1

ख्रिस्त येशूचा दास व प्रेषित असलेल्या शिमोन पेत्राकडून, देवाकडून, ज्यांना तारणारा येशू ख्रिस्त याच्या द्वारे, मौल्यावान विश्वास आमच्या बरोबरीनेच मिळाला आहे अशांना,
देव आणि आपला प्रभु येशू याच्या ओळखीमुळे तुम्हाला देवाची कृपा व शांति विपुल प्रमाणात लाभो.
जे काही जीवनासंबंधी व देवाच्या भक्तीसंबंधी आहे ते सर्व आम्हाला येशूच्या दैवी सामर्थ्याने दिले आहे. कारण ज्याने आम्हाला त्याच्या स्वत:च्या गौरवाने व चांगुलपणाने बोलविले आहे त्याला आम्ही ओळखतो.
या गोष्टींच्या म्हणजे गौरव व चांगुलपण यांच्याद्वारे देवाने आपल्याला फार महान आणि मौल्यावान असे आशीर्वादाचे अभिवचन दिले आहे यासाठी की, त्याच्याद्वारे आम्ही देवासारखे व्हावे आणि जगातील दुष्ट लोकांच्या वासनांमुळे नाशापासून सुटका करुन घ्यावी.
म्हणून या कारणासाठी आपल्या कडून होता होईल ते प्रयत्न करुन देण्यात उदारपणाची, विश्वासात चांगुलपणाची, चांगुलपणात ज्ञानाची,
ज्ञानात आत्मसंयमनाची, आत्मसंयमात धीराची आणि धीरात देवाच्या प्रामाणिक सेवेची भर घाला.
आणि देवाच्या प्रामाणिक सेवेस बंधूप्रीतीची व बंधुप्रीतीस प्रीतीची जोड द्या.
जर या सर्व गोष्टी तुमच्यात असतील व या गोष्टी वाढत असतील तर त्या तुम्हाला क्रियाशील व फळ देणारे लोक करुन आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात परिपूर्ण करतील.
पण ज्याच्या अंगी हे गुण नसतील तो पायापुरते पाहणारा व आंधळा ठरेल. आणि त्याच्या गतकाळतील पापापासून त्याला शुद्ध केल्याचा विसर त्याला पडला आहे.
म्हणून बंधूंनो, तुम्हाला देवाने खरोखरच पाचारण केले आहे आणि निवडले आहे, हे दाखविण्यासाठी अधिक उत्सुक असा. कारण जर तुम्ही या गोष्टी करता तर तुम्ही कधीही अडखळणार नाही आणि पडणार नाही.
आणि अशा प्रकारे आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त याच्या अनंतकाळच्या राज्यात उदारपणे तुमचे स्वागत करण्यात येईल.
या कारणासाठी, या गोष्टींची मी तुम्हांला सतत आठवण करुन देत राहीन. जरी तुम्हांला त्या माहीत असल्या आणि तुमच्याप्रत आलेल्या सत्यात तुम्ही चांगले स्थिरावलेले असला,
तरी हे सांगणे मी अगदी योग्य समजतो की, जोपर्यंत या शरीराने मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हांला आठवण करुन देऊन जागे ठेवणे योग्य आहे.
कारण मला माहीत आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला हे स्पष्ट केले आहे की, लवकरच मला हे शरीर सोडावे लागणार आहे.
म्हणून या जीवनातून गेल्यानंतर या गोष्टींची आठवण करुन देण्यासाठी मी सर्व प्रंसगी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन.
कारण आपल्या प्रभु येशूच्या सामर्थ्ययुक्त आगमनाविषयी जेव्हा आम्ही तुम्हांला सांगितले, तेव्हा अक्क लहुशारीने बनवलेल्या भाखडकथांवर आम्ही विसंबून राहिलो नाही. उलट आम्ही आमच्या डोळ्यांनी त्याची महानता पाहिली.
कारण त्याला सन्मान व गौरव ही देवपित्याकडून प्राप्त झालीत, तेव्हा उदात्त गौरवाने अशी वाणी त्याच्याकडे आली: “हा माझा प्रिय पुत्र आहे याजविषयी मी संतुष्ट आहे.”
आणि त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना ही वाणी स्वर्गातून येत असताना आम्ही स्वत: ऐकली.
आम्ही संदेष्ट्यांचे भविष्यवचन अती विश्वासनीय असे समजून त्यास मान देतो. त्याकडे लक्ष देऊन तुम्ही फार चांगले करता, कारण अगदी अंधारात प्रकाशणाऱ्या दीपाप्रमाणे ते दिसते म्हणून दिवस उजाडून प्रभात तारा तुमच्या अंत:करणात प्रकाशेपर्यंत तुम्ही त्याकडे ध्यान देऊन पाहाल तर चांगले होईल.
प्रथम तुम्ही हे समजले पाहिजे की, पवित्र शास्त्रातील कोणतेही भविष्यवचन कोणाही मनुष्याच्या बुद्धीने उकलत नाही.
कारण एखाद्या मनुष्याला पाहिजे म्हणून भविष्यवाणी झालेली नाही, तर जे लोक पवित्र आत्म्याने प्रेरित झालेले होते, त्यांनीच ती लोकांपर्यंत पोहचविलेली आहे.

2

तरीही देवाच्या लोकांमध्ये खोटे होऊन गेले तसे तुमच्यामध्ये खोटे शिक्षक असणार. ते लोकांमध्ये विध्वंसक विचार पसरवतील. आणि ज्या प्रभूने त्यांच्यासाठी स्वातंत्र्य विकत घेतले त्याचा ते स्वीकार करणार नाहीत. असे करण्याने ते स्वत:वर ताबडतोब नाश ओढवून घेतील.
तसेच पुष्कळ लोक प्रखर लैंगिक वासनांच्या आहारी जाऊन अनैसर्गिक शरीर व्यवहारात गुरफटतील. त्यांच्यामुळे खऱ्या मार्गाची निंदा होईल.
त्यांच्या अधाशीपणामुळे त्यांनी तयार केलेल्या शिकवणुकीने पैशांसाठी तुमची पिळवणूक करतील. फार पूर्वी देवाने त्यांना दिलेली शिक्षा ही पोकळ धमकी नाही तर त्यांचा नाश त्यांची वाट पाहत आहे.
कराण देवाने, ज्या देवदूतांनी पाप केले त्यांनादेखील सोडले नाही, तर न्यायाचा दिवस येईपर्यंत त्यांना अधोलोकाच्या गडद अंधारात टाकले.
देवाने प्राचीन काळातील जगाचीसुद्धा गय केली नाही; तेव्हा त्याने नोहाचे, ज्याने लोकांना योग्य रीतीने राहण्यासाठी उपदेश केला व त्याच्याबरोबर इतर सात लोकांचे संरक्षण केले आणि अधार्मिक लोकांनी भरलेल्या या जगावर पाण्याचा महापूर आणाला.
देवाने सदोम व गमोरा या शहरांना जाळून बेचिराख करण्याची शिक्षा दिली व भविष्याकाळात अनैतिक लोकांचे काय होईल हे या उदाहरणाने दाखवून दिले.
आपल्या अनीतिच्या वागण्याने ज्या बेबंद लोकांनी लोटासारख्या चांगल्या माणसाला कष्टविले, त्याची देवाने सुटका केली.
दिवसेंदिवस त्या लोकांमध्ये राहत असताना, त्या नियमविरहीत लोकांमुळे जे तो पाहत व ऐकत होता त्यामुळे त्या चांगल्या मनुष्याला आपले धार्मिक ह्रदय, फाटून जाते की काय असे त्याला वाटत होते.
अशा प्रकारे, प्रभुला, धार्मिक लोकांची त्यांच्या दु:खापासून सुटका कशी करायची हे माहीत आहे आणि त्याला माहीत आहे की न्यायाच्या दिवसापर्यंत दुष्ट लोकांना शिक्षेसाठी कसे ठेवायचे.
विशेषत: जे पापमय वासनांच्या भ्रष्ट मार्गाने गेले आहेत, आणि प्रभुचा अधिकार असताना देखील उद्धटपणे व मन मानेल तसे वागणारे ते लोक गौरवी देवदूतांची निंदा करायला भीत नाहीत.
याउलट देवदूत जे या लोकांपेक्षा सामर्थ्याने व बळाने महान आहेत, ते देवासमोर या लोकांविरुद्ध अपमानास्पद गैर काही बोलत नाहीत.
परंतु हे लोक ज्यांना पकडून मारुन टाकावे अशा देहस्वभावानुसार चालणाऱ्या बुद्धीहीन पशूंसारखे आहेत. ज्या गोष्टींबद्दल ते अज्ञानी आहेत, त्याविरुद्ध हे लोक बोलतात. ज्याप्रमाणे प्राण्यांचा नाश केला जातो, त्याचप्रमाणे (खोट्या शिक्षकांचाही) नाश केला जाईल.
आणि त्यांनी इतरांना दुखावल्याचे आणि अन्यायाचे फळ म्हणून त्यांनाही दुखाविण्यात येईल. भर दिवसा वाईट गोष्ट करण्यात आनंद आहे असे ते लोक मानतात. ते डाग आणि कलंक असे आहेत. ते तुमच्याबरोबर मेजवानीत सामील होताना आपल्या कपटाच्या आनंदात बेभान होतात.
त्यांची पापी नजर प्रत्येक स्त्रीकडे कामूकतेने वळते व असले पाप करायचे ते कधीही सोडत नाहीत. डळमळीत मनाच्या लोकांना ते भुरळ घालून पापात ओढतात त्यांची मने अधाशीपणात तरबेज झालेली असतात. ते लोक शापित आहेत.
सरळ वाट सोडून ते भलतीकडे भरकटत गेले आहेत. बौराचा पुत्र बलाम याच्यासारखी वाट त्यांनी धरली आहे. बलामाला अयोग गोष्टी करण्याकरिता लाच घेणे आवडत असे.
परंतु त्याच्या दोषामुळे त्याची कानउघडणी करण्यात आली. कधीही बोलू न शकणाऱ्या गाढवाने माणसासारखे बोलून संदेष्ट्याच्या वेडगळपणास आवर घातला.
हे खोटे शिक्षक पाणी नसलेले कोरडे झरे व वादळाने पांगविलेले ढग आहेत. खोल अंधारात त्यांच्यासाठी जागा राखून ठेवली आहे.
ते पोकळ बढाया मारतात व जे लोक चुकीचे जीवन जगणाऱ्यांच्या सांगतीपासून सुटकेचा प्रयत्न करु लागले आहेत, अशांची फसवणूक करुन देहवासनांच्या अनैतिकतेचा मोह टाकतात.
हे जे खोटे शिक्षक आहेत ते लोकांना मोकळीक देण्याचे वचन देतात परंतु ते स्वत:च नाशवंत जीवनाचे दास आहेत. कारण एखाद्या मनुष्यावर ज्या गोष्टीचा पगडा बसलेला असतो त्याचा तो गुलाम बनतो.
म्हणून आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त यांची ज्या लोकांना ओळख होते, त्यांची जगाच्या दूषित वातावारणापासून सुटका होते. परंतु नंतर पुन्हा एकदा जगाचे अशुद्ध वातावरण या लोकांवर आपला पगडा बसविते. मग त्यांची शेवटची स्थिती अगोदरच्या स्थितीहून जास्तच वाईट होते.
त्यांना जर चांगला मार्ग माहीत झाला नसता तर चांगले झाले असते कारण चांगला मार्ग माहीत होणे आणि त्या लोकांना दिलेल्या पवित्र शिक्षणापासून त्यांनी वळणे, यापेक्षा (अगोदरची स्थिती चांगली होती.)
त्यांच्या बाबतीत जे घडले ते या खऱ्या म्हणीत सांगितले आहे: “आपल्याच ओकीकडे परतणारा कुत्रा” आणि दुसऱ्या म्हणीत: “स्वच्छ केले तरी चिखलात लोळणारे डुक्कर.”

3

प्रिय मित्रांनो, हे दुसरे पत्र मी तुम्हाला लिहिले आहे. दोन्ही पत्रांमध्ये या गोष्टींची आठवण करुन देण्यासाठी तुमची शुद्ध मने जागी करण्याचा प्रयत्न केला आहे.
देवाच्या पवित्र संदेष्ट्यांनी वापरलेले शब्द आणि तुमच्या प्रेषितांकडून आपल्या प्रभु व तारणाऱ्याने दिलेल्या आज्ञांची तुम्ही आठवण करावी अशी माझी इच्छा आहे.
पहिल्यांदा आम्ही जे तुम्हाला सांगितले ते तुम्ही समजून घेतले पाहिजे, ते म्हणजे, शेवटच्या दिवसांत थट्टेखोर लोक येतील जे आपल्या इच्छेप्रमाणे वागतील.
आणि म्हणतील, “ख्रिस्ताच्या येण्याविषयीच्या अभिवचनाचे काय झाले? आम्हाला ते जाणून घ्यायचे आहे, कारण आमचे पूर्वज मेल्यापासून प्रत्येक गोष्ट जगाच्या निर्मितीच्या पासून जशी चालत आली तशीच ती आजसुद्धा घडत आहे.”
पण जेव्हा ते असे म्हणतात, तेव्हा ते मुद्दामच विसरतात की, फार पूर्विपासून आकाश व पृथ्वी अस्तित्वात होती, जी देवाच्या शब्दाने पाण्यामधून आकारास आली.
जेव्हा मागे जग अस्तित्वात होते तेव्हा याच घटकणेमुळे महापूर येऊन पृथ्वीचा नाश झाला.
परंतु आता जे आकाश व पृथ्वी आहेत ती याच शब्दाने अग्निद्वारे नष्ट होण्यासाठी राखून ठेवली आहेत. त्यांना त्याच दिवसासाठी राखून ठेवण्यात आले आहे, जेव्हा अधार्मिक लोकांचा न्याय होऊन त्यांचा नाश होईल.
परंतु, प्रिय मित्रांनो, ही एक गोष्ट विसरु नका की, प्रभूला एक दिवस एक हजार वर्षांसारखा आणि एक हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत.
परंतु प्रभूचा दिवस एका चोरासारखा येईल, त्यादिवशी आकाश मोठ्या गर्जनेने नाहीसे होईल व आकाशातील सर्व गोष्टी जळून नाहीशा होतील आणि पृथ्वीवरील लोक व त्यांची कामे उघडकीस येतील.
जर अशा प्रकारे सर्व गोष्टींचा नाश होणार आहे तर तुम्ही कोणत्या प्रकारचे लोक असायला पाहिजे याचा विचार करा. तुम्ही आपले जीवन पवित्रतेने जगावे व देवाच्या सेवेत रममग्र असावे.
तुम्ही प्रभुच्या येण्याच्या दिवसाची वाट पाहावी यासाठी की देवाच्या येण्याचा दिवस अधिक लवकर यावा. त्या गर्जनेने (आवाजाने) आकाश पेटून नष्ट होईल व आकाशातील सर्व गोष्टी आगीत वितळतील.
पण देवाच्या वचनाप्रमाणे, जथे चांगुलपणा वास करतो असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची आपण वाट पाहू.
म्हणून प्रिय मित्रांनो, ज्याअर्थी तुम्ही या गोष्टींची वाट पाहत आहात, त्याअर्थी आपणास प्रभूसमोर डागरहीत, दोषरहित व शांतता टिकविण्यांचा आटोकाट प्रयत्न करा.
आणि ही गोष्ट मनामध्ये ठेवा की, आपल्या प्रभूचा धीर म्हणजे तारण, ज्याप्रमाणे आपला प्रिय बंधू पौल याला देवाने दिलेल्या शहाणपणामुळे त्याने तुम्हांला लिहिले.
त्या पत्रात, जसे इतर सर्व पत्रांत असते, त्याप्रमाणे तो या गोष्टीविषयी सांगतो. त्याच्या पत्रामध्ये काही गोष्टी आहेत ज्या समजण्यास कठीण आहेत. अज्ञानी व चंचल मनाचे लोक पवित्र शास्त्रातील इतर गोष्टींप्रमाणे या गोष्टींचादेखील विपर्यास करुन गैर अर्थ लावतात व परिणामी आपला स्वत:चा नाश करुन घेतात.
यासाठी, प्रिय मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी अगोदरच माहीत असल्याने स्वत:चे रक्षण करा. यासाठी की, नियमशास्त्रविरहित लोकांच्या चुकीमुळे तुम्ही भरकटत जाऊ नये आणि तुमची जी विश्वासाविषयीची अढळ भूमिका आहे, तिच्यापासून विचलित होऊ नये म्हणून संभाळा.
परंतु आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानात वाढत राहा. त्याला आता आणि अनंतकाळपर्यंत गौरव असो.

Holder of rights
Multilingual Bible Corpus

Citation Suggestion for this Object
TextGrid Repository (2025). Marathi Collection. 2 Peter (Marathi). 2 Peter (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. Multilingual Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A900-9