करील.
अबाना आणि परपर या दिमिष्कातील नरुा इस्राएलमधील पाण्यापेक्षा निश्चितच चांगल्या आहेत. मग त्यातच स्नान करुन मी शुध्द का होऊ नये?” एवढे बोलून संतापाने नामान तोंड फिरवून निघून गेला.
पण नामानचे नोकर त्याच्या पाठोपाठ गेले आणि त्यांनी त्याला समजावले. ते म्हणाले. “स्वामी, संदेष्ट्याने तुम्हाला एखादी मोठी गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती नाही का? मग एखादी साधीशी बाब तुम्ही ऐकायलाच हवी नाही का? ‘आंघोळ कर.’ त्याने तू स्वच्छ, निर्दोष होशील एवढेच तर त्याने सांगितले.”
तेव्हा नामानने अलीशाच्या म्हणण्याप्रमाणे केले. यार्देन नदीत त्याने सात वेळा बुडी मारुन स्नान केले. त्याने तो स्वच्छ, नितळ झाला. त्याची त्वचा लहान बाळासारखी कोमल झाली.
नामान आणि त्याच्या बरोबरचे लोक अलीशा संदेष्ट्याकडे आले. त्याच्यासमोर उभे राहून म्हणाले, “इस्राएल मधल्या खेरीज दुसरा कोणी परमेश्वर पृथ्वीतलावर नाही हे आता मला कळले. माझ्याकडून कृपया, ही भेट घ्यावी.”
पण अलीशा त्यांना म्हणाला, “मी परमेश्वराचा सेवक आहे आणि त्याची शपथ घेऊन सांगतो, मी कोणतीही भेट वगैरे घेणार नाही.” आपल्या भेटीचा स्वीकार करावा म्हणून नामानने अलीशाला परोपरीने विनवले पण अलीशाचा नकारच होता.
तेव्हा नामान म्हणाला, “माझ्या कडून तुम्ही भेट तर घेत नाहीच. मग एवढे करावे. माझ्या दोन खेचरावर लादून नेता येईल इतकी इस्राएलची माती नेण्याची मला मुभा द्यावी. म्हणजे मी यापुढे दुसऱ्या कोणत्याही दैवतांना होमबली अर्पण करणार नाही. फक्त परमेश्वरासाठीच यज्ञ करीन.
आणखी एका गोष्टीसाठी परमेश्वराने मला क्षमा करावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. अरामचा राजा माझा स्वामी, रिम्मोनच्या खोट्या दैवतांच्या पूजेला जातील. ते माझा आधार मागतील तेव्हा मला ही तिथे नमन करावे लागले असे झाले असता परमेश्वराने मला क्षमा करावी, माझी ही विनंती आहे.
तेव्हा अलीशाने नामानला निर्धास्तपणे जायला सांगून निरोप दिला.” मग नामान तिथून निघाला आणि थोडा पुढे गेला असेल तेवढ्यात
अलीशाचा नोकर गेहजी याला वाटले, “पाहा, माझ्या धन्याने या अरामच्या नामानला तसेच, त्याच्या कडून भेट न स्वीकारता जाऊ दिले. मीच आता धावत जाऊन त्याला गाठतो आणि काहीतरी पदरात पाडून घेतो.”
आणि गेहजी नामानच्या मागे निघाला. नामानने आपल्या मागून कोणाला तरी पळत येताना पाहिले. तेव्हा तो रथातून उतरला. त्याला गेहजी दिसला. नामान म्हणाला, “सगळे ठीक आहे ना?”
गेहजी म्हणाला, “हो, तसे सगळे ठीक आहे. माझे स्वामी अलीशा यांनी मला पाठवले आहे. त्यांनी सांगितले आहे, ‘एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातून संदेष्ट्यांची दोन तरुण मुले आमच्याकडे आली आहेत. तेव्हा त्यांना पंचाहत्तर पौंड चांदी आणि दोन वस्त्रांचे जोड द्या.”‘
नामान म्हणाला, “जरुर, ही घ्या दीडशे पौंड चांदी.” नामानने गेहजीला ती चांदी घ्यायला लावली. नामानने ती दीडशे पौंड चांदी दोन थैल्यांमध्ये भरली आणि दोन वस्त्रांचे जोड घेतले. मग या वस्तू आपल्या दोन नोकरांच्या हवाली करुन गेहजीकडे त्या पोचवायला सांगितल्या.
डोंगराशी आल्यावर गेहजीने नोकरांकडून ते सर्व घेतले आणि त्यांना परत पाठवले. नोकर माघारी आले. गेहजीने मग हा ऐवज आपल्या घरात लपवला.
गेहजी आला आणि आपले स्वामी अलीशा यांच्यासमोर उभा राहिला अलीशाने गेहजीला विचारले, “तू कुठे गेला होतास?” गेहजी म्हणाला, “मी कुठेच गेलो नव्हतो.”
अलीशा त्याला म्हणाला, “हे खरे नव्हे, नामान तुला भेटायला आपल्या रथातून उतरला तेव्हा माझे ह्दय तुझ्यापाशीच होते. पैसाअडका, कपडेलत्ते जैतूनाची फळे, द्राक्षे, शेळ्या, गायी, किंवा दास दासी भेटी दाखल घेण्याची ही वेळ नव्हे.
नामानचा रोग आता तुला आणि तुझ्या मुलांना होईल. तुमच्यावर हे कोड सतत राहिल.” अलीशाकडून गेहजी निघाला तेव्हा त्याची त्वचा बफर्ासारखी पांढरी शुभ्र झाली होती. गेहजीला कोड उठले होते.

6

एकदा संदेष्ट्याची मुले अलीशाला म्हणाली, “आम्ही राहतो ती जागा आम्हाला अपुरी पडते.
यार्देन नदीवर जाऊन आम्ही लाकूड तोडून आणतो. एकेकजण एकेक ओंडका आणू आणि आमच्यासाठी तिथे राहायला घर बांधू.” अलीशा म्हणाला, “छान, जा आणि कामाला लागा.”
एकजण म्हणाला, “आमच्याबरोबर चला.” अलीशा म्हणाला, “ठीक आहे, येतो.”
तेव्हा अलीशा त्या संदेष्ट्यांच्या मुलांबरोबर गेला. ते यार्देन नदी जवळ आले आणि झाडे तोडायला लागले.
झाड पाडत असताना एकाचे लोखंडी कुऱ्हाडीचे पाते निसटले आणि पाण्यात पडले. तेव्हा तो ओरडला, “स्वामी, मी तर ही कुऱ्हाड उसनी मागून आणली होती.”
अलीशाने विचारले, “ती पडली कुठे?” तेव्हा त्याने, लोखंडी कुऱ्हाडीचे पाते पडले ती जागा दाखवली. अलीशाने मग एक काठी घेतली आणि ती त्या जागी पाण्यात टाकली. त्याबरोबर ते पाते काठीबरोबर तरंगत वर आले.
अलीशा म्हणाले, “घे ते पाते उचलून.” मग त्या माणसाने पुढे होऊन पाते उचलले.
अरामच्या राजाची इस्राएलशी लढाई चाललेली असताना त्याने आपल्या सैन्याच्या अधिकाऱ्यांची एक सभा बोलावली. राजा म्हणाला, “अमुक ठिकाणी दबा धरुन बसा आणि इस्राएली लोक येतील तेव्हा त्यांच्यावर हल्ला करा.”
पण संदेष्टा अलीशा याने इस्राएलच्या राजाला निरोप पाठवून सांगितले, “सावधगिरीने वागा. त्या ठिकाणी जाऊ नका. येथे अरामी सैन्य लपून बसले आहे.
ज्या जागेबद्दल अलीशाने सावधगिरीचा इषारा दिला त्या ठिकाणच्या आपल्या माणसांना इस्राएलच्या राजाने तसा निरोप पाठवला आणि बऱ्याच जणांचे प्राण वाचवले.”
या गोष्टीचा अरामच्या राजाला धक्का बसला. त्याने पुन्हा आपल्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “इस्राएलच्या राजासाठी कोण हेरगिरी करत आहे ते सांगा.”
तेव्हा त्या अधिकाऱ्यांपैकी एकजण म्हणाला, “स्वामी, आमच्यापैकी कोणीही हेर नाही. इस्राएलचा तो संदेष्टा अलीशाच त्यांच्या राजाला अनेक गुपिते सांगतो. अगदी तुमच्या शयनगृहात चाललेले बोलणे देखील!”
तेव्हा अरामचा राजा म्हणाला, “कुठे आहे तो अलीशा. त्याला पकडायला मी माणसे पाठवतो!” तेव्हा अरामच्या राजाच्या सेवकांनी त्याला, अलीशा दोथानमध्ये असल्याचे सांगितले.
मग अरामच्या राजाने घोडे, रथ आणि बरेचसे सैन्य दोथान कडे रवाना केले. ते रात्री तेथे पोचले आणि त्यांनी नगराला वेढा घातला.
अलीशाचा सेवक पहाटे उठला आणि बाहेर येऊन पाहतो तो, रथघोडे यांसह नगराभोवती सैन्य पसरलेले. अलीशाचा सेवक अलीशाला म्हणाला, “स्वामी, आता आपण काय करायचे?”
अलीशा म्हणाला, “घाबरु नको! अरामच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य किती तरी मोठे आहे!”
आणि अलीशाने प्रार्थना केली. तो म्हणाला, “परमेश्वर, माझ्या सेवकाचे डोळे उघड म्हणजे त्याला नीट दिसेल.” परमेश्वराने त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा त्याला अलीशाच्या भोवती अग्रीचे घोडे आणि रथ डोंगरावर पसरलेले दिसले.
हे अग्नीरथ आणि अग्रीचे घोडे खाली अलीशाजवळ उतरले. अलीशाने परमेश्वराची प्रार्थना करुन म्हटले, “तू या लोकांना आंधळे करुन टाकावेस अशी मी तुला विनंती करतो.” अलीशाच्या या विनंतीनुसार परमेश्वराने अरामी सैन्याला आंधळे केले.
अलीशा त्या अरामी सैन्याला म्हणाला, “हा रस्ता बरोबर नाही तसेच तुम्हाला हवे ते नगरही हे नव्हे. माझ्या मागोमग या म्हणजे तुम्ही ज्याच्या मागावर आहात तो माणूस मी तुम्हाला दाखवतो.” अलीशाने मग त्या अरामी सैन्याला शोमरोनला नेले.
ते शोमरोन येथे आले तेव्हा अलीशा म्हणाला, “परमेश्वरा, आता यांना दिसू दे. त्यांचे डोळे उघड.” परमेश्वराने मग त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्या सैन्याला आपण शोमरोनमध्ये असल्याचे कळले.
इस्राएलच्या राजाने हे अरामी सैन्य पाहिले. राजा अलीशाला म्हणाला, “बाबा, मी यांना मारु का? त्यांना ठार करु का?”
अलीशा म्हणाला, “नाही, यांना मारु नको. लढाईत ज्यांना पकडून आणले त्यांना तलवारीने किंवा धनुष्यबाणाने मारायचे नसते. या अरामी सैन्याला खायला प्यायला दे. थोडी भाकर आणि पाणी दे मग त्यांना आपल्या धन्याकडे परत जाऊ दे.
इस्राएलच्या राजाने या सैन्याच्या जेवणाची व्यवस्था केली. मग त्या अरामी सैन्याचे खाणे पिणे झाल्यावर राजाने त्यांना परत पाठवले. ते सैन्य आपल्या राजाकडे परत आले. मग पुन्हा अरामी सैन्याची धाड इस्राएलवर आली नाही.”
या नंतर, अरामचा राजा बेन-हदाद याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली आणि शोमरोन नगराला वेढा दिला.
या सैन्याने नगरात अन्न धान्य जाऊ देण्यास बंदी घातली. त्यामुळे शोमरोनमध्ये लोकांची अन्नान्न दशा झाली. गाढवाचे मुंडके ऐंशी रौप्यमुद्रांना आणि कबुतराची विष्ठा पाच रौप्यमुद्रांना विकली जाऊ लागली इतकी लोकांवर वाईट वेळ आली.
असे चाललेले असताना इस्राएलचा राजा एकदा शहराच्या तटबंदीवरुन चालला होता. तेव्हा एका बाईने त्याला मोठ्याने हाक मारली आणि सांगितले, “माझे स्वामी व प्रभू कृपाकरुन मला मदत करा!”
इस्राएलचा राजा तिला म्हणाला, “जर परमेश्वर तुला मदत करत नाही तरी मी कशी तुला मदत करु? माझ्या जवळ तुला देण्यासारखे काहीच नाही ना खळ्यांतले धान्य, ना द्राक्षकुंडातील द्राक्षारस.”
मग त्याने तिच्या समस्येविषयी विचारपूस केली. ती म्हणाली, “ही बाई मला म्हणाली, ‘तुझा मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला मारुन खाऊ मग द्या आपण माझा मुलगा खाऊ.’
तेव्हा माझ्या मुलाला मारुन त्याचे मांस शिजवून आम्ही खाल्ले. दुसऱ्या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे त्याला आपण खाऊ.’ पण तिने आपल्या मुलाला लपवून ठेवले आहे.”
बाईचे हे बोलणे ऐकून राजा इतका व्यथित झाला की दु:खाच्या भरात त्याने आपले कपडे फाडले. तो तिथून पुढे गेला तेव्हा त्याने आतून जाडेभरडे कपडे घातलेले लोकांनी पाहिले. तेव्हा तो दु:खी आणि उदास आहे हे लोकांच्या लक्षात आले.
राजा म्हणाला, “आज दिवस मावळे पर्यंत शाफाटचा मुलगा अलीशा याचे मस्तक त्याच्या धडावर राहिले तर परमेश्वर मला हवे ते शासन करो!”
राजाने अलीशाकडे एक दूत पाठवला. अलीशा आपल्या घरात बसला होता आणि गावातील वडीलधारी मंडळी त्याच्या बैठकीत होती. हा दूत तेथे पोचण्यापूर्वी अलीशा त्या लोकांना म्हणाला, “हे बघा, तो इस्राएलचा घातकी राजा माझा शिरच्छेद करण्यासाठी माणसे पाठवत आहे. तेव्हा आता दूत येईल तेव्हा दार लावून घ्या. त्याला अजिबात आत येऊ देऊ नका. त्याच्या मागेमाग त्याच्या स्वामीच्या पावलांची चाहूल मला लागली आहे!”
अलीशा हे बोलत असातानाच दूत त्याच्या जवळ आला. त्याने निरोप दिला “हे संकट परमेश्वराकडूनच आले आहे. आता मी त्याची आणखी वाट कशासाठी पाहू?”

7

अलीशा म्हणाला, ‘परमेश्वराचा हा संदेश लक्षपूर्वक ऐका, परमेश्वर म्हणतो ‘द्या या वेळेपर्यंत अन्नधान्याची रेलचेल होईल. शिवाय ते स्वस्तही असेल. शोमरोनच्या वेशीजवळच्या बाजारपेठेत एका शेकेलला मणभर मैदा किंवा दोन मण सातू सहज मिळेल.”
तेव्हा राजाच्या अगदी निकट असलेला एक अधिकारी अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने आकाशाला खिंडारे पाडली तरी असे घडणे शक्य नाही.” अलीशा त्याला म्हणाला, “आपल्या डोळ्यांनी तू ते बघशीलच पण तू मात्र त्यातले काही खाऊ शकणार नाहीस.”
वेशीजवळ कोड झालेली चार माणसे बसलेली होती. ती आपापसात बोलताना म्हणाली, ‘आपण मृत्यूची वाट पाहात इथे कशाला बसलो अहोत?
शोमरोनमध्ये अन्नाचे दुर्भिक्ष आहे. आपण तिथे गेलो तरी मरणारच आहोत. इथे थांबलो तरी मरणार आहोत. तेव्हा आपण अरामी छावणीवरच जावे. त्यांनी जीवदान दिले तर जगू. त्यांनी मारले तर मरुन जाऊ.’
तेव्हा ते चौघेजण संध्याकाळी अरामी सैन्याच्या तळाजवळ आले आणि अगदी टोकाशी जाऊन पाहतात तर तिथे कोणाचाच पत्ता नाही.
परमेश्वराच्या करणीने अरामी लोकांना आपल्यावर घोडे, रथ, विशाल सेना चालून येत आहे असा भास झाला तेव्हा ते आपापसात म्हणाले, “इस्राएलच्या राजाने हित्ती आणि मिसरी राजांना द्रव्य देऊ करुन आपल्यावर चाल करुन पाठवलेले दिसते.”
आणि अरामी लोकांनी फार उशीर व्हायच्या आत संध्याकाळीच तेथून पळ काढला. आपले तंबू, घोडे, गाढवे सगळे जसेच्या तसेच टाकून ते प्राणभयाने तिथून पळाले.
शत्रूच्या छावणीजवळ आल्यावर, कोड झालेली ती चार माणसे एका तंबूत शिरली. तिथे त्यांनी खाणे-पिणे केले. तिथले कपडे-लत्ते आणि सोने चांदी त्यांनी उचलली. सगळ्या गोष्टी त्यांनी लपवून ठेवल्या. मग ते दुसऱ्या तंबूत शिरले. तिथली चिजवस्तू बाहेर काढली, दुसरीकडे नेऊन ती लपवली.
आणि मग ते एकमेकांना म्हणाले, “आपण करतो ते बरे नाही. आज आपल्याजवळ चांगली बातमी असून आपण गप्प आहोत. सकाळी उजाडे पर्यंत जर आपण हे कुणाला सांगितले नाही तर आपल्याला नक्कीच शासन होईल. तेव्हा आपण आता राजवाड्यात राहणाऱ्या लोकांना या गोष्टीची वर्दी देऊ.”
मग कोड झालेली ही माणसे आली आणि नगराच्या रखवालदाराला हाक मारुन म्हणाले, “आम्ही अराम्यांच्या छावणीवर गेलो होतो, पण तिथे कुणाचीच चाहूल लागली नाही. एकही माणूस तिथे नव्हता. तंबू मात्र तसेच उभे होते आणि घोडे, गाढवे जशीच्या तशी बांधून ठेवली होती. माणसांचा मात्र पत्ता नव्हता.”
तेव्हा रखवालदारांनी मोठ्याने पुकारा करुन महालातील लोकांना ही खबर दिली.
रात्रीची वेळ होती, पण राजा अंथरुणावरुन उठला आणि आपल्या कारभाऱ्यांना म्हणाला, “या अरामी सैन्याचा डाव काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आपण भुकेले आहोत हे त्यांना माहीत आहे. म्हणून ते छावणी सोडून शेतात दडून बसले आहेत. आपण नगर सोडून बाहेर पडलो की आपल्याला जिवंत पकडायचे आणि त्यांनी नगरात घुसायचे असा त्यांचा मनसुबा दिसतोय.”
यावर एक कारभारी राजाला म्हणाला, “गावात पाच घोडे अजून कसेबसे जिवंत आहेत. त्यांच्यावर बसून काहीजणांना तिथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थती पाहून येऊ द्या. गावात माणसे कशीबशी तग धरुन आहेत, तसेच हे घोडे एवीतेवी मरणारच आहेत.”
तेव्हा दोन रथ जोडून काही माणसे निघाली. राजाने त्यांना अरामी सैन्याच्या छावणीत पाठवून प्रत्यक्ष परिस्थती पाहून यायला सांगितले.
हे लोक अरामी सैन्याच्या मार्गावर यार्देन नदी पर्यंत गेले. वाटेवर सर्वत्र कपडे आणि शस्त्रे पडलेली त्यांना आढळली. घाई घाईने पळून जाताना अरामी लोक या वस्तूटाकून गेले होते. दूतांनी शोमरोनला परत येऊन हे राजाला सांगितले.
तेव्हा लोक अरामी छावणीकडे पळत सुटले आणि त्यांनी तेथील मौल्यवान चीजवस्तू पळवल्या. प्रत्येकाला भरपूर वस्तू मिळाल्या परमेश्वर म्हणाला होता तसेच झाले. लोकांना एका शेकेलला मणभर मैदा किंवा दोन मण सातू सहज घेता आला.
आपल्या निकटच्या कारभाऱ्याला राजाने वेशीवर द्वारपाल म्हणून नेमले पण लोक शत्रूच्या छावणीवर अन्नासाठी तूटून पडले तेव्हा या द्वारपालाला तुडवून पुढे गेले. त्यामुळे तो मरण पावला. अलीशा या संदेष्ट्याकडे राजा आला होता तेव्हा त्याने जे जे सांगितले त्या बरहुकूमच हे घडले.
अलीशाने सांगितले होते, “लोकांना मणभर मैदा किंवा दोन मण सातू शोमरोनच्या वेशीजवळच्या बाजार पेठेत एका शेकेलला घेता येईल.”
पण या कारभाऱ्याने तेव्हा अलीशाला सांगितले, “परमेश्वराने आकाशाला खिंडार पाडले तरी हे होणार नाही!” यावर अलीशा त्या कारभाऱ्याला म्हणाला, “तू हे सर्व आपल्या डोळं्यादेखत पाहशील पण तुला त्यातले काहीही खाता येणार नाही.”
त्या कारभाऱ्याच्या बाबतीत नेमके तसेच झाले. लोक वेशीपाशी त्याला तुडवून त्याच्या अंगावरुन गेले आणि तो मेला.

8

अलीशामुळे जो मुलगा जीवंत झाला होता त्या मुलाच्या आईशी अलीशा बोलला. अलीशा म्हणाला, “तू आपल्या कुटुंबियासह दुसऱ्या देशात जा. कारण परमेश्वर या प्रदेशात दुष्काळ पाडणार आहे. आणि तो सात वर्षे चालेल.”
तेव्हा अलीशाच्या म्हणण्याप्रमाणे तिने केले. पलिष्ट्यांच्या देशात ती आपल्या कुटुंबियांसमवेत जाऊन सात वर्षे राहिली.
सात वर्षे उलटल्यावर ती पलिष्ट्यांच्या देशातून परत आली. मग ती राजाला भेटायला निघाली. आपले घरदार आणि जमीन आपल्याला पुन्हा परत मिळावी यासाठी तिला राजाची मदत हवी होती.
अलीशा संदेष्ट्याचा सेवक गेहजी याच्याशी राजा बोलत बसला होता. राजा गेहजीला म्हणाला, “अलीशाने जी मोठमोठी कृत्ये केली ती कृपा करुन मला सांग.”
अलीशाने एका मृताला पुन्हा जिवंत कसे केले याविषयी गेहजी राजाला सांगत असतानाच जिच्या मुलाला अलीशाने जिवंत केले होते ती बाई राजासमोर आली. आपली जमीन आणि घर परत मिळावे यासाठी राजाची मदत मागायला ती आली होती. गेहजी म्हणाला, “स्वामी, हीच ती बाई आणि अलीशाने जीवदान दिले तो हाच मुलगा.”
राजाने त्या बाईची विचारपूस केली आणि ती राजाशी बोलली. राजाने मग एका कारभाऱ्याला तिच्या मदतीला दिले आणि सांगितले, “तिच्या मालकीचे आहे ते सर्व तिला परत द्या. तसेच, ती हा देश सोडून गेली तेव्हापासून आतापर्यंतचे तिच्या शेतातले उत्पन्न तिला द्या.”
अलीशा दिमिष्क येथे गेला. आरामचा राजा बेन-हदाद तेव्हा आजारी होता. एकाने त्याला सांगितले, “आपल्या इथे एक संदेष्टा आला आहे.”
तेव्हा बेन-हदाद हजाएलला म्हणाला, “नजराणा घेऊन त्या संदेष्ट्याच्या भेटीला जा. मी या दुखण्यातून बरा होईन की नाही ते परमेश्वराला विचारायला त्याला सांग.”
तेव्हा हजाएल अलीशाच्या भेटीला गेला. दिमिष्कातील उत्तमोत्तम पदार्थाचा नजराणा तो अलीशासाठी घेऊन गेला. या गोष्टी त्याने चाळीस उंटांवर लादल्या होत्या. हजाएल अलीशाकडे जाऊन म्हणाला, “तुमचा शिष्य अरामचा राजा बेनहदाद याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. या दुखण्यातून आराम पडेल का असे त्यांनी विचारले आहे.”
तेव्हा अलीशा हजाएलला म्हणाला, “बेन-हदादला जाऊन सांग, ‘तू खात्रीने बरा होशील.’ पण तो मरणार आहे असे खरे म्हणजे परमेश्वराने मला सांगितले आहे.”
एवढे बोलून मग देवाच्या माणसाने, हजाएल शरमिंदा होईपर्यंत त्याच्याकडे टक लावून पाहिले. नंतर अलीशाला रडू फुटले.
हजाएलने त्याला विचारले, “तुम्ही का रडत आहात?” अलीशाने सांगितले, “इस्राएलवर तू अत्याचार करणार आहेस हे मला माहीत आहे म्हणून मला वाईट वाटते. त्यांची मजबूत नगरे तू जाळशील. आपल्या तलवारीने त्यांची तरुण माणसे कापून काढशील. त्यांच्या लहान मुलांना ठार करशील त्यांच्या गरोदर बायकांना चिरशील.”
हजाएल म्हणाला, “मी पडलो कुत्र्यासारखा क्षुद्र माणूस एक दुबळामाणूस या मोठ्या गोष्टी मी कसल्या करणार!” अलीशा म्हणाल, “तू अरामचा राजा होणार असे परमेश्वराने मला वर्तवले आहे.”
मग हजाएल तिथून निघाला आणि आपल्या धन्याकडे आला. बेन-हदाद हजाएलला म्हणाला, “अलीशा तुला काय म्हणाला?” हजाएल म्हणाला, “तुम्ही जगणार आहात असे अलीशाने मला सांगितले.”
पण दुसऱ्या दिवशी हजाएलने एक रजई घेतली आणि पाण्यात ती भिजवली मग ती बेनहदादच्या तोंडावर टाकली. त्याने बेन-हदाद गुदमरला आणि मरण पावला. अशा प्रकारे हजाएल नवा राजा झाला.
यहोशाफाटचा मुलगा यहोराम यहूदाचा राजा होता. इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना यहोराम इस्राएलच्या राज्यावर आला.
त्यावेळी यहोराम बत्तीस वर्षाचा होता. यरुशलेमवर त्याने आठ वर्षे राज्य केले.
पण इस्राएलच्या इतर राजांप्रमाणेच यहोराम वागला. परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये त्याने केली. अहाबच्या घरचे लोक वागत तसाच तो वागला. त्याची बायको अहाबची मुलगी होती म्हणून त्याने तसे केले.
पण परमेश्वराने आपला सेवक दावीद याला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वराने यहुरुांचा नाश केला नाही. दावीदाच्या वंशातीलच कोणीतरी सतत गादीवर येईल असे वचन परमेश्वराने दावीदाला दिले होते.
यहोरामच्या कारकिर्दीत अदोम यहूदापासून वेगळा झाला. अदोमी लोकांनी स्वत:च राजाची निवड केली.
तेव्हा यहोराम आपले सर्व रथ घेऊन साईर येथे गेला. अदोमी सैन्याने त्याला वेढा घातला. यहोराम आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि आपली सुटका केली. यहोरामचे लोक पळाले आणि घरी परतले.
अशाप्रकारे अदोमी यहूदांच्या सत्ते पासून वेगळे झाले आणि अजूनही ते तसेच मुक्त आहेत. सुमारास लिब्नानेही बंड केले आणि यहूदापासून ते मुक्त झाले.
“यहूदाच्या राजांचा इतिहास” या ग्रंथात यहोरामने जे जे केले त्याची नोंद आहे.
यहोराम मरण पावला आणि दावीद नगरात आपल्या पूर्वजांसोबत त्याचे दफन झाले. यहोरामचा मुलगा अहज्या मग राज्य करु लागला.
इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहोरामचा मुलगा अहज्या यहुदाचा राजा झाला.
त्यावेळी अहज्या बावीस वर्षाचा होता. त्याने यरुशलेममध्ये एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या. इस्राएलचा राजा अम्री याची ती मुलगी.
परमेश्वराने जे करु नये म्हणून सांगितले ते ते अहज्याने केले. तो अहाबचा जावई होता. त्यामुळे अहाबच्या घराण्यातल्या लोकांसारखीच त्याची वागणूक होती.
अहाबचा मुलगा योराम याच्या बरोबर अहज्या रामोथ गिलाद येथे अरामचा राजा हजाएल याच्यावर चढाई करुन गेला. अराम्यांनी योरामला जखमी केले. तेथे झालेल्या दुखापतीतून बरे होण्यासाठी म्हणून राजा योराम इस्राएलला परत गेला. इज्रेलच्या प्रदेशात तो गेला. त्याला भेटायला यहोरामचा मुलगा अहज्या ही इज्रेलला गेला.

9

अलीशाने, एका तरुण संदेष्ट्याला बोलावले. अलीशा त्याला म्हणाला, “तयार हो आणि ही तेलाची कुपी बरोबर घे. रामोथ गिलाद येथे जा.
येथे पोचल्यावर निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याला शोधून काढ. मग आत जाऊन त्याला त्याच्या भावांमधून उठवून आतल्या खोलीत ने.
त्यानंतर ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर तेल ओत. तेव्हा ‘परमेश्वर म्हणतो की इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला आहे,’ असे म्हण. एवढे झाले की धावत परत ये. तेथे थांबू नकोस!”
तेव्हा हा तरुण संदेष्टा रामोथ गिलाद येथे आला
येथे पोचल्यावर त्याला सैन्यातील सरदार बसलेले आढळले. त्यांना तो म्हणाला, “तुमच्यासाठी एक निरोप आहे.” येहू म्हणाला, “आम्ही सर्वच इथे आहोत. निरोप नक्की कुणासाठी आहे?” तेव्हा तो तरुण म्हणाला, “हे सरदारा, तुझ्याशीच; माझे काम आहे.”
यावर येहू उठून घरात आला. त्या तरुण संदेष्ट्याने त्याच्या मस्तकावर तेलाचा अभिषेक केला. येहूला तो म्हणाला, “इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, “इस्राएलचा पुढचा राजा म्हणून मी तुला अभिषेक करत आहे.
तुमचा राजा अहाब याच्या घराण्याचा तू संहार करावास. अशा तऱ्हेने मी माझे सेवक, संदेष्टे, परमेश्वराचे सर्व सेवक यांच्या वधाचा सूड घेऊन ईजबेलला शासन करणार आहे.
म्हणजे अहाबचे घराणे नष्ट होईल. अहाबच्या घराण्यात एकही पुरुष संतान जिवंत राहणार नाही. मग ती इस्राएलमधील मुक्त व्यक्ती असो की गुलाम.
ईजबेलला इज्रेल भागात कुत्री खातील. तिचे दफन होणार नाही. एवढे बोलून हा तरुण संदेष्टा दार उघडून पळून गेला.”
येहू पुन्हा राजाच्या सरदारंमध्ये आला. तेव्हा त्यांच्यातला एकजण म्हणाला, “येहू, सर्व कुशल आहे ना? तो वेडा तुझ्याकडे कशाला आला होता?” येहू त्यांना म्हणाला, “तो माणूस आणि त्याच वेडपट बोलणं तुम्हाला माहीत आहेच.”
तेव्हा ते सर्व म्हणाले, “नाही, नाही खर काय झाल ते सांग. काय म्हणाला तो?” तेव्हा मग तो तरुण संदेष्टा काय म्हणाला ते येहूने सरदारांना सांगितले. येहू म्हणाला, “तो मला म्हणाला, ‘इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराच्या सांगण्यावरुन मी तुला अभिषेक करत आहे.”‘
हे ऐकून मात्र त्यांनी ताबडतोब आपले अंगरखे उतरवले, येहूच्या समोरच्या पायऱ्यांवर ते ठेवले आणि शिंग फुंकून येहू राजा झाला असल्याची घोषणा केली.
निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याने योरामविरुध्द कट रचला. यावेळी, अरामचा राजा हजाएल याच्यापासून रामोथ-गिलादचे संरक्षण करण्यासाठी योराम सर्व इस्राएलांसह झटत होता. येहू इज्रेल येथे जातो
राजा योरामने इजाएलशी झुंज घेतली होती. पण अरामी लोकांनी योरामला जायबंदी केले होते तेव्हा जखमा भरुन येण्यासाठी तो इज्रेलला गेला होता. तेव्हा येहू त्या सगळ्या सरदारांना म्हणाला, “नवीन राजा म्हणून मला तुमची मान्यता असेल तर ही बातमी नगरातून इज्रेलमध्ये जाऊ देऊ नका.”
योराम इज्रेलमध्ये आराम करत होता. येहू रथात बसून इज्रेलला गेला. यहूदाचा राजा अहज्या देखील तेव्हा योरामला भेटायाला इज्रेलला आला होता.
इज्रेलमध्ये बुरुजावर एक पहारोकरी होता. त्याने येहूला मोठ्या जमावनिशी येताना पाहिले. तो म्हणाला, “मोठाच जमाव दिसतोय” योरामने त्याला सांगितले, “कोणाला तरी घोड्यावरुन त्यांच्याकडे पाठव. ते सद्भावाने येत आहेत का ते त्या स्वाराला विचारायला सांग.”
तेव्हा एक सेवक घोड्यावरुन येहूला सामोरा गेला. राजा योरामच्या वतीने त्याने येहूला विचारले, “तुमचे येणे शांततेचे आहे ना?” येहू त्याला म्हणाला, “शांतीशी तुला कर्तव्य नाही. असा माझ्या मागेमाग ये.” पहरेकऱ्याने योरामला सांगितले, “आपला तिकडे पाठवलेला माणूस अजून परत आलेला नाही.”
तेव्हा योरामने दुसऱ्या घोडेस्वाराला पाठवले, तो येहू कडे आला आणि राजा योरामच्या वतीने सलोख्याचे अभिवादन केले. येहू म्हणाला, “तुला सलोख्याशी काय करायचे आहे? असा माझ्या मागोमाग ये?”
पहारेकऱ्याने योरामला सांगितले, “संदेश घेऊन गेलेला दुसरा माणूसही परत आलेला नाही. रथ चालवणारा तर वेड्यासारखा भरधाव रथ हाकतो आहे. निमशीचा मुलगा येहू याच्यासारखीच पध्दत आहे.
योरामने मग स्वत:चा रथ तयार ठेवण्यास सांगितले.” तेव्हा सेवकाने योरामचा रथ आणला. इस्राएलचा राजा योराम आणि यहूदाचा राजा अहज्या या दोघांनी आपापले रथ येहूच्या दिशेने पळवले. इज्रेलचा नाबोथ याच्या शेतात त्यांची यहूशी गाठ पडली.
येहूला पाहून योरामने त्याला विचारले, “येहू तू शांततेसाठीच आला आहेस ना?” येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार आणि चेटके चालू असेपर्यंत कसली आली आहे शांतता?”
योरामने ताबडतोब आपले घोडे वळवले आणि पळ काढण्याच्या तयारीत तो अहज्याला म्हणाला, “अहज्या, दगा आहे.”
पण येहूने सर्व शक्तीनिशी धनुष्य ओढून योरामचा बरोबर दोन बाडूंच्यामध्ये वेध घेतला. बाण योरामच्या हृदयातून आरपार गेला. योराम रथात मरुन पडला.
येहूने आपल्या रथाचा सारथी बिदकर याला सांगितले, “योरामचा मृतदेह उचल आणि तो इज्रेलचा नाबोथह्याच्या शेतात फेकून दे आपण दोघे, योरामचा बाप अहाब याच्याबरोबर बसून चाललो होतो तेव्हा हे असे घडणार असे परमेश्वराने सांगितले होते, ते आठवते ना?
परमेश्वर म्हणाला होता, ‘नाबोथ आणि त्याची मुले यांचे रक्त काल मला दिसले तेंव्हा या शेतात मी अहाबला शिक्षा करीन.’ प्रत्यक्ष परमेश्वरच असे म्हणाला. तेव्हा उचल तो मृतदेह आणि परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे दे टाकून त्या शेतात!”
यहूदाचा राजा अहज्या याने ते पाहिले आणि तेथून पळ काढला. मळ्यातल्या एका घराच्या बाजूने तो गेला. येहूने त्याचा पाठलाग केला. येहू म्हणाला, “अहज्याचाही वध करा.” तेव्हा येहूच्या माणसांनी अहज्याला इब्लाम जवळच्या गूरच्या रस्त्यावर जखमी केले. तेव्हा अहज्या मगिद्दोकडे पळाला पण तिथेच मरण पावला.
अहज्याच्या चाकरांनी त्याचा मृतदेह रथातून यरुशलेम येथे आणला. त्याचे त्यांनी दावीद नगरात त्याच्या पूर्वजांशेजारी दफन केले.
योरामचे इस्राएलचा राजा म्हणून अकरावे वर्षे चालू असताना अहज्या यहूदाचा राजा झाला होता.
येहू इज्रेलला आला ते ईजबेलने ऐकले. तिने चांगले प्रसाधन केले, केशभूषा केली आणि खिडकीत बसून बाहेर बघू लागली.
येहूने नगरात प्रवेश केला. ईजबेल म्हणाली, “काय रे जिम्री? त्याच्या सारखेच तू ही आपल्या स्वामीला मारलेस!”
येहूने वर खिडकीकडे पाहात म्हटले, “माझ्या बाजूने कोण आहे? बोला!” तेव्हा खिडकीतून दोन तीन खोजांनी त्याच्याकडे पाहिले.
येहू त्यांना म्हणाला, “त्या ईजबेलला खाली फेका.” तेव्हा त्या खोजांनी ईजबेलला खाली फेकून दिले. भिंतीवर आणि घोड्यांवर तिचे रक्त उडाले. घोडे तिच्यावरुन चालून गेले.
येहू घरात शिरला आणि त्याने फराळाच्या पदार्थांचा समाचार घेतला. मग तो म्हणाला, “आता त्या शापित बाईला घ्या व तिचे दफन करा कारण ती राजकन्या होती.”
लोक तिला पुरायला पुढे झाले पण त्यांना तिच्या देहाचा पत्ता लागला नाही. फक्त तीचे शिर, पाय आणि हाताचे तळवे सापडले.
तेव्हा लोकांनी येऊन येहूला हे सांगितले. येहू त्यांना म्हणाला, “आपला सेवक एलिया तिश्बी याच्या मार्फत परमेश्वराने हेच सांगितले होते. एलिया म्हणाला होता. ‘इज्रेलच्या परिसरात ईजबेलचा देह कुत्री खातील.
शेणखता सारखा तिचा देह इज्रेलच्या भूमीवर पडेल. लोकांना तिचे प्रेत ओळखू येणार नाही.”

10

शोमरोनमध्ये अहाबला सत्तर मुलगे होते. शोमरोनमधील अधिकारी आणि वडीलधारी मंडळी यांना येहूने पत्रे पाठवली. तसेच ज्यांनी या अहाबच्या मुलाना वाढवले त्यांनाही पाठवली. पत्रात त्याने लिहिले.
पण हे वाचून ती अधिकारी आणि वडीलधारी मंडळी फारच घाबरली. ते सर्व म्हणाले, “योराम आणि अहज्या हे दोन राजे सुध्द येहूला रोखू शकले नाहीत, तेव्हा आम्ही काय त्याला अडवणार?”
ग, अहाबच्या घराची देखभाल करणारा अधिकारी, नगराधिकारी, वडीलधारी मंडळी आणि त्या मुलांचे पालक यांनी येहूला खालील प्रमाणे संदेश पाठवला, “आम्ही तुझे सेवक आहोत. तू म्हणशील ते आम्ही करु. आम्ही कोणालाच राजा करत नाही. तुला योग्य वाटेल ते कर.”
येहूने मग त्या अधिकाऱ्यांना आणखी एक पत्र पाठवले. त्यात त्याने लिहिले, “तुमचा मला पाठिंबा असेल आणि तुम्ही माझ्या आज्ञेत असाल तर अहाबच्या मुलांचा शिरच्छेद करा. द्या साधारण याच वेळेला त्यांना माझ्याकडे आणा.” अहाबला सत्तर मुले होती आणि नगरातील अधिकाऱ्यांकडे ती होती. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना वाढवले होते.
या अधिकाऱ्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी या सर्वच्यासर्व सत्तर जणांना एकत्र आणून ठार केले. मग त्यांची मस्तके टोपल्यांमध्ये भरली. या टोपल्या येहूकडे पाठवल्या.
निरोप्याने येऊन येहूला सांगितले, “या लोकांनी राजपुत्रांची मुंडकी आणली आहेत.” त्याला येहू म्हणाला, “नगराच्या वेशीजवळ त्या मुंडक्यांचे दोन ढीग करुन सकाळपर्यंत तिथे ठेवा.”
सकाळी येहू निघाला आणि लोकांपुढे उभा राहून त्यांना म्हणाला, “तुम्ही निरपराध आहात. मी माझ्या धन्याविरुध्द कट रचून त्याला ठार केले. पण अहाबच्या या मुलांची हत्या कोणी केली? तुम्हीच त्यांना मारलेत.
परमेश्वर बोलतो त्याप्रमाणेच सर्व घडते हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. अहाबच्या कुटुंबाबद्दल परमेश्वराने एलीयाकडून वदविले होते. आता परमेश्वराने आपण ज्या गोष्टी करु म्हणून सांगितले होते त्या सर्व करुन दाखवल्या आहेत.”
आणि येहूने इज्रेलमधल्या अहाबच्या सर्व कुटुंबियांना ठार केले. सर्व प्रतिष्ठित माणसे, जिवलग मित्र याजक यांची त्याने हत्या केली. अहाबच्या नातलगांपैकी कोणीही जिवंत राहिले नाही.
इज्रेल सोडून येहू शोमरोनला आला. वाटेत तो मेंढपाळांच्या तळावर थांबला. मेंढपाळ लोकर कातरतात त्या ठिकाणच्या एका घरात तो गेला.
यहूदाचा राजा अहज्या याच्या नातेवाईकांना तो भेटला. येहूने त्यांची चौकशी केली, “तुम्ही कोण आहात?” ते म्हणाले, “आम्ही यहूदाचा राजा अहज्या याचे नातेवाईक. राजाची मुले आणि राजमातेची मुले यांची विचारपूस करायला आम्ही जात आहोत.”
तेव्हा येहू आपल्या बरोबरच्या लोकांना म्हणाला, “यांना जिवंत ताब्यात घ्या.” तेव्हा येहूच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतले. ते सगळे मिळून बेचाळीस होते. बेथ एकेद जवळच्या विहिरीपाशी येहूने त्या सर्वाना ठार केले. येहूने कोणालाही जिवंत ठेवले नाही.
तिथून निघाल्यावर येहूला रेखाबचा मुलगा यहोनादाब भेटला. तो येहूला भेटायलाच निघाला होता. येहूने त्याचे कुशल विचारुन म्हटले, “मी तुझा विश्वासू मित्र आहे, तसाच तूही आहेस ना?” यहोनादाब म्हणाला, “होय, मी तुझा विश्वासू मित्र आहे.” येहू म्हणाला, “तसे असेल तर मला तुझा हात दे.” आणि येहूने त्याचा हात धरुन त्याला आपल्या रथात घेतले.
येहू यहोनादाबला म्हणाला, “चल माझ्या बरोबर. परमेश्वराबद्दल मला किती उत्कटता आहे ती बघ.” तेव्हा यहोनादाब येहूबरोबर त्याच्या रथातून निघाला.
शोमरोनला पोंचल्यावर येहूने अहाबचे जे कोणी कुटुंबीय अजून जिवंत होते त्या सर्वाना मारले. एलीयाला परमेश्वराने सांगितले होते ते सर्व येहूने केले.
येहूने मग सर्वांना एकत्र बोलावले. त्यांना तो म्हणाला, “अहाबने बालची थोडी सेवा केली. पण येहू मात्र बालची बरीच सेवा करणार आहे.
आता बालच्या सर्व पुरोहितांना आणि संदेष्ट्यांना बोलावून घ्या. तसेच जे जे बालची पूजा करतात त्यांनाही बोलवा. यात कोणीही गैरहजर असता कामा नये. बालसाठी मला मोठा यज्ञ करायचा आहे. इथे जो येणार नाही त्याला मी ठार करीन हे नक्की” येहूची ही सर्व बतावणी होती. त्याला बालच्या पूजकांचा संहार करायचा होता.
येहू म्हणाला, “बालसाठी पवित्र मेळ्याची तयारी करा.” तेव्हा पुरोहितांनी त्याची घोषणा केली.
येहूने मग इस्राएलभर संदेश पाठवला. बालचे समस्त पूजक जमले. एकही मागे राहिला नाही. बालच्या देवळात ते आल्यावर देऊळ भरुन गेले.
वस्त्र भांडार सांभाळणाऱ्याला येहू म्हणाला, “बालच्या या सर्व पूजकांसाठी वस्त्रे दे.” तेव्हा त्याने सर्वासाठी वस्त्रे दिली.
मग येहू आणि रेखाबचा मुलगा यहोनादाब बालच्या देवळात शिरले. येहू तेथे जमलेल्या बालच्या सर्व पूजकांना म्हणाला, “तुमच्यात कोणी परमेश्वराचा सेवक नाही ना ते एकदा पाहून खात्री करुन घ्या. बालची पूजा करणारेच सर्व इथे आहेत ना ते पाहा.”
यज्ञ आणि होमार्पणे करण्यासाठी बालचे सर्व पूजक बालच्या देवळात शिरले. बाहेर येहूने ऐंशीजणांना तयार ठेवले होते. त्यांना येहूने सांगितले होते, “कोणालाही आतून निसटू द्यायचे नाही. एखादा कोणी गेलाच तर त्याला जाऊ देणाऱ्याला आपला जीव गमवावा लागेल.”
स्वत: यज्ञात होमबली अर्पण केल्यावर लगेच हुजऱ्यांना आणि सरदारांना येहूने सांगितले, “आता, आत जा आणि बालची पूजा करणाऱ्यांना ठार करा. कोणालाही देवळातून जिवंत बाहेर येऊ देऊ नका.” तेव्हा सरदारांनी धारदार तलवारींनी सर्व पूजकांना ठार केले. त्यांनी आणि हुजऱ्यांनी बाल देवतेच्या पूजकांचे मृतदेह बाहेर टाकले ते बालदेळाच्या गर्भगृहात गेले
स्मृतिस्तंभ त्यांनी उखडून टाकले आणि देऊळ जाळले.
बालच्या स्मृतिस्तंभाचा त्यांनी चुराडा केला. बालच्या देवळाचाही विद्धवंस केला. त्या देवळाचे त्यांनी प्रसाधनगृह करुन टाकले. अजूनही लोक त्याचा तसाच वापर करतात.
अशा प्रकारे इस्राएलमधली बालची पूजा येहूने मोडून काढली.
पण नबाटचा मुलगा यराबाम याने जी पापे इस्राएलला करायला लावली त्यापासून येहू पूर्णपणे परावृत्त झाला नाही. बेथेल आणि दान इथली सोन्याची वासरे त्याने उध्वस्त केली नाहीत.
परमेश्वर येहूला म्हणाला, “तू चांगली कामगिरी केलीस. माझ्या मते जे उचित तसेच तू वागलास. अहाबच्या कुटुंबाचा मला हव्या त्या पध्दतीने तू विध्वंस केलास. तेव्हा आता तुझ्या पुढच्या चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील.
पण परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन मन:पूर्वक वर्तन ठेवणे येहूला जमले नाही. यराबामच्या ज्या दुष्कृत्यांमुळे इस्राएल पापाच्या गर्तेत गेला ते करण्यापासून तो स्वत:ला थोपवू शकला नाही.”
याचवेळी परमेश्वराने इस्राएल प्रदेशाचे लचके तोडायला सुरुवात केली. अरामचा राजा हजाएल याने इस्राएलच्या सर्व सीमांवर पराभव केला.
यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेश त्याने जिंकला गाद, रऊबेन आणि मनश्शे यांच्या कुटुंबांच्या ताब्यातील प्रदेशासकट सगळा गिलाद त्यात आला. तसेच अर्णोन खोऱ्यातील अरोएर पासून गिलाद आणि बाशानपर्यंतचा प्रदेश हजाएलने जिंकला.
“इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात येहूच्या इतर पराक्रमांची नोंद आहे.
येहू मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दफन शोमरोनमध्ये केले. येहूचा मुलगा यहोआहाज त्यानंतर इस्राएलचा राजा झाला.
येहूने शोमरोन मधून इस्राएलवर अठ्ठावीस वर्षे राज्य केले.

11

अथल्या ही अहज्याची आई. आपला मुलगा मरण पावला हे पाहिल्यावर ती उठली आणि सर्व राजघरण्याची तिने हत्या केली.
यहोशेबा ही राजा योरामची मुलगी आणि अहज्याची बहीण. योवाश हा राजाच्या अनेक मुलांपैकी एक. इतर मुलांची हत्या होत असताना यहोशेबाने योवाशला बाजूला घेतले आणि आपल्या झोपायच्या खोलीत लपवून ठेवले. तिने योवाश आणि त्याची दाई यांना लपवले. यहोशेबा आणि ती दाई यांनी योवाशला अथल्याच्या तावडीतून सोडवले म्हणून तो मारला गेला नाही.
योवाश आणि यहोशेबा मग परमेश्वराच्या मंदिरात लपून राहिले. योवाश तिथे सहा वर्षे राहिला. यहूदावर अथल्याचे राज्य होते.
सातव्या वर्षी महायाजक यहोयादाने अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. परमेश्वराच्या मंदिरात त्या सगळ्यांना बोलावले आणि यहोयादाने त्यांच्याशी एक करार करुन त्यांच्याकडून शपथ घेतली मग योवाश या राजपुत्राला त्यांच्यापुढे आणले.
यहोयादाने त्यांना एक आज्ञा केली. तो म्हणाला, “तुम्हाला आता मी सांगतो तसे करायचे आहे. प्रत्येक शब्बाथला तुमच्यापैकी एकतृतीयांश लोकांनी आत यायचे. राजाचे त्याच्या घरात तुम्ही संरक्षण करायचे.
दुसऱ्या एकतृतीयांश लोकांच्या गटाने सूर वेशीवर थांबायचे आणि तिसऱ्या एकतृतीयांश गटाने पहारेकऱ्यांच्या मागे राहायचे. योवाशच्या मागे तुमची अशी संरक्षक भिंत होईल.
प्रत्येक शब्बाथ दिवसाच्या अखेरीला तुमच्यापैकी दोनतृतीयांश लोक परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करतील आणि राजा योवाशला संरक्षण देतील.
राजा योवाश जिथे जिथे जाईल तिथे तिथे सर्ववेळ तुम्ही त्याच्याबरोबर राहिले पाहिजे. तुम्ही त्याच्याभोवती कडे करावे. प्रत्येक पहारेकऱ्याच्या हातात शस्त्र असेल आणि कोणीही आपल्या फार जवळ आल्यास तुम्ही त्याला मारुन टाकावे.”
याजक यहोयाद याने ज्या ज्या आज्ञा दिल्या त्या सर्वांचे त्या अधिकाऱ्यांनी पालन केले. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या माणसांना बरोबर घेतले. एका गटाने शनिवारी राजाचे रक्षण करायाचे होते. आठवड्यातले इतर दिवस बाकीचे गट ते काम करणार होते. हे सर्व लोक यहोयादाकडे गेले.
यहोयादाने भाले आणि ढाली अधिकाऱ्यांच्या हवाली केल्या. दावीदाने परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली शस्त्रे ती हीच.
मंदिराच्या डाव्या टोकापासून उजव्या टोकापर्यंत हे रखवालदार हातात आपापली शस्त्रे घेऊन उभे राहिले. ते वेदी आणि मंदिर यांच्याभोवती तसेच राजा मंदिरात येई तेव्हा त्याच्या भोवती उभे राहात.
या सर्वांनी योवाशला बाहेर काढले. त्याला त्यांनी मुकुट घातला आणि राजा व देव यांच्यातील करारलेख त्याला दिला. मग त्यांनी त्याला अभिषेक केला व राजा केले मग टाळ्यां वाजवून त्यांनी “राजा चिरायु होवो” म्हणून जयघोष केला.
हुजऱ्यांचा आणि लोकांचा हा गलबला राणी अथल्याच्या कानावर गेला. तेव्हा ती परमेश्वराच्या मंदिरापाशी गेली.
राजाची रीतीप्रमाणे स्तंभाजवळ उभे राहायची जी जागा तिथे अथल्याने राजाला उभे असलेले पाहिले. नेते आणि लोक कर्णे वाजवीत आहेत हे ही तिने पाहिले. लोकांना खूप आनंद झालेला आहे हे तिच्या लक्षात आले. कर्ण्यांचा आवाज ऐकून तिने नाराजी प्रदर्शित करण्याकरता आपली वस्त्रे फाडली आणि ती “फितुरी! फितुरी!” म्हणून ओरडू लागली.
हुजऱ्यांवरील अधिकाऱ्यांना याजक यहोयादाने आज्ञा दिली, “अथल्याला मंदिराच्या आवाराबाहेर काढावे. तिच्या अनुयायांचा वध करावा. मात्र परमेश्वराच्या मंदिरात तो करु नये.”
पहारेकऱ्यांनी मग तिला पकडले आणि घोडे ज्या दारातून आत येत असत त्या दाराने तिला बाहेर काढून तिचा त्यांनी वध केला.
यहोयादाने नंतर परमेश्वर, राजा आणि लोक यांच्यात करार केला. राजा आणि लोक या दोघांवरही परमेश्वराची सत्ता आहे असे त्या करारात होते. यहोयादाने या खेरीज राजा आणि लोक यांच्यातही एक करार केला. राजाची लोकांबाबत असलेली कर्तव्ये त्यात होती. तसेच लोकांनी राजाचे आज्ञापालन आणि अनुयायित्व करावे असे ही त्यात म्हटले होते.
या नंतर लोक बाल या देवतेच्या देवळात गेले. त्यांनी बालच्या मूर्तीची तसेच तेथील वेद्यांची नासधूस, मोडतोड केली. त्यांचे तुकडेतुकडे केले बालचा याजक मत्तान याला वेद्यांसमोरच लोकांनी ठार केले. याजक यहोयाद याने परमेश्वराच्या मंदिरावर पहारेकरी नेमले.
सर्व लोकांना घेऊन तो परमेश्वराच्या मंदिराकडून राजाच्या निवासस्थानी गेला. राजाचे विशेष सुरक्षा सैनिक आणि अधिकारी राजाबरोबर होते. त्यांच्यापाठोपाठ बाकीचे लोक गेले. राजमहालाच्या प्रवेशद्वारापर्यंत ते गेले. राजा योवाश मग सिंहासनावर बसला.
लोक आनंदात होते आणि नगरात शांतता नांदत होती. महालाजवळच राणी अथल्या तलवारीने मारली गेली.
योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता.

12

येहू इस्राएलचा राजा झाल्याच्या सातव्या वर्षी योवाश (म्हणजेच यहोआश) याच्या सत्तेला सुरवात झाली. योवाशने येरुशलेममध्ये चाळीस वर्षे राज्य केले. योवाशच्या आईचे नाव सिब्या, ती बैर - शेबा इथली होती.
योवाशचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने उचित असेच होते. त्याने आयुष्यभर परमेश्वराचे ऐकले. याजक यहोयाद याने शिकवले तसे तो वागत होता.
पण उंचवट्यावरील पुजास्थळांना त्याने धक्का लावला नाही. लोक यज्ञ करायला, धूप जाळायला तिथे जातच राहिले.
तरीही याजकांनी काहीही सुरु केले नाही. योवाशचे राजा म्हणून तेविसावे वर्ष चालू होते तोपर्यत याजकांनी मंदिराची दुरुस्ती केलेली नव्हती.
तेव्हा मात्र योवाशने यहोयाद आणि आणखी काही याजक यांना बोलावणे पाठवले. त्यांना तो म्हणाला, “अजूनही तुमच्या हातून मंदिराची दुरुस्ती का झाली नाही? आता आपापल्या लोकांकडून पैसे घेणे आणि ते पैसे वापरणे बंद करा. त्या पैशाचा विनियोग मंदिराच्या दुरुस्तीसाठीच झाला पाहिजे.”
याजकांनी लोकाकडून पैसे घेण्याचे थांबवण्याबद्दल आपली सहमती दर्शवली खरी पण मंदिराची दुरुस्ती करायची नाही असेही ठरविले.
तेव्हा यहोयाद या याजकाने एक पेटी घेतली आणि तिच्या झाखणाला एक भोक ठेवले. ही पेटी त्याने वेदीच्या दक्षिण बाजूला ठेवली. लोक परमेश्वराच्या मंदिरात शिरल्याबरोबर ती पेटी दाराशीच होती. काही याजक उंबरठ्यापाशीच असत आणि लोकांनी परमेश्वराला वाहिलेले पैसे ते उचलून या पेटीत टाकत.
मग लोकही मंदिरात आल्यावर पेटीतच पैसे टाकत. राजाचा चिटणीस आणि मुख्य याजक अधून मधून येत आणि पेटीत बरेच पैसे साठलेले दिसले की ते पैसे काढून घेत. थैल्यांमध्ये भरुन ते मोजत.
मग दुरुस्तीचे काम करणाऱ्या मजुरांना ते पैसे देत. त्यात सुतार होते तसेच परमेश्वराच्या मंदिराचे काम करणारे इतर गवंडीही होते.
दगड फोडणारे, दगडाचे घडीव चिरे बनवणारे यांना देण्यासाठी तसेच लाकूड विकत घेणे दगड घडणे आणि दुरुस्तीचे इतर सामान विकत घेण्यासाठी हे पैसे वापरले जात.
कोणीही त्या पैशाची मोजदाद केली नाही की त्या पैशाचा हिशेब कारगिरांना विचारला नाही इतके ते कारागीर विश्वासू होते.
आपल्याहातून घडलेल्या अपराधांचे, पापांचे परिमार्जन व्हावे यासाठी अर्पणे करण्यासाठी लोक येत तेव्हा ते पैसे देत, पण हा पैसा कारागिरांना देण्यासाठी वापरला जात नसे. तो याजकांचा होता.
हजाएल अरामचा राजा होता. तो गथवर स्वारी करुन गेला. गथचा त्याने पाडाव केला आणि तो यरुशलेमवर चढाई करायचा विचार करु लागला.
योवाशच्या आधी त्याचे पूर्वज यहोशाफाट, यहोराम आणि अहज्या हे यहूदाचे राजे होते. त्यांनी परमेश्वराला बऱ्याच गोष्टी अर्पण केल्या होत्या. त्या मंदिरातच होत्या. योवाशनेही बरेच काही परमेश्वराला दिले होते. योवाशने ती सर्व चीजवस्तू, घरातील तसेच मंदिरातील सोने बाहेर काढले. या मौल्यवान गोष्टी त्याने अरामचा राजा हजाएल याला पाठवल्या. यरुशलेमला त्यांची भेट झाली. हजाएलने त्या शहराविरुध्द लढाई केली नाही.
“यहूदाच्या राजांचा इतिहास” या ग्रंथात योवाशच्या थोर कृत्यांची नोंद आहे.
योवाशच्या कारभाऱ्यांनी योवाशाविरुध्द कट केला. शिल्ला येथे जाणाऱ्या रस्तावरील मिल्लोच्या घरात त्यांनी योवाशचा वध केला.
शिमाथचा मुलगा योजारवार आणि शोमरचा मुलगा यहोजाबाद हे योवाशचे कारभारी होते. त्यांनी हे कृत्य केले. दावीद नगरात लोकांनी योवाशला त्याच्या पूर्वजांसमवेत पुरले. योवाशचा मुलगा अमस्या त्याच्यानंतर राज्य करु लागला.

13

येहूचा मुलगा यहोआहाज शोमरोन मधून इस्राएलवर राज्य करु लागला. अहज्याचा मुलगा योवाश यहूदात राज्यावर आल्याला तेविसावे वर्ष चालू होते तेव्हाची ही हकीकत. यहोआहाजने सतरा वर्षे राज्य केले.
परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी यहोआहाजने केल्या. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली तीच यहोआहाजने केली, त्यात खंड पडू दिला नाही.
मग परमेश्वराचा इस्राएलवर कोप झाला. अरामचा राजा हजाएल आणि हजाएलचा मुलगा बेनहदाद यांच्या हाती परमेश्वराने इस्राएलची सत्ता सोपवली.
तेव्हा यहोआहाजने मदतीसाठी परमेश्वराची याचना केली. देवानेही त्याची विनंती ऐकली. अरामच्या राजाने इस्राएली लोकांचा केलेला छळ आणि इस्राएलांच्या हाल अपेष्टा परमेश्वराने पाहिल्या होत्या.
त्यातून इस्राएलला तारण्यासाठी परमेश्वराने एक्राला पाठवले. तेव्हा मग अराम्यांच्या हातून इस्राएलींची मुक्तता झाली आणि इस्राएली लोक पूर्वीप्रमाणेच आपापल्या मुक्कामी परतले.
तरीही यराबामच्या घराण्याने जी पापे इस्राएल लोकांना करायला लावली ती करायचे काही त्यांनी सोडले नाही.यराबामची सर्व पापाचरणे त्यांनी चालूच ठेवली शोमरोनमध्ये अशेरा देवतेच स्तंभ त्यांनी ठेवलेच.
अरामच्या राजाने यहोआहाजच्या सैन्याचा पराभव केला. सैन्यातील बहुतेक लोकांना त्याने ठार केले. फक्त पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजारांचे पायदळ एवढेच शिल्लक ठेवले. खळ्यातील धान्याच्या मळणीच्या वेळी उडून जाणाऱ्या फोलकटाप्रमाणे यहोआहाजच्या सैनिकांची अवस्था होती.
“इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात यहोआहाजने केलेली थोर कृत्ये लिहून ठेवली आहेत.
पुढे यहोआहाज मरण पावला आणि पूर्वजांसमवेत त्याचे दफन झाले. शोमरोनमध्ये लोकांनी त्याला पुरले. त्याचा मुलगा योवाश (किंवा यहोआश) त्याच्या जागी राज्य करु लागला.
यहोआहाजचा मुलगा योवाश शोमरोनमध्ये इस्राएलच्या राजा झाला. यहूदाचा राजा योवाश याचे ते सदतिसावे वर्ष होते. योवाशने इस्राएलवर सोळा वर्षे राज्य केले.
परमेश्वराने जे जे करु नका म्हणून सांगितले ते सर्व त्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली ती करण्याचे योवाशने सोडले तर नाहीच, उलट तोही त्याच मार्गाने गेला.
‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात, योवाशने केलेले पराक्रम आणि यहूदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या लढाया यांची हकीकत आलेली आहे.
योवाशच्या निधनानंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. यराबाम सिंहासनावर आला आणि योवाशचे शोमरोनमध्ये इस्राएलच्या राजांबरोबर दफन झाले.
अलीशा आजारी पडला. त्या आजारातच पुढे तो मरण पावला. इस्राएलचा राजा योवाश त्याला भेटायला गेला. अलीशाबद्दल दु:खातिशयाने त्याला रडू आले. योवाश म्हणाला, “माझ्या बापा, माझ्या बापा, ही इस्राएलच्या रथांची आणि घोड्यांची वेळ आहे का?”
अलीशा योवाशला म्हणाला, “धनुष्य आणि काही बाण घे.” तेव्हा योवाशने धनुष्य व काही बाण घेतले
अलीशा मग राजाला म्हणाला, “धनुष्यावर हात ठेव.” योवाशने त्याप्रमाणे केले. अलीशाने मग आपले हात राजाच्या हातांवर ठेवले.
अलीशा त्याला म्हणाला, “पूर्वेकडची खिडकी उघड.” योवाशने खिडकी उघडली. तेव्हा अलीशाने त्याला बाण मारायला सांगितले. योवाशने बाण सोडला. अलीशा त्याला म्हणाला, “परमेश्वराचा हा विजयाचा तीर होय. अरामवरील विजयाचा बाण. अफेक येथे तू अराम्यांचा पाडाव करशील, त्यांना नेस्तनाबूत करशील.”
अलीशा पुढे म्हणाला, “बाण घे.” योवाशने ते घेतले. अलीशाने मग इस्राएलच्या राजाला भूमीवर बाण मारायला सांगितले. योवाशने जमिनीवर तीन बाण मारले. मग तो थांबला.
अलीशा संदेष्टा योवाशवर रागावला. तो त्याला म्हणाला, “तू पाच सहावेळा तरी मारायला हवे होतेस. तरच तू अराम्यांना पुरते नेस्तनाबूत करु शकला असतास. आता तू फक्त तीनदाच त्यांचा पराभव करशील.”
अलीशाने देह ठेवला आणि लोकांनी त्याला पुरले. पुढे वसंतात मवाबी सैन्यातील काहीजण इस्राएलला आले. लढाईनंतर लूट करायला ते आले होते.
काही इस्राएली लोक एका मृताला पुरत असताना त्यांनी या सैनिकांना पाहिले. तेव्हा त्या लोकांनी अलीशाच्या कबरीतच तो मृतेदेह टाकला आणि पळ काढला. अलीशाच्या अस्थींना त्या देहाचा स्पर्श होताच तो मृत पुन्हा जिवंत झाला आणि आपल्या पायावर उभा राहिला.
यहोआहाजच्या कारकिर्दीमध्ये अरामचा राजा हजाएल याने इस्राएलचा छळ केला होता.
पण परमेश्वरालाच इस्राएलची दया आली. इस्राएलवर त्याने आपली कृपादृष्टी वळवली. अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याशी त्याने केलेल्या करारामुळे त्याने हे केले. परमेश्वराला इस्राएल लोकांचा समूळ नाश करायचा नव्हता. त्याला त्यांना अद्याप टाकून द्यायचे नव्हते.
अरामचा राजा हजाएल मरण पावला. त्याच्यानंतर बेन - हदाद राज्य करु लागला.
मृत्यूपूर्वी हजाएलने योवाशचे वडील यहोआहाज ह्यांच्या कडून युध्दात काही नगरे हस्तगत केली होती. पण योवाशने ती आता हजाएलचा मुलगा बेन-हदाद याच्याकडून परत मिळवली. योवाशने बेनहदादचा तीनदा पराभव केला आणि इस्राएलची नगरे जिंकून घेतली.

14

योवाशचा मुलगा अमस्या यहुदाचा राजा झाला. तेव्हा इस्राएलचा राजा यहोआहाज याचा मुलगा योवाश गादीवर आल्याला दुसरे वर्ष होते.
अमस्या राज्य करु लागला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. अमस्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. अमस्याच्या आईचे नाव यहोअदान. ही यरुशलेमची होती.
परमेश्वराच्या दृष्टीने जे उचित तेच अमस्याने केले. पण त्याबाबतीत तो आपला पूर्वज दावीद याच्या इतका पूर्णत्वाला गेला नाही. आपले वडील योवाश यांनी केले तेच अमस्याने केले.
त्याने उंचवट्यावरील पुजास्थळे नष्ट केली नाहीत. त्या ठिकाणी अजूनही लोक यज्ञ करीत तसेच धूप जाळीत.
राज्यावर त्याची चांगली पकड असातानाच, आपल्या वडीलांचे मारेकरी असलेल्या अधिकाऱ्यांचा त्याने वध केला.
पण त्या मारेकऱ्यांच्या मुलांना त्याने मारले नाही कारण मोशेच्या नियमशास्त्रात याबद्दलचे नियम सांगितलेले आहेत. मोशेच्या नियमशास्त्रात परमेश्वराने पुढील आज्ञा सांगितलेली आहे: “मुलांच्या गुन्ह्या करिता आईवडिलांना मृत्युदंड देता कामा नये. तसेच, आईवडिलांनी जे केले त्याबद्दल मुलांना मारले जाऊ नये. अपराधाचे शासन अपराध करणाऱ्यालाच व्हावे.”
मिठाच्या खोऱ्यात अमस्याने दहाहजार अदोम्यांना मारले. या लढाईत सेला नगर त्याने घेतले आणि त्याचे नाव “चकथेल” ठेवले अजूनही ते त्याच नावाने ओळखले जाते.
इस्राएलचा राजा येहू याचा मुलगा यहोआहाज त्याचा मुलगा योवाश याच्याकडे अमस्याने संदेश पाठवला. संदेशात म्हटले होते, “ऊठ, समोरासमोर एकमेकांना भिडून आपण लढू.”
तेव्हा योवाशने यहूदाचा राजा अमस्या याला उत्तर पाठवले की, “लबानोनमधल्या काटेरी झुडुपाने लबानोनमधल्या गंधसरुच्या वृक्षाला निरोप पाठवला, “तुझ्या मुलीला माझ्या मुलाची बायको करुन घ्यायचे आहे.” पण लबानोनमधला एक वन्यपशू वाटेने जाताना त्या काटेरी झुडुपाला तुडवून पुढे गेला.
अदोमचा तू पराभव केलास हे खरे पण त्या विजयाने तू जन्मत्त झाला आहेस. पण आहेस तिथेच राहून बढाया मार. स्वत:ला संकटात लोटू नको. हे ऐकले नाहीस तर तुझा आणि तुझ्याबरोबर यहूदाचाही पाडाव होईल.”
योवाशच्या या इषाऱ्याकडे अमस्याने दुर्लक्ष केले. तेव्हा यहूदातील बेथ-शेमेश या ठिकाणी इस्राएलचा राजा योवाश यहूदाचा राजा अमस्या याच्या समोर लढाईला उभा ठाकला.
इस्राएलने यहूदाचा पराभव केला. यहूदातील एकूण एक सर्व माणसांनी आपापल्या तंबूत पळ काढला.
अहज्यापुत्र योवाशचा मुलगा यहूदाचा राजा अमस्या याला इस्राएलचा राजा योवाश याने बेथशेमेश येथे अटक केले. योवाशने अमस्याला यरुशलेम येथे आणले. तेथे पोचल्यावर यरुशलेमच्या तटबंदीला योवाशने एफ्राईमच्या दरवाज्यापासून कोपऱ्यातील दरवाजापर्यंत जवळ जवळ सहाशे फुटांचे खिंडार पाडले.
पण परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या खजिन्यातील सोने, चांदी आणि सर्व पात्रे योवाशने लुटाली. तसेच येथील सर्व माणसांना बंदिवान केले. मगच तो शोमरोनला परतला.
यहूदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या या लढाईतील पराक्रमाबरोबरच योवाशने केलेल्या इतर महान कृत्यांचीही नोंद “इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात केलेली आहे.
योवाश मरण पावला आणि आपल्या पूर्वंजांना जाऊन मिळाला. इस्राएलच्या राजांशेजारी शोमरोनमध्ये त्याचे दफन झाले. योवाशनंतर त्याचा मुलगा यराबाम गादीवर आला.
इस्राएलचा राजा यहोआहाज याचा मुलगा योवाश याच्या मृत्यूनंतर अमस्या पंधरा वर्षे जिवंत होता.
त्याने केलेल्या सर्व थोर कृत्यांची नोंद “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात केलेली आहे.
अमस्याविरुध्द यरुशलेममध्ये लोकांनी कट केला. तेव्हा अमस्या लाखीश येथे पळाला. पण लोकांनी माणसे पाठवून त्याचा लाखीशर्पंत पाठलाग केला आणि त्यांनी अमस्याचा तेथे वध केला. अमस्याचा मृत्यू
लोकांनी अमस्याचा मृतदेह घोड्यावर लादून परत आणला. दावीदनगरात यरुशलेम येथे आपल्या पूर्जजांच्या समवेत त्याचे दफन झाले.
मग यहूदाच्या सर्व लोकांनी अजऱ्याला राजा केले. अजऱ्या तेव्हा सोळा वर्षांचा होता.
राजा अमस्याच्या निधनानंतर त्याला त्याच्या पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. अजऱ्याने एलाथची पुन्हा उभारणी केली आणि एलाथ यहूदाच्या स्वाधीन केले.
इस्राएलचा राजा योवाश याचा मुलगा यराबाम शोमरोनमध्ये राज्य करु लागला तेव्हा यहूदाचा राजा योवाश याचा मुलगा अमस्या याच्या कारकिर्दींचे पंधरावे वर्ष होते. यराबामने एक्के चाळीस वर्षे राज्य केले.
यराबामने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली तीच या यराबामने चालू ठेवली.
लेबो-हमाथपासून अराबाच्या समुद्रापर्यंतची इस्राएलची भूमी यराबामने पुन्हा संपादन केली. गथ-हेफेर मधला संदेष्टा अमित्तयचा मुलगा योना याला इस्राएलच्या परमेश्वराने सांगितले त्या प्रमाणेच हे घडले.
इस्राएलचे दास काय किंवा स्वतंत्र माणसे काय, सर्वच अडचणीत आलेले आहेत, हे परमेश्वराने पाहिले. यातला कोणीच इस्राएलला वर आणण्याच्या पात्रतेचा नाही हे त्याने ओळखले
इस्राएलचे नाव जगाच्या पाठीवरुन पुसून टाकू असे काही परमेश्वर म्हणाला नव्हता. तेव्हा योवाशचा मुलगा यराबाम याच्यामार्फत परमेश्वराने इस्राएलला तारले.
“इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात यराबामच्या पराक्रमांची नोंद आहे. दिमिष्क आणि हमाथ त्याने इस्राएलच्या भूमीला पुन्हा जोडले याचीही नोंद त्यात आहे. (ही नगरे यहूदाच्या ताब्यात होती)
यराबाम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. यराबामचा मुलगा जखऱ्या राजा म्हणून गादीवर आला.

15

इस्राएलचा राजा यराबाम याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदाचा राजा अमस्या याचा मुलगा अजऱ्या राजा झाला.
तेव्हा अजऱ्या सोळा वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये बावन्र वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखल्या ती यरुशलेममधली होती.
अजऱ्याचे वर्तन आपल्या वडीलांप्रमाणेच परमेश्वराने सांगितले तसे उचित होते. आपले वडील अमस्या जसे वागले तसाच हाही वागला.
परंतु उंचस्थानावरील पूजास्थळे त्याने नष्ट केली नाहीत. त्या ठिकाणी लोक यज्ञ करीत तसेच धूप जाळीत.
परमेश्वराच्या अवकृपेने राजा अजऱ्या याला कुष्ठरोग झाला. मरेपर्यंत तो त्यातून बरा झाला नाही. तेव्हा तो वेगळा राहू लागला. त्याचा मुलगा योथाम याने राजाच्या या घराची देखभाल केली आणि तोच लोकांचा न्यायनिवाडा करु लागला.
अजऱ्याने जे केले ते सर्व ‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात लिहून ठेवलेले आहे.
अजऱ्याचे निधन झाले. दावीदनगरात त्याचे पूर्वजांशेजारी दफन झाले. त्याचा मुलगा योथाम त्याच्यानंतर राज्यावर आला.
यराबामचा मुलगा जखऱ्या याने इस्राएलवर शोमरोनमध्ये सहा महिने राज्य केले. यहूदाचा राजा अजऱ्या याच्या कारकिर्दीचे तेव्हा अडतिसावे वर्ष होते.
जखऱ्याने परमेश्वराच्या दृष्टीने निषिध्द अशी कृत्ये केली. याबाबतीत तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच वागला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली तीच याने केली.
मग याबेशचा मुलगा शल्लूम याने जखऱ्याविरुध्द कट केला. इब्लाममध्ये त्याने जखऱ्याला ठार केले. आणि स्वत: राज्यावर आला.
जखऱ्याने ज्या काही इतर गोष्टी केल्या त्या ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात लिहिलेल्या आहेत.
अशा रीतीने परमेश्वराचा शब्द खरा ठरला. येहूच्या चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील असे परमेश्वराने येहूला सांगितले होते.
याबेशाचा मुलगा शल्लूम इस्राएलचा राजा झाला तेव्हा उज्जीया यहूदाचा राजा झाल्याला एकोणचाळिसावे वर्ष चालू होते. शल्लूमने शोमरोनमध्ये एक महिना राज्य केले.
गादीचा मुलगा मनहेम तिरसाहून शोमरोनमध्ये आला त्याने शल्लूमला ठार केले. मग मनहेम स्वत: राजा झाला.
शल्लूमने जे केले ते सगळे, तसेच त्याने जखऱ्याविरुध्द केलेला कट ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात लिहिलेले आहे.
शल्लूमच्या मृत्यूनंतर मनहेमने तिफसाहचा तसेच त्याच्या भोवतालच्या प्रदेशाचा पाडाव केला. लोकांनी नगराची वेस उघाडायला विरोध केला तेव्हा त्यांनाही नेस्तनाबुत करुन त्याने गर्भवती स्त्रियांनाही कापून काढले.
यहूदाचा राजा अजऱ्या याच्या एकोणचाळिसाव्या वर्षात गादीचा मुलगा मनहेम इस्राएलवर राज्य करु लागला. मनहेमने शोमरोनमध्ये दहा वर्षे राज्य केले.
मनहेमने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचा अध:पात झाला तीच पापे मनहेमने केली.
अश्शूरचा राजा पूल इस्राएलवर चाल करुन आला. तेव्हा पूलने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपले राज्य बळकट करावे या इराद्याने मनहेमने पूलला पंचाहत्तर पौंड चांदी दिली.
हा पैसा उभा करायला मनहेमने श्रीमंत आणि वजनदार लोकांवर कर बसवला. प्रत्येकाला त्याने वीस औंस चांदी करद्यापाने द्यायला लावली. मग ही रक्कम त्याने अश्शूरच्या राजाला दिली. तेव्हा अश्शूरचा राजा परत फिरला. इस्राएलमध्ये तो राहिला नाही.
मनहेमच्या पराक्रमांची नोंद ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहे.
मनहेम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा पेकह्या नवीन राजा झाला.
अजऱ्याच्या यहूदावरील राज्याच्या पन्नासाव्या वर्षी मनहेमचा मुलगा पेकह्या शोमरोन मधून इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने दोन वर्षे राज्य केले.
परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते पेकह्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचे अध:पतन झाले तीच पापे पेकह्याने केली.
रमाल्या याचा मुलगा पेकह हा पेकह्याच्या सैन्याचा सरदार होता. पेकहने पेकह्याला मारले. शोमरोन मध्ये राजवाड्यातच त्याने हा वध केला. वधाच्या वेळी पेकह बरोबर गिलादमधली पन्नास माणसे होती. यानंतर पेकह राजा झाला.
पेकह्याच्या सर्व पराक्रमांची नोंद ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहे.
रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलवर राज्य करु लागला तेव्हा यहूदाचा राजा अजऱ्या याचे बावन्नावे वर्ष होते. पेकहाने वीस वर्षे राज्य केले. पेकहाची कारकीर्द
पेकहाने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यारबाम याच्या पापांनी इस्राएलचा अध:पात झाला. पेकह त्याच मार्गाने गेला.
अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करुन आला. पेकह इस्राएलचा राजा होता तेव्हा हे घडले. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल, बेथ माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांना कैद करुन अश्शूरला नेले.
एला याचा मुलगा होशे याने रमाल्याचा मुलगा पेकह याच्याविरुध्द कट केला. होशेने पेकहला ठार केले. पेकह नंतर मग होशे राजा झाला. उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करीत असल्याच्या विसाव्या वर्षी हे झाले.
पेकहने जे पराक्रम केले त्याची नोंद ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहे.
उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करु लागला तेव्हा रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलमध्ये राज्यावर आल्यावर दुसरे वर्ष चालू होते.
योथाम तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. सादोकची मुलगी यरुशा ही त्याची आई.
आपले वडील उज्जीया यांच्या प्रमाणेच योथामही परमेश्वराच्या दृष्टीने योग्य अशी कृत्ये करत होता.
पण त्यानेही उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट केली नाहीत. लोक तेथे यज्ञ करत, धूप जाळत. परमेश्वराच्या मंदिराला योथामने एक वरचा दरवाजा बांधला.
“यहूदांच्या राजाचा इतिहास’ या पुस्तकात योथामने केलेल्या पराक्रमांची नोंद आहे.
अरामचा राजा रसीन आणि रमाल्याचा मुलगा पेकह यांना याच वेळी परमेश्वराने यहूदावर चालून जायला उद्यक्त केले.
योथाम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. दावीद नगर या आपल्या पूर्वजांच्या नगरात त्याला पुरले. त्याच्या नंतर त्याचा मुलगा आहाज नवा राजा झाला.

16

रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलचा राजा होता. त्याच्या सतराव्या वर्षी योथामचा मुलगा आहाज यहूदाचा राजा झाला.
आहाज तेव्हा वीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. परमेश्वराने जी कृत्ये निषिध्द म्हणून सांगितली ती त्याने केली. आपला पूर्वज दावीद याच्यासारखे तो परमेश्वराचे आज्ञापालन करत नसे.
त्याची वागणूक इस्राएलच्या राजांसारखी होती. आपल्या मुलालाही त्याने अग्रीतून चालायला लावले. इस्राएली आले तेव्हा परमेश्वराने ज्या लोकांना त्या प्रदेशातून जबरदस्तीने हद्दपार केले त्यांच्यासारखी भीषण कृत्ये आहाजने केली.
उंचस्थानातील पुजास्थळे, टेकड्यांवर तसेच प्रत्येक हिरव्यागर्द वृक्षाखाली त्याने यज्ञ केले, धूप जाळला.
अरामचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा रमाल्याचा मुलगा पेकह यरुशलेमवर स्वारी करुन आले. रसीन आणि पेकह यांनी आहाजला घेरले. पण ते त्याचा पराभव करु शकले नाहीत.
अरामचा राजा रसीन याने यावेळी एलाथ हा भूभाग परत मिळवला. तेथून त्याने सर्व यहुद्यांना हुसकावून लावले. मग अरामी लोक त्याठिकाणी स्थायिक झाले. अजूनही त्यांची तिथे वस्ती आहे.
अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याच्याकडे आहाजने दूतामार्फत संदेश पाठवला की, “मी तुझा दास आहे, तुझ्या मुलासारखाच आहे. अराम आणि इस्राएलचे राजे माझ्यावर चाल करुन आले आहेत. तेव्हा माझ्या मदतीला ये आणि मला वाचव.” यहूदाचा राजा आहाज
आहाजने याखेरीज परमेश्वराच्या मंदिरातले आणि राजवाड्याच्या खजिन्यातले सोनेरुपे बाहेर काढले. ते त्याने अश्शूरच्या राजाला नजराणा म्हणून पाठवले.
अश्शूरच्या राजानेही आहाजच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि दिमिष्कावर स्वारी केली. दिमिष्क सर करुन तेथील लोकांना त्याने कीर येथे पकडून नेले. रसीनलाही त्याने ठार केले.
अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याला भेटायला आहाज दिमिष्काला गेला. तेथील वेदी त्याने पाहिली. तेव्हा तिचा नमुना आणि आराखडा त्याने उरीया या याजकाला पाठवला.
दिमिष्काहून आहाजने पाठवलेल्या त्या नमुन्याबरहुकूम उरीया याजकाने वेदी उभारली. राजा आहाज दिमिष्काहून परत येण्यापूर्वी त्याने काम पूर्ण केले.
राजाने दिमिष्काहून येताच वेदी पाहिली. तिच्यावर यज्ञ अर्पण केला.
होमार्पण आणि धान्यार्पणही केले. पेयार्पण केले तसेच शांतिअर्पणाचे रक्तही वेदीवर शिंपडले.
आत्ताची वेदी आणि परमेश्वराचे प्रार्थनामंदिर यांच्यामध्ये परमेश्वरासमोर जी पितळी वेदी होती ती आहाजने तिथून हलवली आणि आपल्या वेदीच्या उत्तरेला आणून ठेवली.
मग उरीया याजकाला त्याने आज्ञा केली, “मोठ्या वेदीवर सकाळचे होमार्पण, संध्याकाळचे धान्यार्पण, देशातील सर्व लोकांचे पेयार्पण करीत जा. तसेच होमार्पणाचे आणि यज्ञाचे रक्त त्या वेदीवर शिंपडत जा. पितळेची वेदी देवाला प्रश्न विचारण्याकरता माझ्या साठी असावी.”
उरीया याजकाने राजाची आज्ञा मानून त्याप्रमाणे सर्वकाही केले.
आहाजने मग बैठकी कापून त्याचे नक्षीदार कठडे काढून टाकले. बैठकींची स्नान पात्रे काढून टाकली. पितळी बैलांवरचा हौद काढून तो खाली फरसबंदीवर ठेवला.
शब्बाथ दिवसासाठी मंदिराच्या आत बांधलेली आच्छादित जागा काढून टाकली. राजासाठी असलेले बाहेरचे प्रवेशद्वारही आहाजने काढून टाकले. परमेश्वराच्या मंदिरातून हे सर्व काढून त्याने अश्शूरच्या राजाला दिले.
‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहाजचे सर्व पराक्रम लिहिलेले आहेत.
आहाजच्या निधनानंतर त्याचे दावीदनगरात पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. आहाजनंतर त्याचा मुलगा हिज्कीया नवा राजा झाला.

17

एलाचा मुलगा होशे हा शोमरोनमधून इस्राएलवर राज्य करु लागला. तेव्हा यहूदावर आहाजच्या सत्तेचे ते बारावे वर्ष होते. होशेने नऊ वर्षे राज्य केले.
परमेश्वराने ज्या कृत्यांचा निषेध केला होता तीच कृत्ये होशेने केली. पण या पूर्वीच्या इस्राएलांच्या राजांइतकी होशेची कारकीर्द वाईट नव्हती.
अश्शूरचा राजा शल्मनेसर होशेवर चाल करुन आला. तेव्हा होशे शल्मनेसरचा मांडलीक बनला. त्याला होशेने आपले रक्षण करावे म्हणून कर दिला.
पण होशेचे आपल्याविरुध्द कटकारस्थान चालू आहे हे अश्शूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्या वर्षी होशेने करही भरला नव्हता. तेव्हा अश्शूरच्या राजाने त्याला अटक करुन कैदेत टाकले.
मग अश्शूरचा राजा इस्राएलमधून चाल करत शोमरोनमध्ये येऊन ठेपला. त्याने शोमरोनशी तीन वर्षे लढा दिला.
होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले. इस्राएल लोकांना त्याने कैद करुन अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि मेदीलोकांच्या नगरात ठेवले.
परमेश्वर देवाच्या इच्छेविरुध्द इस्राएल लोकांनी पापे केली होती. म्हणून असे घडले. मिसरचा राजा फारो याच्या जाचातून परमेश्वराने इस्राएल लोकांची सुटका केली होती. तरी इस्राएली लोकांनी इतर दैवतांचे भजनपूजन सुरु केले.
इतर लोकांचे ते अनुकरण करु लागले. त्या लोकांना परमेश्वराने इस्राएलीखातर तेथून हुसकावू लावले होते. शिवाय देवाऐवजी इस्राएल लोकांनी राजाची सत्ता पत्करली.
इस्राएल लोकांनी परमेश्वर देवाविरुध्द ज्या गोष्टी चोरुन केल्या त्या निषिध्द होत्या. लहान गावापासून मोठ्या शहरापर्यंत सर्व ठिकाणी त्यांनी उंचस्थानावरील पुजास्थळे बांधली.
प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार झाडाखाली त्यांनी स्मृतिस्तंभ आणि अशेराचे खांब उभारले.
या सर्व ठिकाणी ते धूप जाळत. इस्राएली लोकांनी तेथे येण्याआधी परमेश्वराने ज्या राष्ट्रांना त्या भूमीतून घालवून दिले होते त्यांच्यासारखेच वर्तन इस्राएल लोकांनी केले. त्या नीच कृत्यांनी परमेश्वर क्रुध्द झाला.
त्यांनी मूर्तीपूजा आरंभली. “ती कधीही करु नये” म्हणून परमेश्वराने त्यांना बजावले होते.
इस्राएल आणि यहूदा यांना समज देण्यासाठी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांचा उपयोग केला. त्यांच्यामार्फत लोकांना सांगितले, “या गैरकृत्यांपासून मागे फिरा. माझ्या आज्ञा आणि नियम पाळा. तुमच्या पूर्वजांना जे नियम मी घालून दिले त्यांचे पालन करा. ते नियमशास्त्र मी माझे सेवक असलेले संदेष्टे यांच्यामार्फत तुम्हांला सांगितले आहे.”
पण लोकांनी या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या पूर्वजांसारखाच आडमुठेपणा त्यांनी केला. त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वरा ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता.
या लोकांनी परमेश्वराने पूर्वजांशी केलेले करार आणि नियम धुडकावून लावले. परमेश्वराने बाजवून सांगितले तिकडे दुर्लक्ष केले. क्षुद्र दैवतांच्या नादी लागून त्यांनी काहीच साधले नाही. आपल्या भोवतालच्या राष्ट्रांचे त्यांनी अनुकरण चालवले. परमेश्वराने इस्राएल लोकांना जे करु नका म्हणून सांगितले होत तेच ही राष्ट्रे करत होती.
परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळणे इस्राएल लोकांनी अजिबातच थांबवले. त्यांनी वासरांच्या दोन सुवर्णमूर्ती केल्या, अशेराचे खांब उभारले, आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बालदेवतेची त्यांनी पूजा केली.
आपल्या पोटच्या मुलामुलींचा अग्नित बळी दिला. भविष्याचे कुतूहल शमवण्यासाठी जादूटोणा आणि मंत्रतंत्र यांचा अवलंब केला. परमेश्वराने ज्या कृत्यांचा धिक्कार केला तेच करण्यापायी स्वत:लाही विकले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतला.
या गोष्टींनी परमेश्वर क्रुध्द झाला आणि त्याने यहूदाचे घराणे वगळता सर्व इस्राएलांना नामशेष करुन टाकले.
पण यहूदातील लोकांनीही परमेश्वराच्या आज्ञा मानल्या नाहीत. त्यांनी इस्राएल लोकांचा कित्ता गिरवला.
परमेश्वराने सर्व इस्राएल लोकांचा धिक्कार केला. त्यांना संकटात लोटले. इतरांकरवी त्यांचा नाश केला आणि अखेर इतरत्र हाकलून दृष्टीआड केले.
दावीदाच्या घराण्यापासून परमेश्वराने इस्राएल लोकांना तोडले. तेव्हा इस्राएल लोकांना नबाटचा मुलगा यराबामयाला राजा केले. यराबामने लोकांना परमेश्वरापासून आणखी दूर ओढले यराबामने त्यांना मोठ्या पातकाचे धनी केले.
यराबामच्या पावलांवर पाऊल ठेवून इस्राएल लोकांनी पापे केली.
परमेश्वराने त्यांना नजरेआड करीपर्यंत त्यांनी पापे करणे सोडले नाही. परमेश्वराने असे होणार हे भाकीत वर्तवले होतेच. ते सांगायला त्याने संदेष्ट्यांनाही पाठवले होते. तेव्हा इस्राएल लोकांची त्यांच्या प्रदेशातून अश्शूरमध्ये हकालपट्टी करण्यात आली. आजतगायत ते तिथेच आहेत.
अश्शूरच्या राजाने इस्राएल लोकांना शोमरोनमधून बाहेर काढले. त्यानंतर या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हामाथ आणि सफरवाईम येथून लोक आणून शोमरोनमध्ये त्यांना वसवले. या लोकांनी शोमरोनचा ताबा घेतला आणि त्या भोवतालच्या गावांमध्ये ते राहू लागले.
या लोकांनी त्या प्रदेशात राहू लागल्यावर परमेश्वराचा मान राखला नाही. तेव्हा त्यांच्यावर हल्ला करायला परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. या सिंहांनी काहीजणांचा बळी घेतला.
काही लोक अश्शूरच्या राजाला म्हणाले, “तू ज्या लोकांना शोमरोनमध्ये आणून ठेवलेस त्यांना या देशातील परमेश्वराचे नियम माहित नाहीत. म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. या लोकांना त्या परमेश्वराच्या नियमांचे ज्ञान नसल्यामुळे ते लोक मारले गेले.”
तेव्हा अश्शूरच्या राजाने आज्ञा दिली, “शोमरोनमधून काही याजकांना तुम्ही आणले आहे. तरी अटक करुन आणलेल्यांपैकी एका याजकाला तिथे पाठवा. त्याला तिथे राहू द्या. तो मग लोकांना परमेश्वराचे नियमशास्त्र शिकवेल.
तेव्हा, अश्शूरांनी शोमरोनमधून नेलेल्या याजकांपैकी एकजण बेथेल येथे राहायला आला. त्याने लोकांना परमेश्वराचा मान कसा राखावा ते शिकवले.”
पण या लोकांनी स्वत:च्या दैवतांच्या मूर्ती बनवल्या आणि शोमरोन मधील लोकांनी बांधलेल्या उंचस्थानावरील पुजास्थळामध्ये त्या ठेवल्या. सर्वत्र त्यांनी असेच केले.
बाबेलमधल्या लोकांनी सुक्कोथ बनोथ ही दैवते केली. कूथातील लोकांनी नेरगल केला. हमाथमधील लोकांनी अशीमा केली,
अळी या लोकांनी निभज आणि तर्ताक केले. सफरावी यांनी आपले दैवत अद्रम्मेलेक आणि अनम्मेलेक यांच्याप्रीत्यर्थ आपल्या मुलांचा बळी दिला.
पण तरी त्यांनी परमेश्वराविषयी आदर बाळगला. उंचस्थानातील पुजास्थळांसाठी त्यांनी आपल्यातूनच याजक निवडले. तिथे हे याजक यज्ञ करीत.
परमेश्वराविषयी आदर बाळगून ते आपापल्या दैवतांचीही पूजा करीत. आपल्या पूर्वीच्या राष्ट्रांत ते करीत तसेच इथेही करीत.
आजही हे लोक पूर्वीप्रमाणेच वागतात. ते परमेश्वराला मानत नाहीत. इस्राएलांचे नियमशास्त्र ते पाळत नाहीत. याकोबचे वंशज म्हणजे इस्राएल यांना परमेश्वराने ज्या आज्ञा दिल्या त्या ते मानत नाहीत.
परमेश्वराने इस्राएल लोकांशी करार केला होता. त्यात परमेश्वर म्हणाला होता, “इतर दैवतांची पूजा सेवा तुम्ही करता कामा नये त्यांच्यासाठी यज्ञ करता कामा नयेत.
फक्त परमेश्वर देवालाच मानले पाहिजे त्यानेच तुम्हाला मिसरमधून बाहेर काढले तुमच्या रक्षणासाठी परमेश्वराने आपले सामर्थ्य पणाला लावले. तेव्हा परमेश्वराची उपासना करा आणि त्याच्यासाठी यज्ञ करा.
त्याने तुम्हाला ज्या आज्ञा, नियम, करार, शिकवण लिहून दिली ती तुम्ही पाळलीच पाहिजे. त्या सर्वांचे तुम्ही सर्व वेळ पालन केले पाहिजे इतर देवीदेवतांच्या नादी लागता कामा नये.
मी तुमच्याशी केलेल्या कराराचा विसर पडू देऊ नका. इतर दैवतांच्या भजनी लागू नका.
फक्त परमेश्वर देवालाच भजा. तरच तो तुम्हाला सर्व संकटांतून सोडवील.”
पण इस्राएल लोकांनी हे ऐकले नाही. ते पूर्वीप्रमाणेच वागत राहिले.
आता ती इतर राष्ट्रे परमेश्वराचा आदर ठेवतात पण स्वत:च्या देवतांच्या मूर्तीचीही पूजा करतात. त्यांची मुले बाळे, नातवंडे आपल्या पूर्वजांचेच अनुकरण करत राहिली. ती आजतागायत तशीच वागत आहेत.

18

अहाजचा मुलगा हिज्कीया हा यहूदाचा राजा झाला. एलाचा मुलगा होशे याच्या इस्राएलवरील सत्तेचे तेव्हा तिसरे वर्ष होते.
हिज्कीया पंचवीस वर्षाचा असताना राज्यावर आला आणि त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव अबी. ही जखऱ्याची मुलगी.
आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणेच हिज्कीयाचे वर्तनही परमेश्वराच्या दृष्टीने उचित असेच होते.
हिज्कीयाने उंचस्थानावरील पुजास्थळे नष्ट करुन टाकली. तसेच स्मृतिस्तंभ, आणि अशेराचे खांबही पाडून टाकले. इस्राएलचे लोक तेव्हा मोशेने केलेल्या पितळी सापापुढे धूप जाळत असत. या पितळी सापाला “नहुश्तान” म्हणत. लोक याची पूजा करत म्हणून हिज्कीयाने त्याचे तुकडे तुकडे केले.
इस्राएलचा देव परमेश्वर याच्यावरच हिज्कीयाचा विश्वास होता. हिज्कीयासारखा राजा यहूदात त्याच्या आधी किंवा नंतरही झाला नाही. यहूदात हिज्कीया याच्या कारकिर्दीचा प्रारंभ
त्याची परमेश्वरावर निष्ठा होती. त्यात त्याने खंड पडू दिला नाही. मोशेला परमेश्वराने दिलेल्या आज्ञांचे हिज्कीयाने पालन केले.
परमेश्वर हिज्कीयाच्या बाजूचा होता. त्यामुळे त्याने जे जे केले त्यात त्याला यश आले. अश्शूरच्या राजाविरुध्द बंड करुन हज्किीयाने त्याचे मांडलिकत्व नाकारले.
थेट गज्जा आणि त्याच्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. लहान खेड्यापासून मोठ्या नगरापर्यंत सर्व पलिष्टी गावे त्याने जिंकली.
अश्शूरचा राजा शल्मनेसर याने शोमरोनवर हल्ला केला. त्याच्या सैन्याने नगराला वेढा दिला. हिज्कीयाच्या यहूदावरील सत्तेच्या चौथ्या वर्षी (म्हणजेच एलाचा मुलगा होशे याचे इस्राएलवरच्या अधिपत्याचे सातवे वर्ष असताना) हे झाले.
तीन वर्षांनी शल्मनेसरने शोमरोन घेतले. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या सहाव्या वर्षी हे झाले. (आणि अर्थातच इस्राएलचा राजा होशे याच्या नवव्या वर्षी) अश्शूरांचा शोमरोनला वेढा
अश्शूरच्या राजाने इस्राएल लोकांना कैद करुन अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे, गोजनमधील हाबोर नदीजवळ आणि मेदी नगरांमध्ये ठेवले.
इस्राएल लोकांनी त्यांच्या परमेश्वर देवाची आज्ञा पाळली नाही, परमेश्वराच्या कराराचा भंग केला. परमेश्वराचा सेवक मोशे याचे करार पाळले नाहीत म्हणून हे सर्व झाले. लोकांनी परमेश्वराचा करार जुमानला नाही, त्याची शिकवण ऐकली नाही.
हिज्कीयाच्या चौदाव्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदातील सर्व मजबूत नगरांवर हल्ला चढवला. सर्व नगरांचा त्याने पाडाव केला.
तेव्हा यहूदाचा राजा हिज्कीया याने अश्शूरच्या राजाला लाखीश येथे निरोप पाठवला. निरोपात हिज्कीयाने म्हटले, “माझ्या हातून चूक झाली आहे. तुम्हाला हवे ते द्यायला मी तयार आहे. पण माझ्यावर हल्ला करु नये.” यावर अश्शूरच्या राजाने यहूदाचा राजा हिज्कीया याला अकरा टन चांदी आणि एक टन सोने अशी खंडणी मागितली.
हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या खजिन्यातील सर्व चांदी बाहेर काढली.
परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे आणि खांब सोन्याच्या पल्याने मढवले होते ते सर्व काढून हिज्कीयाने घेतले आणि हे सोने अश्शूरच्या राजाला दिले.
अश्शूरच्या राजाने मोठ्या सैन्यासोबत आपले तीन महत्वाचे सेनापती यरुशलेममध्ये राजा हिज्कीयाकडे पाठवले. तेव्हा ते लाखीश येथून यरुशलेमला निघाले. वरच्या तलावाच्या पाटापाशी ते उभे राहिले. (परिटाच्या शेताकडे जो रस्ता जातो त्या वाटेवर हा वरचा तलाव आहे)
तेथून त्यांनी राजाला निरोप पाठवला. राजाचा खानगीकडील कारभारी एल्याकिम (हा हिल्कीयाचा मुलगा) चिटणीस शेबना आणि नोंदणी लेखक व आसाफचा मुलगा यवाह हे त्यांना भेटायला तेव्हा पुढे आले.
तेव्हा एक सेनापती त्यांना म्हणाला, “अश्शूरचा महान राजा काय म्हणतो ते हिज्कीयाला सांगा: तू कशाचा भरवंसा धरतो आहेस?
तुझ्या तोंडचे शब्द पोकळ, अर्थहीन आहेत. तू म्हणालास, “लढाईसाठी पुरेशी मसलत आणि सामर्थ्य माझ्याजवळ आहे.” पण माझ्यापासून फुटून निघाल्यापासून तुला कोणाचा आधार आहे?
काठी म्हणून तू ज्याच्यावर रेलला आहेस तो तर मोडका बांबू आहे. ही काठी म्हणजे मिसर. माणूस अशा काठीवर विसंबून राहिला तर ती मोडून पडेल हातात रुतेल आणि क्लेश देईल लोक विश्वास ठेवतात तो मिसरचा राजा हा असा आहे.
तू कदाचित् असे म्हणशील, “आम्ही परमेश्वर देवावर भरवसा ठेवतो.” पण हिज्कीयाने परमेश्वराची उंचावरील पूजास्थळे आणि वेदी काढून टाकल्या आणि “फक्त यरुशलेममधील वेदीपुढेच आराधना करावी” असे यहूदा आणि यरुशलेम येथील लोकांना सांगितले हे मला माहीत आहे.
आता माझा स्वामी अश्शूराचा राजा याच्याशी हा करार कर. तुझ्याकडे घोड्यांवर स्वार व्हायला माणसे असतील तर मी तुला दोन हजार घोडे द्यायचे कबूल करतो.
माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ सेवकाचा देखील तू पराभव करु शकणार नाहीस. रथ आणि घोडेस्वार यांच्यासाठी तू मिसरवर अवलंबून आहेस.
मी यरुशलेमचा संहार करायला चाल करुन आलोय तो काही परमेश्वराचा पाठिंबा असल्याशिवाय नव्हे. परमेश्वरा मला म्हणाला, “या देशावर स्वारी करुन त्याचा पूर्ण पाडाव कर.”
तेव्हा हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, शेबना आणि यवाह हे सेनापतीला म्हणाले, “आमच्याशी तू कृपया अरामी भाषेत बोल. आम्हाला ती भाषा कळते. यहूदी भाषेत बोलू नको. कारण नाही तर तटबंदीवरील लोक आपले बोलणे ऐकतील.”
पण रब-शाके त्यांना म्हणाला, “परमेश्वराने काही मला फक्त तुझ्याशी आणि तुझ्या राजाशी बोलायला पाठवलेले नाही तटबंदीवरील लोकांशीही मी बोलतो आहे. तुमच्याबरोबरच त्यांनाही स्वत:चे मलमूत्र चाटायची वेळ येणार आहे.”
मग रबशाके यहूदी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “अश्शूरचा थोर राजा काय म्हणतो ते ऐका
राजाचे म्हणणे आहे, ‘हिज्कीयाच्या भूलथापांना बळी पडू नका. माझ्यापासून तो तुम्हाला वाचवू शकणार नाही.’
तो म्हणतो तसे परमेश्वरावर विसंबून राहू नका. हिज्कीया तुम्हाला सांगतो, ‘परमेश्वर आपल्याला वाचवील. अश्शूरचा राजा आपल्या शहराजा पराभव करु शकणार नाही.’
पण हिज्कीयाचे ऐकू नका. “कारण अश्शूरचा राजा म्हणतो ‘माझ्याशी तह करा आणि माझ्याकडे या. तसे केलेत तर आपापल्या द्राक्षवेलीवरची, अंजिराच्या झाडावरची फळे तुम्हाला खायला मिळतील. स्वत:च्या विहिरीचे पाणी प्यायला मिळेल.
तुमच्या भूमीसारख्याच दुसऱ्या भूमीत मी तुम्हाला घेऊन जाईपर्यंत तुम्ही असे वागा. तरच तुम्ही जगाल; मरणार नाही. आणि हिज्कीयाचे ऐकू नका. तो तुमचे ह्दयपरिवर्तन करु पाहात आहे. ‘परमेश्वर आपल्याला वाचवेल’ असे तो म्हणतो.
इतर दैवतांनी आपले देश अश्शूरच्या राजाच्या तावडीतून सोडवले आहेत असे अजून झाले आहे काय? कधीच नाही.
कुठे आहेत हमाथ आणि अर्पद यांची दैवतं? सफरवाईम, हेना, इळ्व यांची दैवते कुठे गेले? त्यांनी शोमरोनचे माझ्यापासून रक्षण केले का? नाही.
इतर राष्ट्रांच्या दैवतांनी आपापली भूमी माझ्यापासून सुरक्षित ठेवली का? नाही माझ्याहातून परमेश्वर यरुशलेम वाचवणार का? नाही.”
पण लोक गप्पच होते. ते सेनापातीला काहीही बोलले नाहीत. कारण “त्यांनी काहीही उत्तर द्याचये नाही” अशी राजा हिज्कीयाची त्यांना आज्ञा होती.
हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम (एल्याकीम राजवाड्याचा कारभारी होता) चिटणीस शेबना आणि असाफचा मुलगा यवाह (हा नोंदी करणारा होता.) हिज्कीयाकडे आले. शोकाकुल होऊन त्यांनी वस्त्रे फाडली होती. अश्शूरचा सेनापती काय म्हणाला ते त्यांनी हिज्कीयाला सांगितले.

19

राजा हिज्कीयाने सर्व हकीकत ऐकली. दु:ख आणि उद्वेग यांच्या भरात त्याने अंगावरची वस्त्रे फाडली आणि जाडेभरडे कपडे घालून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि वडीलधारे याजक यांना हिज्कीयाने आमोजचा मुलगा यशया या संदेष्ट्यांकडे पाठवले. त्यांनीही दु:ख प्रदर्शित करणारे जाडेभरडे कपडे घातले होते.
ते यशयाला म्हणाले, “हिज्कीया म्हणतो, ‘हा संकटाचा मानहानीचा दिवस आहे. मूल जन्माला येत आहे पण आईला प्रसूतीची शक्ती नसावी तसे झाले आहे.
त्या सेनापतीचा स्वामी अश्शूराचा राजा याने त्याला आपल्या जिवंत देवाची निंदा करायला पाठवले होते. कदाचित् हे सर्व आपल्या परमेश्वर देवाच्या कानावर जाईल. शत्रूचा अंदाज चुकीचा आहे हे तो दाखवूनही देईल. तेव्हा अजून जे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना कर.”‘
राजा हिज्कीयाचे अधिकारी यशयाकडे गेले.
यशया त्यांना म्हणाला, “हिज्कीयाला हा निरोप द्या. ‘परमेश्वर म्हणतो माझ्या टवाळीचे जे उद्गार अश्शूरच्या राजाच्या सेनापतींनी काढले त्याने घाबरुन जाऊ नका.
मी आता त्याच्यात एका आत्म्याचा संचार करतो. एक अफवा तो ऐकेल आणि त्यामुळे तो स्वदेशी पळून जाईल आणि आपल्या देशातच त्याला तलवारीने मरण येईल असे मी करतो.”‘
अश्शूराचा राजा लाखीश सोडून गेल्याचे सेनापतीने ऐकले. यहूदातील एक नगर लिब्ना याच्याविरुध्द तो लढत असल्याचे त्या सेनापतीला आढळले.
कूशाचा राजा तिऱ्हाका आपल्याशी लढायला येत आहे अशी अफवा अश्शूरच्या राजाने ऐकली. तेव्हा अश्शूरच्या राजाने हिज्कीयाकडे पुन्हा निरोप घेऊन दूत पाठवले. निरोप असा होता.
यहूदाचा राजा हिज्कीयाला सांगा “तुम्ही ज्या परमेश्वरावर विसंबून आहात त्याच्याकडून फसगत करुन घेऊ नका. तो म्हणतो, ‘अश्शूरचा राजा यरुशलेमचा पराभव करणार नाही.’
अश्शूरच्या राजाने इतर देशांचे काय केले ते तुम्ही ऐकलेच आहे. आम्ही ते पूर्ण धुळीला मिळवले. तेव्हा तुम्हीच तेवढे वाचणार का? नाही.
त्या राष्ट्रांच्या देवतांनी त्यांचे रक्षण केले नाही. माझ्या पुर्वजांनी त्यांची धूळधाण केली. गोजान, हारान, रेसफ आणि तलस्सरातील एदेन हे त्यांनी नष्ट केले.
हमाथ, अर्पाद, सफरवाईम, हेना आणि इळा यांचे राजे कुठे आहेत? त्यांचा पार धुळा उडाला आहे.”
हिज्कीयाने जासूदांच्या हातून पत्र घेऊन ते वाचले. मग परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वरापुढे ते उघडून ठेवले.
परमेश्वराची प्रार्थना करुन हिज्कीया म्हणाला. “परमेश्वर देवा, करुबांच्यावर राजासनी बसणारा तूच इस्राएलचा देव आहेस. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राज्यांचा तू आणि एकमेव तूच नियंता आहेस. आकाश आणि पृथ्वीचा तू निर्माता आहेस,
परमेश्वरा, माझे म्हणणे ऐक आपले डोळे उघड आणि हे पत्र पाहा. सन्हेरीबची जिवंत परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा.
खरोखरच परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा. 17खरोखरच परमेश्वरा असे घडले आहे. अश्शूरच्या राजाने ही सर्व राष्ट्रे नामशेष केली आहेत.
तिथले दैवत त्याने आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले. पण ते काही खरे देव नव्हते. माणसाने केलेल्या त्या लाकडाच्या आणि दगडाच्या मूर्ती होत्या. म्हणून तर अश्शूरच्या राजाला त्या नष्ट करता आल्या.
तेव्हा परमेश्वर देवा आता आम्हाला या राजापासून वाचव. म्हणजे तूच खरा परमेश्वर आहेस हे जगातील सर्व राज्यांना कळेल.”
आमोजचा मुलगा यशया याने हिज्कीयाला निरोप पाठवला की, “इस्राएलचा परमेश्वर देव असे म्हणतो, ‘अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्या विषयी तू केलेले गाऱ्हणे मी ऐकले आहे.’
“सन्हेरीबबद्दल परमेश्वराचा असा निरोप आहे. सीयोनच्या (म्हणजेच यरुशलेमच्या) कुमारी कन्येने तुला तुच्छ लेखून तुझा अपमान केला आहे. यरुशलेम कन्या तुझी पाठ वळली की तुझा उपहास करते.
पण तू कोणाचा अपमान केलास? कोणाला क:पदार्थ लेखलेस? तू हे कोणाविरुध्द बोललास? इस्राएलच्या पवित्र परमेश्वराविरुध्द तू गेलास. त्याच्यापेक्षा वरचढ असल्याच्या आवेशात तू असा वागलास.
परमेश्वराचा अवमान करायला तू दूत पाठवलेस. तू म्हणालास, “माझे बहुसंख्य रथ घेऊन मी या उंच पर्वतावर, लबानोनच्या अंतर्भागात आलो आहे. त्यांचे उंच गंधसरु आणि उत्तम देवदारु मी तोडीन. लबानोन मध्ये सर्वात उंचावर असलेल्या घनदाट अरण्यात मी पोचलो आहे.
मी विहिरी खणल्या आणि नव्या नव्या ठिकाणांचे पाणी प्यालो. मिसरमधील नढ्या सुकवून तो प्रदेश मी पादाक्रांत केला.”
तू असे म्हणालास खरा, पण परमेश्वर काय म्हणाला ते तू ऐकले नाहीस काय?’ “पूर्वी, फार फार पूर्वीच मी हे सर्व योजले होते आणि आता त्याप्रमाणेच घडत आहे. मजबूत नगर उद्ध्वस्त होऊन तिथे नुसती दगडांची रास उरली आहे, हे तुझ्याहातून घडले ते माझ्यामुळेच.
तेथील लोक समर्थ नव्हते. ते घाबरलेले आणि गोंधळलेले होते. शेतातले गवत आणि पीक सरसकट कापले जावे तसे ते होते. घराच्या धाब्यावरच गवत पूर्ण वाढण्याआधीच करपून जावे तशी त्यांची स्थिती होती.
तू कधी स्वस्थ बसतोस, कधी लढाईवर जातोस आणि कधी घरी परततोस, तसेच माझ्याविरुध्द कधी उठतोस ते मला माहीत आहे.
माझ्या विरुध्द तू उठलास, तुझे उन्मत्त बोलणे मी ऐकले. तेव्हा, मी आता तुझ्या नाकात वेसण घालतो आणि तोंडात लगाम अडकवतो. मग तुला माघारे वळवून ज्या रस्त्याने आलास त्याच वाटेने तुला परत फिरवतो.”
“मी तुझ्या साहाय्यासाठी येणार आहे याची खात्री पटावी म्हणून हे चिन्ह देतो. या वर्षी आपोआप धान्य उगवेल ते तुम्ही खाल. दुसऱ्या वर्षी त्याच्या बियाणातून उगवेल ते खाल. पण तिसऱ्या वर्षी मात्र तुम्ही स्वत: पेरणी कराल त्यातून धान्य काढा. द्राक्षाची लागवड करा आणि द्राक्षे खा.
यहूदाच्या घराण्यातील उरल्यासुरल्या लोकांचा वंश वाढेल.
कारण काही जण बचावतील. ते यरुशलेममधून बाहेर पडतील. सीयोन डोंगरातून काहीजण येतील. परमेश्वराच्या तीव्र आवेशामुळे असे घडेल.
“अश्शूरच्या राजाबद्दल परमेश्वर असे म्हणतो, तो या शहरात पाऊल टाकणार नाही या नगरावर तो बाण सोडणार नाही आपल्या ढाली तो येथे आणणार नाही. या शहरच्या तटबंदीवर हल्ला करण्यासाठी तो कचऱ्याचे ढीग रचणार नाही.
तो आल्या वाटेने परत जाईल. या शहरात तो येणार नाही असे परमेश्वर म्हणतो.
या नगराचे रक्षण करुन त्याला मी वाचवीन. माझ्यासाठी आणि माझा सेवक दावीद याच्यासाठी मी हे करीन.”
त्या रात्री परमेश्वराचा दूत बाहेर पडला आणि त्यांने अश्शूरांच्या छावणीतली एक लक्ष पंच्याऐशी हजार माणसे मारली. सकाळी लोक उठून पाहतात तर सर्वत्र प्रेतांचा खच पडलेला.
तेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब निनवे येथे, जिथे तो अगोदर होता तिथे निघून गेला.
एक दिवस सन्हेरीब आपले दैवत निस्रोख याच्या देवळात पूजा करत होता. तेव्हा त्याचीच मुले अद्रम्मेलेक आणि शरेसर यांनी त्याला तलवारीने मारले. मग ते अराराट या देशात निघून गेले. सन्हेरीबच्या जागी त्याचा मुलगा एसर-हद्दोन राज्य करु लागला.

20

याच सुमारास हिज्कीया आजारी पडून जवळ जवळ मृत्युशय्येवरच होता. आमोजचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याच्याकडे गेला. तो हिज्कीयाला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे आहे, ‘तू आता घराच्या कारभाराची निरवानिरव करावीस कारण तू फार काळ जगणार नाहीस तुझा मृत्यू समीप आला आहे.”‘
तेव्हा हिज्कीयाने आपले तोंड भिंतीकडे वळवले. परमेश्वराची प्रार्थना करुन तो म्हणाला, हिज्कीया मरणासन्न अवस्थेत
“परमेश्वर, मी तुझी मन:पूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले.” एवढे बोलून तो ओक्साबोक्शी रडला.
यशया मधला चौक ओलांडून जाण्यापूर्वीचा पुन्हा त्याला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. परमेश्वर म्हणाला,
“पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिज्कीया याच्याशी बोल. त्याला म्हणावे, “तुझा पूर्वज दावीद याचा परमेश्वर देव म्हणतो: तू करुणा भाकलीस ती मी ऐकली आणि तुझी अश्रू पाहिले. तेव्हा मी तुला बरे करतो तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराचे मंदिर चढून जाशील.
तुला मी आणखी पंधरा वर्ष आयुष्य दिले आहे. अश्शूरच्या राजाच्या हातून तुझी आणि या नगराची मी सोडवणूक करीन. या नगराचे मी रक्षण करीन स्वत:साठी तसेच माझा सेवक दावीद याला मी दिलेल्या वचनासाठी मी हे करीन.”‘
मग यशया म्हणाला, “अंजीराचे मिश्रण करुन ते याच्या दुखऱ्या भागावर लावा.” तेव्हा त्यांनी अंजीरांचे मिश्रण करुन हिज्कीयाच्या दुखऱ्या भागावर त्याचा लेप दिला. तेव्हा हिज्कीया बरा झाला.
हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वराच्या कृपेने माझ्या प्रकृतीला उतार पडेल आणि तिसऱ्या दिवशी मी परमेश्वराचे मंदिर चढू शकेन याबद्दल काही खूण देता येईल का?”
यशया म्हणाला, “तुला काय हवे बोल. सावली दहा पावले पुढे जाऊ दे की मागे येऊ दे? परमेश्वराने तुझ्या बाबतीत जे घडेल असे कबूल केले आहे त्याची ही खूण आहे.”
हिज्कीया म्हणाला, “सावली दहा पावले पुढे जाणे स्वाभाविक आहे. तेव्हा तसं नको, ती दहा पावले मागे यावी.”
मग यशयाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि परमेश्वराने सावली दहा पावले मागे घेतली. जिथून ती पुढे गेली होती तिथेच ती पूर्ववत आली.
यावेळी बलदानचा मुलगा बरोदख - बलदान हा बाबेलचा राजा होता. त्याने हिज्कीयाकडे संदेश आणि भेटवस्तू पाठवल्या. हिज्कीया आजारी असल्याचे ऐकून त्याने हे पाऊल उचलले.
हिज्कीयाने त्याच्याकडून आलेल्या माणसांचे आगतस्वागत केले. त्यांना आपल्या घरातील सर्व मौल्यवान वस्तु दाखवल्या. सोने, चांदी, मसाल्याचे पदार्थ, किंमती अत्तरे, शस्त्रास्त्रे असा आपला सर्व खजिना त्यांना दाखवला. आपल्या घरातील आणि राज्यातील कोणतीही गोष्ट त्याने त्यांना दाखवायची शिल्लक ठेवली नाही.
तेव्हा यशया संदेष्ट राजाकडे येऊन म्हणाला, “हे लोक कोण? त्यांचे काय म्हणणे आहे?” हिज्कीया म्हणाला, “हे फार लांबच्या प्रांतातून बाबेलमधून आले आहेत.”
यशयाने विचारले, ‘त्यांनी या घरातले काय काय पाहिले?’ हिज्कीयाने सांगितले, “त्यांनी सगळेच पाहिले. माझे सगळे भांडार मी त्यांच्यापुढे उघडे केले.”
तेव्हा यशया म्हणाला, “आता परमेश्वराचा हा निरोप ऐक.
तुझ्या घरातील सर्व चीजवस्तू आणि तुझ्या पूर्वजांनी जमवलेले सर्व धन आत्ता बाबेलला नेण्यात येईल. ती वेळ आता येऊन ठेपली आहे. काही म्हणता काही मागे उरणार नाही. ही परमेश्वराची वाणी आहे.
बाबेलचे लोक तुझ्या मुलांना घेऊन जातील. ती मुले बाबेलच्या राजावाड्यात खोजे बनून राहतील.”
तेव्हा हिज्कीया यशायाला म्हणाला, ‘परमेश्वराचे म्हणणे योग्यच आहे.’ तो पुढे म्हणाला, “निदान माझ्या कारकिर्दीत तरी शांतता लाभेल ना?”
शहराला पाणीपुरवठा करणारी तळी आणि कालवे यांच्यासकट हिज्कीयाने जी कामगिरी बजावली तिची नोंद ‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहे.
हिज्कीया निधन पावला आणि त्याचा पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा मनश्शे गादीवर आला.

21

मनश्शे राज्य करु लागला तेव्हा तो बारा वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर पंचावन्र वर्षे, राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसीबा.
परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले तेच त्याने केले. इतर राष्ट्रे करत तसे अमंगळ आचरण मनश्शेने केले (आणि इस्राएली आले त्यावेळी याच राष्ट्रांना परमेश्वराने तेथून हुसकून लावले होते.)
हिज्कीयाने नष्ट केलेली उंचस्थानावरील पुजास्थळे मनश्शेने पुन्हा बांधली तसेच त्याने बालदेवतेसाठी वेदी बांधली आणि इस्राएलचा राजा अहाब याच्याप्रमाणे अशेरा देवीचे स्तंभ उभारले. मनश्शे नक्षत्रांची पूजाही करत असे.
परमेश्वराच्या मंदिरात त्याने इतर देवतांच्या पूजेसाठी वेद्याग बांधल्या. (आपल्या नावाप्रीत्यर्थ परमेश्वराने हे मंदिर केले होते.)
या खेरीज या मंदिराच्या दोन्ही चौकांत मनश्शेने आकाशातील नक्षत्रांसाठी वेद्या बांधल्या.
आपल्या मुलाचाच बळी देऊन मनश्शेने त्याला वेदीवर जाळले. जादूटोणा, मंत्रतंत्र, भुतंखेतं यांच्यामार्फत भविष्य जाणून घ्यायचा मनश्शेला नाद होता. परमेश्वराने जे जे गैर म्हणून सांगितले ते ते मनश्शे करत गेला. त्याने परमेश्वराचा कोप झाला.
मनश्शेने अशेराचा कोरीव पुतळा करुन तो मंदिरात ठेवला. या मंदिराविषयी दावीद आणि दावीदचा मुलगा शलमोन यांना परमेश्वर म्हणाला होता, “इस्राएलमधील सर्व नगरांमधून मी यरुशलेमची निवड केली आहे. यरुशलेममधील मंदिरात मी माझे नाव कायमचे ठेवीन.
इस्राएल लोकांना या भूमीतून बाहेर पडावे लागू नये याची मी दक्षता घेईल. माझ्या सर्व आज्ञा तसेच मोशेची शिकवण त्यांनी तंतोतंत पाळली तर त्यांची इथेच या भूमीत वसती राहील.”
पण लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही. इस्राएल लोक इथे येण्यापूर्वी कनानमधील राष्ट्रांनी जी वाईट वर्तणूक केली त्यापेक्षाही मनश्शेचे वर्तन निंद्य होते. इस्राएल लोक या भूमीत आले तेव्हा त्या राष्ट्रांना परमेश्वराने नष्ट केले होते.
तेव्हा परमेश्वराने आपल्या सेवक संदेष्ट्यांना हे सांगायला सांगितले,
“यहूद्यांचा राजा मनश्शे याने अत्यंत निंद्य कृत्ये केली आहेत. त्याच्या आधीच्या अमोऱ्यांपेक्षाही याचे वागणे भयंकर आहे. त्याच्या त्या मूर्तीमुळे त्याने यहूदालाही पाप करायला लावले आहे.
तेव्हा इस्राएलचा परमेश्वर म्हणतो, ‘यरुशलेम आणि यहूदा यांना मी आता अशा संकटाच्या खाईत लोटीन की ते ऐकूनच लोकांना धक्का बसेल.
शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबच्या घराण्याचा ओळंबा मी यरुशलेमवर धरीन. थाळी घासूनपुसून पालथी करुन ठेवावी तशी मी यरुशलेमची गत करीन.
त्यातूनही काहीजण बचावतील. पण त्यांना मी तसेच सोडीन. त्यांना मी त्यांच्या शत्रूच्या ताब्यात देईन. ते त्यांना युध्दातील लुटीप्रमाणे कैदी करुन नेतील.
मी जे जे करु नका म्हणून बजावले ते ते त्यांनी केले त्याचे हे फळ होय. यांचे पूर्वज मिसरमधून बाहेर पडले त्या दिवसापासूनच यांनी मला संताप आणला आहे.
शिवाय मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. संपूर्ण यरुशलेम त्याने रक्तलांछित केले. यहूद्यांना त्याने जी पापे करायला लावली ती वेगळीच. परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते मनश्शेने यहूदाला करायला लावले.”‘
मनश्शेची पापे आणि इतर कृत्ये ‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकांत लिहिलेली आहेत.
मनश्शे मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांच्या शेजारी दफन झाले. आपल्या घराच्या बगीच्यात त्याला पुरले. या बागेचे नाव “उज्जाची बाग” त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन राज्य करु लागला.
आमोन राज्य करु लागला तेव्हा बावीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर दोन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव मशुल्लेमेथ ही यटबा येथील हारुस याची मुलगी.
आपले वडील मनश्शे यांच्याप्रमाणेच आमोननेही परमेश्वराच्या दृष्टीने गैर कृत्ये केली.
तो आपल्या वडीलांसारखाच होता. वडीलांनी ज्या देवतांची पूजाअर्चा केली त्यांचीच पूजा आमोननेही आरंभली.
आपल्या पूर्वजांचा परमेश्वर देव याचा मार्ग त्याने सोडला आणि परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला.
आमोनच्या सेवकांनी त्याच्याविरुध्द कट करुन त्याच्या घरातच त्याला ठार केले.
आणि ज्यांनी आमोनशी फितुरी केली त्या सेवकांना देशातील लोकांनी जिवे मारले. मग आमोनचा मुलगा योशीया याला लोकांनी राजा केले.
आमोनने जी इतर कृत्ये केली ती सर्व “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात लिहून ठेवलेली आहेत.
उज्जाच्या बागेत आमोनचे दफन करण्यात आले. आमोनचा मुलगा योशीया राजा झाला.

22

योशीया राज्य करु लागला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यदीदा. ती बसकथमधील अदाया याची मुलगी.
योशोयाचे वर्तन परमेश्वराला पटेल असेच होते. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे तो चालला. परमेश्वराच्या शिकवणुकी प्रमाणेच वागला. देवाला जसे पाहिजे तेच त्याने केले.
मशुल्लामचा मुलगा असल्या याचा मुलगा शाफान चिटणीस याला योशीया राजाने कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी परमेश्वराच्या मंदिरात पाठवले आणि सांगितले. मंदिराच्या दुरुस्तीचा आदेश
“तिथे तू महायाजक हिल्कीया याच्याकडे जा. द्वारपालांनी लोकांकडून गोळा केलेले पैसे या याजकाकडे जमा व्हायला हवेत. हा परमेश्वराच्या मंदिरात जमा झालेला पैसा आहे.
परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखेरख करणाऱ्यांना याजकांनी यातील पैसे द्यावेत. मंदिराची दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना देण्यासाठी या पैशाचा विनियोग व्हावा.
सुतार, गवंडी, पाथरवट यांना तसेच लाकूड घेणे, चिरे घडवणे यासाठी पैसे द्यावेत.
दिलेल्या पैशाचा हिशेब मागू नये कारण ही मंडळी विश्वसनीय आहे.”
महायाजक चिटणीस शाफान याला म्हणाला, “मला परमेश्वराच्या मंदिरात नियमशास्त्राचे पुस्तक सापडले आहे.” मग ते पुस्तक याजक हिल्कीयाने शाफानला दिले. शाफानने ते वाचले.
शाफानने परत येऊन राजाला सर्व वर्तमान सांगितले. तो म्हणाला, “तुझ्या सेवकांनी मंदिरातील सर्व पैसा एकत्र करुन तो परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणाऱ्यांना त्यांनी दिला आहे.”
पुढे शाफान राजाला म्हणाला, “याजक हिल्कीया याने हे पुस्तकही मला दिले.” शाफानने ते राजाला वाचून दाखवले.
नियमशास्त्रातील वचने ऐकून राजाने अतीव दु:ख प्रदर्शित करण्यासाठी आपली वस्त्रे फाडली.
मग त्याने याजक हिल्कीया, शाफानचा मुलगा अहीकाम, मिखायाचा मुलगा अखबोर, शाफान चिटणीस आणि सेवक असाया यांना आज्ञा केली की,
“आता जाऊन परमेश्वराचा कौल घ्या. मी, आपले लोक आणि सर्व यहूदा यांच्या वतीने त्याला या पुस्तकातील वचनांविषयी विचारा. परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. कारण आपल्या पूर्वंजांनी या पुस्तकातील वचनांचा भंग केला आहे. आपल्यासाठी लिहून ठेवलेल्या सर्व गोष्टी त्यांनी आचरणात आणल्या नाहीत.
मग हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया हे सर्व हुल्दा या संदेष्ट्रीकडे गेले. हरहसचा मुलगा तिकवा याचा मुलगा शल्लूम याची ती बायको. शल्लूम याजकांच्या कपड्यांचे खाते सांभाळी, हुल्दा यरुशलेममध्ये दुसऱ्या भागात राहात होती. हे सर्वजण तिच्याकडे गेले आणि तिच्याशी बोलले.”
तेव्हा हुल्दा त्यांना म्हणाली, “इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो: तुम्हाला माझ्याकडे ज्याने पाठवले त्याला सांगा
“परमेश्वराचे म्हणणे आहे की, हा प्रदेश आणि तेथे राहणारे लोक यांच्यावर आता मी अरिष्ट आणणार आहे. यहूदाच्या राजाने त्या पुस्तकात वाचली तीच संकटे येतील.
यहूदाच्या लोकांनी माझा त्याग केला. इतर दैवतांपुढे त्यांनी धूप जाळला. त्यांनी मला संताप आणला. त्यांनी अनेक मूर्तींही केल्या. म्हणून या प्रदेशावर माझा राग आहे. न विझवता येणाऱ्या अग्निसारखा माझा संताप असेल.’
ती तुझी तुझ्या पूर्वजांशी भेट करुन देईन. तुला मरण येईल आणि तू सुखाने कबरीत पडशील. यरुशलेमवर येणारे अरिष्ट तुला आपल्या डोळ्यांनी पाहावे लागणार नाही.”‘ मग याजक हिल्कीया, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया यांनी हा संदेश राजाला सांगितला.

23

राजा योशीया याने यहूदा आणि यरुशलेम येथील सर्व वडिलधाऱ्यांना निरोप पाठवून बोलावून घेतले.
मग राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्याच्या मागोमाग यहूदा आणि यरुशलेम येथे राहणारे लोकही गेले. अगदी सामान्य माणसापासून याजक, संदेष्टे यांच्यासारख्या महत्वाच्या वयक्तीपर्यंत झाडून सर्वजण राजाच्या बरोबर गेले. मग राजाने परमेश्वराच्या मंदिरात सापडलेले कराराचे पुस्तक काढून त्यातील सर्व वचने सगळ्यांना ऐकू जातील अशी वाचली.
स्तंभाजवळ उभे राहून राजाने परमेश्वराशी करार केला. त्याने परमेश्वराची सर्व वचने, करार, नियम पाळायचे कबूल केले. पुस्तकात लिहिलेले सर्व मनोभावे पाळायचे त्याने आश्वासन दिले. राजाने केलेल्या या कराराला पाठिंबा दशर्विण्यासाठी सर्वजण उठून उभे राहिले.
मग बालदैवत, अशेरा, नक्षत्रे यांच्या पूजेसाठी केलेली सर्व पात्रे परमेश्वराच्या मंदिरातून बाहेर काढण्यात यावीत अशी आज्ञा राजाने हिल्कीया, इतर याजक आणि द्वारपाल यांना दिली. मग त्याने ती यरुशलेम बाहेरच्या किद्रोनच्या शेतात जाळली. त्यांची राख बेथेल येथे नेली.
यहूदाच्या राजांनी याजक म्हणून जी माणसे निवडली होती ती सामान्य माणसे होती, आहरोन कुळातली नव्हती! हे भोंदू याजक यहूदाच्या सर्व नगरामध्ये तसेच यरुशलेमभोवतीच्या गावांतून उंचस्थानावरील पूजास्थळांपुढे सरर्ास धूप जाळत होते. बाल, सूर्य, चंद्र, नक्षत्रे आणि आकाशातील इतर तारे यांच्यासाठी ते धूप जाळत. मग हिज्कीयाने या याजकांवर बंदी घातली.
योशीयाने परमेश्वराच्या मंदिरातून अशेराचा स्तंभ हलवला. तो गावाबाहेर किद्रोन खोऱ्यात नेऊन जाळून टाकला. नंतर त्याने जळलेल्या भागाच्या तुकड्यांची राख केली. ती सामान्य लोकांच्या थडग्यांवर विखरुन टाकली.
परमेश्वराच्या मंदिरातील पुरुषवेश्यांची घरे योशीयाने उद्ध्वस्त केली. बायकाही या घरांचा वापर करत आणि अशेरा या देवतेच्या सन्मानार्थ लहान तंबू आच्छादने करत असत.
हिन्नोमच्या मुलाचे खोरे या ठिकाणी तोफेत हे एक ठिकाण होते. तेथे लोक मोलख या दैवताला आपल्या मुलांचा बळी देत आणि वेदीवर त्यांना जाळत. योशीयाने हे स्थान पुन्हा वापरता येऊ नये अशातऱ्हेने भ्रष्ट करुन टाकले.
पूर्वीच्या राजांनी परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी एक रथ आणि काही घोडे ठेवलेले होते. नाथान-मेलेक या अधिकाऱ्याच्या खोलीजवळ ही जागा होती. हे घोडे आणि रथ सूर्थ दैवतांच्या सन्मानार्थ होते. योशीयाने हे घोडे तेथून हलवले आणि रथ जाळून टाकला.
आहाजच्या इमारतीच्या गच्चीत पूर्वी यहूदाच्या राजांनी वेद्या बांधल्या होत्या. परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही चौकातही मनश्शेने वेद्या बांधल्या होत्या. योशीयाने या सर्व वेद्यांची मोडतोड करुन किद्रोनच्या खोऱ्यात त्यांचे भग्निवशेष टाकून दिले.
यरुशलेमजवळच्या विध्वंसगिरी नावाच्या पहाडावर राजा शलमोनने काही उच्चस्थाने पूर्वी बांधली होती. पहाडाच्या ती दक्षिणेला होती. सिद्ोन्यांची अमंगळ दैवत अष्टोरेथ, मवाब्यांची अमंगळ दैवत कमोश आणि अम्मोन्यांची अमंगल देवता मिलकोम यांच्यासाठीही उच्चस्थाने त्याने बांधली होती. पण ही सर्व स्थाने राजा योशीयाने भ्रष्ट केली.
त्याने सर्वच्या सर्व स्मृतिस्तंभ आणि अशेराचे खांब यांची पार मोडतोड केली आणि त्या ठिकाणावर मृत माणसांच्या अस्थी पसरुन टाकल्या.
नबाटचा मुलगा यराबाम याने बांधलेली बेथेलमधली वेदी आणि उच्चस्थानेही योशीयाने उध्वस्त केली. या यराबामने इस्राएलला पाप करायला लावले होते. योशीयाने त्या बांधकामांची मोडतोड करुन त्याची अगदी माती केली. अशेरा स्तंभही त्याने जाळून टाकला.
योशीयाने डोंगरावर इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्याला काही कबरी दिसल्या. तेव्हा त्याने माणसे पाठवून त्यांतील हाडे आणली. ती हाडे त्याने वेदीवर जाळली आणि ते स्थान अपवित्र केले. संदेष्ट्याने जो परमेश्वराचा संदेश घोषित केला होता त्या प्रमाणेच हे झाले. यराबाम वेदीजवळ उभा असताना संदेष्ट्याने हे सांगितले होते. पुन्हा पाहिले तेव्हा योशीयाला संदेष्ट्याची कबर दिसली.
योशीयाने विचारले, “हे थडगे कोणाचे?” तेव्हा गावातील लोकांनी त्याला सांगितले, “हे यहूदातून आलेल्या संदेष्ट्याचे थडगे. तू बेथेलच्या वेदीची जी दशा करुन टाकलीस त्याबद्दल त्याने फार पूर्वीच भाकित केले होते.”
तेव्हा योशीया म्हणाला, “या थडग्याला धक्का लावू नका तेथील अस्थी हलवू नका.”
शोमरोनच्या नगरामधील उच्चस्थानांवरील सर्व दैवतेही योशीयाने उद्ध्वस्त केली. ही दैवते इस्राएलच्या राजांनी बांधली होती आणि त्या मुळे परमेश्वराचा कोप झाला होता. बेथेलमधील वेदीप्रमाणेच योशीयाने ह्या दैवतांची गत करुन टाकली.
शोमरोन मधील उच्चस्थानांच्या सर्व याजकांना योशीयाने ठार केले. त्या वेदीवरच त्याने त्यांना मारले. वेदीवर माणसांची हाडे जाळली. अशाप्रकारे सर्व पूजास्थळांची मोडतोड करुन मग तो यरुशलेमला परतला. यहूदाचे लोक वल्हांडण साजरे करतात
राजा योशीयाने सर्व लोकांना आज्ञा केली, “करारात लिहिले आहे त्या पध्दतीने तुमच्या परमेश्वर देवासाठी वल्हांडण सण साजरा करा.”
इस्राएलवर न्यायाधीश राज्य करत होते तेव्हापासून लोकांनी वल्हांडण सण अशा पध्दतीने साजरा केला नव्हता. यहूदाच्या किंवा इस्राएलच्या कोणत्याही राजाने त्यानिमित्त उत्सव केला नव्हता.
योशीयाचे राजा म्हणून अठरावे वर्ष चालू असताना लोकांनी परमेश्वरासाठी हा सण साजरा केला.
यहूदा आणि यरुशलेममध्ये लोक पुजत असलेल्या मांत्रिक (भूतसंचारी) चेटकी, गृहदेवता आणि अनेक अमंगळ गोष्टींचा नाश योशीयाने केला. परमेश्वराच्या मंदिरात याजक हिल्कीयाला जे नियमशास्त्राचे पुस्तक सापडले त्या बरहुकूम योशीयाने हे केले.
योशीयासारखा राजा यापूर्वी झाला नव्हता. योशीया पूर्णपणे परमेश्वराचा उपासक बनला मोशेच्या कराराचे पालन योशीयाइतक्या काटेकोरपणे कुठल्याच राजाने केले नव्हते. आणि त्यानंतरही तसा राजा झाला नाही.
पण तरीही यहूदावरील परमेश्वराचा राग ओसरला नाही. मनश्शेच्या वर्तनाबद्दल अजूनही त्याला राग होता.
परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलांना हुसकावून लावले तसेच यहूदांना करीन त्यांना मी नजरेपुढून घालवीन. यरुशलेमचाही मी त्याग करीन. मीच ते नगर निवडले हे खरे पण तेथील मंदिराची मी मोडतोड करीन “माझे नाव राखणारी जागा” असे याच स्थळाबद्दल मी म्हणत होतो.”
“यहूदाच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात योशीयाच्या इतर गोष्टींची हकीकत आहे.
योशीयाच्या कारकिर्दीत, मिसरचा राजा फारो-नखो याने फरात नदीजवळ अश्शूरच्या राजावर स्वारी केली. तेव्हा योशीया फारो-नखोवर चाल करुन गेला. पण मगिद्दो येथे फारो-नखोने त्याला पाहिले आणि ठार केले.
योशीयाच्या सेवकांनी त्याचा मृतदेह रथात घालून मगिद्दोहून यरुशलेमला आणला. त्याला त्याच्या कबरीत पुरले. मग देशातील लोकांनी त्याचा मुलगा यहोआहाज याला अभिषेक केला आणि त्याला पुढचा राजा केले.
यहोआहाज तेव्हा तेवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर तीन महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल लिब्नाच्या यिर्मया याची ती मुलगी.
यहोआहाज परमेश्वराच्या दृष्टीने गैर वागला. त्याचे वर्तन आपल्या पूर्वजांसारखेच होते.
फारो-नखोने हमाथ देशातील रिब्ला येथे यहोआहाजला बेड्या घातल्या. त्यामुळे यहोआहाजला यरुशलेममध्ये राज्य करता येईना. फारो-नखोने यहूदाकडून साडेसात हजार पौंड चांदी आणि पंचाहत्तर पौंड सोने जबरदस्तीने वसूल केले.
फारो-नखोने योशीयाचा मुलगा एल्याकीम याला राजा केले एल्याकीम गादीवर आला. एल्याकीमचे नाव फारो-नखोने बदलून यहोयाकीम केले; आणि यहोआहाजला मिसरला नेले. यहोआहाज तेथे मरण पावला.
यहोयाकीमने फारोला सोने चांदी दिले तरी फारो-नखोला देण्यासाठी सामान्य लोकांवर कर बसवला. तेव्हा प्रत्येकाला आपल्या वाटचे थोडे थोडे सोने रुपे द्यावे लागले. यहोयाकीमने मग फारोनखोला पैसे दिले.
यहोयाकीम राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव जबूदा. ती रुमा येथील पदाया याची मुलगी.
यहोयाकीमचे वर्तन परमेश्वराला न पटणारे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच तो गैर वागला.

24

यहोयाकीमच्या काळात बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यहूदात आला. यहोयाकीमने तीन वर्षे त्याचे मांडलिकत्व पत्करले आणि नंतर फितूर होऊन त्याने बंड केले.
यहोयाकीमविरुध्द परमेश्वराने बाबेल, अरामी, मवाबी आणि अम्मोनी लोकांच्या टोळ्या पाठवल्या. आपल्या संदेष्ट्यांकरवी परमेश्वराने जे जे घडेल म्हणून सांगितले होते त्याप्रमाणेच घडत होते. यूहदाच्या संहारासाठी या टोळ्या होत्या.
यहूदा आपल्या नजरेसमोरुन नाहीसे व्हावा म्हणून परमेश्वराच्या आज्ञेने हे झाले. मनश्शेची पापे याला कारणीभूत होती.
मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. सारे युरुशलेम त्यांच्या रक्ताने माखले. या पापांना परमेश्वराजवळ क्षमा नव्हती.
यहोयाकीमने बाकी जे काही केले त्याची नोंद “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात आहे.
यहोयाकीमच्या मृत्यूनंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. त्याचा मुलगा यहोयाखीन राज्य करु लागला.
मिसरच्या नदीपासून फरात नदीपर्यंत पूर्वी मिसरच्या ताब्यात असलेला सगळा प्रदेश बाबेलच्या राजाने बळकावल्यामुळे मिसरचा राजा मिसरसोडून आला नाही.
यहोयाखीन राजा झाला तेव्हा तो अठरा वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर तीन महिने राज्य केले. याच्या आईचे नाव नेहूष्टा. ती यरुशलेमच्या एलनाथानची मुलगी.
यहोयाखीनने आपल्या वडीलांप्रमाणेच परमेश्वराच्या दृष्टीने गैर वर्तन केले.
यावेळी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारभाऱ्यांनी यरुशलेमला वेढा दिला.
नंतर नबुखद्नेस्सर या नगरात आला.
यहूदाचा राजा यहोयाखीन बाबेलच्या या राजाच्या भेटीला आला. यहोयाखीनची आई, त्याचे कार- भारी, वडीलधारी मंडळी, सरदार हेही लोक त्याच्याबरोबर होते. तेव्हा बाबेलच्या राजाने यहोयाखीनला आपल्या ताब्यात घेतले. नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी हे झाले.
यरुशलेमच्या परमेश्वराच्या मंदिरातली आणि राजवाड्यातली सर्व मौल्यवान चीजवस्तू नबुखद्नेस्सरने हस्तगत केली. राजा शलमोनने परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली सर्व सुवर्णपात्रे त्याने मोडून तोडून टाकली. हे परमेश्वराच्या भाकिताप्रमाणेच झाले.
नबुखद्नेस्सरने यरुशलेममधली सगळी वडीलधारी मंडळी आणि धनवान लोक यांना कैद केले. दहाहजार लोकांना त्याने कैद केले. कुशल कामगार आणि कारागिर यांनाही त्याने पकडले. अगदी गरीबातला गरीब माणूस वगळता कोणालाही मोकळे ठेवले नाही.
यहोयाखीनला नबुखद्नेस्सरने बाबेलला कैदी म्हणून नेले. राजाची आई, बायका, सेवक, आणि गावातील प्रतिष्ठित लोक यांनाही त्याने नेले. हे सर्व त्याचे कैदी होते.
सात हजाराचे सैन्य, एक हजार कुशल कामगार आणि कारागीर यांनाही त्याने नेले. हे सर्व लोक युध्दात वाकबगार, तयार होते. त्यांना त्याने बाबेलला कैदी म्हणून नेले.
बाबेलच्या राजाने मत्तन्या याला राजा केले. हा यहोयाखीनचा काका. त्याचे नाव बदलून सिद्कीया असे ठेवले.
सिद्कीया राज्य करु लागला तेव्हा एकवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर अकरा वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्ना येथील यिर्मया याची मुलगी.
सिद्कीया यहोयाखीनप्रमाणेच वर्तनाने वाईट होता. परमेश्वराच्या आज्ञेविरुध्द तो वागला. 20तेव्हा परमेश्वराने संतापाने यरुशलेम आणि यहूदा यांची हकालपट्टी केली.

25

सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुध्द बंड केले आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्या सैन्यासह यरुशलेमवर चाल करुन गेला. सिद्कीया राज्यावर आल्याचे ते नववे वर्ष, दहावा महिना, दहावा दिवस होता. नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमला वेढा देऊन लोकांची ये जा रोखली. मग त्याने नगराभोवती कचऱ्याचे अडसर निर्माण केले.
सिद्कीयाच्या कारकिर्दीचे अकरावे वर्ष उजाडेपर्यंत हा वेढा चालू राहिला.
दुष्काळाने परिस्थिती बिकट झाली होती. चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवसापर्यंत नगरातील सामान्य माणसाची अन्नान्नदशा झाली.
नबुखद्नेस्सरच्या सैन्याने शेवटी तटाला खिंडार पाडले. त्या रात्री राजा सिद्कीया आणि त्याचे सैन्य यांनी पलायन केले. त्यांनी पळून जाण्यासाठी दुहेरी तटबंदीमधल्या गुप्त वाटेचा आश्रय घेतला. ही वाट राजाच्या बागेजवळ होती नगराभोवती शत्रूसैन्याचा वेढा होता पण सिद्कीया आणि त्याचे सैन्य वाळवंटाच्या दिशेने निसटले.
बाबेलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना यरीहोजवळ गाठले. तेव्हा सिद्कीयाचे सैन्य त्याला एकटा सोडून पळून गेले.
बाबेलच्या लोकांनी राजा सिद्कीयाला धरुन रिब्ला येथे आपल्या राजाकडे नेले. या लोकांनी सिद्कीयाला जबर शासन करण्याचे ठरवले.
त्यांनी सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जिवे मारले. नंतर सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्याला जेरबंद करुन बाबेलला नेले.
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्यात सातव्या दिवशी नबुखद्नेस्सर यरुशलेमवर चाल करुन आला. नबुजरदान हा राजाच्या उत्तम, निवडक सैन्याचा नायक होता.
या नबुजरदानने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा आणि यरुशलेममधील सर्व घरे जाळून टाकली. मोठमोठे वाडेही त्याने उद्ध्वस्त केले.
मग बाबेलच्या सैन्याने यरुशलेमची तटबंदी पाडली.
नगरात अजून असलेले लोक नबुजरदानने ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी जे शरण यायला तयार होते त्यांच्यासह सर्वांना कैदी म्हणून नेले.
अगदीच दरिद्री लोकांना तेवढे त्याने तेथेच राहू दिले. द्राक्षमळे आणि शेतीची देखभाल करण्यासाठी त्याने त्यांना तिथे ठेवले.
परमेश्वराच्या मंदिरातील सर्व पितळी पात्रांची बाबेलच्या सैन्याने मोडतोड केली. पितळी खांब, ढकलगाड्या, मोठमोठी पितळी घंगाळी यांची मोडतोड करुन ते पितळ त्यांनी बाबेलला नेले.
इतर पात्रे, फावडी, वाती कापण्याच्या कात्र्या, पळ्या, पितळी थाळ्या ही परमेश्वराच्या मंदिरातली सर्व उपकरणेही त्यांनी घेतली.
अग्निपात्रे, वाडगे, सोने-चांदीच्या लोभापायी सोन्यारुप्याची भांडीही नबुजरदानने हस्तगत केली.
नबुजरदानने मंदिरातून खालील लोकांना नेले मुख्य याजक सराया दुय्यम याजक सफन्या आणि तीन द्वारपाल
आणि शहरातून एक सैन्याधिकारी अजूनही नगरात असलेले राजाचे पांच सल्लागार सैन्याधिकाऱ्याचा सचिव. हा जनगणना प्रमुख असून सैनिकांची निवड करत असे. शहरात सापडलेली साठ माणसेही त्याने घेतली.
नबुखद्नेस्सरने काही लोकांना यहूदातच राहू दिले. त्यात एकजण होता त्याचे नाव गदल्या. हा अहीकामचा मुलगा आणि अहीकाम शाफानचा. या गदल्याला नबुखद्नेस्सरने यहूदा प्रांतावर अधिकारी म्हणून नेमले.
नथन्याचा मुलगा इश्माएल, कोरहाचा मुलगा यहोहानान आणि नटोफाथी तन्हुमेथाचा मुलगा सराया व माकाथीचा मुलगा याजन्या हे सैन्यातील सरदार होते. त्यांनी बाबेलच्या राजाने गदल्याला अधिकारी केल्याचे ऐकले म्हणून ते त्याला भेटायला मिस्पा येथे आले.
गदल्याने या सर्वाना अभय दिले आणि तो त्यांना म्हणाला, “बाबेलच्या अधिकाऱ्यांचे भय बाळगू नका. या देशातच राहून बाबेलच्या राजाशी एकनिष्ठ राहा. म्हणजे तुमचे भले होईल.”
अलीशामचा मुलगा नथन्या याचा मुलगा इश्माएल हा राजसंतानांपैकी होता. त्याने आणखी दहाजणांसमवेत सातव्या महिन्यात गदल्यावर हल्ला केला आणि सर्व यहूदी तसेच खास्दी यांना मिस्पा येथे ठार केले.
मग सर्व सैन्याधिकारी आणि लोक मिसरला पळून गेले. बाबेलच्या लोकांच्या धास्तीने कनिष्ठ पदावर असलेल्यापासून श्रेष्ठ पदावर असलेल्यांपर्यंत सर्व पळाले.
पुढे अबील मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन याची कैदेतून सुटका केली. यहोयाखीनला तोपर्यत तुरुंगात पडून सदतीस वर्षे झाली होती. अबील मरोदखने सत्तेवर आल्यावर बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी हे सुटकेचे काम केले.
यहोयाखीनच्या बाबतीत त्याचे धोरण मवाळपणाचे होते. त्याने यहोयाखीनला इतर राजांपेक्षा दरबारात उच्चासन दिले.
अबील मरोदखने त्याला तुरुंगातले कपडे बदलायला लावले. पुढे आयुष्यभर यहोयाखीन अबील मरोदखच्या शेजारी मेजावर बसून जेवत असे.
अबील मरोदखने त्याला पुढे त्याच्या आयुष्यभर रोज जेवण दिले.

License
CC-0
Link to license

Citation Suggestion for this Edition
TextGrid Repository (2025). Christos Christodoulopoulos. 2 Kings (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A7FE-E