1

पुष्कळ लोकांनी आमच्यामध्ये घडलेल्या ऐतिहासिक घटनांची नोंद करण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी त्याच गोष्टी लिहिल्या ज्या आम्हांला काही इतर लोकांकडून समजल्या होत्या-या लोकांनी त्या गोष्टी सुरुवातीपासून पाहिल्या होत्या आणि देवाचा संदेश लोकांना सांगून त्याची सेवा केली होती.
थियफिला महाराज, सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास मी केला आहे, म्हणून मला असे वाटले की, या सर्व घटनांविषयी आपणांला व्यवस्थित माहिती लिहावी.
हे मी यासाठी लिहित आहे की, जे काही तुम्हांला शिकविण्यात आले ते खरे आहे, हे तुम्हांला समजावे.
यहूदीयाचा राजा हेरोद याच्या दिवसांत, जखऱ्या नावाचा एक याजक होता. तो अबीयाच्या याजककुळातील होता. त्याला एक पत्नी होती, ती अहरोनाच्या वंशातील कन्यांपैकी होती. तिचे नाव अलीशिबा होते.
दोघेही देवाच्या दृष्टीने धार्मिक होते आणि प्रभूच्या आज्ञा व विधी पाळण्यात काटेकोर होते.
परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलीशिबा वांझ होती. आणि शिवाय दोघेही फार म्हातारे झाले होते.
जेव्हा जख जखऱ्याच्या गटाची मंदिरात सेवा करण्याची वेळ आली आणि त्यावेळी तो तेथे देवाचा याजक म्हणून सेवा करीत होता,
याजकांच्या प्रथेप्रमाणे संमदिरात देवापुढे धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली.
जेव्हा धूप जाळण्याच्या वेळी सर्वजण बाहेर जमून प्रार्थना करीत होते,
तेव्हा देवाच्या दूताने त्याला दर्शन दिले. देवदूत धूप जाळण्याच्या वेदीच्या उजव्या बाजूला उभा होता.
जेव्हा जखऱ्याने त्याला पाहिले तेव्हा तो अस्वस्थ झाला, आणि त्याला भीति वाटली.
देवदूत त्याला म्हणाला, “जखऱ्या, भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे, आणि तुझी पत्नी अलीशिबा इजपासून तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव योहान ठेव.
तो तुला आनंद आणि सुख देईल. त्याचा जन्म होईल तेव्हा पुष्कळ लोक आनंदित होतील.
देवाच्या दृष्टीने तो महान होईल. त्याने कोणतेही कडक पेय किंवा मद्य पिऊ नये. आणि तो आईच्या गर्भात असल्यापासूनच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.
आणि तो पुष्कळ इस्राएल लोकांना प्रभु त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल.
योहान स्वत: देवापुढे चालेल, तो एलीयाप्रमाणे समर्थ होईल. एलीयाला जो आत्मा होता, तोच त्याला असेल. तो वडिलांची अंत:करणे त्याच्या मुलांकडे वळवील. आज्ञा न मानणाऱ्यांना तो धार्मिकतेकडे नेईल. प्रभुसाठी लोकांना तयार करण्यासाठी तो या गोष्टी करील.”
मग जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे खरे आहे हे मला कसे समजेल? कारण मी वृद्ध मनुष्य आहे, आणि माझी पत्नीसुद्धा वृद्ध झाली आहे.”
आणि देवदूताने उत्तर दिले. तो म्हणाला, “मी गब्रीएल आहे. मी देवाच्या समक्षतेमध्ये उभा राहतो. आणि मला तुझ्याशी बोलायला व तुला ही सुवार्ता सांगायला पाठविण्यात आले आहे.
पण हे लक्षात ठेव, तू मुका राहशील. हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही. कारण माझे शब्द जे योग्य वेळी खरे ठरणार आहेत त्या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”
लोक जखऱ्याची वाट पाहत होते, आणि तो मंदिरात इतका वेळ का राहिला याचे त्यांना नवल वाटत होते.
जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याला त्यांच्याशी बोलता येईना. मग त्यांना जाणीव झाली की, मंदिरात त्याने दृष्टान्त पाहिला आहे. तो त्यांना खुणा करीत होता परंतु बोलू शकत नव्हता.
मग असे झाले की, त्याच्या सेवेचा कालावधि संपल्यानंतर तो घरी गेला.
काही काळानंतर त्याची पत्नी अलीशिबा गरोदर राहिली. आणि पाच महिने तिने स्वत: एकांतवास पत्करला. ती म्हणाली,
“शेवटी आता प्रभुने मला या मार्गाने मदत केली आहे. लोकांमध्ये माझी लाज राखण्यासाठी त्याने माझी पुष्कळ काळजी घेतली.”
अलीशिबाच्या सहाव्या महिन्यात, देवाने गब्रीएल दूताला गालीलातील नासरेथ गावी पाठविले.
योसेफ नावाच्या मनुष्याशी ज्या कुमारीची मागणी झाली होती, तिच्याकडे गब्रीएलाला पाठविण्यात आले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातील होता. तिचे नाव मरीया होते.
गब्रीएल तिच्याकडे आला आणि म्हणाला, “अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभु तुझ्याबरोबर आहे.”
परंतु या शब्दांनी ती अस्वस्थ झाली, आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करु लागली.
देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे.
ऐक! तू गरोदर राहशील, आणि तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू येशू ठेव.
तो महान होईल व त्याला सर्वोच्य देवाचा पुत्र म्हणतील. आणि प्रभु देव त्याला त्याचा पिता दावीद याचे सिंहासन देईल.
याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी तो सत्ता चालवील त्याच्या राज्याचा कधीही अंत होणार नाही.”
तेव्हा मरीया दूताला म्हणाली, “मी कुमारी असल्याने हे असे कसे घडेल?”
देवदूत तिला म्हणाला, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील. आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्याला देवाचा पुत्र म्हणतील.
आणि याकडे लक्ष दे: तुझी नातेवाईक अलीशिबा जरी वांझ असली तरी तीसुद्धा गरोदर आहे व तिच्या पोटी पुत्र आहे. आणि ज्या स्त्रीला ते म्हणाले की तुला मूल होणार नाही तिला आता सहावा महिना आहे!
कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.”
मरीया म्हणाली, “मी प्रभूची दासी आहे, आपण म्हणालात तसे माझ्याबाबतीत घडो.” मग देवदूत तिला सोडून गेला.
त्याच वेळी मरीया तयार झाली आणि लगेच यहूदीयाच्या डोंगराळ भागातील एका गावी गेली.
तिने जखर्ऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि अलीशिबेला अभिवादन केले.
आणि असे झाले की, जेव्हा अलीशिबेने मरीयेचे अभिवादन ऐकले तेव्हा तिच्या पोटातील बालकाने उडी मारली. आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरुन गेली.
ती मोठ्या आवाजात बोलली, “सर्व स्त्रियांमध्ये तू अधिक धन्य आहेस, तुझ्या पोटचे फळ धन्य आहे.
परंतु माझ्या बाबतीत अशी कोणती गोष्ट घडली की माझ्या प्रभूच्या आईने माझ्याकडे यावे?
कारण तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या कानी पडताक्षणीच, माझ्या पोटातील बाळाने आनंदाने उडी घेतली.
प्रभूने तुला ज्या गोष्टी घडतील असे सांगितले त्यावर तू विश्वास ठेवलास म्हणून तू धन्य आहेस.”
आणि मरीया म्हणाली,
“माझा आत्मा प्रभूची स्तुति करतो;माझा आत्मा माझ्या तारणाऱ्या देवामध्ये आनंद करतो.
कारण त्याने त्याच्या नम्र दासीची काळजी वाहिली, होय, येथून पुढे सर्व लोक मला धन्य म्हणतील.
कारण सर्वमसर्थाने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे.
जे त्याचे भय धरतात, त्यांच्यावर तो पिढ्यानपिढ्या दया करतो.
त्याने आपल्या बाहूंनी आपले सामर्थ्य दाखविले; गर्विष्ठ लोकांना त्यांच्या बढाईखोर विचारांसह विखरुन टाकले आहे.
सत्ताधीशांना त्याने त्यांच्या सिंहासनावरुन खाली आणले आहे, आणि नम्र जनांना त्याने उंच केले आहे.
त्याने भुकेलेल्यांना उत्तम पदार्थांनी समाधान दिले आहे. श्रीमंत लोकांना त्याने रिकामे पाठविले आहे.
त्याचा सेवक जो इस्राएल याला मदत करण्यास तो आला आहे.
त्याने आपल्या पूर्वजांना जे अभिवचन दिले होते त्याप्रमाणे अब्राहाम व त्याच्या वंशजांवर दया करण्याचे तो लक्षात ठेवतो.”
मरीया अलीशिबेबरोबर तीन महीने राहिली, आणि मग ती तिच्या घरी परत गेली.
अलीशिबेला तिचे मूल होण्याची वेळ आली, तेव्हा तिने एका मुलाला जन्म दिला.
तिच्या शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी ऐकले की, देवाने तिच्यावर मोठी कृपा केली आहे, ते तिच्या आनंदात सहभागी झाले.
मग असे झाले की, आठव्या दिवशी मुलाची सुंता करण्यासाठी ते आले, ते, त्याच्या बापाचे जे नाव होते तेच म्हणजे जखऱ्या नाव ठेवणार होते.
पण त्याची आई म्हणाली, “नाही, त्याला योहान असे म्हणावे.”
ते तिला म्हणाले, “तुझ्या कोणत्याच नातेवाईकाचे नाव ते नाही.”
नंतर त्यांनी त्याच्या वडिलांना खुणेने विचारले, “त्याला कोणते नाव ठेवायचे आहे?”
त्याने लिहिण्यासाठी पाटी मागितली आणि लिहिले, “त्याचे नाव योहान आहे.” त्या सर्वांना खूपच आश्चर्य वाटले.
लगेच त्याचे तोंड उघडले आणि त्याची जीभ मोकळी झाली, आणि तो बोलू लागला व देवाची स्तुति करु लागला.
सर्व शेजारी भयभीत झाले आणि यहूदीयाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलत होते.
ज्या कोणी हे ऐकले त्या प्रत्येकाने याविषयी नवल केले, ते म्हणाले, “हे मूल पुढे कोण होणार आहे?” कारण देवाचा वरदहस्त त्यांच्यावर होता.
मग त्याचा पिता जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला गेला, त्याने भविष्यवाणी केली; तो म्हणाला,
प्रभु, इस्राएलाचा देव धन्यवादित असो, कारण तो त्याच्या लोकांना मदत करण्यास, व त्यांना मुक्त करण्यास आला आहे.
त्याने आमच्यासाठी आपला सेवक दाविद याच्या घराण्यातून आम्हांला सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.
देव म्हणाला की, मी असे करीन त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांकरवी तो हे बोलला व ते फार वर्षां पूर्वी होऊन गेले.
जे आमचे शत्रु आहेत व जे आमचा द्वेष करतात त्यांच्यापासून मुक्त करण्याचे अभिवचन त्याने आम्हांला दिले.
आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे. व त्यांच्याशी केलेला पवित्र करार लक्षात ठेवण्यासाठी तो आमचे रक्षण करणार आहे.
हा करार एक शपथ होती, जी त्याने आमचा पूर्वज अब्राहाम याच्याशी घेतली
ती अशी की, तो आम्हांला शत्रुच्या सामर्थ्यापासून मुक्त करील, अशासाठी की, आम्ही त्याची सेवा निर्भयपणे करु शकू.
त्याची अशी इच्छा होती की, आम्ही त्याच्यासमोर धार्मिकतेने व पवित्रतेने आमच्या आयुष्याचे सर्व दिवस जगावे.
“मुला, आता तुला सर्वोच्च देवाचा संदेष्टा म्हणातील. प्रभूच्या येण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी तू त्याच्या (प्रभु) पुढे चालशील.
कारण तू प्रभूसमोर, त्याचा मार्ग तयार करण्यासाठी आणि पापक्षमा मिळून तुमचे तारण होईल हे त्याच्या लोकांना सांगण्यासाठी पुढे जाशील.
कारण देवाच्या हळुवार करुणेमुळे स्वर्गीय दिवासाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल.
आणि शांतीच्या मार्गावर आमच्या पावलांना मार्गदर्शन करील.”
अशा रीतीने तिचा मुलगा मोठा होत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला. इस्राएल लोकांना प्रगट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.

2

त्या दिवसात कैसर औगुस्तकडून हुकुम झाला की, रोमन जगातील सर्व लोकांच्या नावांची नोंद झालीच पाहिजे.
ही पहिली नावनोंदणी होती. क्वीरीनिय हा सूरिया प्रांताचा राज्यपाल होता त्यावेळेस ही नावनोंदणी झाली.
प्रत्येक जण नावनोंदणी करण्यासाठी आपापल्या गावी गेला.
मग योसेफसुद्धा गालीलातील नासरेथ गावाहून यहूदीयातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला. कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता.
जिच्याशी त्याचे लग्न ठरले होते व जी गरोदर होती, त्या मरीयेसह तो तेथे नावनोंदणी करण्यासाठी गेला.
ते तेथे असतानाच तिची बाळंतपणाची वेळ आली.
आणि तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तिने त्याला फडक्यंामध्ये गुंडाळले व गोठ्यात ठेवले, कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही.
आणि तेथे काही मेंढपाळ रात्रीच्या वेळी शेतामध्ये राहून आपले कळप राखीत होते.
आणि देवाचा एक दूत त्यांच्यामोर प्रगट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले. आणि ते मेंढपाळ घाबरुन गेले.
देवदूत त्यांना म्हणाला: “भिऊ नका, कारण मी तुम्हांला आनंदाची बातमी सांगणार आहे, जिच्यामुळे सर्व लोकांना आनंद होणार आहे.
कारण आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभु आहे.
आणि तुमच्यासाठी ही खूण असेल : फडक्यात गुंडाळलेले आणि गोठ्यात निजविलेले बाळ तुम्हांला आढळेल.”
आणि अचानक तेथे देवदूताबरोबर स्वर्गातील सैन्याचा समुदाय जमला. ते देवाची स्तुति करीत होते आणि म्हणत होते;
“स्वर्गात देवाला गौरव आणि ज्यांच्याबद्दल देव समाधानी आहे, त्या पृथ्वीवरील मनुष्यांत शांति”
जेव्हा देवदूत त्यांना सोडून परत स्वर्गात गेले, तेव्हां मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, ‘चला, बेथलेहेमला जाऊ या आणि घडलेली जी गोष्ट देवाने आम्हांला कळविली ती पाहू या.”
ते घाईने गेले आणि त्यांना मरीया व योसेफ आढळले आणि त्यांनी गोठ्यात ठेवलेले बाळ पाहिले.
जेव्हा मेंढपाळांनी त्याला पाहिले तेव्हा देवदूताने त्यांना त्या बाळविषयी जे सांगितले होते ते सर्वांना सांगितले.
ज्यांनी हे ऐकले ते सर्व मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे चकित झाले.
पण मरीयेने या गोष्टी स्वत:जवळच ठेवल्या, व सतत त्याविषयी विचार करु लागली.
त्यांनी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या सर्व गोष्टीविषयी देवाचे गौरव आणि स्तुति करीत मेंढपाळ घरी गेले: त्यांना जसे सांगण्यात आले तसेच सर्व घडले.
आणि जेव्हा बाळाची सुंता करण्याचा आठवा दिवस आला, तेव्हा त्याचे नाव येशू ठेवले गेले. हे नाव देवदूतांनी त्याला त्याची गर्भधारणा होण्यापूर्वीच ठेवले होते.
मोशेच्या नियमाप्रमाणे जो त्यांचा शुद्धीकरणाच्या विधीचा काळ होता तो आला तेव्हा त्याला देवापुढे सादर करण्याचा विधि करण्यासाठी ते त्याला घेऊन यरुशलेमला गेले.
ज्याप्रमाणे प्रभूच्या नियमात लिहिले आहे; “प्रत्येक प्रथम जन्मलेला तर प्रभूला अर्पण करावा.”
आणि “कबुतरांच्या जोडीचा किंवा पारव्याच्या दोन पिलांचा यज्ञ करावा.” प्रभूच्या या नियमाप्रमाणे यज्ञ अर्पण करण्यास ते गेले:
यरुशलेम येथे एक मनुष्य होता, त्याचे नाव शिमोन होते; तो नीतिमान आणि भक्तिशील होता. इस्राएलाचे सांत्वन होण्याची तो वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्यावर होता.
पवित्र आत्म्याने त्याला दाखवून दिले की, प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तो मरणार नाही.
आत्म्याने भरलेला तो मंदिरात गेला. आणि येशूच्या आईवडिलांनी बाळाला नियमशास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे करण्यासाठी त्याच्याजवळ आणले.
शिमोनाने येशूला आपल्या हातात घेतले, आणि त्याने देवाची स्तुति केली. तो म्हणाला:
“आता, प्रभु, आपल्या वचनाप्रमाणे आपल्या सेवकाला जाऊ दे,
कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे,
जे तू सर्व लोकांच्या समोर केलेस.
तो यहूदीतर लोकांना तुझा मार्ग प्रगट करण्यासाठी प्रकाश असा आहे. आणि तो तुझे लोक इस्राएल यांच्यासाठी गौरव असा आहे.”
त्याच्याविषयी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्याचे आईवडील आश्चर्यचकित झाले.
मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला, तो येशूची आई मरीया हिला म्हणाला, “इस्राएलात, हे मूल, अनेकांचे पडणे व उठणे यांस कारणीभूत ठरेल. जे चिन्ह नाकारले जाईल ते होण्याकरिता याची नेमणूक झाली आहे.
अनेकांच्या मनातील विचार प्रगट होण्यासाठी तुझ्या जिवातून तरवार आरपार जाईल.”
तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी स्त्री होती. ती फनूएलाची मुलगी होती. ती अशेर वंशाची होती. ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्षे राहिली.
ती विधवा असून आता चौऱ्याऐंशी वर्षांची होती. तिने मंदिर कधीही सोडले नाही; उपास व प्रार्थना करुन ती रात्रंदिवस उपासना करीत असे.
ती त्यावेळी बालकाच्या आईवडिाांकडे आली व तिने देवाचे आभार मानले. आणि जे यरुशलेमच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले.
प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांनी सर्व पूर्ण केले व नंतर ते गालीलातील त्यांच्या नासरेथ या गावी परतले.
बालक वाढत होता, तो बलवान झाला, तो ज्ञानाने परिपूर्ण झाला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती.
प्रत्येक वर्षी त्याचे आईवडील वल्हांडण सणासाठी यरुशलेमाला जात.
जेव्हा तो बारा वर्षांचा झाला तेव्हा ते नेहमीप्रमाणे सणासाठी वर गेले.
सण संपल्यावर ते घरी परतत असता, येशू (मुलगा) मात्र यरुशलेमातच राहिला, पण त्याच्या आईवडिलांना हे माहीत नव्हते.
कुठल्या तरी प्रवाश्यांच्या घोळक्याबोरबर तो येत असावा असा विचार करुन पुढे एक दिवसाचा प्रवास केला. मग ते त्याला त्यांच्या नातेवाईकांमध्ये व मित्रांमध्ये शोधू लागले.
जेव्हा तो त्यानां सापडला नाही तेव्हा त्याला शोधण्यासाठी यरुशलेमास परत गेले.
असे घडले की, तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात सापडला, तो गुरुजनांच्यामध्ये बसून त्यांचे ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारीत होता.
ज्यांनी त्याचे बोलणे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरांमुळे चकित झाले.
जेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला पाहिले तेव्हा ते चकित झाले. त्याच्यी आई त्याला म्हणाली, “मुला, तू आमच्याबरोबर असे का केले? तुला शोधत असताना तुझे वडील व मी अतिशय काळजीत होतो.”
मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध का केलात? माझ्या पित्याचे कार्य जेथे आहे, तेथे मी असावे हे तुम्हांला माहीत नव्हते काय?”
परंतु त्याने हे जे उत्तर दिले ते त्यांना समजले नाही.
मग तो त्यांच्याबरोबर नासरेथास गेला. आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याची आई या सर्व गोष्टी अंत:करणात ठेवीत होती.
येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्यांच्या कृपेत वाढला.

3

तिबिर्य कैसराच्या कारकीर्दीच्या पंधराव्या वर्षी, जेव्हा पंतय पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता, आणि हेरोद गालीलचा अधिकारी असताना, आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती या देशांचा अधिकारी होता व लूसनिय हा अबिलेनेचा अधिकारी होता.
हनन्या व केफा हे मुख्य याजक होते, तेव्हा वाळवंटात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले.
तो यार्देनेच्या सभोवतालच्या सर्व परिसरात गेला, व लोकांना त्यांच्या पापांपासून क्षमा मिळण्यासाठी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घेण्याविषयी घोषणा करीत फिरला.
हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे झाले: “वाळवंटात कोणाचा तरी आवाज ऐकू आला, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्याचे रस्ते सरळ करा.
प्रत्येक दरी भरुन येईल, आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल वाकड्यातिकड्या जागा सरळ केल्या जातील ओबडधोबड रस्ते सपाट केले जातील
आणि सर्व लोक देवाचे तराण पाहतील!”‘ यशाय 40:3-5
त्याच्याकडून बाप्तिस्मा करुन घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला: “अहो, सापाच्या पिल्लांनो, येणाऱ्या क्रोधापासून सुटका करुन घेण्यासाठी तुम्हांला कोणी सावध केले?
पश्चात्तापास योग्य असे फळ द्या, आणि आपापसात असे म्हणू नका की, ‘आमच्यासाठी अब्राहाम आमच्या पित्यासारखा आहे.’ मी तुम्हांला सांगतो की, अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव या खडकांचा उपयोग करण्यास समर्थ आहे.
आणि झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड अगोदरच ठेवलेली आहे. आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून आगीत टाकले जाईल.”
जमावाने त्याला विचारले, “मग आता आम्ही काय करावे?”
त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन सदरे असतील त्याने ज्याच्याकडे काहीच नाही त्याला ते वाटून द्यावे. ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.”
काही जकातदारही बाप्तिस्मा करुन घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”
तो त्यांना म्हणाला, “गरजेपेक्षा जास्त जमा करु नका.” हेच तुम्हांला सांगितले आहे.
काही शिपायांनीसुद्धा त्याला विचारले, “आणि आम्ही काय करावे?” योहान त्यांना म्हणाला, “कोणाकडून बळजबरीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करु नका. आणि तुम्हांला मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.”
लोक मशीहाची अपेक्षा करीत होते. आणि ते सर्व त्यांच्या मनामध्ये योहानाबद्दल आश्चर्य करीत होते व असा विचार करीत होते की, “कदाचित तो ख्रिस्त असण्याची शक्यता आहे.”
त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले; तो म्हणाला. “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण एकजण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील.
त्याचे खळे स्वच्छ करण्यासाठी व त्याच्या कोठारात गहू साठविण्यासाठी त्याच्या हातात त्याचे सूप आहे पण भुसा तो न विझविता येणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.”
योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करुन सुवार्ता सांगितली.
योहानाने हेरोद या सताधीशाची कानउघडणी केली. कारण त्याचे त्याच्या भावाच्या पत्नीशी-हेरोदीयाशी अनैतिक संबंध होते, तसेच इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या.
हे सर्व करुन सुद्धा त्यात भर म्हणून की काय त्याने योहानाला तुरुंगात टाकले.
तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा केला जात होता, तेव्हा येशूचा सुद्धा बाप्तिस्मा झाला. तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले.
आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रुपात त्याच्यावर उतरला आणि आकाशातून एक वाणी आली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुइयाविषयी फार संतुष्ट आहे.”
जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोकांना असे वाटे की, येशू योसेफाचा मुलगा आहे. योसेफ एलीचा मुलगा होता
एली मत्ताथाचा मुलगा होता, मत्ताथ लेवीचा मुलगा होता. लेवी मल्खीचा मुलगा होता. मल्खी यन्रयाचा मुलगा होता. यन्रया योसेफाचा मुलगा होता.
योसेफ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य अमोसाचा मुलगा होता. अमोस नहूमाचा मुलगा होता. नहूम हेस्लीचा मुलगा होता. हेस्ली नग्गयाचा मुलगा होता.
नग्गय महथाचा मुलगा होता. महथ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य शिमयीचा मुलगा होता. शिमयी योसेखाचा मुलगा होता. योसेख योदाचा मुलगा होता.
योदा योहानानाचा मुलगा होता. योहानान रेशाचा मुलगा होता. रेशा जरुब्बाबेलाचा मुलगा होता. जरुब्बाबेल शल्तीएलाचा मुलगा होता. शल्तीएल नेरीचा मुलागा होता.
नेरी मल्खीचा मुलगा होता. मल्खी अद्दीचा मुलगा होता. अद्दी कोसोमाचा मुलगा होता. कोसोम एल्मदामाचा मुलगा होता. एल्मदाम एराचा मुलगा होता.
एर येशूचा मुलगा होता. येशू अलिएजराचा मुलगा होता. अलिएजर योरीमाचा मुलगा होता. योरीम मत्ताथाचा मुलगा होता. मत्ताथ लेवीचा मुलगा होता.
लेवी शिमोनाचा मुलगा होता. शिमोन यहूदाचा मुलगा होता. यहूदा योसेफाचा मुलगा होता. योसेफ योनामाचा मुलगा होता. योनाम एल्याकीमाचा मुलगा होता.
एल्याकीम मल्लयाचा मुलगा होता. मल्ल्या मिन्नाचा मुलगा होता. मिन्ना मत्ताथाचा मुलगा होता. मत्ताथ नाथानाचा मुलगा होता. नाथान दाविदाचा मुलगा होता.
दावीद इशायाचा मुलगा होता. इशाय ओबेदाचा मुलगा होता. ओबेद बवाजाचा मुलगा होता. बवाज सल्मोनाचा मुलगा होता. सल्मोन नहशोनाचा मुलगा होता.
नहशोन अम्मीनादाबाचा मुलगा होता. अम्मीनादाब अर्णयाचा मुलगा होता. अर्णय हेस्रोनाचा मुलगा होता. हेस्रोन पेरेसाचा मुलगा होता. पेरेस यहूदाचा मुलगा होता.
यहूदा याकोबाचा मुलगा होता. याकोब इसहाकाचा मुलगा होता. इसहाक अब्राहामाचा मुलगा होता. अब्राहाम तेरहाचा मुलगा होता. तेरह नाहोराचा मुलगा होता.
नाहोर सरुगाचा मुलगा होता. सरुग रऊचा मुलगा होता. रऊ पेलेगाचा मुलगा होता. पेलेग एबराचा मुलगा होता. एबर शेलहाचा मुलगा होता.
शेलह केनानाचा मुलगा होता. केनान अर्पक्षदाचा मुलगा होता. अर्पक्षद शेमाचा मुलगा होता. शेम नोहाचा मुलगा होता. नोहा लामेखाचा मुलगा होता.
लामेख मथुशलहाचा मुलगा होता. मथुशलह हनोखाचा मुलगा होता. हनोख यारेदाचा मुलगा होता. यारेद महललेलाचा मुलगा होता. महललेल केनानाचा मुलगा होता.
केनान अनोशाचा मुलगा होता. अलोश शेथाचा मुलगा होता. शेथ आदामाचा मुलगा होता. आदाम देवाचा मुलगा होता.

4

येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरुन यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्याला अरण्यात नेले.
तेथे सैतानाने त्याला चाळीस दिवस मोहात टाकले. त्या दिवसांत येशूने काहीही खाल्ले नाही. जेव्हा ती वेळ संपली, तेव्हा येशूला भूक लागली.
सैतान त्याला म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस, तर या दगडांची भाकर करुन दाखव.”
येशून त्याला उत्तर दिले, “असे लिहिले आहे: “मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.”‘ अनुवाद 8:3
मग सैतान त्याला वर घेऊन गेला. आणि एका क्षणात जगातील सर्व राज्ये त्याला दाखविली.
सैतान त्याला म्हणाला, “मी तुला या सर्व राज्याचे अधिकार व गौरव देईन कारण ते मला दिलेले आहे. आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो.
जर तू माझी उपसना करशील, तर हे सर्व तुझे होईल.”
येशूने उत्तर दिले, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे: “तू प्रभु तुझा देव याचीच उपासना केली पाहिजे, आणि फक्त त्याचीच सेवा केली पाहिजे.”‘ अनुवाद 6:13
नंतर त्याने त्याला यरुशलेमाला नेले. आणि मंदिराच्या उंच टोकावर त्याला उभे केले. आणि तो म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी मार!
असे लिहिले आहे: “तो मुझे संरक्षण करण्याची देवादूतांना आज्ञा करील.’ स्तोत्र. 91;11 आणि असेही लिहीले आहे:
“ते तुला आपल्या हातावर उचलून धरतील, त्यामुळे तुझा पाय दगडावर आपटणार नाही.”‘ स्तोत्र. 91:12
येशून उत्तर दिले. “पवित्र शास्त्रत असेही म्हटले आहे, “तु प्रभु, तुझा देव याची परीक्षा पाहू नकोस.”‘ अनुवाद 6:16
म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे भुरळ घालण्याचे संपविल्यावर, योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला.
मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालीलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली.
त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले, आणि सर्वांनी त्याची स्तुति केली.
मग तो नासरेथला गेला. जेथे तो लहानाचा मोठा झाला होता, आणि शब्बाथ दिवशी त्याच्या प्रथेप्रमाणे तो सभास्थानात गेला, तो वाचण्यासाठी उभा राहिला,
आणि यशया संदेष्ट्याचे पुस्तक त्याला देण्यात आले. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्या ठिकाणी असे लिहिले आहे:
“प्रभूचा आत्मा मजवर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टि मिळावी व त्यांनी बघावे यासाठी, जुलूूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी
आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठविले आहे.” यशया 61:1-2
मग त्याने पुस्तक बंद केले आणि सेवकाला परत दिले व तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता.
त्यांने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली: “तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्रवचन पूर्ण झाले.”
तेव्हा प्रत्येकाने त्याच्याविषयी चांगले उद्गार काढले. आणि त्याच्या मुखातून येणाऱ्या कृपेच्या शब्दांबद्दल ते आश्चर्यचकित झाले. आणि ते म्हणाले, “हा योसेफाचाच मुलगा नव्हे काय?”
तो त्यांना म्हणाला, “अर्थात, तुम्ही मला ही म्हण लागू कराल; ‘वैद्या, स्वत:ला बरे कर.’ कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्याचे आम्ही ऐकले त्या गोष्टी तुझ्या स्वत:च्या गावातसुद्धा कर.” मग तो म्हणाला,
“मी तुम्हांला खरे सांगतो, कोणीही संदेष्टा त्याच्या स्वत:च्या गावात स्वीकारला जात नाही.
मी तुम्हांला खरे सांगतो, इस्राएलात एलीयाच्या काळात पुष्कळ विधवा होत्या, जेव्हा साडेतीन वर्षेपर्यंत पाऊस पडला नाही आणि सर्व प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता
तरीही एलीयाला इतर कोणत्याही विधवेकडे पाठविण्यात आले नाही. त्याला सिदोन प्रांतातील सारफथ येथील विधवेकडेच पाठविण्यात आले.
अलीशा संदेष्ट्याच्या वेळेस इस्राएलात अनेक कुष्ठरोगी होते परंतु त्यापैकी कोणीही शुद्ध झाला नाही. केवळ सूरीया येथील नामान कुष्ठरोग्यालाच शुद्ध करण्यात आले होते.”
जेव्हा सभास्थानातील लोकांनी हे ऐकले, तेव्हा ते फार रागावले.
ते लोक उठले आणि त्यांनी त्याला (येशूला) शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्यांचे गाव वसले होते, त्या टेकडीच्या कड्याकडे त्याला ढकलून देण्यासाठी घेऊन गेले.
परंतु तो त्यांच्यातून निघून आपल्या वाटेने गेला.
नंतर तो गालीलातील कफर्णहूम गावी गेला. तो त्यांना शब्बाथ दिवशी शिक्षण देत असे.
ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण तो अधिकारवाणीने शिकवीत असे.
सभास्थानात एक मनुष्या होता, त्याच्यात अशुद्ध आत्मा होता.
तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे नासरेथच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे: देवाचा पवित्र तोच तू आहेस.”
येशूने त्याला दटावले आणि म्हटले, “शांत राहा आणि त्याच्यातून नीघ!” तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्याला जमिनीवर खाली ढकलले व त्या माणसाला काहीही इजा न करता तो बाहेर आला.
सर्व जण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, “हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो व ते बाहेर येतात.”
अशा प्रकारे त्या भागात त्याच्याविषयी सगळीकडे ही बातमी पसरली.
येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू अति तापाने आजारी होती. त्यांनी येशूला तिला बरे करण्याविषयी विनविले.
येशू तिच्याजवळ उभा राहिला. त्याने तापाला आज्ञा दिली व ताप निघाला. ती ताबडतोब उठली आणि त्यांची सेवा करु लागली.
सूर्य मावळतीला जात असताना, ज्यांची माणसे निरनिराळ्या रोगांनी आजारी होती त्या सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले. प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले.
कित्येकांमधून अशुद्ध आत्मे बाहेर आले. ते अशुद्ध आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते, “तू देवाचा पुत्र आहेस.” परंतु त्याने त्यांना दटावले व बोलू दिले नाही कारण त्यांना माहीत होते की, तो ख्रिस्त आहे.
जेव्हा दिवस उगवला तेव्हा तो एकांत स्थळी गेला. पण लोक त्याला शोधत होते. तो जेथे होता तेथे ते लगेच आले. आणि त्याने त्यांच्यातून निघून जाऊ नये म्हणून प्रयत्न केले.
तेव्हा तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याची सुवार्ता मला इतर गावांमध्येही सांगितली पाहिजे. कारण याच कारणासाठी मला पाठविले आहे.”
आणि तो यहूदियाच्या वेगवेगळ्या सभास्थानात उपदेश करीत होता.

5

मग असे झाले की, लोकांनी त्याच्याभोवती गर्दी केली होती व ते देवाचे वचन ऐकत होते आणि तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा होता,
तेव्हा त्याने सरोवरातील दोन होड्या पाहिल्या, पण होड्यातील कोळी बाहेर गेले होते व त्यांची जाळी धूत होते.
त्यातील, शिमोनाच्या होडीवर येशू चढला आणि त्याने ती होडी किनाऱ्यापासून थोडी दूर नेण्यास सांगितले. नंतर तो होडीत बसला व लोकांना शिक्षण देऊ लागला.
जेव्हा त्याने बोलणे संपविले, तेव्हा तो शिमोनाला म्हणाला, “खोल पाण्यात होडी ने आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड.”
शिमोनाने उत्तर दिले, “गुरुजी संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही. तरी आपण सांगत आहात म्हणून मी जाळे खाली सोडतो.”
जेव्हा त्यांनी तसे केले तेव्हा त्यांच्या जाळ्यात भरपूर मासे लागले. पण त्यांचे जाळे तुटू लागल्याने
त्यांनी दुसऱ्या होडीतील आपल्या जोडीदारांना मदत करण्यासाठी बोलाविले. ते आले आणि त्यांनी इतके मासे भरले की, दोन्ही होड्या बुडु लागल्या.
शिमोन पेत्राने जेव्हा हे पाहिले तेव्हा तो येशूच्या पाया पडला आणि म्हणाला, “प्रभु, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे!”
तो असे म्हणाला कारण तो आणि त्याच्या साथीदारांना इतके मासे मिळाले होते की, हे कसे झाले म्हणून ते आश्चर्यात पडले.
जब्दीचे पुत्र याकोब व योहान हे ही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले होते. ते शिमोनाचे भागीदार होते. मग येशू शिमोनाला म्हणाला, “भिऊ नको. कारण येथून पुढे तू माणसे धरशील.”
त्यांनी त्यांच्या होड्या किनाऱ्याला आणल्या, नंतर त्यानी सर्व काही सोडले आणि त्याच्यामागे गेले.
आणि असे झाले की, तेव्हा येशू कुठल्या एका गावात असता तेथे कुष्ठाने भरलेला एक मनुष्य होता, जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो तोंडावर उपडा पडला आणि त्याला विनंति केली, “प्रभु, जर तुझी इच्छा असेल तर तू मला बरे करण्यास समर्थ आहेस.”
येशूने आपला हात लांब करुन त्याला स्पर्श केला आणि म्हटले, “मला तुला बरे करायचे आहे, बरा हो!” आणि ताबडतोब त्याचे कुष्ठ नाहीसे झाले.
मग येशूने त्याला आज्ञा केली की, “कोणालाही सांगू नकोस, पण जा आणि स्वत:ला याजकाला दाखव आणि तुझ्या शुद्धतेबद्दल मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे अर्पण कर. त्यांना समजेल की तू बरा झाला आहेस. ते आश्चर्यचकित झाले, त्यांच्यासाठी हा पुरावा म्हणून कर.”
परंतु येशूविषयीच्या बातम्या अधिक पसरतच गेल्या. आणि मोठे जमाव त्याचे ऐकण्यासाठी व त्यांच्या रोगांपासून मुक्त होण्यासाठी येत असत.
परंतु येशू नेहमी एकांतात जात असे व प्रार्थना करीत असे.
असे झाले की एके दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते गालील, यहूदीया आणि यरुशलेम या भागातील प्रत्येक गावातून आले होते. प्रभूचे सामर्थ्य त्याच्याजवळ होते त्यामुळे तो बरे करत होता.
काही लोक एका अर्धांगवायु झालेल्या मनुष्याला बिछान्यात घालून घेऊन आले. त्यांनी त्याला आत आणण्याचा व येशूसमोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला.
परंतु गर्दीमुळे आत आणण्याचा मार्ग त्यांना सापडेना. ते छपरावर गेले, आणि त्याला खाटेसाहित आत सोडले, कौले काढून बरोबर मध्यभागी जेथे येशू बसला होता तेथे सोडले.
त्यांचा विश्वास पाहून येशू त्याला म्हणाला, “मनुष्या, तुइया पापांची क्षमा झाली आहे!”
नियमशास्त्राचे शिक्षक आणि परुशी स्वत:शी विचार करु लागले: “हा कोण आहे, जोे असे दुर्भाषण करीत आहे? देवाशिवाय कोण पापांची क्षमा करु शकतो?”
पण येशू विचार जाणून होता, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपल्या अंत:करणात असा विचार का करता?
“तुुझ्या पापांची क्षमा झाली आहे’ किंवा “ऊठ आणि चालू लाग’ यांतील कोणते म्हणणे सोपे आहे?
पण तुम्हांला हे कळावे की मनुष्याच्या पुत्राला” पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” तो अर्धांगवायु झालेल्या मनुष्याला म्हणाला, “मी तुला सांगतो ऊठ, आपला बिछाना उचल आणि घरी जा.”
ताबडतोब तो उभा राहिला, ज्या बिछान्यावर तो झोपला होता तो त्याने उचलला व देवाची स्तुति करीत आपल्या घरी गेला.
आणि ते सर्व आश्चर्यचकित झाले, आणि देवाची स्तुति करु लागले, ते खरोखरच आश्चर्यचकित झाले, ते म्हणाले, “आम्ही आज आश्चर्य पाहिले!”
यानंतर येशू बाहेर गेला आणि त्याने लेवी नावाच्या जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले, येशू त्याला म्हणाला, “माइया मागे ये!”
लेवी सर्व काही तेथेच सोडून उठला आणि त्याच्या मागे गेला.
नंतर लेवीने त्याच्या घरी येशूसाठी मोठी मेजवानी दिली. जकातदारांचा आणि इतर लोकांचा मोठा जमाव त्याच्याबरोबर जेवत होता.
परुशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्या शिष्यांकडे तक्रार केली, ते म्हणाले, “तुम्ही जकातदार आणि पापी लोकांबरोबर का जेवता?”
येशू त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही, पण जे रोगी आहेत, त्यांना वैद्याची गरज आहे.
मी धार्मिकांस नाही तर पाप्यांस पश्चाताप करण्यासाठी बोलावण्यास आलो आहे.
ते त्याला म्हणाले, योहानाचे शिष्य नेहमी उपास करतात आणि प्रार्थना करतात. आणि परुश्यांचे शिष्यसुद्धा तसेच करतात, पण तुझे शिष्य नेहमीच खातपीत असतात.”
येशू त्यांना म्हणाला, “नवरा मुलगा (वर) बरोबर असताना त्याच्या पाहुण्यांना तुम्ही उपाशी ठेवाल काय?
पण असे दिवस येत आहेत की, वराला त्यांच्यापासून घेतले जाईल आणि त्या दिवसांत ते उपास करतील.”
त्याने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली, “कोणीही नवीन कापडाचा तुकडा फाडून जुन्याला लावीत नाही, जर तो तसे करतो तर तो नवे कापड फाडतो पण नव्या कापडांचे ठिगळ जुन्या कापडाला योग्य दिसणार नाही.
आणि कोणीही नवा द्राक्षारस जुन्या द्राक्षारसाच्या कातडी पिशवीत ठेवीत नाही जर तो असे करतो तर नवा द्राक्षारस कातडी पिशवी फोडून बाहेर उसळेल.
नवा द्राक्षारस नव्या कातडी पिशवीतच ठेवला पाहिजे.
कोणालाही जुना द्राक्षारस प्याल्यानंतर नवा नको असतो कारण तो म्हणतो, “जुना द्राक्षारसच चांगला आहे.”‘

6

नंतर असे झाले की, शब्बाथ दिवशी येशू शेतामधून जात होता. आणि त्याचे शिष्य धान्याची कणसे मोडून हातावर चोळून खात होते.
मग परुश्यांपैकी काही म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करण्यास मना आहे, ते तुम्ही का करता?”
येशूने त्यांना म्हटले, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले हे तुम्ही वाचले नाही काय?
तुम्ही हे ऐकले नाही का की, तो देवाच्या मंदिरात गेला आणि अर्पणाची भाकर त्याने खाल्ली व त्याच्याबरोबर जे होते त्यांना दिली. जी भाकर फक्त याजकच खाऊ शकत असे ती त्यांनी खाल्ली.”
येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभु आहे.”
असे झाले की दुसऱ्या एका शब्बाथाच्या दिवशी येशू सभास्थानात गेला, आणि शिकवू लागला. तेव्हा तेथे एक मनुष्य होता. त्याचा उजवा हात वाळलेला होता.
येशू शब्बाथ दिवशी कोणाला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी त्याच्यावर पाळत ठेवून होते. यासाठी की, त्याच्यावर आरोप ठेवण्यासाठी त्यांना काहीतरी कारण मिळावे.
त्याला त्यांचे विचार माहीत होते, पण वाळलेल्या हाताच्या मनुष्याला तो म्हणाला, “ऊठ आणि सर्वांसमोर उभा राहा!” आणि तो मनुष्य उठला आणि तेथे उभा राहिला.
येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला विचारतो, शब्बाथ दिवशी कोणत्या गोष्टी करायला परवानगी आहे? चांगले करणे की वाईट करणे? कोणते कायदेशीर आहे, एखाद्याचा जीव वाचविणे का जीव घेणे?
येशूने सर्वांकडे पाहिले, मग तो त्या मनुष्याला म्हणाला, “हात सरळ कर.” त्याने हात सरळ केला आणि त्याचा हात बरा झाला.
पण परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक खूप रागावले व येशूविषयी काय करता येईल याविषयी आपापसात चर्चा करु लागले.
त्या दिवसांत असे झाले की, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला. त्याने ती रात्र देवाची प्रार्थना काण्यात घालविली.
जेव्हा दिवस उगवला, तेव्हा त्याने शिष्यांना आपणांकडे बोलाविले. त्याने त्यांच्यातील बारा जणांना निवडले व त्यांना “प्रेषित” असे नाव दिले.
शिमोनत्याला पेत्र हे सुद्धा नाव दिले, आंद्रिया (पेत्राचा भाऊ), याकोब आणि योहान, फिलिप्प, बर्थलमय,
मत्तय, थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, शिमोन ज्याला जिलोट म्हणत,
याकोबचा पुत्र यहूदा व यहूदा इस्कर्योत, जो पुढे विश्वासघात करणारा निघाला.
तो त्यांच्याबरोबर खाली उतरला व सपाट जागेवर उभा राहिला आणि त्याच्या अनुयायांचा मोठा समुदाय तेथे आला होता. व यहूदीया, यरुशलेम, सोर आणि सिदोनच्या समुद्रकिनाऱ्याकडचे असे पुष्कळसे लोक तेथे आले होते.
ते तेथे त्याचे ऐकण्यास व त्यांच्या रोगापासून बरे होण्यास आले होते. व ज्यांना अशुद्ध आत्म्यांनी बाधा होती त्यांनाही त्यांच्या व्याधींपासून मुक्त करण्यात आले.
सगळा लोकसमुदाय त्याला स्पर्श करु पाहत होता. कारण त्याच्यामधून सामर्थ्य येत होते व ते सर्वांना बरे करीत होते.
येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला, “जे तुम्ही गरीब आहात ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे.
तुम्ही जे भुकेले ते आशीर्वादित आहात कारण तुम्ही तृप्त व्हाल. आता तुम्ही जे रडता ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण तुम्ही हसाल.
“जेव्हा लोक तुमचा द्धेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील आणि तुमचा अपमान करतील, जेव्हा तुमचे नाव ते वाईट समजतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हाला नाकारतील, तेव्हा तुम्ही आशीर्वादित व्हाल.
त्या दिवशी तुम्ही आनंद करा. आनंदाने उड्या मारा कारण स्वर्गात तुमचे बक्षीस मोठे आहे! कारण त्यांच्या पूर्वजांनी संदेष्ट्यांना सुध्दा तसेच केले.
“पण श्रीमंतानो, तुम्हांला दु:ख होवो कारण तुम्हांला अगोदरच सर्व सुख मिळाले आहे.
जे तुम्ही तृप्त आहात त्या तुम्हांला दु:ख होवो, कारण तुम्ही भुकेले व्हाल. जे आता हसतात त्यांना दु:ख होवो कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल.
“जेव्हा सर्व तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुम्हांला दु:ख होवो कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेष्ट्यांना असेच केले.
“माझे ऐकणाऱ्यांना मी सांगतो. तुमच्या शत्रूंवर प्रेम करा. जे तुमचा द्धेष करतात, त्यांचे चांगले करा.
जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुम्हांला वाईट वागवितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसरा पण गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्याला तुमचा सदराही घेऊ द्या.
जे तुम्हांला मागतात त्या प्रत्येकाला द्या आणि जो तुमचे घेतो ते परत मागू नका.
लोकांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हांला वाटते तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा.
तुमच्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर जर तुम्ही प्रेम केले, तर तुम्ही काय विशेष केले? पापी लोकसुद्धा, जे त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर प्रेम करतात.
तुमचे जे चांगले करतात, त्यांचे जर तुम्ही चांगले करता तर तुम्हांला काय लाभ? पापीसुद्धा असेच करतात.
ज्यांच्याकडून तुम्हांला परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हांला काय लाभ? पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात.
पण तुमच्या शत्रूवर प्रेम करा आणि त्यांचे चांगले करा. व कोणतीही अपेक्षा न ठेवता उसने द्या, मग तुमचे बक्षीस मोठे असेल व तुम्ही सर्वोच्च देवाचे पुत्र व्हाल. कारण देव हा कृतन्घ व दुष्ट लोकांवर दया करतो.
जसा तुमचा पिता कनवाळू आहे तसे तुम्हीही कनवाळू व्हा.
ʇदुसऱ्यांचा न्याय करु नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला दोषी ठरविले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल.
दुसऱ्यांना द्या म्हणजे तुम्हांलाही दिले जाईल. तुमच्या पदरात हलवून, दाबून, ओसंडून वाहणारे उत्तम माप ओतले जाईल. जे माप तुम्ही दुसऱ्यांसाठी वापरता त्याच मापाने तुम्हांला दिले जाईल.”
त्याने त्यांना एक गोष्ट सांगितली: “एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकेल काय? ते दोघेही खडुचात पडणार नाहीत काय?
कोणताही शिष्य त्याच्या गुरुच्या पातळीला जाऊ शकत नाही. पण प्रत्येक मनुष्य जेव्हा तो पूर्ण शिकतो तेव्हा तो गुरुसारखाच असतो.
ʇतू आपल्या भावाच्या डोळ्यतील कुसळ का पाहतोस? स्वत:च्या डोळ्यातील मुसळ तुला दिसत नाही काय?
तू तुझ्या भावाला कसे म्हणू शकतोस, “बंधु, तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे.’ तुझ्या स्वत:च्या डोळ्यातील मुसळ तुला दिसत नाही? ढोंग्या, प्रथम तुझ्या डोळ्यातील मुसळ काढ मगच तुला तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढताना चांगले दिसेल.
“कोणतेही चांगले झाड असे नाही की जे वाईट फळ देते, किंवा कोणतेही वाईट झाड असे नाही की जे चांगले फळ देते.
कारण प्रत्येक झाड हे त्याच्या फळावरुन ओळखले जाते. लोक काटेरी झुडुपातून अंजिरे गोळा करीत नाहीत तसेच काटेरी झुडुपातून ते द्राक्षे गोळा करीत नाहीत.
चांगला मनुष्य त्याच्या अंत:करणात ज्या चांगल्या गोष्टी साठविलेल्या असतात त्याच काढतो आणि दुष्ट मनुष्य त्याच्या अंत:करणात जे वाईट आहे तेच बाहेर काढतो. कारण मनुष्याच्या अंत:करणात जे असते तेच तो मुखाद्वारे बोलतो.
“तुम्ही मला प्रभु, प्रभु, का म्हणता, आणि मी जे सांगतो ते तुम्ही का करीत नाही?
प्रत्येक जण जो माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकतो व त्या आज्ञा पाळतो-तो कसा आहे हे मी तुम्हांला दाखवितो:
तो एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्याने खोल खोदले आणि खडकावर पाया बांधला. मग पूर आला, तेव्हा नदीचे पाणी घरावर आदळले. पण पाण्याने ते हलले नाही. कारण ते चांगले बांधले होते.
पण जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही, तो, ज्याने आपले घर पाया न घालता जमिनीवर बांधले त्या मनुष्यासारखा आहे, नदीच्या पुराचे पाणी घरावर आदळते व ते घर लगेच कोसळते आणि घर पूर्णपणे नष्ट होते.”

7

ज्या बोधकथा लोकांनी ऐकाव्यात असे त्याला वाटत होते त्या सांगण्याचे संपविल्यावर तो कफर्णहूमास गेला.
तेथे एक रोमी शताधिपती होता. त्याचा गुलाम इतका आजारी होता की, तो मरावयास टेकला होता. हा गुलाम त्या शताधिपतीचा फार आवडता होता.
जेव्हा शताधिपतीने येशूविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडील जनांना त्याच्याकडे पाठविले, व अशी विनंति केली की, त्याने येऊन त्याच्या गुलामाला वाचवावे.
जेव्हा ते येशूकडे आले तेव्हा त्यांनी मन:पूर्वक विनंति केली, ते म्हणाले, “तू त्याच्यासाठी हे करावेस कारण तो त्या योग्यतेचा आहे.
कारण तो आमच्या लोकांवर प्रेम करतो, त्याने आमचे सभास्थान आम्हांला बाधून दिले.”
म्हणून येशू त्यांच्याबरोबर गेला. तो घरापासून दूर नव्हता, तोच शताधिपतीने मित्रांना असे सांगण्यासाठी पाठविले की, “प्रभु, आपण त्रास करुन घेऊ नका, कारण आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही.
यासाठी मी स्वत: आपणाकडे येऊ नये असा विचार केला होता. परंतु तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल.
कारण मीही ताबेदार असून माझ्या अधिपत्याखाली शिपाई आहेत. मी एखाद्याला “जा’ असे म्हणतो, आणि तो जातो, दुसऱ्याला “ये’ म्हणतो आणि तो येतो. मी माझ्या गुलामाला म्हणतो, “हे कर!’ आणि तो ते करतो.”
जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्याला त्याच्याविषयी (शताधिपतीविषयी) आश्चर्य वाटले. तो त्याच्यामागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो, असा विश्वास मला इस्राएलात देखील आढळला नाही.”
ज्यांना पाठविले होते, ते घराकडे परतले, तेव्हा त्यांना आढळून आले की, तो सेवक बरा झाला आहे.
नंतर असे झाले की, येशू नाईन नावाच्या गावाला गेला. त्याच्याबरोबर त्याचे शिष्य व मोठा समुदाय होता.
तो गावाच्या वेशीजवळ आला असता, एका मेलेल्या माणसाला अंत्यविधीकरीता नेले जात होते. तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता. आणि ती विधवा होती. आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते.
जेव्हा प्रभुने तिला पाहिले, त्याला तिची अनुकंपा वाटली व तो तीला म्हणाला, “रडू नकोस.”
नंतर तो पुढे तिरडीजवळ गेला व तिला स्पर्श केला. जे लोक तिरडी वाहून नेत होते, ते थांबले.
तेव्हा येशू म्हणाला, “तरुणा, मी तुला सांगतो, ऊठ!” आणि तो मृत मनुष्य उठून बसला व बोलू लागला. मग येशूने त्याला त्याच्या आईकडे दिले.
ते सर्व भयचकित झाले, त्यांनी देवाचे गौरव केले; ते म्हणाले, “आमच्यामध्ये एक महान संदेष्टा प्रगट झाला आहे.” आणि म्हणाले, “देव त्याच्या लोकांना मदत करण्यास आला आहे!”
येशूविषयीची ही बातमी सर्व यहूदीयात आणि सभोवतालच्या परिसरात पसरली.
योहानाच्या शिष्यांनी योहानाला जाऊन हे सर्व सांगितले, नंतर योहानाने आपल्या दोन शिष्यांना बोलाविले
आणि त्याने त्यांना प्रभुकडे हे विचारण्यासाठी पाठविले की, “जो येणारा तो तूच आहेस की, आम्ही दुसऱ्या कोणाची तरी अपेक्षा करावी?”‘
जेव्हा लोक त्याच्याकडे आले, ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हांला तुमच्याकडे हे विचारण्यास पाठविले आहे की, “जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्या कोणाची अपेक्षा करावी?”‘
त्यावेळी येशूने अनेक लोकांचे रोग, आजार बरे केले, पुष्कळांमधील भुते काढली, आंधळ्यांना दृष्टी दिली.
येशूने त्यांना उत्तर दिले, “जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा: आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्ता ऐकतात.
जो मला अनमान न करता स्वीकारतो, तो धन्य.”
योहानाचे निरोपे गेल्यावर येशू समुदायाबरोबर योहानाविषयी बोलू लागला: “वाळवंटात तुम्ही काय पाहण्यासाठी गेला होता? वाऱ्याने वाकलेल बोरु?
नाही, मग काय पाहण्यासाठी तुम्ही गेला होता? कपडे घातलेला मनुष्य? नाही. तलम कपडे घालणारे आणि ऐषारामात राहणारे लोक राजवाड्यात राहतात.
पण तुम्ही बाहेर काय पाहण्यासाठी गोला होता? संदेष्टा? होय, मी तुम्हांला सांगतो, तुम्ही संदेष्ट्यापेक्षा काही तरी अधिक पाहिले आहे!
हाच तो ज्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे, “पाहा, मी माझ्या संदेशवहकाला माझ्यापुढे पाठवीत आहे. तो तुमच्यापुढे मार्ग तयार करील.’ मलाखी. 3:1
मी तुम्हांला सांगतो, जे स्त्रियांपासून जन्मले त्यात योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तरीही देवाच्या राज्यातील अगदी सामान्य माणूस सुध्दा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
“जेव्हा लोकांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी मान्य केले की, देवाची शिकवण चांगली आहे. जकातदारसुद्धा सहमत झाले. या लोकांना योहानाने अगोदरच बाप्तिस्मा दिला होता.
पण परुशी व नियमाशास्त्राच्या शिक्षकांनी देवाची त्यांच्याविषयी असलेली योजना नाकारली. त्यांनी योहानाला त्यांचा बाप्तिस्मा करु दिला नाही.
मग मी या पिढीची कोणाशी तुलना करु? ते कोणासारखे आहेत?
ते उनाड मुलांसारखे आहेत, ते बाजारात बसतात, ते एकमेकाला म्हणतात, “आम्ही तुमच्यासाठी पावा वाजविला पण तुम्ही नाचला नाही. आम्ही तुमच्यासाठी शोकगीत गाईले पण तुम्ही रडला नाही.’
बाप्तिस्मा करणारा योहान हा भाकर किंवा द्राक्षारस खात किंवा पीत आला नाही. पण तुम्ही म्हणता, “त्याला भूत लागले आहे.’
मनुष्याचा पुत्र खात पीत आला आणि तुम्ही म्हणता; “पाहा, तो खादाड, मद्यपी, जकातदारंचा आणि पाप्यांचा मित्र आहे.’
ज्ञान तेव्हा योग्य ठरते, जेव्हा त्याचा वापर केल्याने झालेल्या गोष्टी योग्य असतात.”
कोणा एका परुश्याने येशूला त्याच्याबरोबर जेवणाचे आमंत्रण दिले, म्हणून तो परुश्याच्या घरी गेला व मेजासभोवती आपल्या जागेवर बसला.
तेथे त्या गावात एक स्त्री होती, ती पापी होती, जेव्हा तिला समजले की, येशू परुश्याच्या घरी जेवत आहे, तेव्हा तिने सुगंधी तेलाचे एक अलावास्त्र भांडे आणले.
ती त्याच्या पाठीमागे पायाशी उभी राहून रडत होती, ती आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. नंतर तिने ते आपल्या केसांनी पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले व त्यावर सुगंधी तेल ओतले.
ज्या परुश्याने हे आमंत्रण दिले होते त्याने ते पाहिले आणि तो स्वत:शी म्हणाला, “जर हा मनुष्य संदेष्टा असता, तर ही कोण व कशा प्रकारची स्त्री आपल्या पायाला स्पर्श करीत आहे, हे त्याला कळले असते!”
येशू त्याला म्हणाला, “शिमोना, मला तुला काही सांगायचे आहे.” त्याने उत्तर दिले, “सांगा गुरुजी.”
येशू म्हणाला, “एका सावकाराचे दोन कर्जदार होते. एकाकडे पाचशे चांदीची नाणी आणि दुसऱ्याकडे पन्नास चांदीची नाणी असे कर्ज होते.
ते कर्ज फेडू शकत नसल्याने सावकाराने दोघांचीही कर्ज माफ केली, आता त्यांच्यापैकी कोण त्याच्यावर अधिक प्रेम करील?”
शिमोनाने उत्तर दिले, “मला वाटते, ज्याचे कर्ज जास्त होते तो.” येशू त्याला म्हणाला, “तू बरोबर ओळखलेस.”
तो स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हणाला, “तू ही स्त्री पाहतोस काय? मी तुझ्या घरी आलो तेव्हा माझे पाय धुण्यास तू मला पाणी दिले नाहीस. परंतु हिने माझे पाय अंश्रूंनी ओले केले. ते तिने केसांनी पुसले.
तू मला साधे शुभेच्छालिंगन सुध्दा दिले नाहीस, पण मी आत आल्यापासून तिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही.
तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु होने माझ्या पायावर सुगंधी तेल ओतले.
यासाठी मी तुला सांगतो की तिच्या अनेक पापांची क्षमा झाली आहे. हे स्पष्ट आहे कारण तिने विपुल प्रेम दाखविले आहे. परंतु ज्याला कमी माफ केले आहे तो कमी प्रेम करतो.”
तेव्हा तो तिला म्हणाला, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
नंतर जे त्यांच्याबरोबर जेवत होते ते स्वत:शीच म्हणू लागले, “हा कोण आहे, जो पापांचीसुद्धा क्षमा करतो?”
पण तो स्त्रीला म्हणाला, “तुझ्या विश्वासाने तुला वाचविले आहे, शांतिने जा.”

8

यानंतर असे झाले की, येशू सर्व गावांतून आणि खेड्यामधून उपदेश करीत व देवाच्या राज्यासंबंधीची सुवार्ता सांगत जात होता. आणि बारा प्रेषित त्याच्याबरोबर होते.
ज्यांच्यामधून भुते काढली होती व ज्यांना आजारतून बरे केले होते अशा काही स्त्रियाही त्याच्याबरोबर होत्या: मरीया जिला मग्दालिया म्हणत, तिच्यातून सात भुते बाहेर पडली होती.
हेरोदाच्या घराचा कारभारी खुजा याची पत्नी योहान्ना, सूसान्ना आणि इतर अनेक स्त्रिया होत्या, या स्त्रिया त्यांच्याकडे जे होते, म्हणजे त्यांच्या उत्पन्नातून येशू व त्याच्या शिष्यांना देत असत.
जेव्हा मोठा जनसमुदाय जमत असे व प्रत्येक गावातून लोक त्याच्याकडे येत असत, तेव्हा येशू बोधकथांचा उपयोग करुन बोलत असे:
“एक शेतकरी आपले बी पेरायला गेला. तो पेरत असताना काही बी रस्त्यावर पडले व ते तुडविले गेले. आकाशातील पक्ष्यांनी ते खाऊन टाकले.
काही बी खडकाळ जमिनीवर पडले आणि उगवल्यावर वाळून गेले कारण त्यात ओलावा नव्हता.
काही बी काटेरी झुडुपात पडले. काटेरी झुडुपे त्याच्याबरोबर वाढली व त्याची वाढ खुंटविली.
काही बी चांगल्या जमिनीवर पडले. ते उगवले, वाढले व जे पेरले होते त्यापेक्षा शंभर पट पीक जास्त आल.” या बोधकथा सांगत असता तो मोठ्याने म्हणाला, “ज्याला ऐकण्यास कान आहेत, त्याने ऐकावे!”
त्याच्या शिष्यांनी या बोधकथेचा अर्थ काय असे विचारले.
म्हणून तो म्हणाला, “तुम्हांला देवाच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचा अधिकार दिलेला आहे. पण इतरांच्यासाठी ते बोधकथेमध्ये दिले आहे. “यासाठी की, जरी ते पाहत असले, तरी त्यांना दिसू नये आणि ऐकत असले तरी त्यांना समजू नये.’ यशया 6:9
“बोधकथेचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. बी हे देवाचा संदेश आहे.
आणि जे बी वाटेवर पडले ते जे ऐकतात त्याचे दर्शक आहेत. नंतर सैतान येतो आणि त्यांच्या हृदयातील बी घेऊन जातो, यासाठी की त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यांचे तारण होऊ नये.
जे बी खडकावर पडते ते असे आहे की, ते ऐकतात आणि आनंदाने संदेश ग्रहण करतात. पण त्यांना मूळ नसते. ते काही वेळ विश्वास ठेवतात पण परीक्षेच्या वेळी देवापासून दूर जातात.
जे बी काटेरी झुडुपात पडलेले असते ते दर्शविते की, ते ऐकतात परंतु आपल्या मार्गाने जात असता काळजी, श्रीमंती, जीवनातील सुखे यांनी ते खुंटविले जाते, ते पक्व फळ देत नाही.
चांगल्या जमिनीतील बी दर्शविते की, ते चांगल्या व प्रामाणिक अंत:करणाचे आहेत ते वचन ऐकतात, ग्रहण करतात व धीराने फळ देतात.
“कोणीही दिवा लावून तो भांड्याने झाकून ठेवीत नाही, किंवा खाटेखाली ठेवीत नाहीत, तर तो दिवठणीवर ठेवतात, यासाठी की जे आत येतात त्यांना प्रकाश दिसावा.
लक्षात ठेवा, असे काहीही लपविलेले नाही, जे उघड होणार नाही. प्रत्येक रहस्य सर्वांना सांगितले जाईल आणि ते प्रकाशात येईल.
म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी काळजी घ्या कारण ज्याच्याजवळ आहे त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे आहे असे वाटते तेदेखील काढून घेतले जाईल”.
येशूची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले. पण गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना.
म्हणून त्याला असे सांगण्यात आले की, “तुझी आई व तुझे भाऊ बाहेर उभे आहेत, त्यांना तुला भेटायचे आहे.”
पण त्याने त्यांना उत्तर दिले, “जे देवाचे वचन ऐकतात व त्याप्रमाणे करतात तेच माझी आई व माझे भाऊ आहेत.”
त्या दिवसात एकदा असे झाले की, येशू त्याच्या शिष्यांसह नावेत बसला. आणि तो त्यांना म्हणाला, “आपण सरोवराच्या पलीकडाच्या बाजूला जाऊ या.”
आणि ते निघाले. ते जात असता येशू झोपी गेला. सरोवरावर तुफान वादळी वारे सुरु झाले व नावेत पाणी जाऊ लागले. ते अतिधोकादायक स्थितीत सापडले.
म्हणून त्यांनी त्याला उठविले, ते त्याला म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण बुडत आहोत!” मग तो उठला. त्याने वारा व लाटा यांना दटाविले. ते थांबले. व सर्वत्र शांतता पसरली.
येशू त्यांना म्हणाला, “तुमचा विश्वास कोठे आहे?” पण ते भयचकित आणि विस्मित झाले व एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण तो वारा आणि लाटा यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात?”
नंतर ते गालील सरोवरापलीकडील गरसेकरांच्या प्रदेशात गेले.
जेव्हा तो किनाऱ्यावर उतरला, तेव्हा नगरातला एक मनुष्य त्याला भेटला. त्या माणसामध्ये अनेक भुते होती. बराच काळपर्यंत त्याने कपडे घातले नव्हते व तो घरातही राहिला नव्हता. तो कबरांमध्ये राहत होता.
जेव्हा त्याने येशूला पाहिले, तेव्हा तो मोठ्याने ओरडला व त्याच्यापुढे पडला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, “येशू, सर्वोच्च देवाच्या पुत्रा, तुला माझ्यापासून काय पाहिजे? मी तुला विनंति करतो की, मला त्रास देऊ नको.”
तो असे म्हणाला कारण येशूने भुताला त्याच्यातून बाहेर येण्याची आज्ञा केली होती. कारण त्याने त्याला पुष्कळ वेळ धरले होते. त्याला त्यावेळी साखळ्यांनी बांधले होते. पायात बेड्या होत्या व त्याला पहाझ्यात ठेवले होते परंतु तो नेहमी साखळ्या तोडीत असे व भुते त्याला एकांतात घेऊन जात असत.
येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय आहे?” तो म्हणाला, “सैन्य,” कारण त्याच्यात अनेक भुते शिरली होती.
भुतांनी येशूला विनवणी केली की, आम्हांला अनंतकाळच्या अंधारात जाण्याची आज्ञा करु नको.
डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. भुतांनी त्याला विनंति केली, “आम्हांला त्या डुकरांच्या मध्ये जाऊ दे.” आणि येशूने त्यांना तसे करण्याची परवानगी दिली.
मग भुते त्या मनुष्यातून बाहेर आली आणि डुकरात शिरली. नंतर डुकरांचा कळप सरोवराकडे जोरात पळाला आणि तो सारा कळप सरोवरात बुडून मेला.
जेव्हा डुकरांचा कळप राखणाऱ्यांनी हे पाहिले, तेव्हा ते दूर पळाले व त्यांनी नगरात व त्या प्रदेशात हे वर्तमान सांगितले.
काय झाले हे पाहण्यासाठी लोक बाहेर आले. ते येशूकडे आले आणि त्यांनी ज्या माणसाच्या अंगातून भुते निघाली होती, त्याला येशूच्या पायाजवळ बसलेला त्यांनी पाहिले. त्याने नीट कपडे घातले होते व तो पूर्ण शुद्धीवर होता. या घटनेचे त्यांना भय वाटले.
ज्यांनी हे पाहिले त्यांनी तो भूत लागलेला मनुष्य कसा बरा झाला हे त्यांना सांगितले.
तेव्हा गरसेकर प्रदेशातील सर्व लोकांनी येशूला त्यांना सोडून जाण्यास सांगितले. कारण ते सर्व फार घाबरले होते. मग येशू नावेत बसून परत गेला.
ज्याच्या अंगातून भुते तिघाली होती तो त्याच्याबरोबर जाण्यासाठी विनवणी करु लागला. पण येशूने त्याला परत जायला सांगितले आणि म्हणाला,
“घरी जा आणि देवाने तुझ्यासाठी जे केले आहे ते सांग.” तेव्हा तो मनुष्य गेला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केले ते नगारातील सर्व लोकांना त्याने सांगितले.
नंतर जेव्हा येशू परत आला तेव्हा लोकांनी त्याचे स्वागत केले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते.
त्याचवेळी याईर नावाचा एक मनुष्य आला. तेथील सभास्थानाचा तो अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंति केली.
कारण त्याला बारा वर्षांची एक मुलगी होतो आणि ती मरावयास टेकली होती. येशू जात असता लोकांची गर्दी झाली होती व तो चेंगरला जात होता.
आणि एक स्त्री तेथे होती. तिला बारा वर्षे रक्तस्राव होत होता. तिच्याकडे जे काही पैसे होते ते सर्व तिने वैद्यांसाठी खर्च केले पण कोणीही तिला बरे करु शकले नाही.
ती त्याच्या मागोमाग आली. व तिने त्याच्या वस्त्राच्या टोकाला स्पर्श केला आणि ताबडतोब तिचा रक्तस्राव थांबला.
मग येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?” ते सर्व जण नाकारीत असताना पेत्र म्हणाला, “सर्व जण आपल्याभोवती गर्दी करीत आहेत आणि तुम्हांला चेंगरीत आहेत.”
परंतु येशू म्हणाला, “कोणी तरी मला स्पर्श केला आहे. कारण मला माहीत आहे की, माझ्यातून शक्ति निघाली आहे.”
आपण येशूच्या नजरेतून सुटू शकणार नाही हे जेव्हा त्या स्त्रीने पाहिले तेव्हा ती थरथर कांपत आली आणि त्याच्या पाया पडली. तेथे तिने सर्व लोकांसमोर आपण त्याला का स्पर्श केला व आपण कसे बरे झालो ते सांगितले.
तेव्हा तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा.”
तो हे बोलत असतानाच कोणी तरी सभास्थानाच्या अधिकार्याच्या घरुन आले आणि म्हणाले, “तुमची मुलगी मरण पावली आहे. आता गुरुजींना त्रास देऊ नका.”
येशून हे ऐकले व तो सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नको, फक्त विश्वास ठेव आणि ती मरणातून वाचविली जाईल.
जेव्हा येशू त्या घरी आला, त्याने आपणाबरोबर पेत्र, योहान, याकोब आणि मुलीचे आईवडील यांच्याशिवाय कोणालाही आत येऊ दिले नाही.
सर्व लोक तिच्यासाठी रडत होते. येशू म्हणाला, “रडणे थांबवा, ती मेलेली नाही, ती झोपेत आहे.”
पण ते त्याला हसले. कारण त्यांना माहीत होते की ती मेली आहे.
परंतु त्याने तिचा हात धरला आणि मोठ्याने म्हणाला, “मुली, ऊठ!”
मग, तेव्हा तिचा आत्मा पुन्हा आला आणि ती लगेच उभी राहिली. नंतर त्याने तिला खाण्यास देण्याची आज्ञा केली.
तेव्हा तिचे आईवडील आश्चर्याने थश्च झाले, परंतु जे घडले त्याबद्दल कोणालाही सांगू नका अशी त्याने त्यांना आज्ञा केली.

9

येशूने बारा शिष्यांना एकत्र बोलाविले, आणि त्याने त्यांना सर्व भुतांवर सामर्थ्य व अधिकार दिला. आणि त्यांना त्याने रोग बरे करण्याचे सामर्थ्य दिले.
नंतर त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यास व रोग्यांना बरे करण्यास पाठविले.
तो त्यांना म्हणाल, “तुमच्या प्रवासासाठी बरोबर काठी, पिशवी, भाकरी, चांदीची नाणी, दोन-दोन अंगरखे असे काहीही घेऊ नका.
आणि ज्या घरात तुम्ही जाल त्या घरातच तुम्ही राहा. व दुसऱ्या गावाला जाताना ते घर सोडा.
जेथे लोक तुमचे स्वागत करणार नाहीत, तेथे गाव सोडताना त्यांच्याविरुद्ध साक्ष म्हणून आपल्या पायावरील धूळ झटकून टाका.”
ते निघाल्यानंतर सर्व गावातून सुवार्ता सांगत व लोकांचे रोग बरे करीत गेले.
जेव्हा हेरोद राच्यापालाने जे सर्व काही घडत होते त्याविषयी ऐकले, तेव्हा तो घोटाळ्यात पडला. कारण काही जणांनी असे म्हटले की, “योहान मेलेल्यांतून उठविला गेला आहे.”
इतर काही जण असे म्हणत होते की, “एलीया पुन्हा आला आहे.” इतर काही जणांनी असे सांगितले की, “फार पूर्वीच्या संदेष्ट्यांपैकी एक जण मेलेल्यांतून पुन्हा जिवंत झाला आहे.”
शिष्य परत आले तेव्हा त्यांनी येशूला आपण केलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. नंतर येशू त्यांना घेऊन बेथसैदा नावाच्या नगरास गुप्तपणे गेला.
पण लोकसमुदायाला हे कळले व ते त्याच्यामागे गेले. त्याने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना स्वर्गराज्याविषयी सांगितले. ज्यांना बरे होण्याची आवश्यकता होती, त्यांना त्याने बरे केले.
दिवस मावळत असता प्रेषित त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “लोकांना जाऊ द्या. म्हणजे ते आजूबाजूच्या शेतात आणि खेड्यात जातील व त्यांना खावयाला व राहण्यास मिळण्याची शक्यता आहे का ते पाहतील. कारण आपण दूर ठिकाणी आहेत.”
पण तो त्यांना म्हणाला, “तुम्ही त्यांना काही खावयास द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन या सर्व लोकांसाठी अन्न विकत घ्यावे असे तुम्हांला वाटते काय? आमच्याजवळ फक्त पाच भाकरी आणि दोन मासे याशिवाय काही नाही.”
तेथे ते सुमारे पाच हजार पुरुष होते. परंतु तो आपल्या शिष्यांस म्हणाला, “त्यांना सुमारे पन्नासाच्या गटाने बसवा.”
त्यांनी तसे केले व सर्वांना खाली बसविले.
नंतर त्याने पाच भाकरी व दोन मासे घेतले, मग स्वर्गाकडे बघून त्याने भाकरी व मासे याबद्दल देवाचे उपकार मानले. त्याचे तुकडे केले. नंतर लोकांना वाढण्यासाठी शिष्यांना दिले.
लोक जेवले व सर्व तृप्त झाले. आणि जेवून झाल्यानंतर उरलेले गोळा करण्यात आले तेव्हा त्या तुकड्यांच्या बारा टोेपल्या भरल्या.
मग असे झाले की एकदा येशू एकटाच प्रार्थना करीत असताना, त्याचे शिष्य त्याच्याबरोबर होते. त्याने त्यांना विचारले, “मी कोण आहे याबद्दल लोक काय म्हणतात?”
ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणारा योहान, इतर काही एलीया आणि काहीजण म्हणतात की, फार पूर्वी होऊन गेलेल्या संदेष्ट्यांपैकी कोणी तरी उठला आहे.”
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा ख्रिस्त.”
तेव्हा ताकीद देऊन त्याने त्यांना सूचना दिली की, हे कोणालाही सांगू नका.
येशू म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला पुष्कळ दु:ख सोसणे आवाश्यक आहे, आणि वडिलांनी, मुख्य याजकांनी, नियमशास्त्राचे शिक्षक यांनी नाकारावे व त्यांच्याकडून मारले जावे व पुन्हा तिसऱ्या दिवशी उठावे हे आवश्यक आहे.”
नंतर तो त्या सर्वांना म्हणाला, “जर कोणा व्यक्तीला माझ्या मागे यायचे असेल तर त्याने स्वत:ला नाकारले पाहिजे. व दररोज स्वत:चा वधस्तंभ उचलून माझ्या मागे आले पाहिजे.
जो कोणी स्वत:चा जीव वाचवू पाहतो, तो त्याला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी जिवाला मुकेल तो त्याला बाचवील.
कोणी सर्व जग मिळविले परंतु स्वत:चा नाश करुन घेतला किंवा स्वत:ला गमाविले तर त्याला काय लाभ?
जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या वैभवाने, पित्याच्या आणि पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा तोही त्याची लाज धरील.
परंतु मी तुम्हांला खरे सांगतो येथे उभे राहिलेल्यांमध्ये असे काही आहेत की, स्वार्गाचे राज्य पाहिल्याशिवाय त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
मग असे झाले की, तो असे बोलल्यावर साधारणपणे आठ दिवसांनंतर, आपल्याबरोबर पेत्र, योहान व याकोब यांना घेऊन डोंगरावर प्रार्थना करण्यास गेला.
मग असे घडले की, तो प्रार्थना करीत असताना त्याच्या चेहऱ्याचे रुप पालटले व त्याचे कपडे डोळे दिपविण्याएवढे पांढरेशुभ्र झाले.
आणि तेथे दोघे जण त्याच्याबरोबर बोलत होते. ते एलीया व मोशे होते. ते गौरवामध्ये प्रगट झाले होते,
आणि ते येशूच्या मरणाविषयी, जे तो यरुशलेमामध्ये पूर्ण करणार होता, त्याविषयी बोलत होते.
पण पेत्र व त्याच्याबरोबर असलेले सर्व झोपी गेले होते, जेव्हा ते जागे झाले, त्यांनी येशूचे गौरव पाहिले, आणि दोन मनुष्यांना त्याच्याबरोबर उभे असलेले पाहिले.
मग असे झाले की, ते दोघे जण येशूपासून विभक्त होत असताना, पेत्र येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही येथे आहोत ते चांगले झाले. आपण तीन मंडप तयार करु या, एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.” (तो काय बोलत होता हे त्याचे त्याला कळत नव्हते.)
पण तो या गोष्टी सांगत असता एक मेघ खाली आला आणि त्याने छायेने झाकून टाकले. त्यांनी मेघामध्ये प्रवेश केल्यानंतर ते घाबरले.
आणि त्यानां वेढलेल्या ढगातून एक वाणी ऐकू आली; ती म्हणाली, “हा माझा पुत्र आहे; तो माझा निवडलेला आहे, त्याचे ऐका.”
जेव्हा वाणी झाली तेव्हा येशू एकटाच तेथे होता. आणि याविषयी ते गप्प राहिले. त्यांनी त्यावेळी जे काही पाहिले होते त्याविषयी कोणालाही काही सांगितले नाही.
नंतर दुसऱ्या दिवशी असे झाले की, जेव्हा ते डोंगरावरुन खाली आले तेव्हा मोठा जमाव येशूला भेटण्यासाठी आला.
आणि त्याचवेळी जमावातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, “गुरुजी, मी तुम्हांला विनंति करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझा एकुलता एक मुलगा आहे.
एकाएकी त्याला अशुद्ध आत्मा धरतो व तो अचानक किंचाळतो, आणि तो त्याला झटके देईपर्यंत पिळतो, त्यामुळे त्याच्या तोंडाला फेस येतो, तो त्याला सोडीत नाही व त्याला गलितगात्र करतो.
मी तुमच्या शिष्यांना तो अशुद्ध आत्मा काढण्याची विनंति केली, पण त्यांना ते शक्य झाले नाही.”
“येशू म्हणाला अहो, अविश्वासू व चुकलेल्या लोकांनो! मी तुमच्याबरोबर किती काळ राहू व किती काळ तुमचे सोसू? त्या मुलाला इकडे आणा.”
परंतु तो येत असतानाच भुताने त्याला पाडले आणि पिळवटले. येशूने अशुद्ध आत्म्याला धमकावले. त्याने मुलाला बरे केले आणि त्याला त्याच्या वडिलांजवळ परत दिले.
देवाचा महिमा पाहून ते सर्व फार आश्चर्यचकित झाले. पण सर्व लोक येशूने जे केले त्याविषयी आश्चर्य व्यक्त करीत असताना, तो त्याच्या शिष्यांना म्हणाला.
“मी तुमच्याजवळ ज्या गोष्टी सांगतो त्याकडे काळजीपूर्वक लक्षा द्या. मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती देण्यात येईल.”
पण शिष्यांना त्याचे बोलणे समजले नाही. ते त्यांच्यापासून लपवून ठेवण्यात आले होते. यासाठी की ते त्यांना समजू नये. आणि या बोलण्याविषयी त्याला विचारण्याची त्यांना भीति वाटत होती.
आपणांमध्ये सर्वांत मोठा कोण असा शिष्यांमध्ये वाद सुरु झाला.
पण येशूला त्यांच्या मनातले विचार समजले, तेव्हा त्याने एका लहान बालकाला घेतले व त्याच्याजवळ त्याला उभे केले.
येशू त्यानां म्हणाला, “जो कोणी ह्या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो. कारण जो कोणी तुम्हा मध्ये सर्वांत लहान बनेल तो सर्वांत मोठा आहे.”
परंतु योहानाने उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही कोणाला तरी तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले, व आम्ही त्याला मना केले, कारण आम्ही जे तुम्हांला अनुसरतो त्यापैकी तो नाही.”
परंतु येशू योहानाला म्हणाला, “त्याला मना करु नका, कारण जो तुमच्याविरुद्ध नाही तो तुम्हांला अनुकूल आहे.”
आता असे घडले की, जेव्हा त्याला स्वर्गात घेण्याची वेळ आली, त्याने यरुशलेमाला जाण्याचे ठरविले.
त्याने आपणांपुढे निरोपे पाठविले. ते गेले आणि येशूच्या येण्याविषयीच्या तयारीसाठी एका शोमरोनी खेड्यात गेले.
पण शोमरोन्यांनी येशूचा स्वीकार केला नाही, कारण तो यरुशलेमाकडे निघाला होता.
जेव्हा याकोब व योहान या शिष्यांनी पाहिले, तेव्हा ते म्हणाले, “प्रभु, स्वर्गातील अग्नीने येऊन त्यांचा नाश करावा यासाठी आम्ही आज्ञा करावी असे तुला वाटते काय?”
तेव्हा त्याने वळून त्यांना धमकावले.
आणि ते दुसऱ्या खेड्यात निघून गेले.
ते रस्त्याने चातल जात असता कोणी तरी त्याला म्हणाले, “तू जेथे कोठे जाशील तेथे मी तुझ्यामागे येईन.”
तेव्हा येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे आहेत, आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, पण मनुष्याच्या पुत्राला डोकेसुध्दा टेकावयास जागा नाही.”
तो दुसऱ्या एकाला म्हणाला, “माझ्यामागे ये.” पण तो मनुष्य म्हणाला, “पहिल्यांदा मला जाऊ दे आणि माझ्या वडिलांना पुरु दे.”
पण येशू त्याला म्हणाला, “मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरु दे. तू जा आणि देवाच्या राज्याची घोषणा कर.”
दुसरा म्हणाला, “मी तुला अनुसरेन, प्रभु पण अगोदर मला माझ्या घरातील लोकांचा निरोप घेऊ दे.”
पण येशू त्यांस म्हणाला, “जोे कोणी नांगराला हात घालतो व मागे पाहतो तो देवाच्या राज्यासाठी योग्य नाही.”

10

या घटनांनंतर प्रभुने इतर बहात्तर जणांची नेमणूक केली. आणि येशूने त्यांना जोडीजोडीने पाठविले. त्याला ज्या ठिकाणी जायचे होते त्या प्रत्येक गावात व ठिकाणी त्याने त्यांना पाठविले.
तो त्यांना म्हणाला, “पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धन्याने त्याच्या पिकासाठी कामकरी पाठवावेत यासाठी प्रार्थना करा.
जा! आणि लक्षात ठेवा, लांडग्यात जशी कोंकरे तसे मी तुम्हास या जगात पाठवीत आहे.
थैली, पिशवी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका, व रस्त्याने जाताना कोणाला सलाम करु नका.
कोणत्याही घरात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा पहिल्यांदा असे म्हणा, “या घरास शांति असो!’
जर तेथे शांतिप्रिय मनुष्य असेल तर तुमची शांति त्याच्यावर राहील, परंतु तो मनुष्य शांतिप्रिय नसेल तर तुमची शांति तुमच्याकडे परत येईल.
त्या घरात तुम्हांला जे देतील ते खातपीत राहा. कारण कामकरी हा त्याच्या मजुरीस पात्र आहे. या घरातून त्या घरात असे घर बदलू नका.
कोणत्याही नगरात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा आणि जेव्हा ते तुमचे स्वागत करतील तेव्हा, तुमच्यासमोर जे वाढलेले असेल ते खा.
तेथील रोग्यांना बरे करा आणि नंतर त्यांना सांगा की, “देवाचे राज्य लवकरच तुमच्याकडे येत आहे!’
परंतु तुम्ही एखाद्या गावात प्रवेश कराल आणि त्यांनी जर तुमचे स्वागत केले नाही तर रस्त्यात जा आणि म्हणा.
“आमच्या पायाला लागलेली तुमच्या गावाची धूळदेखील आम्ही तुम्हांविरुद्ध झटकून टाकीत आहोत! तरीही हे लक्षात असू द्या की, देवाचे राज्य लवकरच तुमच्येकडे येत आहे.!’
मी तुम्हांला सांगतो, त्या दिवशी त्या गावापेक्षा सदोमातील लोकांना सोपे जाईल.”
“खोराजिना तुझ्यासाठी हे वाईट होईल! बेथसैदा तुझ्यासाठी हे वाईट होइल! कारण जे चमत्कार तुम्हांमध्ये घडले ते जर सोर व सिदोनमध्ये घडले असते तर त्यांनी फार पूर्वीच गोणपाट नेसून राखेत बसून पश्चात्ताप केला असता.
“तरीसुद्धा सोर व सिदोन यांना न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोपे जाईल.
आणि कफर्णहूमा, तुला स्वर्गापर्यंत चढवले जाईल काय? तू तर अधोलोकातच जाशील.
जो शिष्यांचे ऐकतो तो माझे ऐकतो आणि जो शिष्यांना नाकारतो तो मला नाकारतो. आणि जो मला नाकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला नाकारतो.”
ते बहात्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, “प्रभु, तुझ्या नावाने भुतेसुद्धा आम्हांला वश होतात!”
तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले!
ऐका मी तुम्हांला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा अधिकार दिला आहे. व मी तुम्हांला शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे. आणि कशानेच तुम्हांला अपाय होणार नाही.
तथापि तुम्हांला भुते वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वार्गात लिहिली आहेत याचा आनंद माना.”
त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात उल्हासित झाला, आणि म्हणाला, “हे पित्या, स्वार्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभु मी तुझी स्तुति करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बाळकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे बरे वाटले ते तू केलेस.
“माइया पित्याने सर्व गोष्टी माझ्यासाठी दिल्या होत्या. आणि पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. आणि पुत्राशिवाय कोणालाही पिता कोण आहे हे माहीत नाही व ज्या कोणाला ते प्रगट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्यालाच फक्त माहीत आहे.”
आणि शिष्यांकडे वळून तो एकांतात बोलला, “तुम्ही जे पाहता ते पाहणारे डोळे धन्य.
मी तुम्हांस सांगतो, अनेक राजांनी व संदेष्ट्यांनी तुम्ही जे पाहता ते पाहण्याची इच्छ बाळगली, परंतु त्यांनी ते पाहिले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्याची इच्छा बाळगली, परंतु त्यांनी ते ऐकले नाही.”
नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रथम केला, तो म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?”
तेव्हा येशू त्याला म्हणाला, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू त्यांत काय वाचतोस?”
तो म्हणाला, “तू तुझा देव प्रभु याच्यावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तिने प्रीति कर.” व “स्वत:वर जशी प्रीति करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीति कर.’ “
तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू चिरकाल राहशील.”
पण आपण योग्य प्रश्न विचारला आहे हे इतरांना दाखवून देण्यासाठी त्याने येशूला विचारले, “मग माझा शेजारी कोण?”
येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरुशलेमाहून यरीहोस निघाला होता. आणि तो लुटारुंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेतले. त्यांनी त्याला मारले, आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले.
तेव्हा त्याचवेळी एक याजक त्या रस्त्याने जात होता. याजकाने त्याला पाहिले, पण तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.
त्याच मार्गाने एक लेवी त्या ठिकाणी आला. लेव्याने त्याला पाहिले. व तो सुध्दा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.
नंतर एक शोमरोनी त्याच रस्त्याने प्रवास करीत तेथे आला. जेव्हा त्याने त्या मनुष्याला पाहिले, तेव्हा त्याला त्याच्याविषयी कळवळा आला
तो त्याच्याजवळ आला त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षारस ओतून त्या बांधल्या. नंतर त्या शोमरोन्याने त्याला आपल्या गाढवावर बसविले व त्याला उतारशाळेत आणले, व त्याची देखभाल केली.
दुसऱ्या दिवशी त्याने दोन दीनार। (सुमारे वीस रुपये) काढले आणि उतारशाळेच्या मालकाला दिले व म्हणाला, “याची चांगली देखभाल कर म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन.”‘
लुटारुंच्या तावडीत जो मनुष्य सापडला होता, त्याचा त्या तिघांपैकी कोण खरा शेजारी होता असे तुला वाटते?”
तो नियमशास्त्राचा शिक्षक म्हणाला, “ज्याने त्या गरजू जखमी प्रवाशावर दया मनापासून केली तो.” तेव्हा येशू त्याला म्हणाला, “जा आणि तूही तसेच कर.”
मग येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मार्गाने जात असता, तो एका खेड्यात आला. तेथे मार्था नावाच्या स्त्रीने त्याचे स्वागत करुन आदरातिथ्य केले.
तिला मरीया नावाची एक बहीण होती, ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली.
पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली. ती येशूकडे आली आणि म्हणाली, “प्रभु, माझ्या बहिणीने सर्व काम माइयावर टाकले याची तुला काळजी नाही काय? तेव्हा मला मदत करायला तिला सांग.”
प्रभूने उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस.
पण एक गोष्ट आवश्यक आहे. हे मी सांगतो कारण मरीयेने तिच्यासाठी चांगला कार्यभाग निवडला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”

11

मग असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. प्रार्थना संपल्यावर शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला, “प्रभु, योहानाने जशी त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवली:” त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना कशी करावी ते आम्हास शिकवा.”
मग तो त्यांना म्हणाला, “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणा: ‘पित्या, तुझे नाव पवित्र राखले जावो. तुझे राज्य येवो,
आम्हाला रोज लागणारी भाकर आज आम्हांला दे,
आणि आमच्या पापांची आम्हांला क्षमा कर, कारण आम्ही सुद्धा जे आमचे वाईट करतात त्यांची क्षमा करतो. आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाइटापासून सोडीव.”‘
मग येशू त्यास म्हणाला, “समजा तुमच्यापैकी कोणाला तरी एक मित्र होता. आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्याला म्हणाला, “मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे,
कारण माझा मित्र नुकताच प्रवास करुन माझ्याकडे आला आहे. आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काहीही नाही.’
आणि समजा तो मनुष्य आतून म्हणाला, “मला त्रास देऊ नको! अगोदरच दार लावलेले आहे. आणि माझी मुले माझ्याजवळ झोपलेली आहेत. मी तुला देण्यासाठी उठू शकत नाही.’
मी तुम्हाला सांगतो जरी तो उठून त्याला कांही देण्याची टाळटाळ करील तरी त्याच्या मित्राच्या आग्रही वृत्तीमुळे तो खात्रीने उठून त्याला पाहिजे ते देईल.
आणि म्हणून मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल आणि ठोठवा म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाईल.
कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल. जो शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोठावतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल.
तुम्हांमध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्याला मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल?
किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्याला विंचू देईल?
जर तुम्ही इतके वाईट असताना तुम्हांला तुमच्या मुलांना चांगल्या देण्याचे समजते, तर जे त्याच्याकडे मागतात त्यांना स्वर्गातील पिता किती तरी अधिक पवित्र आत्मा देईल?”
येशू एक भूत काढीत होता. ते मुके होते. मग असे झाले की, जो मनुष्य बोलू शकत नव्हता तो, भूत बाहेर आल्यावर, बोलू लागला व लोकांचा जमाव चकित झाला.
परंतु त्यांच्यातील काही लोक म्हणाले की, “भुतांचा प्रमुख जो बालजबूल याच्या साहाय्याने तो भुते काढतो.”
काहींनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वर्गातून चिन्ह मागितले.
पण त्यांच्या मनात काय होत हे त्याला माहीत होते आणि तो त्यांना म्हणाला, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि एखाद्या घरात एकमेकांविरुद्ध भांडतात तेव्हा त्या घराचे तुकडे होतात.
आणि तुम्ही म्हणता तशी जर भुतांमध्येही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी तुम्हांला हे विचारतो, कारण तुम्ही म्हणता मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो..
पण जर मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे अनुयायी (तुमची मुले) कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील.
परंतु जर मी देवाच्या साहाय्याने भुते काढतो, तर मग हे स्पष्ट आहे की, देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे.
जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो आणि स्वत:चे रक्षण करतो तेव्हा त्याची मालमता सुरक्षित राहते.
परंतु कोणी त्याच्याहीपेक्षा अधिक बलवान त्याच्यावर हल्ला करुन त्याचा पराभव करतो, तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्यांने भरंवसा ठेवला होता, ती तो घेऊन जातो व त्याला मिळालेली लूट आपल्या मित्रांना वाटतो.
जो माझ्या पक्षाचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबरीने गोळा करीत नाही, तर तो उधळून टाकतो.
जेव्हा भूत माणसाबाहेर येते व ते विसावा घेण्यासाठी निर्जल प्रदेशात जागा शोधते. पण त्याला ती विश्रांति मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, “मी ज्या घरातून बाहेर आलो त्या घरात परत जाईन.’
तो जातो आणि त्याला ते घर झाडून नीटनेटके केलेले आढळते.
नंतर तो जातो आणि आपणापेक्षा अधिक बळकट व दुष्ट असे सात आत्मे मिळवितो, आणि ते आत जातात आणि तेथेच राहतात. तेव्हा त्या मनुष्याची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”
असे घडले की, तो या गोष्टी बोलला तेव्हा गर्दीतील एक स्त्री मोठ्याने ओरडून त्याला म्हणाली, “धन्य ते गर्भाशय, ज्याने तुझा भार वाहिला व धन्य ती स्तने जी तू चोखलीस!”
परंतु तो म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य!”
जसजसा लोकसमुदाय वाढू लागला, तेव्हा तो बोलू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे. ती चिन्ह मागत आहे, आणि योनाच्या चिन्हाशिवाय कोणतेही चिन्ह तिला दिले जाणार नाही.
कारण जसा योना निनवेच्या लोकांकरिता चिन्ह होता तसा मनुष्याचा पुत्रही या पिढीसाठी चिन्ह होईल.
दक्षिणेकडची राणी न्यायाच्या दिवशी या पिढीविरुद्ध उठेल आणि ती त्यांचा धिक्कार करील. कारण ती पृथ्वीच्या दक्षिण टोकाकडून शलमोनाचे शहाणपण ऐकण्यासाठी आली, आणि आता तर शलमोनापेक्षाही थोर असा कोणी एक थेथे आहे.
न्यायाच्या दिवशी निनवेचे लोक या पिढीबरोबर उभे राहतील व त्यांचा धिक्कार करतील. कारण योनाचा उपदेश ऐकून त्यांनी पश्यात्ताप केला पण आता योनापेक्षाही थोर असा कोणी येथे आहे.
ʇकोणी दिवा लावून तळघरात किंवा भांड्याखाली ठेवत नाहीत, उलट तो दिवठणीवर ठेवतात. यासाठी की जे कोणी आत येतात त्यांना प्रकाश दिसणे शक्य व्हावे.
डोळा हा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जर तुमचे डोळे चांगले आहेत, तर तुमचे शरीरही प्रकाशाने भरलेले आहे.
पण ते जर वाईट आहेत तर तुमचे शरीर अंधकारमय आहेत तुमच्यातला प्रकाश हा अंधार तर नाही ना, याची काळजी घ्या.
जर तुमचे सर्व शरीर प्रकाश आहे आणि जर त्याचा एकही भाग अंधार नाही तर, जशी दिव्याची प्रकाशकिरणे तुझ्यावर प्रकाशतात, तसे ते पूर्णपणे प्रकाशतील.”
जेव्हा येशूने आपले बोलणे संपविले तेव्हा एका परुश्याने त्याला आपलल्याबरोबर जेवायला बोलाविले. तो आत गेला आणि आपल्या जागी रेलून बसला.
परंतु त्याने जेवणापूर्वी हात धुतले नाहीत हे पाहून परुश्याला फार आश्चर्य वाटले.
तेव्हा प्रभु त्याला म्हणाला, “तुम्ही परुशी प्याला व ताट बाहेरुन स्वच्छ करता पण तुम्ही आतून अधाशीपणाने व फसवणुकीच्या दुष्टतेने भरले आहात.
तुम्ही मूर्ख लोक! ज्याने बाहेरील बाजू बनवली तो आतली बाजू बनवणार नाही का?
पण जे आतमध्ये आहे, ते गरीबांना द्या. आणि नंतर सर्व काही तुमच्यासाठी स्वच्छ होईल.
परुश्यांनो तुम्हाला धिश्चार असो कारण तुम्ही पश्चात्ताप करता व पुदिन्याचा व प्रत्येक वनस्पतीचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रेम याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही या गोष्टी प्रथम काराव्यात व मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये.
परुश्यांनो तुमचा धिक्कार असो, कारण तुम्हांला सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते.
तुमचा धिश्चार असो कारण तुम्ही खुणा न केलेल्या कबरांसारखे आहात, अशा कबरांवर लोक नकळत पाय देऊन चालतात.”
नियमशास्त्राचा एक शिक्षक येशूला म्हणाला, “गुरुजी, तुम्ही असे बोलता तेव्हा तुम्ही आमचासुद्धा अपमान करता.”
तेव्हा येशू म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचाही धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांना वाहण्यास कठीण असे ओझे लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटानेसुद्धा मदत करीत नाही.
तुमचा धिक्कार असो, कारण तुमच्या पूर्वजांनी ठार केलेल्या भविष्यवाद्यांसाठी तुम्ही कबरा बांधता.
अशा प्रकारे तुमच्या पूर्वजांनी केलेल्या कृत्यांचे समर्थन करता.
यामुळे देवाचे ज्ञानसुद्धा असे म्हणाले, “मी प्रेषित व संदेष्ट त्यांच्याकडे पाठवील. त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील!’
तेव्हा या पिढीस भविष्यवाद्यांचे जे रक्त जगाच्या प्रारंभापासून सांडले गेले त्याबद्दल दंड भरुन द्यावा लागेल.
म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून ते जखऱ्या जो देवाचे मंदिर व वेदी यांच्यामध्ये मराला गेला. खरोखर मी तुम्हांस सांगतो या पिढिला ते भरुन द्यावे लागेल.
“नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचा धिक्कार असो. कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली आहे. तुम्ही स्वत:ही आत गेला नाहीत आणि जे आत जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनाही जाऊ दिले नाही.”
येशू तेथून निघून जात असता नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी फार विरोध करु लागले व त्याला अनेक गोष्टीविषयी प्रश्न विचारु लागले.
तो जे बोलेल त्यामध्ये त्याला एखाद्या सावजाप्रमाणे पकडण्यासाठी टपून बसले.

12

आणि म्हणून हजारो लोकांचा समुदाय जमला होता. इतके लोक जमले होते की, ते एकमेकांना तुडवू लागले, तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोलला: “परुश्यांच्या खमिराविषयी जपा, म्हणजे जे ढोंग आहे त्याविषयी जपा.
उघड केले जाणार नाही असे काहीच झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीच गुच्त नाही.
यास्तव जे काही तुम्ही अंधारत बोलाल ते उजेडात ऐकले जाईल आणि जे काही तुम्ही कोणाच्या कानात एकांतात सांगाल ते घराच्या छपरावरुन घोषित केले जाईल.”
“परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नये, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही.
तुम्ही कोणाची भीति बाळगावी हे मी तुम्हांला सांगतो. तुम्हांला ठार मारल्यांनतर तुम्हांस नरकात टाकून देण्यास जो समर्थ आहे, त्याची भीति धरा. होय, मी तुम्हांस सांगतो त्यालाच भ्या.
“पाच चिमण्या दोन पैशांना विकतात की नाही? आणि त्यातील एकीचाही देवाला विसर पडत नाही.
पण तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील त्याने मोजलेले आहेत. भिऊ नका. पुुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही मूल्यवान आहात.”
“प्रत्येक जण जो मला इतर लोकांसमोर स्वीकारतो, त्या मनुष्याला देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारील.
परंतु जो मला इतर लोकांसमोर नाकारतो, तो देवदूतांसमोरही नाकारला जाईल.
“प्रत्येक मनुष्य जो मनुष्याच्या पुत्राविरुद्ध बोलतो, त्याला क्षमा केली जाईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला क्षमा केली जाणार नाही.
“जेव्हा ते तुम्हांला सभास्थान, सरकार, अधिकारी यांच्यासमोर आणतील तेव्हा तुम्ही काय बोलावे किंवा स्वत:चा बचाव कसा करावा याविषयी आधीच चिंता करीत बसू नका.
कारण तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा त्यावेळी तुम्हांला शिकवील.”
नंतर लोकसमुदायातील एक जण त्याला म्हणाला, “गुरुजी, माझ्या भावाला वतन विभागून माझे मला द्यायला सांगा!”
परंतु येशू त्याला म्हणाला, “मनुष्या, मला तुमच्यावर मध्यस्थ किंवा न्यायाधीश म्हणून कोणी नेमले?”
मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वत:ला दूर ठेवा. कारण जेव्हा एखाद्या माणसाजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती म्हणजे त्याचे जीवन असे होत नाही.”
नंतर त्याने त्यास एक बोधकथा सांगितली: “कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीत फार उत्तम पीक आले.
तो स्वत:शी विचार करुन असे म्हणाला, “मी काय करु, कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही?’
मग तो म्हणाला, “मी असे करीन की धान्याची कोठारे पाडून मोठी बांधीन, मी माझे सर्व धान्य व माल तेथे साठवीन.
आणि मी माझ्या जिवाला म्हणेन, जिवा, तुझ्यासाठी पुष्कळ चांगल्या गोष्टी अनेक वर्षे पुरतील इतक्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.”
पण देव त्याला म्हणतो, “मूर्खा, जर आजा तू मेलास तर तू मिळविलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’
“जो कोणी स्वत:साठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे.”
मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “म्हणून मी तुम्हांस सांगतो, स्वत:च्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करु नका. किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करु नका.
कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यापेक्षा शरीर महत्त्वाचे आहे.
कावळ्यांचा विचार करा. ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मोलवान आहात!
चिंता करुन तुम्हांपैकी कोण स्वत:च्या आयुष्यात एका तासाची भर घालू शकेल?
ज्याअर्थी तुम्ही ही लहान गोष्ट करु शकत नाही, तर इतर गोष्टीविषयी चिंता का करता?
रानफुले कशी वाढतात याचा विचार करा. ते कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत. तरी मी तुम्हांला सांगतो शलमोनानेसुद्धा आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातील एकासारखाही पोशाख घातला नव्हता.
जर देवाने जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा त्या रानातील गवताला असा पोशाख घातला आहे, तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हांला तो कितीतरी अधिक (चांगला) पोशाख घालणार नाही काय!
आणि तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी खटपट करु नका. या गोष्टीविषयी चिंता करु नका.
कारण जगातील सर्व लोक हे मिळविण्याची खटपट करतात पण या गोष्टींची गरज तुम्हांला आहे, हे तुमच्या पित्याला माहीत आहे.
त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे याही गोष्टी तुम्हांला दिल्या जातील.
“लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हांला त्याचे राज्य द्यावे हे दयाळू पित्याला समधानाचे वाटते.
तुमच्याकडे असलेले सर्व विका आणि गरिबांना पैसे द्या. जुन्या न होणाऱ्या व स्वर्गातही न संपणाऱ्या अशा थैल्या स्वत:साठी करा. जेथे चोर जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करु शकणार नाही.
कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.
“तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या.
लग्नाच्या मेजवानीवरुन त्यांचा मालक परत येईल अशी वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा. यासाठी की जेव्हा तो येतो व ठोठाठतो तेव्हा त्याच्यासाठी ते ताबडतोब दार उघडतील.
धन्य ते नोकर जे त्यांचा मालक परत आल्यावर त्याला जागे व तयारीत असलेले आढळतील. मी तुम्हांला खरे सांगतो, तो स्वत: त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील.
तो मध्यरात्री येवो अगर त्यांनतर येवो. जर ते त्याला असे तयारीत आढळतील तर ते धन्य.
परंतु याविषयी खात्री बाळगा; जर घराच्या मालकाला चोर केव्हा येणार हे माहीत असते तर त्याचे घर त्याने फोडू दिले नसते.
तुम्हीही तयार असा कारण तुम्ही अपेक्षा करणार नाही अशा कोणत्याही क्षणी मनुष्याचा पुत्र येईल.”
मग पेत्र म्हणाला, “प्रभु, तुम्ही ही बोधकथा आम्हांलाच सांगत आहात की सर्वांना?”
तेव्ह प्रभु म्हणाला, “असा कोण शहाणा व विश्वासू कारभारी आहे की, ज्याला प्रभु त्याच्या नोकरांना त्याचे धान्य योग्य वेळी देण्यासाठी त्याची नेमणूक करील?
त्याचा मालक येईल त्यावेळी असे करताना जो नोकर आढळेल तो धन्य.
मी तुम्हांला खरे सांगतो, मालक त्या नोकराला त्याच्या सर्व मालमत्तेवर अधिकारी म्हणून नेमील.
पण जर तो नोकर मनात म्हणतो, “माझा मालक येण्यास फार विलंब लावतो.’ व तो त्याच्या स्त्री व पुरुष नोकरांना मारहाण करतो व खाण्यापिण्यास सुरुवात करतो.
ज्या दिवसाची तो वाट पाहत नाही त्या दिवशी त्या नोकराचा मालक येईल व अशा वेळी येईल की ती वेळ त्याला माहीत असणार नाही. आणि तो त्याचे वाभाडे वाभाडे काढील व तो त्याला अविश्वासू लोकांबरोबर ठेवील.
ज्या नोकराला आपल्या मालकाची इच्छा माहीत असते व जो तयार राहत नाही, किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नोकराला खूप मार मिळेल.
परंतु कसलाही वाईट हेतू न बाळगता मालकाला न आवडणारे जर त्याने केले असेल तर त्याला कमी मार बसेल. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल. ज्यांच्याजवळ जास्त ठेवले आहे त्यांच्याकडून जास्त मागितले जाईल.”
मी पृथ्वीवर आग लावण्यास आलो आहे. मला असे वाटते की ती अगोदरच पेटली असती तर किती बरे झाले असेत.
माझ्याकडे बाप्तिस्मा आहे व तो मला घ्यावयाचा आहे. आणि तो होईपर्यंत मी किती अस्वस्थ आहे!
तुम्हांला असे वाटते का की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करण्यास आलो आहे? नाही, मी तुम्हांला सांगतो मी तुमच्यात फूट पाडण्यासाठी आलो आहे.
मी असे म्हणतो कारण आतापासून घरातील पाच जणात एकमेकाविरुद्ध फूट पडेल. तिघे दोघांविरुद्ध व दोघे तिघांविरुद्ध अशी फूट पडेल.
त्यांच्यात पित्याविरुद्ध मुलगा व मुलाविरुद्ध पिता अशी फूट पडेल, आईविरुद्ध मुलगी व मुलीविरुद्ध आई अशी फूट पडेल, सासूविरुद्ध सून व सुनेविरुद्ध सासू अशी त्यांच्यात फूट पडेल.”
तो लोकसमुदायाला म्हणाला, “तुम्ही जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की, “पाऊस पडेल’ आणि तेच घडते.
जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो, तेव्हा तुम्ही म्हणता “उकाडा होईल’ आणि तसे घडते.
अहो ढोंग्यांने! तुम्ही पृथ्वीवरील व आकाशातील स्थित्यंतरे पाहून अनुमान काढता, पण सध्याच्या काळाचा अर्थ तुम्हांला का काढता येत नाही?”
“आणि काय योग्य आहे हे तुमचे तुम्ही स्वत:च का ठरवीत नाही?
तुम्ही तुमच्या वाद्याबरोबर न्यायालयात जात असता वाटेतच त्यांच्याशी समेट करा नाही तर तो तुम्हांला न्यायाधीशासमोर नेईल, आणि न्यायाधीश तुम्हांला दंडाधिकाऱ्याच्या स्वाधीन करील. आणि अधिकारी तुम्हांला तुरुंगात टाकील.
मी तुम्हांला सांगतो, तुम्ही पै न पै देईपर्यंत तेथून बाहेर पडू शाकणार नाही.”

13

त्यावेळी तेथे काही लोक उपस्थित होते. त्यांनी येशूला गालीलातील त्या लोकांविषयी सांगितले, ज्यांचे रक्त पिलाताने आधीच असलेल्या यज्ञपशूंच्या रक्तात मिसळले होते.
त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला वाटते का की, ह्या गालीलकरंनी जे भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते?
नाही, मी तुम्हांस सांगतो, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल.
किंवा त्या अठरा जणांचे काय? ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व ते मारले गेले? तुम्हांला वाटते का की, यरुशलेम येथे राहणाऱ्या सर्व लोकांपेक्षा ते अधिक दोषी होते?
नाही, मी तुम्हांला सांगतो जर तुम्ही पश्चत्ताप केला नाही तर तुम्ही सर्व जण त्यांच्यासारखे मराल.”
नंतर त्याने ही बोधकथा सांगितली, “एका माणसाने त्याच्या बागेत अंजिराचे झाड लावले होते, त्यावर फळ असेल म्हणून तो पाहावयास आला परंतु त्याला काहीही आढळले नाही.
म्हणून तो माळयाला म्हणाला, “पाहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून येत आहे, परंतु मला त्यावर काहीही आढळले नाही. तेव्हा ते तोडून टाक. त्याचा उगीच भुईला भार कशाला?’
माळयाने उत्तर दिले, “मालक, या एका वर्षासाठी ते राहू द्या. मग मी त्याच्याभोवती खणून त्याला खत घालीन.
मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.”
शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता.
तेथे एक स्त्री होती, तिला अशुद्ध आत्म्याने अठरा वर्षे पांगळे केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते.
येशूने तिला पाहिले, त्याने तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, “बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस!”
नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ सरळ झाली. आणि ती देवाची स्तुति करु लागली.
नंतर सभास्थानाचा अधिकारी रागावला, कारण येशूने शब्बाथ दिवशी तिला बरे केले होते. तो लोकांना म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत म्हणून या सहा दिवसांमध्ये या व बरे व्हा. पण शब्बाथ दिवशी येऊन बरे होऊ नका.”
येशूने त्याला उत्तर दिले, आणि म्हणाला. “ढोंग्यांनो, तुम्हांपैकी प्रत्येक जण त्याच्या बैलाला वा गढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का?
ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. ज्या बंधनात ती होती त्यापासून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?”
तो असे म्हणाल्यावर जे त्याचा विरोध करीत होते त्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भुत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करु लागला.
मग तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? आणि मी त्याची कशाबरोबर तुलना करु
देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो मोहरीचा दाणा एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला, तो वाढला आणि त्याचे झाडे झाले. आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बांधली.”
तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याची तुलना कोणाबरोबर करु
ते खमिरासरखे आहे. एका स्त्रीनेे तीन मापे पिठात खमिर मिसळले आणि ते सर्व खमिरामुळे फुगले.”
येशू गावागावांतून आणि खेड्यापाड्यांतून जात असता व यरुशलेमाच्या दिशेने वाटचाल करीत असता तो लोकांना शिकवीत होता.
कोणीतरी त्याला विचारले, “प्रभु, फक्त थोड्या लोकांचेच तारण होईल का?” तो त्यांना म्हणाला,
“अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हांला सांगतो की, पुष्कळ जण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही.
जेव्हा घराचा मालक उठून दार बंद करील, तेव्हा तुम्ही बाहेर उभे राहाल व दार ठोठवाल. आणि म्हणाल, “प्रभु, आम्हांसाठी दार उघडा!’ परंतु तो तुम्हांला उत्तर देईल, “तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही.’
नंतर तुम्ही म्हणाल, “आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले!’
आणि तो तुम्हांला म्हणेल, “तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, जे तुम्ही दुष्टपणा करता ते सर्व माझ्यापासून निघून जा.”
तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला, आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वत: मात्र बाहेर फेकलेले असाल.
आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासभोवती आपापल्या जागेवर बसतील.
लक्षात ठेवा की, जे शेवटचे आहेत ते पहिले होतील, व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील.”
त्यावेळी काही परुशी येशूकडे आले. आणि ते त्याला म्हणाले, “येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा, कारण हेरोद तुम्हांला ठार मारणार आहे.”
येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, “ऐक, मी लोकांतून भुते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.’
तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टयांने यरुशलेमाबाहेर मरणे ह्याचा विचार करणे चूक आहे.
“यरुशलेमे, यरुशलेमे, जी तू संदेष्टयांना मारतेस व देवाने पाठविलेल्यांवर दगडमार करतेस! कितीतरी वेळा कोंबडी जशी पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते तसे तुम्हा लोकांना एकवटण्याची माझी इच्छा होती, पण तुमची तशी इच्छा नव्हती.
पाहा, देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे. मी तुम्हांला सांगतो, “देवाच्या नावाने येणारा धन्यवादित असो’ असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.”

14

एका शब्बाथ दिवशी तो प्रमुख परुश्यांपैकी एकाच्या घरी जेवावयास गेला, तेव्हा तेथे असणारे लोक येशूवर बारकाईने नजर ठेवीत होते.
आणि तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला एक मनुष्य होता.
येशूने नियमशास्त्राच्या शिक्षकांना व परुश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की कसे?”
पण ते गप्प राहिले. तेव्हा येशूने त्या आजारी माणसाला धरुन त्याला बरे केले व त्याला पाठवून दिले.
मग तो त्यांना म्हणाला, “जर तुमच्यापैकी एखाद्याला एक मुलगा किंवा एक बैल आहे व तो विहीरीत पडला, तर शब्बाथ दिवशी तुम्ही त्याला ताबडतोब बाहेर काढणार नाही काय?”
आणि ह्या प्रश्नाला उत्तर देणे त्यांना जमले नाही.
मग त्याने पाहुण्यांना एक बोधकथा सांगितली, कारण त्याने पाहिले की, ते त्यांच्यासाठी मानाच्या जागा शोधीत होते. तो त्यांना म्हणाला,
“जेव्हा एखादा तुम्हांला लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील, तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका. कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या माणसाला त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल.
मग ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल, आणि तुम्हांला म्हणेल, “या माणसाला तुझी जागा दे.’ मग खजील होऊन तुम्हांला खालच्या जागी बसावे लागेल.
पण जेव्हा तुम्हांला आमंत्रित केलेले असेल, तेव्हा जा आणि अगदी खालच्या (शेवटच्या) जागी जाऊन बसा. यासाठी की, जेव्हा यजमान येईल, तेव्हा तो तुम्हांला म्हणेल, “मित्रा, वरच्या आसनावर येऊन बैस.’ तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझा मान होईल.
कारण जो कोणी स्वत:ला उच्च करितो त्याला लीन केले जाईल व जो स्वत:ला लीन करील त्याला उच्च केले जाईल.”
मग ज्याने आमंत्रण दिले होते त्याला तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, किंवा तुझ्या नातेवाईकांना वा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल.
पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे.
आणि तुला आशीर्वाद मिळतील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही असणार नाही. कारण नीतीमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”
आता जेव्हा मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, “देवाच्या राज्यात जेवतो, तो प्रत्येक जण धन्य!”
मग येशू त्याला म्हणाला, “एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांना आमंत्रण दिले.
भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना “या, कारण सर्व तयार आहे’ हे सांगण्यासाठी नोकराला पाठविले.
ते सर्वजण सबब सांगू लागले. पाहिला त्याला म्हणाला, “मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपा करुन मला क्षमा कर.’
दुसरा म्हणाला, “मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहोत व त्या कशा आहेत हे बघण्यासाठी मी चाललो आहे, कृपा करुन मला क्षमा कर.’
आणखी तिसरा म्हणाला, “मी लग्न केले आहे, व त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’
म्हणून जेव्हा तो नोकर परत आला, तेव्हा त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या. मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला, “लवकर बाहेर रस्त्यावर आणि नगारातल्या गल्ल्यांमध्ये जा व गरीब, आंधळे, असहाय्य, लंगडे यांना घेऊन इकडे ये!’
नोकर म्हणाला, “आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे. आणि तरीही जागा आहे.’
मालक नोकराला म्हणाला, “रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांना आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरुन जाईल.
कारण मी तुम्हांस सांगतो की, त्या आमंत्रित केलेल्या कोणालाही माझ्या मेजवानीतली चव पाहायला मिळणार नाही.”‘
मोठ्या संख्येने लोक येशूबरोबर चालत होते. तो त्यांच्याकडे वळाला व म्हणाला,
“जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वत:च्या जिवाचासुद्धा द्धेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही.
जो कोणी स्वत:चा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.
जर तुम्हांपैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करुन तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे आहे की नाही हे पाहणार नाही काय?
नाहीतर कदाचित तो पाया घालील आणि पूर्ण करु शकणार नाही. आणि जे पाहणारे आहेत ते त्याची थट्टा करतील आणि म्हणतील,
ʅया मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करु शकला नाही!’
ʇकिंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्याला मुकाबला करता येणे शक्य आहे काय?
जर तो त्याला तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रु दूर अंतरावर असतानाच तो शिष्टमंडळ पाठवून शांततेसाठी तहअटींची विचारणा करील.
त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही.
“मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्याला खारटपणा कशाने येईल?
ते पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील. “ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको!”

15

सर्व पापी लोक त्याचे ऐकायला त्याच्याकडे येत होते.
तेव्हा परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करु लागले. ते म्हणू लागले, “हा पाप्यांचे स्वागत करतो आणि त्यांच्याबरोबर जेवतो!”
मग येशूने त्यांना ही गोष्टी सांगितली.
“जर तुमच्यापैकी कोणा एकाजवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले, तर तो नव्याण्णव रानांत सोडून हरवलेल्या मेंढरामागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय?
आणि जेव्हा त्याला ते सापडते तेव्हा तो आनंदाने ते खांद्यांवर घतो.
आणि घरी येतो, तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्याना एकत्र करुन म्हणतो, “माइयाबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरु सापडले आहे.’
मी तुम्हांस सांगतो, त्याचप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांपेक्षा पश्चात्ताप करणार्या एका पाप्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल.
“समजा एका बाईजवळ चांदीची दहा नाणी आहेत. जर तिचे एक नाणे हरवले तर ती दिवा लावून घर झाडून ते मिळेपर्यंत काळजीपूर्वक शोधणार नाही काय?
आणि जेव्हा तिला ते नाणे सापडते तेव्हा ती मैत्रिणींना आणि शेजाऱ्याना बोलाविते आणि म्हणते, “माइयाबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.’
त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हांस सांगतो.”
मग येशू म्हणाला, “एका मनुष्याला दोन मुलगे होते.
त्यापैकी धाकटा म्हणाला, “बाबा, मलामत्तेचा माझा वाटा मला द्या.’ आणि वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये विभागली.
नंतर फार दिवस झाले नाहीत तोच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने सर्व संपत्ती चैनीचे जीवन जगून उधळून टाकली.
त्याने सर्व पैसे खर्च केल्यावर, त्या देशांत भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली.
मग तो गेला आणि त्या देशातील एका नागरिकाजवळ नोकरी करु लागला. त्या नागरिकाने त्याला डुकरे चारावयास पाठविले.
तेव्हा डुकरे खातात त्या शेंगा तरी खाव्यात अशी त्याला इच्छा होई, पण कोणी त्याला काहीही दिले नाही.
नंतर तो शुद्धीवर आला आणि म्हणाला, “माझ्या पित्याच्या घरी किती तरी मजुरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि येथे मी भुकेने मरतो आहे!
मी उठून आपल्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणेन, बाबा, मी स्वार्गाविरुद्ध (देवाविरुद्ध) आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.
तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. मला आपल्या रोजंदारीवरील मजुरांसारखे ठेवा.”
मग तो उठला आणि आपल्या पित्याकडे गेला. तो दूर असतानाच पित्याने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. वडील पळत गेले आणि त्याच्या गळ्या पडले आणि त्याचे मुके घेतले.
ʇमुलगा त्यांना म्हणाला, “बाबा, मी स्वार्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही.’
परंतु वडील आपल्या नोकरांस म्हणाले, “त्वरा करा, चांगला झगा आणून त्याला घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला.
आणि पुष्ट वासरु आणून कापा, आपण खाऊ आणि आनंद करु!
कारण हा माझा मुलगा मेला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे.’ व ते आनंद करु लागले.
ʇत्याचा मोठा मुलगा शेतात होता. तो घराकडे निघाला. जेव्हा तो घराजवळ आला, तेव्हा त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला.
त्याने एका नोकराला बोलावून विचारले, “हे सर्व काय चालले आहे?’
तो नोकर त्याला म्हणाला. “तुमचा भाऊ आला आहे. तो सुखरुप आला म्हणून तुमच्या वडिलांनी पुष्ट वासरु कापले आहे.’
मोठा मुलगा रागावला त्याला आत जाण्याची इच्छा होईना. तेव्हा वडिलांनी येऊन त्याची समजूत काढली.
परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले, “पाहा, इतकी वर्षे मी तुमचीसेवा केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही! मित्रांबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी बकरीसुद्धा दिली नाही.
ज्याने तुमची सर्व संपत्ती वेश्यांसाठी उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरु कापले!
वडील त्याला म्हणाले, “माझ्या मुला, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे.
आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे कारण हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, तो सापडला आहे.”‘

16

येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “एक श्रीमंत मनुष्य होता. त्याचा एक कारभारी होता. “हा कारभारी तुमचे पैसे उधळतो.’ असे त्या श्रीमंत माणसाला सांगण्यात आले.
म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने कारभाऱ्यायाला आत बोलावले आणि म्हणाला, “हे मी तुझ्याविषयी काय ऐकत आहे तुझ्या कारभाराचा हिशेब दे, कारण यापुढे कारभारी म्हणून तुला राहता येणार नाही.’
“तेव्हा कारभारी स्वत:शी म्हणाला, “मी काय करु? माझे मालक माझे कारभाऱ्यायाचे काम काढून घेत आहेत. शेतात कष्ट करण्याइतका मी बळकट नाही व भीक मागण्याची मला लाज वाटते.
मी काय करावे हे मला माहीत आहे. यासाठी की जेव्हा मला कारभाऱ्यायाच्या कामावरुन काढून टाकतील, लोक मला त्यांच्या घरांमध्ये घेतील.’
“मग त्याने त्याच्या मालकाच्या प्रत्येक कर्जदाराला बोलावले. पहिल्याला तो म्हणाला, “तू माइया मालकाचे किती देणे लागतोस?’
तो म्हणाला, “चार हजार लीटर जैतून तेल.’ मग तो त्याला म्हणाला, “तुझी पावती घे बघू, खाली बस आणि लवकर त्यावर दोन हजार लीटर लिही.’
“मग दुसऱ्यायाला तो म्हणाला, “आणि तुझे किती देणे आहे?’ तो म्हणाला, “तीस हजार किलो गहू.’ तो त्याला म्हणाला, “तुझी हिशेबाची पावती घे व त्यावर पंचवीस हजार किलो लिही.
आणि मालकाने त्या अप्रामाणिक कारभाऱ्यायाची प्रशंसा केली. कारण तो धूर्तपणे वागला होता. या जगाचे पुत्र त्यांच्यासारख्यांशी वागताना प्रकाशाच्या पुत्रांपेक्षा अधिक धूर्ततेने वागतात.
“मी तुम्हांस सांगतो, तुमच्यासाठी तुमच्या ऐहिक संपत्तीने मित्र मिळवा. यासाठी की, जेव्हा ते संपेल तेव्हा ते तुमचे अनंतकाळच्या घरात स्वागत करतील.
ज्या कोणावर थोडा विश्वास ठेवणे शक्य आहे त्याच्यावर जास्त विश्वास ठेवला जाण्याची शक्यता आहे. व जो कोणी थोडक्याविषयी अविश्वासू आहे तो अधिकाविषयीसुद्धा अविश्वासू आहे.
“म्हणून जर तुम्ही ऐहिक संपत्तीविषयी विश्वासू नाही, तर मग खऱ्याया संपत्तीविषयी तुमच्यावर कोण विशवास ठेवील?
ʇजे दुसऱ्यायाचे आहे त्याविषयी तुम्ही विश्वासू नसाल तर जे तुमचे आहे ते तुम्हांस कोण देईल?”
ʇकोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही. एकाचा तो द्वेष करील व दुसऱ्यायावर तो प्रेम करील किंवा एकाशी तो प्रामाणिक राहील व दुसऱ्यायाला तुच्छ मानील. तुम्ही एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करु शकणार नाही.”
मग जे परुशी धनलोभी होते, त्यांनी हे सर्व ऐकले व त्यांनी त्याचा उपहास केला.
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही स्वत:ला लोकांसमोर नीतिमान म्हणून मिरवता दाखविता, पण देव तुमची अंत:करणे ओळखतो. जे लोकांना महत्त्वाचे वाटते ते देवाच्या दृष्टीने टाकावू आहे.
“नियमशास्त्र व संदेष्टे योहानापत होते, तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजविली जात आहे. व प्रत्येक जण त्यात घुसण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे.
एकवेळ आकाश व पृथ्वी नाहीशी होणे शक्य होईल पण नियमशास्त्राचा एक काना मात्राही नाहीसा होणार नाही.
“जो कोणी आपल्या पत्नीस सूटपत्र देतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो व्याभिचार करतो आणि जो कोणी एखाद्या स्त्रीशी- जिला तिच्या पतीने टाकलेले आहे तिच्याशी लग्न करतो तो व्यभिचार करतो.”
“एक मनुष्य होता. तो श्रीमंत होता. तो जांभळी आणि तलम वस्त्रे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐषारामात घालवीत असे.
त्याच्या फाटकाजवळ लाजार नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता. त्याच्या अंगावर फोड भरलेले होते.
त्या श्रीमंत मनुष्याच्या टेबलावरुन खाली पडलेले असेल ते खाण्याची तो आतुरतेने वाट पाही. कुत्रीदेखील येऊन त्याचे फोड चाटीत असत.
मग असे झाले की, तो गरीब मनुष्य मरण पावला, व देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्याला पुरले गेले.
आणि अधोलोकात. जेथे तो (श्रीमंत मनुष्य) यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहीले, व दूरवर असलेल्या अब्राहामाला पाहिले आणि लाजाराला त्याच्या शेजारी पाहिले,
तो मोठ्याने ओरडला, “पित्या अब्राहामा, माझ्यावर दया कर आणि लाजाराला पाठव यासाठी की तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करील, कारण या अग्नीत मी भयंकर वेदना सहन करीत आहे.!”
परंतु अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, लक्षात ठेव की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजाराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता येथे तो समाधानात आहे व तू दू:खात आहेस.
आणि या सगळ्याशिवाय, तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे, यासाठी की, येथून तुमच्याकडे ज्यांना जायचे आहे त्यांना जाता येऊ नये व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येऊ नये.’
तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, “मग तुला मी विनंति करतो की पित्या, लाजाराला माझ्या पित्याच्या घरी पाठव,
कारण मला पाच भाऊ आहेत. त्याला त्यांना तरी सावध करु दे. म्हणजे ते तरी या यातनेच्या ठिकाणी येणार नाहीत.’
पण अब्राहाम म्हणाला, “त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे.’
तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, “नाही, पित्या अब्राहामा, मेलेल्यातील कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील.’
अब्राहाम त्याला म्हणाला, “जर ते मोशेचे आणि संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मेलेल्यांतून जर कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.”‘

17

येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “ज्या गोष्टी लोकांना देवापासून दूर नेतात त्या येणे निश्चित आहे, परंतु ज्याच्यामुळे त्या येणार त्याची वाईट दशा होवो!
त्याने या लहानातील एकाला पाप करावयास लावण्यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकणे हे त्याच्यासाठी अधिक बरे होईल.
स्वत:कडे लक्ष द्या! जर तुमचा भाऊ पाप करतो तर त्याला धमकावा. आणि जर तो पश्चात्ताप करतो तर त्याची क्षमा करा.
जर तो तुझ्याविरुद्ध दिवसातून सात वेळा पाप करतो आणि सात वेळा तुमच्याकडे येतो व म्हणतो, “मी पश्चात्ताप करतो,’ त्याला क्षमा करा.”
मग शिष्य प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढव.”
प्रभु म्हणाला, “जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्याएवढा असेल तर तुम्ही या तुतीच्या झाडाला म्हणू शकता, “मुळासकट उपटून समुद्रात लावले जा.’ आणि ते तुमची आज्ञा पाळील.”
समजा, तुमच्यापैकी एकाला एक सेवक आहे. व तो शेत नांगरीत आहे किंवा मेंढरे राखीत आहे. जेव्हा तो शेतातून परत येतो, तुम्ही त्याला “ताबडतोब ये आणि जेवायला बैस” असे म्हणाला का?
उलट तुम्ही असे म्हणणार नाही का, “माझे भोजन तयार कर. आणि कामाचे कपडे घालून माझे खाणेपिणे चालू असताना माझी सेवा कर. त्यानंतर तू खाऊ पिऊ शकतोस?
ज्या गोष्टी करण्याबद्दल तुम्ही नोकराला आज्ञा करता ते केल्याबद्दल त्याचे आभार तुम्ही मानता काय?
तुमच्या बाबतीतही हे तसेच आहे: जेव्हा तुम्हांला करण्यास सांगितलेली सर्व कामे तुम्ही केल्यावर असे म्हटले पाहिजे, “आम्ही कोणत्याही मानास पात्र नसलेले सेवक आहोत आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे.”‘
येशू यरुशलेमाला जात असताना त्याने शोमरोन व गालील यांच्या सीमेवरुन प्रवास केला.
तो एका खेड्यात जात असताना, कुष्ठरोग झालेले दहा पुरुष त्याला भेटले, ते दूर उभे राहीले.
ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “येशू, गुरुजी आम्हांवर दया करा!”
जेव्हा त्याने त्यांना पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “जा, आणि स्वत:ला याजकांना दाखवा.” ते जात असतानाच बरे झाले,
जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की, आपण बरे झालो आहोत, तेव्हा तो परत आला व त्याने मोठ्या स्वरात देवाची स्तुति केली.
तो येशूच्या पायाजवळ उपडा पडला. आणि त्याने त्याचे उपकार मानले. तो शोमरोनी होता.
येशू त्याला म्हणाला, “दहाजण बरे झाले नव्हते काय? नऊजण कोठे आहेत?
या विदेशी माणासाशिवाय कोणीही देवाची स्तुति करण्यासाठी परत आला नाही काय?”
येशू त्याला म्हणाला, “ऊठ, आणि जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
एकदा, परुश्यांनी येशूला विचारले, देवाचे राज्य केव्हा येईल, त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाच राज्य दृद्दय स्वरुपात येत नाही. लोक असे म्हणणार नाहीत की
ते येथे आहे! किंवा ते तेथे आहे! कारण देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.”
पण शिष्यांना तो म्हणाला, “असे दिवस येतील की जेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या गौरवाने येण्याच्या एका दिवसाची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहाल. परंतु तो दिवस तुम्ही पाहू शकणार नाही.
आणि लोक तुम्हांला म्हणतील, “तेथे पाहा! तेथे जाऊ नका. किंवा त्यांच्यामागे जाऊ नका.
“कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत चमकते आणि प्रकाशते तसेच मनुष्याच्या पुत्राचे त्याच्या दिवसात होईल.
पण पहिल्यांदा त्याने पुष्कळ गोष्टीविषयी दु:ख भोगले पाहिजे. व या पिढीने त्याला नाकारले पाहिजे.
जसे नोहाच्या दिवसांत झाले, तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातदेखील होईल. ते खात होते, पीत होते, लग्न करीत होते. लग्न करुन देत होते.
नोहा तारवात जाईपर्यंत असे चालले होते. मग पूर आला. व त्या सर्वांचा नाश झाला.
त्याचप्रकारे लोटाच्या दिवसात झाले तसे होईल: ते खात होते, पीत होते. विकत घेत होते. विकत देत होते. लागवड करीत होते. बांधीत होते.
परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून बाहेर पडला त्या दिवशी आकाशातून अग्नि व गंधक यांचा पाऊस पडला आणि सर्वांचा नाश केला.
मनुष्याचा पुत्र प्रगट होईल तेव्हा असेच होईल.
“त्या दिवशी जर एखादा छपरावर असेल व त्याचे सामान घरात असेल, त्याने ते घेण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे जो शेतात असेल त्याने परत जाऊ नये.
लोटाच्या पत्नीची आठवण करा.
जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला गमावील आणि जो कोणी आपला जीव गमावील तो त्याला राखील.
मी तुम्हांला सांगतो, त्या रात्री बिछान्यावर दोघे असतील, त्यापैकी एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल.
दोन स्त्रिया धान्य दळत असतील, तर त्यांपैकी एक घेतली जाईल व दुसरी ठेवली जाईल.
शेतात दोघे असतील एकाला घेतले जाईल व दुसऱ्यायाला ठेविले जाईल.”
शिष्यांनी त्याला विचारले, “कोठे प्रभु?” येशूने उत्तर दिले, “जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील.”

18

त्यांनी नेहमी आशा न सोडता प्रार्थना करावी व ती करण्याचे कधीच सोडू नये हे शिकविण्यासाठी त्याने त्यांना एक बोधकथा सांगितली.
तो म्हणाला, “एका नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे लोकांना मानही देत नसे.
त्या नगरात एक विधवा होती. ती वारंवार येत असे व न्याधीशाला म्हणत असे, “माझ्या विरोधकांविरुद्ध मला न्याय मिळेल असे बघा!’
काही काळ त्याची इच्छा नव्हती पण शेवटी तो स्वत:शीच म्हणाला, “मी जरी देवाला भीत नाही व लोकांना मान देत नाही.
तरीही ती विधवा मला त्रास देत असल्याने तिला न्याय मिळेल असे मी करतो, यासाठी की ती वारंवार येऊन मला बेजार करणार नाही.’
मग प्रभु म्हणाला, “अनीतिमान न्यायाधीश काय म्हणाला त्याकडे लक्ष द्या.
आणि मग जे देवाचे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तो त्यांना मदत करावयास वेळ लावील काय?
मी तुम्हांस सांगतो, तो त्यांना न्याय देईल. तरीही जेव्हा मनुष्याचा पुत्र येतो, तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
अशा लोकांना जे स्वत:नीतिमान असल्याचा अभिमान बाळगत होते व इतरांना कमी लेखत होते, अशा लोकांसाठी येशूने ही गोष्ट सांगितली.
ʇदोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. एक परुशी होता व दुसरा जकातदार होता.
परुशी उभा राहिला व त्याने अशी प्रार्थना केली, “हे देवा, मी तुझे उपकार मानतो कारण, इतर लोकांसारखा म्हणजे चोर, फसविणारा, व्यभिचारी व या जकातदारासरखा मी नाही.
उलट मी आठवड्यातून दोनदा उपास करतो, व माझ्या सर्व उत्पन्राचा दहावा भाग देतो.’
“परंतु जकातदार दूर अंतरावर उभा राहिला व आपले डोळे स्वर्गाकडे वर न उचलता आपली छाती बडवीत म्हणाला, “हे देवा, मज पापी माणसावर दया कर!’
मी तुम्हांला सांगतो हा मनुष्य, त्या दुसऱ्याया माणसापेक्षा नितीमान ठरुन घरी गेला. कारण जो कोणी स्वत:ला उंच करतो त्याला नीच केले जाईल आणि जो कोणी स्वत:ला नीच करतो त्याला उंच केले जाईल.”
आणि ते आपल्या बालकांनादेखील त्याच्याकडे आणीत यासाठी की त्याने त्यांना स्पर्श करावा. पण जेव्हा शिष्यांनी हे पाहिले तेव्हा ते त्यांना दटावू लागले.
पण येशूने बाळकांना त्याच्याकडे बोलाविले आणि म्हणाला, “बालकांना मजकडे येऊ द्या. त्यांना अडवू नका. कारण देवाचे राज्य त्यांच्यासरख्यांचेच आहे.
मी खरोखर तुम्हांला सांगतो, जो कोणी देवाच्या राज्याचा बालकासारखा स्वीकार करीत नाही. त्याचा स्वर्गात प्रवेश होणार नाही.”
एका यहूदी पुढाऱ्यायाने त्याला विचारले, “उत्तम गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळविण्यासाठी मी काय करु?”
येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? देवाशिवाय कोणीही उत्तम नाही.
“तुला आज्ञा माहीत आहेत: “व्यभिचार करु नको, खून करु नको, चोरी करु नको, खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.’
तो पुढारी म्हणाला, “या सर्व आज्ञा मी माझ्या तरुणपणासून पाळल्या आहेत.”
जेव्हा येशूने हे ऐकले, तेव्हा तो त्याला म्हणाला, “तुझ्यामध्ये अजून एका गोष्टीची उणीव आहे: तुझ्याजवळचे सर्व काही विकून ते गरिबांना वाट, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल. मग ये. माझ्या मागे चल.”
पण जेव्हा त्या पुढाऱ्यायाने हे ऐकले तेव्हा तो फार दु:खी झाला, कारण तो फार श्रीमंत होता.
जेव्हा येशूने पाहिले की, तो दु:खी झाला आहे, तो म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे!
“होय, श्रीमंत माणसाचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाने सुईच्या छिद्रातून जाणे सोपे आहे.
नंतर ज्या लोकांनी हे ऐकले, ते म्हणाला, “तर मग कोणाचे तारण होईल?”
येशू म्हणाला, “ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.”
मग पेत्र म्हणाला, “पाहा, आमच्याकडे जे होते, ते सर्व सोडून आम्ही तुमच्यामागे आलो आहोत.”
येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांस खरे सांगतो, असा कोणीही नाही की ज्याने देवाच्या राज्यासाठी आपले घर किंवा पत्नी कींवा भाऊ, किंवा आईवडील सोडले आहेत, त्यांस या काळात व
येणाऱ्याया काळातील अनंतकाळात याच्यापेक्षा कित्येक पटींनी मिळाले नाही.”
येशूने बारा प्रेषितांना बाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला, “ऐका! आपण वर यरुशलेमास जात आहोत आणि भविष्यवाद्यांनी मनुष्याच्या पुत्राविषयी जे काही लिहिले होते ते पूर्ण होईल.
होय, त्याला विदेश्यांच्या हाती धरुन देण्यात येईल, त्याची कुचेष्टा होईल, त्याची निंदा करतील, त्याच्यावर थुंकतील.
ते त्याला चाबकाचे फटके मारुन रक्तबंबाळ करुन ठार करतील. आणि तो तिसऱ्याया दिवशी मरणातून उठेल.”
शिष्यांना यातील काहीही कळाले नाही. कारण हे वचन त्यांच्यापासून लपवून ठेवण्यात आले होते. आणि तो कशाविषयी बोलत आहे हे त्यांना माहीत नव्हते.
येशू यरीहेजवळ येत असताना एक आंधळा रस्त्यावर बसून भीक मागत होता.
जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्याया समुदायाचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले हे काय चालले आहे.
त्यांनी त्याला सांगितले की, “नासरेथकर येशू जात आहे.”
तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “येशू दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर!”
जे पुढे चालले होते त्यांनी त्याला गप्प राहण्यास सांगितले. परंतु तो आणखी मोठ्याने ओरडून म्हणाला, “दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा!”
येशू थांबला, आणि त्याने आंधळ्याला आपणांकडे आणण्याची आज्ञा केली, जेव्हा आंधळा जवळ आला, तेव्हा येशूने त्याला विचारले,
“तुला काय हवे?” आंधळा मनुष्या म्हणाला, “प्रभु, मला परत दृष्टी प्राप्त व्हावी.”
येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टि येवो: तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
तत्काळ त्याला दृष्टि आली आणि देवाचे गौरव करीत तो येशूच्या मागे गेला. सर्व लोकांनी हे पाहिले आणि देवाची स्तुति केली.

19

येशूने यरीहोत प्रवेश केला आणि यरीहोतून जात होता.
तेथे जक्कय य नावाचा मनुष्या होता. तो मुख्य जकातदार होता आणि खूप श्रीमंत होता.
येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता. परंतु गर्दीमुळे त्याला काही दिसेना, कारण तो बुटका होता.
तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. कारण तो त्याच रस्तयाने पुढे जाणार होता.
येशू जेव्हा त्या ठिकाणी आला तेव्हा वर पाहून जक्कय याला म्हणाला, “जक्कय था, त्वारा कर आणि खाली ये. कारण आज मला तुझ्याच घरी राहायचे आहे.”
मग तो घाईघाईने खाली उतरला आणि आनंदाने त्याचे स्वागत केले.
सर्व लोकांनी ते पाहिले, ते कुरकूर करु लागले. व म्हणू लागले की, “तो पापी माणसाचा पाहुणा होण्यास गेला आहे.”
परंतु जक्कय उभा राहिला व प्रभूला म्हणाला, “गुरुजी, जे माझे आहे त्यातील अर्धे मी गरिबांना दिले असे समजा व मी कोणाला फसवून काही घेतले असेल तर ते चौपट परत करीन.”
येशू त्याला म्हणाला, “आज या घराला तारण मिळाले आहे. कारण हा मनुष्यसुद्धा अब्राहामाचा पुत्र आहे.
कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधावयास व तारावयास आला आहे.”
लोक या गोष्टी ऐकत असतानाच येशूने त्यांना आणखी एक गोष्ट सांगितली, कारण तो यरुशलेमाजवळ होता म्हणून त्यांनी असा विचार केला की, देवाचे राज्य तत्काळ प्रगट होणार आहे.
मग येशू म्हणाला, “कोणी एक उच्च कुळातील मनुष्य आपली त्या भागाचा सरदार म्हणून नियुक्ती करुन घेण्यासाठी व पुन्हा परतण्यासाठी दूरच्या देशी गेला.
त्याने त्याच्या नोकरांपैकी दहा नोकरांना बोलाविले. त्यांना त्याने दहा मोहरा दिल्या. आणि तो त्यांना म्हणाला, “मी परत येईपर्यंत यावर व्यापार करा.
परंतु त्याचे प्रजाजन त्याचा द्वेष करीत असत त्यांनी त्याच्यामागे एक शिष्टमंडळ पाठविले, व सांगितले की, “या माणसाला आमचा राजा करु नका.”
परंतु त्याची राजा म्हणून नेमणूक झाली व तो परत आला. त्याने ज्या नोकरांना पैसे दिले होते त्यांना बोलावणे पाठविले. यासाठी की, त्यांनी त्यापासून किती फायदा मिळविला हे पाहावे.
पहिला वर आला आणि म्हणाला, “धनी तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी दहा नाणी मिळवली आहेत.
तेव्हा तो त्याला म्हणाला, “चांगल्या दासा, छान केलेस, तू थोडक्यांविषयी विश्वासू झालास, म्हणून तू दहा नगरांवर अधिकारी होशील.”
मग दुसरा (नोकर) आला व म्हणाला, “तुमच्या पाच नाण्यांवर मी पाच नाणी आणखी मिळवली.”
आणि तो त्याला म्हणाला, “तू पाच नगरांवर अधिकारी असशील.”
मग दुसरा नोकर आला आणि म्हणाला, “धनी, आपण दिलेले नाणे मी हातरुमालात बांधून ठेवले होते.
आपण कठोर आहात, मला तुमची भीति वाटत होती. जे आपण ठेवले नाही, ते आपण काढता, आणि जे पेरिले नाही, ते कापता.”
धनी त्यास म्हणाला, “दुष्ट माणसा, तुझ्याच शब्दांनी मी तुझा न्याय करतो. तुला ठाऊक होते की मी कडक शिस्तीचा माणूस आहे. मी जे दिले नाही ते घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो,
तर तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? मग जेव्हा मी परत आलो असतो तेव्हा ते मला व्याजासह मिळाले असते.
त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यायांना तो म्हणाला, “त्याच्याजवळून ते नाणे घ्या आणि ज्याच्याजवळ दहा नाणी आहेत, त्याला द्या.’
ते त्याला म्हणाले, “धनी, त्याच्याजवळ दहा नाणी आहेत.’
धन्याने उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगतो, ज्याच्याजवळ आहे, त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, ज्याच्याकडे जे काही असेल ते सुद्धा काढून घेतले जाईल.
परंतु मी राज्य करु नये अशी इच्छा करणाऱ्याया माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर ठार मारा.”‘
येशूने या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरुशलेमापर्यंत गेला.
जेव्हा तो वर जातच राहिला तेव्हा तो जैतून डोंगर म्हटलेल्या टेकडीनजिक असलेल्या बेथफगे आणि बेथानीजवळ आला तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठविले की,
“तुमच्यासमोर असलेल्या खेड्यात जा. तुम्ही प्रवेश करताच, ज्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु तुम्हास आढळेल. ते सोडून येथे आणा.
जर तुम्हांला कोणी विचारले की, “तुम्ही ते का सोडता?” तर म्हणा की, “प्रभूला याची गरज आहे.’
ज्यांना पाठविले होते, ते गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांस आढळले.
ते सोडीत असता त्याचा मालक त्यांना म्हणाला, “तुम्ही शिंगरु का सोडता?”
ते म्हणाले, “प्रभूला याची गरज आहे.”
त्यांनी ते येशूकडे आणले. त्यांनी आपले झगे शिंगरावर घातले आणि येशूला त्याच्यावर बसविले.
येशू रस्त्यावरुन जात असता लोक आपली वस्त्रे रस्त्यावर पसरीत होते.
जेव्हा तो जैतून डोंगराच्या उतरणीवर आला तेव्हा सर्व जनसमुदाय, त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुति करु लागले.
ते म्हणाले, “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो! स्तोत्र. 118:26 स्वर्गात शांति आणि उर्ध्वलोकी देवाला गौरव!”
जमावातील काही परुशी येशूला म्हणाले, “गुरुजी, आपल्या शिष्यांना दटावा.”
त्याने उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगतो, जर ते शांत बसतील तर हे धोंडे ओरडतील!”
जेव्हा तो जवळ आला व त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्यासाठी रडला. आणि म्हणाला,
“जर आज कोणत्या गोष्टी तुला शांति देतील हे माहीत असते तर!, परंतु आता ते तुझ्या नजरेपासून लपवून ठेवण्यात आले आहे.
तुझ्यावर असे दिवस येतील की, तुझे शत्रु तुझ्याभोवती कोट उभारतील. तुला वेढीतील, आणि सर्व बाजूंनी तुला कोंडीत पकडतील.
ते तुला, तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील. व दगडावर दगड राहू देणार नाही. कारण देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही.”
येशूने मंदिरात प्रवेश केला व जे विक्री करीत होते, त्यांना बाहेर हाकलू लागला.
तो त्यांस म्हणाला, “असे लिहिले आहे की, “माझे घर प्रार्थनेचे घर होईल!’ पण तुम्ही ते लुटारुची गुहा केली आहे.”
तो दारोज मंदिरात शिकवीत असे. मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, लोकांचे पुढारी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते.
पण तसे करण्यासाठी त्यांना काही मार्ग सापडत नव्हता. कारण सर्व लोक त्याच्या शब्दांनी खिळून गेले होते.

20

एके दिवशी येशू मंदिरात लोकांना शिक्षण देत असताना व सुवार्ता सांगत असताना एकदा एक मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक, वडीलजनांसह एकत्र वर त्याच्याकडे आले.
ते त्याला म्हणाले, “आम्हांला सांग, कोणत्या अधिकाराने तू या गोष्टी करत आहेस! तुला हा अधिकार कुणी दिला?”
तेव्हा त्याने त्यास उत्तर दिले, “मी सुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारीन, तुम्ही मला सांगा:
योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की मनुष्यापासून?”
त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले, “जर आपण स्वर्गापासून म्हणावे, तर तो म्हणेल, तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?
पण जर आपण मनुष्यांकडून म्हणावे, तर सर्व लोक आपणांस दगडमार करतील कारण त्यांची खात्री होती की, योहान संदेष्टा होता.”
म्हणून त्यांनी असे उत्तर दिले की, तो कोणापासून होता हे त्यांना माहीत नाही.
मग येशू त्यांस म्हणाला, “मग मी या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हांला मी सुध्दा सांगणार नाही.
मग तो लोकांना ही गोष्ट सांगू लागला: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला. व तो काही शेतकऱ्यांना मोलाने देऊन बऱ्यायाच दिवसांसाठी दूर गेला.
हंगामच्या वेळी त्याने नोकराला शेतकऱ्यांकडे पाठविले. यासाठी की, त्यांनी द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावित. पण शेतकऱ्यांनी त्या नोकराला मारले व रिकाम्या हाताने परत पाठविले.
नंतर त्याने दुसऱ्या नोकराला पाठविले, पण त्यालासुद्धा त्यांनी मारले. त्या नोकराला त्यांनी लज्जास्पद वागणूक दिली. आणि रिकाम्या हाताने परत पाठविले.
तेव्हा त्याने तिसऱ्या नोकराला पाठविले. पण त्यालाही त्यांनी जखमी करुन बाहेर फेकून दिले.
द्राक्षमळ्याचा मालक म्हणाला, “मी काय करु? मी माझा स्वत:चा प्रिय पुत्र पाठवतो. कदाचित ते त्याला मान देतील.
पण जेव्हा शेतकऱ्यांनी मुलाला पाहिले, तेव्हा त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले, “हा तर वारस आहे, आपण त्याला ठार मारु, म्हणजे वतन आपले होईल.”
त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व ठार मारले. “तर मग द्राक्षमळ्याचा मालक काय करील?
तो येईल आणि त्या शेतक ऱ्यांना ठार मारील व तो द्राक्षमळा दुसऱ्यांना सोपवून देईल.” त्यांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, “असे कधीही न होवो.”
येशूने त्यांच्याकडे पाहिले व म्हटले, ““तर मग जो दगड बांधणाऱ्यांनी नकारला तोच कोनशिला झाला’ स्तोत्र.118:22 असे जे लिहिले आहे त्याचा अर्थ काय?”
जो कोणी त्याच्यावर पडेल त्याचे तुकडे होतील परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा चुराडा होईल.”
नियमशास्त्राचे शिक्षक आणि मुख्य याजक यांनी त्याचवेळी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना लोकांची भीति वाटत होती. त्यांना त्याला अटक करायचे होते, कारण त्यांना माहीत होते की, हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता.
तेव्हा त्यानी त्याच्यावर पाळत ठेवली. आणि आपण प्रामाणिक आहोत असे भासविणारे हेर पाठविले. त्यांची अशी योजना होती की, त्याच्या बोलण्यात त्याला पकडावे म्हणजे त्यांना त्याला राज्यपालाच्या ताब्यात देऊन त्यांच्या अधिकाराच्या कक्षेत आणता आले असते. अधिकारामध्ये सुपूर्त करता आले असते.
म्हणून त्या हेरांनी त्याला प्रश्न विचारला. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हांला माहीत आहे की, जे योग्य ते तुम्ही बोलता व शिकविता आणि तुम्ही पक्षपात करीत नाही. तर सत्याने देवाचा मार्ग शिकविता.
आम्ही कैसराला कर द्यावा हे योग्य आहे किंवा नाही?”
ते धूर्तपणे आपल्याला फसवू पाहत आहेत याची येशूला कल्पना होती.
“मला एक नाणे दाखवा. त्यावर कोणाचा मुखवटा व शिश्चा आहे?” ते म्हणाले, “कैसराचा.”
तेव्हा तो त्यांना म्हणाला, “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला द्या.”
तेव्हा लोकांसमोर तो जे बोलला त्यात त्याला धरणे त्यांना शक्य झाले नाही. त्याच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले. आणि शांत झाले.
मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले. त्यांनी त्याला प्रश्न विचारला. ते म्हणाले,
ʇगुरुजी मोशेने आमच्यासाठी लिहून ठेवले आहे की जर एखाद्याचा भाऊ मेला, व त्या भावला पत्नी आहे पण मूल नाही, तर त्याच्या भावाने त्या विधवेशी लग्न करावे आणि भावासाठी त्याला मुले व्हावीत.
सात भाऊ होते. पाहिल्या भावाने लग्न केले व तो मूल न होता मेला.
नंतर दुसऱ्या भावाने तिच्याशी लग्न केले.
नंतर तिसऱ्याने तिच्याशी लग्न केले. सातही भावांबरोबर तीच गोष्ट घडली. कोणालाही मुले न होता ते मरण पावले.
नंतर ती स्त्रीही मरण पावली.
तर मग पुनरुत्थानाच्या वेळी ती कोणाची पत्नी होईल? कारण त्या सातांनीही तिच्याबरोबर लग्न केले होते.
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “या युगातले लोक लग्न करुन घेतात व लग्न करुन देतात.
परंतु जे लोक त्या येणाऱ्या युगामध्ये व मृतांच्या पुनरुत्थानामध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरतील, ते लग्न्न करुन घेणार नाहीत, आणि लग्न्न करुन देणार नाहीत
आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतासारखे आहेत. ते पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचे पुत्रही आहेत.
जळत्या झुडुपाविषयी मोशेने लिहिले, तेव्हा त्याने परमेश्वाराला अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव असे म्हटले व मेलेलेसुद्धा उठविले जातात हे दाखवून दिले.
देव मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. सर्व लोक जे त्याचे आहेत ते जिवंत आहेत.”
काही नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले, “गुरुजी, उत्तम बोललात!”
तेव्हा त्याला आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही.
परंतु तो त्यांना म्हणाला, “ख्रिस्त दावीदाचा पुत्र आहे असे ते कसे म्हणतात?
कारण दावीद स्वत: स्तोत्राच्या पुस्तकात म्हणतो, “प्रभु माइया प्रभूला म्हणाला: तू माइया उजवीकडे बैस,
जोपर्यंत मी तुइया शत्रूला तुइया पायाखालचे आसन करीत नाही तोपर्यंत.’ स्तोत्र. 110:1
अशा रीतिने दावीद त्याला “प्रभु’ म्हणतो, तर मग ख्रिस्त दावीदाचा पुत्र कसा?’
सर्व लोक हे ऐकत असताना तो शिष्यांना म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा, त्यांना लांब झगे घालून फिरणे आवडते,
त्यांना बाजारात नमस्कार घेण्यास, सभास्थानात महत्त्वाच्या आसनावर व मेजवानीच्या वेळी मानाच्या जागी बसणे आवडते.
ते विधवांची घरे खाऊन फस्त करतात आणि देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात. या माणसांना अत्यंत वाईट शिक्षा होईल.

21

येशूने वर पाहिले व श्रीमंत लोकांना दानपेटीत दाने टाकताना न्याहाळले.
त्याने एका गरीब विधवेलाही तांब्याची दोन नाणी टाकताना पाहिले.
तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले. (मी असे म्हणतो)
कारण या सर्व लोकांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु तिने गरीब असून आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.
शिष्यातील काही जण मंदिराविषयी असे बोलत होते की, ते सुंदर पाषाणांनी आणि नवसाच्या अर्पणांनी सुशोभित केले आहे. येशू म्हणाला,
“या गोष्टी तुम्ही पाहताना असे दिवस येतील की, एकावर एक असा एकही दगड ठेवला जाणार नाही. ते सर्व पाडले जातील.”
त्यांनी त्याला प्रश्न विचारला आणि ते म्हणाले, “गुरुजी या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी घडणार आहेत यासंबंधी कोणते चिन्ह असेल?”
आणि तो म्हणाला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. कारण माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि तो “मी आहे’ असे म्हणतील. आणि ते म्हणतील, “वेळ जवळ आली आहे.’ त्यांच्यामागे जाऊ नका!
जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरु नका. कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण एवढ्यात शेवट होणार नाही.”
मग तो त्यांना म्हणाला, “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल.
मोठे भूंकप होतील, दुष्काळ पडतील, आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील. आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.
परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुम्हांला अटक करतील. ते तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हांस सभस्थानांसमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हांला राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील.
यामुळे तुम्हांला माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल.
“आपला स्वत:चा बचाव कसा करायचा याविषयी काळजी करायची नाही अशी मनाची तयारी करा,
कारण मी तुम्हांला असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुद्ध बोलायला मुळीच जमणार नाही.
“परंतु आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हांपैकी काही जणांना ठार मारतील.
माझ्या नावामुळे सर्व जण तुमचा द्वेष करतील.
परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही.
आपल्या सहनशीलतेने तुम्ही जिवाचे रक्षण कराल.
जव्हा तुम्ही यरुशलेमाला सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हांला कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे.
जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांमध्ये पळून गेले पाहिजे. जे रानात आहेत त्यांनी शहरात जाऊ नये.
ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत.
त्या दिवसांत ज्या गरोदर स्रिया आहेत, व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्रिया आहेत, त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल. अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल. मी असे म्हणतो कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर देवाचा कोप ओढवेल.
ते तरवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना बंदीवान करुन राष्ट्रांत नेतील आणि यहूदीतर लोकांचा काळ संपेपर्यंत यहूदीतर राष्ट्रे यरुशलेम पायाखाली तुडवतील.
“सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील.
भीतीमुळे लोक बेशुद्ध होतील आणि जगात काय घडणार आहे ह्या धास्तीमुळे व भीतिमुळे लोक दुर्बल होतील. आकाशातील सामर्थ्ये डळमळीत होतील.
नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने मेघात येताना पाहतील.
मग या गोष्टी घडण्यास आरंभ होईल, तेव्हा सरळ उभे राहा. आणि तुमचे मस्तक वर करा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.”
नंतर त्याने त्यांस एक बोधकथा सांगितली: “अंजिराच्या झाडाकडे व इतर दुसऱ्या सर्व झाडांकडे पाहा.
त्यांना पालवी येऊ लागली की, तुमचे तुम्हीच समजता की, उन्हाळा अगदी जवळ आला आहे.
त्याचप्रमाणे या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे.
मी तुम्हांस खरे सांगतो की, ह्या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.
आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
सावध राहा, दारुबाजी आणि अधाशीपणात तुमचा वेळ घालवू नका, किंवा ऐहिक गोष्टींमध्ये मग्न राहू नका. जर तुम्ही तसे कराल, तर तुम्ही व्यवस्थित विचार करु शकणार नाही, व तुम्ही तयार नसताना तो दिवस (शेवट) अकस्मात तुमच्यावर येईल.
खरोखर, तो पृथ्वीवर असणाऱ्या सर्व जिवंतांवर येईल.
सर्व समची जागृत राहा. होणाऱ्या सर्व गोष्टींपासून जिवंत राहण्यासाठी आणि विश्वासाने मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहणे शक्य व्हावे यासाठी प्रार्थना करा.”
दर दिवशी तो मंदिरात शिक्षण देत असे. परंतु रात्री मात्र तो जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर जात असे.
सर्व लोक मंदिरात जाण्यासाठी व त्याचे ऐकण्यासाठी पहाटेस उठून त्याच्याकडे जात.

22

नंतर बेखमीर भाकरीचा सण ज्याला वल्हांडण म्हणतात, तो समय जवळ येत होता.
आणि मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, येशूला कसे मारता येईल हे बघत होते. कारण त्यांना लोकांची भीति वाटत होती.
नंतर सैतान यहूदामध्ये, ज्याला इस्कर्योत म्हणत, व जो बारा जणांपैकी एक होता, त्याच्यात शिरला.
यहूदा मुख्य याजक व मंदिराचे अधिकारी यांच्याकडे गेला आणि येशूला त्यांच्या हाती कसे धरुन देता येईल याविषयी त्याने बोलणी केली.
त्यांना फार आनंद झाला व त्यांनी त्याला पैसे देण्याचे मान्य केले.
म्हणून त्याने संमति दर्शविली आणि तो येशूला गर्दी नसेल तेव्हा धरुन त्यांच्या हाती देण्याची संधि शोधू लागला.
बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरु मारावयाचे तो दिवस आला.
तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना सांगून पाठविले की, “जा आणि आपणांसाठी वल्हांडण सणाचे भोजन तयार करा म्हणजे आपण ते खाऊ.”
पेत्र व योहान येशूला म्हणाले, “आम्ही ते कोठे करावे अशी तुमची इच्छा आहे?”
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही नगरात प्रवेश कराल तेव्हा पाण्याचे भांडे घेऊन जाणारा एक मनुष्य तुम्हांला भेटेल. तो ज्या घरात जाईल तेथे जा.
आणि घरमालकांस सांगा, “गुरुजींनी तुम्हांला विचारले आहे की, माझ्या शिष्यांसह वल्हांडण सणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कोठे आहे?’
तो मनुष्य तुम्हांला माडीवरील सजविलेली खोली दाखवील. तेथे तयारी करा.”
तेव्हा पेत्र व योहान तेथून निघाले. जसे येशूने सांगितले तसेच सर्व घडले तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
वेळ झाली तेव्हा येशू त्याच्या शिष्यांसह भोजनास बसला.
तो त्यांना म्हणाला, “मी दु:ख भोगण्यापूर्वी तुमच्याबरोबर वल्हांडण सणाचे भोजन घ्यावे अशी माझी फार इच्छा होती.
कारण मी तुम्हांस सांगतो की, देवाच्या राज्यात हे परिपूर्ण होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही.”
नंतर त्याने पेला घेतला आणि उपकार मानले. तो म्हणाला, “हे घ्या, आणि आपसात वाटून घ्या.
कारण मी तुम्हांस सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत यापुढे मी द्राक्षफळांचा रस घेणार नाही.”
नंतर त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. त्याने ती मोडली आणि त्यांना दिली व म्हणाला, “हे माझे शरीर आहे जे तुम्हांसाठी दिले आहे. माझ्या आठवणीसाठी हे करा.”
त्याचप्रमाणे त्यांचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जो तुमच्यासाठी ओतला जात आहे.”
परंतु पाहा! माझा विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्याबरोबरच मेजावर आहे.
कारण मनुष्याचा पुत्र जसे निश्चित केले आहे, त्याप्रमाणे मरावयास जाईल. परंतु ज्याने त्याचा विश्वासघात केला आहे, त्याचा धिश्चार असो.”
आणि ते आपापसात एकमेकाला प्रश्न विचारु लागले, “हे करणारा आपणापैकी कोण असावा?”
ततेच, त्यांच्यामध्ये अशासंबंधी वाद निर्माण झाला की, त्यांच्यामध्ये सर्वांत श्रेष्ठ कोण आहे.
पण येशू त्यांना म्हणाला, विदेश्यांचे राजे त्यांच्या लोकांवर (प्रजेवर) सत्ता गाजवितात. इतर लोकांवर अधिकार असणारी माणसे लोकांनी त्यांना लोकांचे उपकारकर्ते म्हणण्यास भाग पाडतात. (स्वत:ला उपकारकर्ते म्हणवून घेतात.)
परंतु तुम्ही तसे नाही. त्याऐवजी तुमच्यातील सर्वांत मोठा असलेल्याने सर्वांत लहान व्हावे व जो अधिकारी आहे त्याने सेवक व्हावे.
तेव्हा मोठा कोण: जो मेजावर बसतो तो की जो सेवा करतो तो? जो मेजावर बसतो तो नाही का? परंतु मी तुम्हांमध्ये सेवा करणारासारखा आहे.
परंतु माझ्या परीक्षेमध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेले असे तुम्हीच आहात.
ज्याप्रमाणे माझ्या पित्याने माझी नियुक्ति केली तशी मी तुमची नियुक्ति राज्यावर करतो.
म्हणून तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि आसनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करावा.
शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे.
परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना कसून केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.
परंतु शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभु, मी तुझ्याबरोबर तुरुंगात जाण्यासाठी व मरण्यासाठी तयार आहे.”
पण येशू म्हणाला, “पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे तीन वेळा नाकारीपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही.”
येशू शिष्यांना म्हणाला, “जेव्हा मी तुम्हांला थैली, पिशवी व वहाणांशिवाय पाठविले, तेव्हा तुम्हांस काही कमी पडले का?” ते म्हणाले, “काहीही नाही.”
तो त्यांना म्हणाला, “पण आता, ज्याच्याजवळ थैली आहे त्याने ती घ्यावी व त्याने पिशवीसुद्धा घ्यावी. आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपला झगा विकावा आणि एक विकत घ्यावी.
कारण मी तुम्हांस सांगतो, हा शास्त्रभाग माझ्यामध्ये परिपूर्ण झालाच पाहिजे: “आणि तो अपराधी असा गणला गेला.’ यशया 53:12 होय, हा माझ्याविषयीचा संदर्भ पूर्ण होत आहे.”
ते म्हणाले, “प्रभु, पहा, येथे दोन तरवारी आहेत.” तो त्यांना म्हणाला, “तेवढे पुरे!”
तो निघाला आणि नेहमीप्रमाणे जैतूनाच्या डोंगराकडे गेला व शिष्यही त्याच्या मागोमाग गेले.
तो त्या ठिकाणी आला तेव्हा त्यांना म्हणाला, “तुम्ही मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
तो त्यांच्यापासून दगडाच्या टप्प्याइतका दूर गेल्यानंतर त्याने गुडघे टेकले. आणि अशी प्रार्थना केली,
“पित्या, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माइयाकडून घे. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छंप्रमाणे होऊ दे.”
स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्याला सामर्थ्य देत राहिला
दु;खाने ग्रासलेला असतानासुद्धा त्याने अधिक काकुळतीने प्रार्थना केली. आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता.
आणि जेव्हा प्रार्थना करुन तो उठला आणि शिष्यांकडे आला तेव्हा ते त्यांच्या दु:खामुळे थकून जाऊन झोपी गेलेले आढळले.
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का झोपत आहात? उठा, आणि मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
तो बोलत असता लोकांचा जमाव आला. आणि बारा शिष्यातील यहूदा इस्कर्योत म्हटलेला एक जण त्यांच्यापुढे चालत होता. येशूचे चुंबन घेण्यासाठी तो त्याच्याजवळ आला.
परंतु येशू त्यास म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राचा तू विश्वासघात करतोस काय?”
त्याच्याभोवती जे होते ते काय होणार हे पाहून म्हणाले, “प्रभु. आम्ही तलवारीने मारावे काय?”
त्यांच्यापैकी एकाने मुख्य याजकाच्या नोकरावर वार केला आणि त्याचा उजवा कान कापला.
येशूने उत्तर दिले, “असे काही करु नका. त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्याला बरे केले.
नंतर येशू मुख्य याजक, मंदिराचे मुख्य अधिकारी आणि वडील जे त्याच्यावर चालून आले होते, त्यांना म्हणाला, “तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन माझ्यावर चालून आलात, जसा काय मी लुटारु आहे.
मी तर तुम्हांबरेबर दररोज मंदिरात असे आणि तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. परंतु ही तुमची आणि अंधाराची राज्य करण्याची वेळ आहे.”
त्यांनी त्याला अटक केली व ते त्याला मुख्य याजकाच्या घरी घेऊन गेले. पण पेत्र दुरुन त्यांच्या मागे चालला.
त्यांनी अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटविला, आणि त्याच्याभोवती बसले. पेत्रही त्यांच्यात बसला.
एका दासीने तेथे त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहिले. तिने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि ती म्हणाली, “हा मनुष्यही त्याच्याबरोबर होता.”
पेत्र ते नाकारुन म्हणाला, “बाई, मी त्याला ओळखत नाही!”
थोड्या वेळानंतर दुसऱ्या मनुष्याने त्याला पाहिले आणि म्हणाला, “तू सुद्धा त्यांच्यापैकी एक आहेस!” पण पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही!”
नंतर सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण ठामपणे म्हणाला, “खात्रीने हा मनुष्यसुद्धा त्याच्याबरोबर होता, कारण हा गालीलाचा आहे.”
परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था तू काय बोलतोस ते मला कळत नाही!” तो बोलत असताना त्याच क्षणी कोंबडा आरवला.
आणि प्रभुने वळून पेत्राकडे पाहिले. पेत्राला प्रभूने उच्चारलेले वाक्य आठवले. “आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा माल नकारशील,” असे सांगितलेले त्याला आठवले.
मग तो बाहेर गेला आणि अतिदु:खाने रडला.
येशूवर पहारा देणाऱ्या लोकांनी त्याचा उपहास करायला व त्याला मारायला सुरुवात केली.
त्यांनी त्याचे डोळे बांधले, व त्याला प्रश्न विचारु लागले. ते म्हणाले, “ओळख बघू! तुला कोणी मारले?”
आणि ते त्याचा अपमान करण्यासाठी आणखी पुष्कळ काही बोलले.
दिवस उगवला तेव्हा वडील लोकांची म्हणजे त्यात दोन्ही प्रकारचे लोक, मुख्य याजक, व नियमशास्त्राचे शिक्षक यांची सभा भरली. आणि ते त्याला त्यांच्या सभेत घेऊन गेले.
ते म्हणाले, “जर तू ख्रिस्त आहेस तर आम्हांला सांग.” येशू त्यांना म्हणाला, “जरी मी तुम्हांला सागितले तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही.
आणि जरी मी तुम्हांला प्रश्न विचारला तरी तुम्ही उत्तर देणार नाही.
पण आतापासून मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेला असेल.”
ते सर्व म्हणाले, “तर मग तू देवाचा पुत्र आहेस काय? त्याने त्यांना उत्तर दिले, “मी आहे असे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.”
मग ते म्हणाले, “आता आपल्याला आणखी साक्षीची काय गरज आहे? आपण स्वत: त्याच्या तोंडचे शब्द ऐकले आहेत.”

23

मग त्यांचा सर्व समुदाय उठला, व त्यांनी त्याला (येशूला) पिलाताकडे नेले.
व ते त्याच्यावर आरोप करु लागले. ते म्हणाले, “आम्ही या माणसाला लोकांची दिशाभूल करताना पकडले. तो कैसराला कर देण्यासाठी विरोध करतो आणि म्हणतो की, तो स्वत: ख्रिस्त, एक राजा आहे.”
मग पिलाताने येशूला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशू म्हणाला, “मी आहे हे तू म्हणतोस ते बरोबर आहे.”
मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, “या माणसावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही.”
पण त्यांनी आग्रह धरला. ते म्हणाले, “यहूदीयातील सर्व लोकांना तो आपल्या शिकवणीने भडकावीत आहे, त्याने गालीलापासून सुरुवात केली आणि येथपर्यंत आला आहे.”
पिलाताने हे ऐकले, तेव्हा त्याने विचारले की, “हा मनुष्य गालीलाचा आहे काय?”
जेव्हा त्याला समजले की, येशू हेरोदाच्या अंमलाखाली येतो. तेव्हा त्याने त्याला हेरोदाकडे पाठविले. तो त्या दिवसांत यरुशलेमामध्येच होता.
हेरोदाने येशूला पाहिले तेव्हा त्याला फार आनंद झाला, कारण त्याने त्याजविषयी ऐकले होते, व त्याला असे वाटत होते की, तो एखादा चमत्कार करील व आपल्याला तो बघायला मिळेल
त्याने येशूला अनेक प्रश्न विचारले, पण येशूने त्याला उत्तर दिले नाही.
मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक तेथे उभे होते. ते त्याच्याविरुद्ध जोरदारपणे आरोप करीत होते.
हेरोदाने त्याच्या शिपायांसह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्याला पिलाताकडे परत पाठविले.
त्याच दिवशी हेरोद आणि पिलात एकमेकांचे मित्र बनले. त्यापूर्वी ते एकमेकांचे वैरी होते.
पिलाताने मुख्य याजक, पुढारी आणि लोकांना एकत्र बोलावले.
तो त्यांना म्हणला, “तुम्ही या माणसाला तो लोकांना भडकावीत होता म्हणून आणले, आता मी त्याची तुमच्यासमोर चौकशी केली आहे आणि तुम्ही त्याच्याविरुद्ध जे आरोप करीत आहात त्यासाठी मला काहीही आधार सापडत नाही.
हेरोदालाही आरोपाविषयी काहीही आधार सापडला नाही. कारण त्याने त्याला परत आमच्याकडे आणले आहे. तुम्हीही पाहू शकता की, मरणाची शिक्षा देण्यास योग्य असे त्याने काहीही केलेले नाही.
म्हणून मी याला फटके मारुन सोडून देतो.
पण ते सर्व एकत्र मोठ्याने ओरडले, “या माणसाला ठार करा! आणि आम्हांसाठी बरब्बाला सोडा!”
(बरब्बाने शहरात खळबळ माजवली होती. त्याने काही लोकांना ठारही केले होते, त्यामुळे त्याला तुरुंगात टाकले होते.)
पुन्हा पिलात त्यांच्याशी बोलला, कारण येशूला सोडण्याची त्याची इच्छा होती.
पण ते ओरडतच राहिले, “त्याला वधस्तंभावर खिळा, त्याला वध्स्तंभावर खिळा!”
तिसऱ्यांदा पिलात त्यांना म्हणाला, “परंतु या माणसाने असा कोणता गुन्हा केला आहे? मरणाची शिक्षा देण्यायोग्य असे मला याच्याविरुद्ध काहीही आढळले नाही. यास्तव मी याला फटक्याची शिक्षा सांगून सोडून देतो.”
परंतु ते मोठ्याने ओरडतच राहिले आणि त्याला वधंस्तंभावर खिळण्याची मागणी करु लागले. आणि त्यांच्या ओरडण्याचा विजय झाला.
पिलाताने त्यांची मागणी मान्य करण्याचे ठरविले.
जो मनुष्य दंगा आणि खून यासाठी तुरुंगात टाकला गेला होता, व ज्याची त्यांनी मागणी केली होती त्याला त्याने सोडून दिले. पिलाताने त्यांच्या इच्छे प्रमाणे करण्यासाठी येशूला त्यांच्या हाती दिले.
ते त्याला घेऊन जात असताना, कुरेने येथील शिमोन नावाच्या मनुष्याला त्यांनी धरले. तो शेताकडून येत होता. त्यांनी वधस्तंभ त्याच्यावर ठेवला व त्यांनी त्याला तो वधस्तंभ येशूच्या मगे वाहावयास लावला.
लोकांचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालला होता. त्यामध्ये त्याच्यासाठी शोक करणाऱ्या आणि रडणाऱ्या काही स्त्रियांचाही समावेश होता.
येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वत:साठी आणि आपल्या मुलांबाळांसाठी रडा.
कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा लोक म्हणतील, “धन्य त्या स्त्रिया ज्या वांझ आहेत, आणि धन्य ती गर्भाशये, ज्यांनी जन्मदिले नाहीत, व धन्य ती स्तने, ज्यांनी कधी पाजले नाही.’
तेव्हा ते पर्वतास म्हणतील, “आम्हांवर पडा!” आणि ते टेकड्यांस म्हणतील. “आम्हांला झाका!”
जर लोक असे करतात जेव्हा झाड हिरवे असते, तर झाड सुकल्यावर काय होईल?”
दोन दुसरी माणसे जी दोघेही गुन्हेगार होती, त्यांनाही मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी नेत होते.
आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्याला वधस्तंभी गुन्हेगारांमध्ये खिळले. एका गुन्हेगारला त्यांनी उजवीकडे ठेवले व दुसऱ्याला डावीकडे ठेवले.
नंतर येशू म्हणाला, “हे बापा, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” त्यांनी चिठ्ृया टाकून त्याचे कपडे वाटून घेतले.
लोक तेथे पाहात उभे होते. आणि पुढारी थट्टा करुन म्हणाले, “त्याने दुसऱ्यांना वाचविले, जर तो ख्रिस्त, देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वत:ला वाचवावे!”
शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला आंब दिली.
आणि ते म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वत:ला वाचव!”
त्याच्यावर असे लिहिले होते: “हा यहूदी लोकांचा राजा आहे.”
तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याचा अपमान केला. तो म्हणाला, “तू ख्रिस्त नाहीस काय? स्वत:ला व आम्हालाही वाचव!”
पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्याला दटावले आणि म्हणाला, “तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे.
पण आपली शिक्षा योग्य आहे. कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणांस मिळत आहे. पण या माणसाने काहीही अयोग्य केले नाही.”
नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्याधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर.”
येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”
त्यावेळी जवळजवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही.
आणि मंदिरातील पडदा फाटला आणि त्याचे दोन भाग झाले.
येशू मोठ्या आवाजात ओरडला, “पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” असे म्हटल्यानंतर तो मेला.
जेव्हा रोमी सेवाधिकाऱ्याने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.”
हे दृष्य पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी घडलेल्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा ते छाती बडवीत परत गेले.
परंतु त्याच्या ओळखीचे सर्वजण हे पाहण्यासाठी दूर उभे राहिले. त्यामध्ये गालीलाहून त्याच्यामागे आलेल्या स्त्रियाही होत्या.
तेथे एक योसेफ नावाचा एक मनुष्य होता. तो यहूदी सभेचा सभासद होता. तो चांगला आणि धार्मिक मनुष्य होता.
तो सभेच्या निर्णयाशी व कृतीशी सहमत नव्हता. तो यहूदीयातील अरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता.
हा मनुष्य पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले.
ते त्याने वधस्तंभावरुन खाली काढले आणि तागाच्या वस्त्रात गुंडाळले. नंतर ते खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ही कबर अशी होती की, जिच्यात तोपर्यंत कोणाला ही ठेवले नव्हते.
तो शुक्रवार (तयारीचा दिवस) होता, आणि शब्बाथ सुरु होणार होता.
गालीलाहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्यामध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले. 56नंतर त्या घरी गेल्या व त्यांनी सुगंधी मसाले आणि लेप तयार केले. शब्बाथ दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विसावा घेतला.

24

आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या, आणि त्यांनी स्वत: तयार केलेले मसाले आणले.
त्यांना दगड कबरेवरुन लोटलेला आढळला.
त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभु येशूचे शरीर सापडले नाही.
यामुळे त्या अवाक्‌ झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरुष त्यांच्या बाजूला उभे राहिले.
अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे वळविले. ते दोन पुरुष त्यांना म्हणाले, “जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मेलेल्यांमध्ये का करता?
तो येथे नाही; तो उठला आहे! तो गलीलात असताना त्याने तुम्हांला काय सांगितले याची आठवण करा.
तो असे म्हणाला की, मनुष्याच्या पुत्राला धरुन पापी लोकांच्या हाती द्यावे, त्याला वधस्तंभावर खिळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे.
नंतर स्त्रियांना येशूच्या शब्दाची आठवण झाली.
त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले.
त्या स्त्रिया मरीया मग्दालिया, योहान्न, आणि याकोबाची आई मरीया ह्या होत्या. त्या आणि इतर स्त्रियांसुद्धा ज्या त्यांच्याबरोबर होत्या, प्रेषितांना या गोष्टी सांगत होत्या.
पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले. आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.
पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्याला तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वत:शीच आश्चर्य करीत दूर गेला.
त्याचा दिवशी त्याच्यातील दोघे शिष्य यरुशलेमापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते.
ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते.
ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वत: आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला.
पण त्यांचे डोळे त्याला ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते.
येशू त्यांना म्हणाला, “चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?” चालता चालता ते थांबले. ते अतिशय दु:खी दिसले.
त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्याला म्हणला, “ह्या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरुशलेमात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?”
येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या मते कोणत्या गोष्टी?” ते त्याला म्हणाले, “नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला.
आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या प्रमुख याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्याला मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले. आणि त्यांनी त्याला वधस्तंभी खिळले.
आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील. आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत.
आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हांला थश्च केले आहे: आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या, परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही.
त्यांनी येऊन आम्हांला सांगितले की, त्यांना देवदूतांचा दृष्टात घडला आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.
तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेले, आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते, तसेच त्यांना आढळले, पण त्यांनी त्याला पाहिले नाही.”
मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात.
ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?”
आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करुन आणि सर्व संदेष्ट्यापर्यंत सांगून, पवित्र शास्त्रात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करुन सांगितले.
ज्या खेड्याकडे ते जात होते, त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाणा केला की, जणू काय तो पुढे जाणार आहे.
परंतु जास्त आग्रह करुन ते म्हणाले, “आमच्या बरोबर राहा. कारण जवळजवळ संध्याकाळ झालीच आहे. आणि दिवसही जवळजवळ मावळला आहे.” मग तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला.
जेव्हा तो त्यांच्याबोरबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला.
तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्याला ओळखले. पण तो त्यांच्यातून अदुश्य झाला.
मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट करुन सांगत असताना आपली अंत:करणे आतल्या आत उकळत नव्हती काय?”
मग ते लगेच उठले, व यरुशलेमेस परत गेले. तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले.
प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभु उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.”
नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्याला सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्याला कसे ओळखले ते सांगितले.
ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांस म्हणाला, “तुम्हांस शांति असो.”
ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की, ते भूत पाहत आहेत.
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या?
माझे हात व पाय पाहा. तुम्हाला मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पाहा की, मला आहे तसे हाडमांस भुताला नसते.
असे बोलून त्याने त्यांस आपले हातपाय दाखवले. तरीही त्यांच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना.
ते आश्चर्यचकित झाले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “येथे तुमच्याजवळ खाण्यासाठी काय आहे?”
खरे त्यांनी त्याला भाजलेला माशाचा तुकडा दिला.
त्याने तो घेतला व त्यांच्यासमोर खाल्ला.
तो त्यांना म्हणाला, “ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हांबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, भविष्यवादी आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”
नंतर पवित्र शास्त्र समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली.
मग तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख भोगावे आणि मेलेल्यांतून तिसऱ्या दिवशी उठावे.
आणि यरुशलेमापासून सुरुवात करुन सर्व राष्ट्रांस माझ्या पित्याने जे वचन दिले आहे ते पाठवीन. पापक्षमेसाठी पश्चात्तापाची घोषणा करावी.
या गोष्टींचे तुम्ही साक्षी आहात.
आता मी तुम्हांला माझ्या पित्याने जे वचन दिले आहे ते पाठविन. परंतु जोपर्यंत तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने भरले जात नाही तोपर्यंत तुम्ही या शहरातच राहा.”
नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करुन आशीर्वाद दिला.
तो त्यांना आशीर्वाद देत असतानाच तो त्यांना सोडून गेला. आणि त्याला स्वर्गात घेण्यात आले.
नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरुशलेमाला परतले.
आणि देवाची सतत स्तुति करीत ते मंदिरात राहिले.

Rechtsinhaber*in
Multilingual Bible Corpus

Zitationsvorschlag für dieses Objekt
TextGrid Repository (2025). Marathi Collection. Luke (Marathi). Luke (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. Multilingual Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A8A4-1