1

इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानातील दर्शनमंडपात परमेश्वर मोशेशी बोलला; तो म्हणाला,
“सर्व इस्राएल लोकांची शिरगणती कर; प्रत्येक पुरुषाचे नांव, त्याचे कूळ आणि त्याच्या वाडवडिलांचे घराणे ह्यांच्यासह त्यांच्या नावांची यादी कर.
वीस वर्षाचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके पुरुष युद्धास लायक असतील त्या सर्वाची त्यांच्या दलाप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा.
प्रत्येक वंशातला एकजण तुम्हाला मदत करील तो त्या वंशाचा प्रमुख असेल.
तुमच्याबरोबर राहून तुम्हाला मदत करणाऱ्यांची नावे ही: रऊबेन वंशातला शदेयुराचा मुलगा अलीसूर;
शिमोन वंशातला सुरीशादैचा मुलगा शलूमियेल;
यहुदा वंशातला अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन;
इस्साखार वंशातला सुवाराचा मुलगा नथनेल;
जबुलून वंशातला हेलोनाचा मुलगा अलीयाब;
योसेफ पुत्राच्या वंशात म्हणजे एफ्राइम वंशातला अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा, आणि मनश्शे वंशातला पदाहसुराचा मुलगा गमलीयेल.
बन्यामीन वंशातला गदोनीचा मुलगा अबीदान;
दान वंशातला आम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर;
आशेर वंशातला आक्रानाचा मुलगा पागीयेल;
गाद वंशातला दगुवेलाचा मुलगा एल्यासाप;
नफताली वंशातला एनानाचा मुलगा अहीरा;”
1हे सर्वजण आपापल्या घराण्याचे प्रमुख होते; लोकांनीही त्यांना आपापल्या कुळाचे सरदार म्हणून निवडले.
प्रमुख म्हणून निवडलेल्या ह्या सर्वांना मोशे व अहरोन ह्यांनी आपल्याबरोबर घेतले;
आणि त्यांनी सर्व इस्राएल लोकांना एकत्र जमविले; मग त्यांच्या कुळांप्रमाणे व त्यांच्या घराण्यांप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली. वीस किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांची यादी करण्यात आली.
परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे त्याने सीनाय रानात त्यांची गणती केली.
इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र-थोरला मुलगा-रऊबेन ह्याच्या वंशाचे लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी त्यांची गणना करण्यात आली. ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली; त्यांची यादी घराणी आणि कुळे ह्यांच्याप्रमाणे करण्यात आली.
ती मोजदाद एकूण शेहेचाळीस हजार पाचशे भरली.
शिमोन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक क्याचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली;
ती मोजदाद एकूण एकुणसाठ हजार तीनशे भरली.
गाद वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक क्याचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली;
ती मोजदाद एकूण पंचेचाळीसहजार सहाशे पन्नास भरली.
यहुदा वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते, त्या सर्वाची नोंद करण्यात आली;
ती मोजदाद एकूण चौऱ्याहत्तर हजार सहाशे भरली.
इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वाची नोंद करण्यात आली;
ती मोजदाद एकूण चोपन्न हजार चारशे भरली.
जबुलून वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोद करण्यात आली;
ती मोजदाद एकूण सत्तावन्न हजार चारशे भरली.
योसेफ पुत्रांपैकी एफ्राइम वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
3ती मोजदाद एकूण चाळीस हजार पाचशे भरली.
मनश्शे वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
ती मोजदाद एकूण बत्तीस हजार दोनशे भरली.
बन्यामीन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
ती मोजदाद एकूण पस्तीस हजार चारशे भरली.
दान वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
ती मोजदाद एकूण बासष्ट हजार सातशे भरली.
आशेर वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
ती मोजदाद एकूण एकेचाळीस हजार पाचशे भरली.
नफताली वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली.
ती मोजदाद एकूण त्रेपन्न हजार चारशे भरली.
मोशे, अहरोन आणि इस्राएलांच्या प्रत्येक घराण्यातील एक प्रमुख असे बारा नेते, ह्यांनी ही मोजदाद केली.
त्यांनी वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक असलेल्या प्रत्येक पुरुषाची त्याच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे नोंद केली.
ती मोजदाद एकूण सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरली.
इस्राएल लोकांबरोबर लेवी कुळांच्या दलातील लोकांची करण्यात आली नाही.
परमेश्वराने मोशेला सांगितले होते की,
“लेवी कुळांच्या दलातील लोकांची गणती करु नको किंवा इतर इस्राएल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करुं नको;
लेवी लोकांना सांग की आज्ञापटाच्या पवित्र निवास मंडपाबद्दल ते जबाबदार आहेत; पवित्र निवासमंडप व त्याबरोबर त्यातील सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी. पवित्रनिवास मंडप व त्यातील सर्व सामान त्यांनी वाहून न्यावे. त्यांनी आपले तंबू पवित्र निवास मंडपाभोवती ठोकावेत आणि त्याची निगा राखावी.
जेव्हा जेव्हा पवित्र निवास मंडप हलवावयाचा असेल तेव्हा तेव्हा तो लेवी लोकांनीच उतरावा व तो उभारताना लेवी लोकांनीच तो उभा करावा; त्याची निगा राखणे हे त्यांचेच काम आहे; लेवी कुळापैकी नसलेला कोणी जर पवित्रनिवास मंडपाच्या सेवेचा प्रयत्न करु लागलां तर त्याला जिवे मारावे.
इस्राएल लोकांपैकी प्रत्येकाने आपापले तंबू आपापल्या दलाप्रमाणे आपापल्या छावणीत आपापल्या कुळाच्या निशाणाजवळ ठोकावेत.
परंतु लेवी लोकांनी आपले तंबू पवित्रनिवास मंडपाच्या सभोंवती ठोकावेत; त्यांनी आज्ञापट असलेल्या पवित्र निवासमंडपाचे रक्षण करावे म्हणजे इस्राएल लोकांवर संकट येणार नाही.”
परमेशवराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्व काही केले.

2

परमेश्वर, मोशे व अहरोन यांना म्हणाला,
“इस्राएल लोकांनी दर्शनमंडपाभोवती आपापले तंबू ठोकावेत; प्रत्येक दलाला आपले स्वत:चे निशाण असावे आणि प्रत्येकाने आपापल्या दलाच्या निशाणाजवळ आपला तंबू ठोकावा.
“यहुदावंशाच्या छावणीचे निशाण उगवत्या सूर्याच्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेला असावे. यहुदावंशातील सर्व लोकांनी आपली छावणी त्या निशाणाजवळ ठोकावी. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन हा यहुदावंशाचा प्रमुख सरदार असावा.
त्याच्या दलात चौऱ्याहत्तर हजार सहाशे लोक होते.
“इस्साखार वंशाच्या लोकांनी यहुदावंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. सुवाराचा मुलगा नथनेल हा इस्साखारवंशाचा प्रमुख सरदार असावा.
त्याच्या दलात चोपन्न हजार चारशे लोक होते.
“जबुलून वंशाच्या लोकांनीही यहुदावंशाच्या छावणीनंतर जवळच आपली छावणी उभारावी. हेलोनाचा मुलगा अलीयाब हा जबुलून वंशाचा प्रमुख सरदार असावा.
त्याच्या दलात सत्तावन्न हजार चारशे लोक होते.
“यहुदावंशाच्या छावणीत एकूण एक लाख शहाऐंशी हजार चारशे लोक होते. ते त्यांच्या कुळाप्रमाणे विभागलेले होते. इस्राएल लोकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रवास करिताना यहुदावंशाच्या दलाने सर्वात पुढे चालावे.
“पवित्रनिवास मंडपाच्या दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण असावे. प्रत्येक गटाने आपापल्या निशाणाजवळ आपली छावणी उभारावी. शदेउराचा मुलगा अलीसूरहा रऊबेन वंशाचा प्रमुख सरदार असावा.
त्याच्या दलात शेहेचाळीस हजार पाचशे लोक होते.
“शिमोन वंशातल्या कुळांनी रऊबेन वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. सुरीशादैचा मुलगा शलूमीयेल हा शिमोन वंशाचा प्रमुख सरदार असावा.
त्याच्या दलात एकोणसाठ हजार तीनशें लोक होते.
“गादवंशाच्या कुळांनीही रऊबेन वंशाच्या छावणी जवळ आपली छावणी उभारावी. रगुवेलाचा मुलगा एल्यासाप हा गाद वंशाचा प्रमुख सरदार असावा.
त्याच्या दलात पंचेचाळीस हजार सहाशें पन्नास लोक होते.
“रऊबेनच्या छावणीत कुळांप्रमाणे एकंदर एक लाख एकावन्न हजार चारशें पन्नास लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना रऊबेनच्या दलातील लोकांनी दुसऱ्या क्रमांकावर चालावे.
“त्यानंतर इस्राएलचे लोक हालल्यावर लेवीच्या लोकांनी मुक्काम हलवावा (यहूदा आणि रऊबेन नंतर) दर्शनमंडप त्यांच्याबरोबर असावा व तो इतर छावण्याच्या लोकांच्या मध्ये असावा. प्रवास करताना छावण्या ज्या क्रमाने निघतात त्याच क्रमाने मुक्काम करताना त्यांनी आपापल्या छावण्या ठोकाव्यात. प्रत्येक माणसाने आपल्या कुळाच्या निशाणाजवळ राहावे.
“एफ्राइम वंशाच्या छावणीचे निशाण पश्चिम बाजूस असावे व त्याच्या कुळातल्या लोकांनी आपली छावणी तेथे उभारावी. अम्मीहुदाचा मुलगा अलीशामा एफ्राइम वंशाचा प्रमुख सरदार असावा.
त्याच्या दलात चाळीस हजार पाचशे लोक होते.
“मनश्शेवंशाच्या दलाने एफ्राइम वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. पदासुराचा मुलगा गमलीयेल हा मनश्शेवंशाचा प्रमुख सरदार असावा.
त्याच्या दलात बत्तीस दोनशें लोक होते.
“बन्यामीन वंशाच्या दलानेही एफ्राइमाच्या दलाशेजारी आपली छावणी ठोकावी. बन्यामीन वंशाच्या प्रमुख सरदार गिदोनीचा मुलगा अबीदान हा असावा.
त्याच्या दलात पस्तीस हजार चारशें लोक होते.
“एफ्राइम वंशाच्या छावणीत एकण एक लाख आठ हजार शंभर लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना एफ्राइम वंशाचा तिसरा क्रमांक असावा.
“दान वंशाच्या छावणीचे निशाण उत्तरेकडील बाजूस असावे. त्यांच्या कुळातल्या लोकांनी आपल्या दलाची छावणी तेथे उभारावी. अम्मीशादैचा मुलगा अहीयेजर हा दानवंशाचा सरदार असावा.
त्याच्या दलात बासष्ट हजार सातशें लोक होते.
“आशेर वंशाच्या दलाने दान वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. आक्रानाचा मुलगा पगीयेल हा आशेर वंशाचा सरदार असावा.
त्याच्या दलात एकेचाळीस हजार पाचशे लोक होते.
“नफताली वंशाच्या कुळांनीही दान वंशाच्या छावणीजवळ आपली छावणी उभारावी. एनानाचा मुलगा अहीरा हा नफताली वंशाचा पुढारी असावा.
त्याच्या दलात त्रेपन्न हजार चारशें लोक होते.
“दान वंशाच्या छावणीत एक लाख सत्तावन्न हजार सहाशें लोक होते. इस्राएल लोकांचा तळ ठिकठिकाणाहून हलविताना दानवंशाच्या कुळांनी सर्वात शेवटी चालावे. प्रत्येक माणसाने आपल्या कुळाच्या निशाणाजवळ राहावे.”
अशी ही इस्राएल लोकांची मंडळी होती. त्यांच्या वंशात त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची गणती केली तेव्हा त्यांची एकूण संख्या सहा लाख तीन हजार पाचशें पन्नास होती.
मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांबरोबर लेवी लोकांची गणती केली नाही.
तेव्हा परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही इस्राएल लोकांनी केले. प्रत्येक दलाने आपल्या निशाणापाशी तळ दिला आणि प्रत्येक जण आपापल्या कुळात व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांच्या छावणीत राहिला.

3

परमेश्वर सीनाय पर्वतावर मोशेशी बोलला त्याकाळची अहरोन व मोशे ह्यांची वंशावळ अशी:
अहरोनाला चार मुलगे होते. नादाब हा थोरला मुलगा, त्यानंतरचे अबीहू, एलाजार व इथामार.
अहरोनाचे हे मुलगे याजक ह्यां नात्याने परमेश्वराची पवित्र सेवा करण्यासाठी निवडले होते व त्यांचा अभिषेक करण्यात आला होता;
परंतु नादाब व अबीहू परमेश्वराची सेवा करिताना सीनाय रानात मरण पावले. त्यांनी परमेश्वराकरिता यज्ञ अर्पण केला परंतु त्यासाठी त्यांनी परमेशवराला मान्य नसलेल्या प्रकारे अग्नीचा उपयोग केला. त्यांना मुलगे नव्हते म्हणून एलाजार व इथामर हे आपला बाप अहरोन हयात असताना याजक होऊन परमेश्वराची सेवा करीत असत.
परमेशवर मोशेला म्हणाला,
“लेवी वंशातील सर्व लोकांना अहरोन याजकाकडे आण म्हणजे ते त्याचे मदतनीस होतील.
अहरोन दर्शनमंडपात सेवा करताना लेवी लोक त्याला मदत करतील आणि इस्राएल लोक परमेश्वराची सेवा करण्यास दर्शनमंडपात येतील तेव्हा त्या लोकांना मदत करतील.
इस्राएल लोकांनी दर्शनमंडपातील सर्व वस्तूचे रक्षण करावे. ते त्यांचे काम आहे परंतु त्या वस्तूची निगा राखण्यामुळे लेवी लोक इस्राएल लोकांची मदत करतील. पवित्रनिवास मंडपात त्यांनी ह्याप्रकारे सेवा करावी.
“लेवी लोकांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या ताब्यात दे. त्यांना सर्व इस्राएल लोकांनी अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची मदत करण्यासाठी निवडले आहे.
“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची याजक म्हणून नेमणूक कर. त्यांनी याजक म्हणून आपले सेवेचे काम करावे. कोणी दुसरा पवित्र वस्तूच्याजवळ येऊन सेवा करण्याचा प्रयत्न करु लागला तर त्याला जिवे मारावे.”
परमेश्वर मोशेला आणखी म्हणाला,
“इस्राएल लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी आता माझी सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांना निवडून घेत आहे. लेवी माझेच असतील तेव्हा आता इतर इस्राएल लोकांना त्यांचे प्रथम जन्मलेले मुलगे मला द्यावे लागणार नाहीत.
“जेव्हा तुम्ही मिसर देशात होता तेव्हा त्या मिसरच्या लोकांचे प्रथम जन्मलेले मुलगे मी मारुन टाकले. त्याच दिवशी इस्राएल लोकांतील पुरषांपैकी व पशूपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी घेतले. ते माझेच आहेत. परंतु तुमची प्रथम जन्मलेली मुले तुमचीच राहातील व फकत लेवी माझे होतील. मी परमेश्वर आहे.”
परमेश्वर सीनाय रानात पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला,
“लेवी वंशातील जितके पुरुष व एक महिन्याचे किंवा त्याहून अधिक वयाची मुले असतील त्यांची, त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर.”
म्हणून मोशेने देवाची आज्ञा मानून त्यांची गणती केली.
लेवीला गेर्षोन, कहाथ व मरारी नांवाचे तीन मुलगे होते.
प्रत्येक मुलगा अनेक कुळांचा पुढारी होता. गेर्षोनाचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे; लिब्नी व शिमी.
कहाथाचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे हे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उजीयेल.
मरारीचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे हे: माहली व मूशी. ही लेवी कुळातील घराणी होत.
गेर्षोनापासून लिब्नी व शिमी ही कुळे चालू झाली ही गेर्षोनी कुळे.
ह्या दोन कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष मिळून सात हजार पाचशे होते.
गेर्षोने कुळांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे पश्चिमेच्या बाजूस पवित्र निवासस्थानाच्या मागे आपले डेरे ठोकले.
लायेलाचा मुलगा एल्यासाप हा गेर्षोनी घराण्याचा सरदार होता.
दर्शन मंडपातील पवित्र निवास मंडप, बाह्य मंडप आणि आच्छादन यांची निगा राखण्याचे काम गेर्षोनी लोकांवर सोपविण्यात आले. दर्शन मंडपाच्या प्रवेश द्वारावरील पडद्याचीही निगा त्यांच्यावर सोपवली होती.
पवित्र निवास मंडप व वेदी ह्यांच्या सभोंवतीच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा, त्यांच्यासाठी लागणारे तणावे व इतर सामान ह्यांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उजीयेल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.
हया कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष आठ हजार सहाशे होते. पवित्रस्थळातील वस्तूची निगा राखण्याचे काम कहाथी कुळांना देण्यात आले.
त्यांना पवित्र निवास मंडपाचा दक्षिणेकडचा भाग देण्यात आला, तेव्हा तेथे त्यांनी आपली छावणी उभारली.
उजीयेलाचा मुलगा अलीसापान हा कहाथी घराण्याचा पुढारी होता.
पवित्र कराराचा कोश, मेज, दीपवृक्ष, वेद्या, पवित्र मंडपात सेवेसाठी असलेली पात्रे, पडदा व इतर सर्व सामान ह्यांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
अहरोनाचा मुलगा एलाजार याजक हा लेवी लोकांच्या पुढऱ्यांचा पुढारी होता. पवित्र वस्तूचे रक्षण करण्याचे काम ज्यांच्यावर सोपविले होते त्या सर्वांवर देखरेख करणारा तो प्रमुख होता.
मरारीपासून माहली व मुशी ही घराणी चालू झाली ही मरारी कुळे.
ह्या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वचाये मुलगे व पुरुष सहा हजार दोनशें होते.
अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा मरारी घराण्याचा पुढारी होता. ह्या कुळांना पवित्र निवास मंडपाच्या उत्तरेकडचा भाग दिला होता तेव्हा त्यांनी तेथे आपल छावणी ठोकली.
मरारीवंशातील लोकांना पवित्र निवास मंडपाच्या फळ्या व त्यांचे सर्व अडसर, खांब व उथळ्या आणि पवित्र निवास मंडपाच्या फळ्यांशी निगडीत अशा सर्व सामानाची निगा राखण्याचे काम देण्यात आले;
तसेच पवित्र निवास मंडपाच्या अंगणासभोंवतीचे सर्व खांब, त्यांच्या बैठका-उथळ्या-मेखा आणि तणाव्याचे दोर ह्यांची ही देखभाल करण्याचे काम त्यांनी घेतले.
मोशे, अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची छावणी दर्शनमंडपाच्या समोर असलेल्या पवित्र निवास मंडपाच्या पूर्वेस होती. इस्राएल लोकांच्यावतीने पवित्र निवासस्थानाच्या रक्षणाचे काम त्यांना देण्यात आले. सर्व इस्राएलाकरिता त्यांनी हे काम केले. कोणी दुसरा पवित्र निवासस्थानाजवळ आल्यास त्याला जिवे मारावे असा त्यांना आदेश होता.
लेवी वंशातील एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष ह्यांची गणती करण्यास परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना सांगितले, तेव्हा पुरुष लेवीयांची एकूण संख्या बावीस हजार भरली.
परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांपैकी जितके प्रथम जन्मलेले, एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष असतील त्यांच्या नांवाची एक यादी तयार कर;
आता मी इस्राएलाचे प्रथम जन्मलेले मुलगे व पुरुष घेणार नाही, त्या ऐवजी मी परमेश्वर, लेवी वंशाचे लोक घेईन, तसेच इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या पशूंच्या ऐवजी लेवी लोकांच्या पशूंचे प्रथम जन्मलेले घेईन.”
तेव्हा मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले, त्याने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वाची गणती केली.
मोशेने प्रथम जन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे जे इस्राएल मुलगे व पुरुष होते त्यांच्या नांवाची यादी केली. त्या यादीत बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर नांवे होती.
परमेश्वर मोशेला आणखी म्हणाला,
“मी परमेश्वर तुला अशी आज्ञा देतो की इस्राएलांच्या प्रथम जन्मलेल्या ऐवजी तू लेवी लोक घे; आणि इस्राएलांच्या पशू ऐवजी मी लेवी लोकांचे पशू घेतो, कारण लेवी माझे लोक आहेत.
लेवी लोक बावीस हजार आहेत आणि इस्राएल लोकांच्या कुळात प्रथम जन्मलेले बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर आहेत. म्हणजे इस्राएलातील प्रथम जन्मलेल्यांपैकी दोनशे त्र्याहत्तर मुलगे अधिक शिल्लक राहातात.
त्यांना सोडवून घेण्यासाठी प्रत्येककडून पवित्र स्थानातील अधिकृत चलणाप्रमाणे पाच शेकेल चांदी प्रत्येकी 273 जणांसाठी घे. (एक शेकेल म्हणजे वीस गेरा) इस्राएल लोकांकडून ही चांदी घे,
व ती अहरोन व त्याच्या मुलांना दे. इस्राएल लोकांनी सोडविलेल्या दोनशें त्र्याहत्तर प्रथम जन्मलेल्या लोकांनी दिलेले ते सोडवणुकीचे पैसे होत.”
तेव्हा मोशेने त्या दोनशे त्र्याहत्तर लोकांकडून पैसे गोळा केले. ह्या दोनशेत्र्याहत्तर लोकांची जागा घेण्यास लेवी लोकाकडे कोणी उरले नव्हते.
इस्राएलांच्या प्रथम जन्मलेल्या ह्या लोकांकडून अधिकृत पवित्र स्थानातील चलनाप्रमाणे मोशेने एकूण एक हजार तीनशें पासष्ट शेकेल चांदी गोळा केली.
परमेश्वराने सांगितलेले मोशेने ऐकले व त्याच्या आज्ञेप्रमाणे त्याने ती चांदी-ते पैसे-अहरोन व त्याच्या मुलांना दिले.

4

परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला,
“लेवी लोकांपैकी कहाथी कुळांच्या लोकांची त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर. (हे लोक लेवीच्या कुळापैकीच होते)
सैन्यात सेवा केलेल्या तीस ते पन्नास वर्षांच्या पुरुषांची दर्शनमंडपात सेवा करण्यासाठी गणती कर.
दर्शनमंडपातील परमपवित्र वस्तूची त्यांनी काळजी घ्यावी.
“इस्राएल लोक आपला तळ नवीन जागी हलवितील तेव्हा अहरोन व त्याच्या मुलांनी दर्शनमंडपात जाऊन अंतरपट खाली काढावा व त्याने पवित्र कराराचा कोश झाकावा.
मग त्यांनी ह्या सर्वावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे व त्यावर संपूर्ण निळ्या रंगाचे कापड पसरावे व मग कराराच्या कोशाला दांडे लावावे.
“मग त्यांनी पवित्र मेजावर निळ्या रंगाचे कापड पसरावे व त्यावर तबके, धूपपात्रे, वाट्या व पेयार्पणे ओतण्याचे पेले ठेवावे; त्याचप्रमाणे पवित्र भाकरही त्यावर ठेवावी.
मग त्या सर्वांवर किरमिजी रंगाचे कापड पसरावे व नंतर ते सर्व तहशाच्या उत्तम कातड्याने झाकून टाकावे; त्यानंतर मेजाला दांडे बसवावे.
मग त्यांनी दीपवृक्ष आणि त्यावरील दिवे, तसेच दिवे सतत तेवत ठेवण्याकरिता लागणारी सर्व उपकरणे चिमटे, ताटल्या आणि दिव्यासाठी लागणाऱ्या तेलाची सर्व पात्रे ही सर्व निळ्या कापडाने झाकावी.
मग ह्या सर्व वस्तू त्यांनी तहशाच्या उत्तम कातड्याने लपेटून घ्याव्यात आणि हे सर्व वाहून न्यावयाच्या खांबांवर त्यांनी ठेवावे.
“त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे. ते तहशाच्या उत्तम कातड्याने झाकावे व मग वेदीला वाहून नेण्याचे दांडे बसवावे.
“मग पवित्र स्थानातील उपासनेसाठी लागणारी सर्व उपकरणे त्यांनी गोळा करावीत व ती निळ्या कापडात गुंडाळावीत; त्यावर तहशाच्या उत्तम कातड्याचे आच्छादन टाकावे आणि मग हे सर्व त्यांनी वाहून नेणाऱ्या चौकटीवर ठेवावे.
“मग त्यांनी वेदीवरील सर्व राख काढून ती स्वच्छ करावी व तिच्यावर जांभळ्या रंगाचे कापड पसरावे.
नंतर त्यांनी वेदीच्या सेवेची सर्व उपकरणे म्हणजे अग्निपात्रे, काटे, फावडी व कटोरे हे वेदीचे सर्व सामान गोळा करुन ते वेदीवर ठेवावे; मग तिच्यावर तहशाच्या उत्तम कातड्याचे आच्छादन घालावे व मग तिला वाहून नेण्याचे दांडे बसवावेत.
“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी पवित्रस्थानातील सर्व पवित्र वस्तूवर आच्छादन टाकण्याचे पूर्ण करावे; मग कहाथी लोकांनी आत जावे आणि त्या वस्तू वाहून नेण्याचे काम सुरु करावे; अशा प्रकारे ते पवित्र वस्तूंना स्पर्श करणार नाहीत आणि मरणार नाहीत.
“पवित्र निवासमंडप व त्यातील सर्व सामान व उपकरणे म्हणजे पवित्रस्थान व त्यातील दिव्यांना लागणारे तेल. सुगंधी धूप, रोजची अन्नार्पणे व अभिषेकाचे तेल ह्या सर्वांची जबाबदारी अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याने घ्यावी.”
परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला,
“सावध राहा! कहाथी लोकांचा नाश होऊदेऊ नका;
तुम्ही ही कामे करावीत म्हणजे मग कहाथी लोक परम पवित्र स्थानाजवळ जातील तेव्हा ते मरणार नाहीत; अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी परमपवित्रस्थानात जाऊन कहाथी लोकांतील एकेका माणसाला त्याने कोणकोणत्यावस्तू वाहून न्याव्यात ते सांगावे व ते दाखवावे.
जर तुम्ही असे करणार नाही तर मग कहाथी लोक कदाचित आत जातील व पवित्र वस्तू त्यांच्या नजरेस पडतील आणि त्यांनी तसे क्षणभर जरी पाहिले तरी ते मरतील.”
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“गेर्षोन वंशातील पुरुषांची गणना कर आणि त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांच्याप्रमाणे त्यांची यादी कर;
म्हणजे तीस ते पन्नास वर्षे वयाच्या ज्या लोकांनी सैन्यात सेवा केली आहे अशा लोकांची गणती कर; दर्शनमंडपाची देखभाल करण्याचे काम त्यांच्याकडे राहील.
“गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा व वाहावयाची ओझी ही अशी:
त्यांनी पवित्र निवासमंडपाचे पडदे, दर्शनमंडप व त्याचे आच्छादन आणि तलमशा उत्तम कातड्याचे आच्छादन तसेच दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा,
पवित्रनिवासमंडप व वेदी ह्यांच्या भोंवतीच्या अंगणाच्या कनातीचे पडदे, तसेच अंगणाच्या प्रवेश दाराजा पडदा, सर्व तणावे व त्यांच्याबरोबर लागणारी उपकरणे, हे सर्व सामान गेर्षोनी कुळांनी वहावे; आणि ह्या सामानासंबंधी जे काही काम पडेल ते त्यांनी करावे;
अहरोन आणि त्याचे मुलगे यांनी झालेल्या सर्व कामाची पाहणी करावी. त्यांनी गेर्षोनी लोक जे जे वाहून नेतील आणि इतर जे काही काम करतील त्यावरही नजर ठेवावी. तुम्ही त्यानी वाहावयाच्या वस्तूची कल्पना त्यांना द्यावी. ते वाहून नेत असलेल्या वस्तूची जबाबदारी त्यांच्यावर आहे असे त्यांना सांगावे
गेर्षोनी कुळातील लोकांची दर्शनमंडपातली ही सेवा आहे. अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्यावर त्यांच्या कामाची जबाबदारी राहील.”
“मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्या प्रमाणे गणती कर.
म्हणजे तीस ते पन्नास वर्षेच्या वयाच्या दलात सेवा केलेल्या पुरुषांची गणती कर. हे लोक दर्शनमंडपातील विशेष सेवा करतील.
तुम्ही जेव्हा पुढील प्रवासासाठी निघाल तेव्हा दर्शनमंडपाचा सांगाडा वाहून नेण्याचे काम त्यांनी करावे.
तसेच सभोंवतीच्या अंगणाचे खांब, उथळ्या, तंबूच्या मेखा, तणावे आणि अंगणाच्या खांबासाठी लागणारी इतर उपकरणे, इत्यादी सर्वसामान वाहून नेण्याचे काम मरारी लोकांचे आहे. त्या माणसांच्या नावांवी यादी करा व प्रत्येकाने नेमके काय वाहून न्यायचे ते त्याला सांगा.
दर्शनमंडपाची कामे करिताना मरारी कुळातील पुरुषांनी ही सेवा करावी त्यांच्या कामासाठी अहरोन याजकाचा मुलगा इथामार हा जबाबदार राहील.”
मोशे, अहरोन व इस्राएल लोकांचे पुढारी ह्यांनी कहाथी लोकांची, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती केली.
त्यांनी, सैन्यात सेवा केलेल्या तीस ते पन्नास वर्षे वयाच्या पुरुषांची गणती केली. दर्शनमंडपासाठी त्यांना खास काम दिले गेले होते.
हे काम करण्यास दोन हजार सातशे पन्नास कहाथी लोक पात्र ठरले.
तेव्हा त्यांना दर्शनमंडपात पवित्र सेवा करण्याचे काम देण्यात आले. मोशे व अहरोन ह्यांनी, परमेश्वराने मोशेला सांगितल्या प्रमाणे हे केले.
तसेच गेर्षोनी वंशजांचीही, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली;
म्हणजे सैन्यात सेवा केलेल्या तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करण्यात आली. त्यांना दर्शनमंडपासाठी करण्यासाठी विशेष काम दिले गेले होते.
तेव्हा दर्शनमंडपात काम करण्यास दोन हजार सहाशें तीस गेर्षोनी लोक पात्र ठरले.
तेव्हा त्यांना दर्शनमंडपात पवित्र काम देण्यात आले. मोशे व अहरोन ह्यांनी, परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
त्याचप्रमाणे मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली,
म्हणजे सैन्यात सेवा केलेल्या तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करण्यात आली.
तेव्हा तीन हजार दोनशें मरारी लोक दर्शनमंडपात काम करण्यास पात्र ठरले.
तेव्हा त्यांना त्यांचे विशेष काम देण्यात आले. मोशे व अहरोन ह्यांनी, परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
तेव्हा मोशे, अहरोन व इस्राएलाचे पुढारी ह्यांनी सर्व लेवी लोकांची गणती, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे केली.
तीस ते पन्नास वर्षे वय असलेल्या व सैन्यात सेवा केलेल्या पुरुषांची गणती करण्यात आली; त्यांना दर्शनमंडपासाठी खास काम देण्यात आले. इस्राएल लोकांचे प्रवासात दर्शनमंडप वाहून नेण्याचे विशेष सेवेचे काम त्यांना देण्यात आले.
त्यांची एकूण संख्या आठ हजार पांचशे ऐंशी होती.
तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येक माणसाची गणती करण्यात आली; प्रत्येक माणसाला त्याने स्वत: करावयाचे काम नेमून देण्यात आले व त्याने काय वाहून न्यावयाचे ते सांगण्यात आले. हे सर्व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे करण्यात आले.

5

परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांनी आपली छावणी आजारापासून रोगराईपासून स्वच्छ ठेवावी अशी मी आज्ञा देतो: त्यांना सांग की कोणी महारोगी, कोणाला कसल्याही प्रकारचा स्त्राव होत असेल व कोणी प्रेताला शिवल्यामुळे अशुद्ध झालेला असल्यास अशा लोकांना त्यांनी छावणीच्या बाहेर घालवून दयावे;
मग तो पुरुष असो किंवा ती स्त्री असो त्यांना छावणीच्या बाहेर काढावे म्हणजे मग छावणी आजार व विटाळापासून शुद्ध स्वच्छ राहील; कारण मी छावणीत तुमच्याबरोबर राहात आहे.”
तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी परमेश्वराची आज्ञा मानून त्या लोकांना छावणी बाहेर काढून टाकिले.
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांना हे सांग की एखादा पुरुष वा स्त्री दुसऱ्याचा अपराध करील तर खरे पाहता तो परमेश्वराविरुद्धच पाप करील व म्हणून तो दोषी ठरेल.
तेव्हा त्या माणसाने आपला अपराध कबूल करावा. मग ज्याचा त्याने अपराध केला आहे त्याची त्याने पूर्णपणे भरपाई करावी व त्या भरपाईत आणखी एक पंचमांशाची भर घालून ज्याचा त्याने अपराध केला आहे त्याला ती सर्व दयावी.
पण ज्याच्यावर अपराध घडला आहे तो मेला आणि अपराधाबद्दलची भरपाई घेण्यास त्याचे जवळचे कोणी नातलग नसतील तर त्या अपराधी माणसाने ती भरपाई परमेश्वराला अर्पण करावी. त्याने ती पूर्ण भरपाई याजकाकडे द्यावी. याजकाने त्या अपराध्याच्या प्रायश्चितासाठी प्रायश्चिताचा मेंढा अर्पण करावा परंतु राहिलेली भरपाई याजकाने ठेवावी.
“जर कोणी इस्राएल परमेश्वराला समर्पित करण्याकरिता काही विशेष देणगी याजकाकडे देईल तर ती याजकाने ठेवून घ्यावी; ती त्याचीच होईल.
कोणी अशा देणग्या द्याव्यात असे नाही परंतु जर त्याने त्या आणिल्या तर त्या याजकाच्या होतील.”
मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांना असे सांग की एखाद्या माणसाच्या बायकोने त्याचा विश्वासघात केला.
म्हणजे तिने दुसऱ्या माणसाशी कुकर्म केले व ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेविली तर कोणी साक्षीदार नसल्यामुळे हे कुकर्म तिच्या नवऱ्याला कधीच कळणार नाही; ती स्वत: तर आपल्या नवऱ्याला ही गोष्ट सांगणारच नाही;
परंतु आपल्या बायकोने आपल्या विरुद्ध पाप केले आहे अशी शंका कदाचित तिच्या नवऱ्याला येऊ लागेल व तो तिचा द्वेष करील; ती शुद्ध नाही व आपल्याशी विश्वासू नाही असे त्याला वाटू लागेल;
जर असे झाले, तर त्या माणसाने आपल्या बायकोला याजकाकडे घेऊन जावे. तसेच त्याने अर्पण म्हणून आठ वाट्या-एक दशांश एफा जवाचे पीठ घेऊन जावे; त्या पिठावर त्याने तेल ओतू नये किंवा धूप ठेवू नये; हे जवाचे पीठ म्हणजे परमेश्वराकरिता अन्नार्पण होय. हे द्वेषामुळे त्या माणसाने परमेश्वराला दिले आहे. आपली बायको आपल्याशी विश्वासू राहिली नाही असा त्याचा विश्वास आहे असे ह्या अन्नार्पणामुळे दिसेल.
“याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे.
मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे व पवित्र निवास मंडपाच्या जमिनीवरील थोडीशी धूळ त्यात टाकावी.
याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे रहावयास सांगावे. मग त्याने तिच्या डोक्याचे केस सोडावे, आणि द्वेषामुळे अर्पण करण्यासाठी आणिलेले सातूचे पीठ तिच्या हातावर ठेवावे. त्याचवेळी त्याने पवित्र पाण्याचे पात्र आपल्या हातात घ्यावे; स्त्रिला पीडा देऊ शकणारे असे ते विशेष प्रकारचे प्राणी आहे.
“मग त्या याजकाने त्या स्त्रीला खोटे न बोलण्याबद्दल सुचना द्यावी. तसेच तिने खरे सांगण्याचे वचन द्यावे. याजकाने तिला म्हणावे; ‘तू लग्न झालेल्या तुझ्या नवऱ्याविरुद्ध पाप करुन दुसऱ्या पुरुषाबरोबर कुकर्म केले नसेल तर मग ह्या अतिशय पीडा देणाऱ्या पवित्र पाण्यापासून तुला काही अपाय होणार नाही.
परंतु तू जर तुझ्या नवऱ्या विरुद्ध पाप केले असेल - तू दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध केला असशील तर मग तू शुद्ध नाहीस.
म्हणून तू हे पाणी पिशील तेव्हा तुला अनेक प्रकारचा त्रास होईल तुला मूल होऊ शकणार नाही; तू गरोदर असशील तर तुझे मूल मरुन जाईल; तुझे लोक तुला बाहेर टाकतील व तुझी निंदा करतील.’ “मग याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरापुढे विशेष शपथ घ्यावयास सांगावे; तिने जर लबाडी केली तर ह्या सर्व वाईट गोष्टी तिच्यावर येतील असे तिने कबूल करावे;
याजकाने म्हणावे, ‘तुला त्रास देणारे हे पाणी तू प्यालीच पाहिजेस; जर तू पाप केले असशील तर तुला मुले होऊ शकणार नाहीत आणि जर तुझ्या उदरात मूल असेल तर ते जन्मण्यापूर्वीच मरुन जाईल.’ मग त्या स्त्रीने म्हणावे ‘आमेन’ म्हणजे आपण म्हणता तसे मला होवो.
“मग याजकाने दिलेल्या सुचनेचे शब्द आणि त्या स्त्रीने उच्चारलेल्या शपथेचा शब्द गुडांळी कागदावर लिहावेत व गुंडाळीवरील ते शब्द त्या पाण्यात धुवावेत.
मग पीडा देणारे ते शापित पाणी त्या स्त्रीने प्यावे. हे पाणी तिच्या पोटात जाईल आणि ती अपराधी असेल तर त्या पाण्यामुळे तिला खूप त्रास व दु:ख सोसावे लागेल.
“नंतर याजकाने ते (द्वेषाबद्दलचे अन्नार्पण) त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व परमेश्वरासमोर उंच धरावे आणि मग ते वेदी जवळ घेऊन जावे.
मग त्यातील मूठभर अन्नार्पण घेऊन ते वेदीवर ठेवावे व त्याचा होम करावा. त्या नंतर याजकाने त्या स्त्रीला हे पाणी पिण्यास सांगावे -
जर त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध पाप केले असेल तर त्या पाण्यामुळे तिला खूप त्रास व दु:ख सोसावे लागेल. ते तिच्या पोटात जाईल आणि तिला खुप त्रास होईल. तिच्या पोटात मूल असेल तर तें जन्मण्याआधीच मरेल आणि तिला कधीही मुले होणार नाहीत. सर्व लोक तिला शाप देतील.
परंतु त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध पाप केले नसेल व ती शुद्ध असेल तर ती स्त्री अपराधी नाही असे याजकाने तिला सांगावे. मग ती पूर्वीसारखीच होईल व गर्भधारणेस पात्र ठरेल.
तेव्हा द्वेषासंबंधी हा नियम आहे. एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध जर पाप केले तर तू ही अशी कारवाई करावी.
किंवा एखाद्या पुरुषाने आपल्या बायकोने आपल्या विरुद्ध पाप केले आहे असा संशय व द्वेष, धरला तर त्या माणसाने अशी कारवाई करावी; याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे व सांगितलेल्या नियमाप्रमाणे तिच्याविरुद्ध कारवाई करावी.
मग नवरा अधर्म करण्यापासून मुकत होईल परंतु जर स्त्रीने पाप केले असेल तर तिला त्रास भोगावा लागेल.”

6

परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांस असे सांग की कोणा पुरुषाने किंवा स्त्रीने आपणास इतरापासून वेगळे होऊन काही काळपर्यंत पूर्णपणे परमेश्वरास वाहून घ्यावयाचा नवस केला तर त्याने किंवा तिने सर्वकाळ परमेश्वराच्या सेवेसाठी वाहून घ्यावे. त्यांना नाजीर म्हणावे.
त्या काळात नाजीराने द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये; द्राक्षारसाचा किंवा कडक मद्याचा शिरकाही पिऊ नये; द्राक्षाचा कसलाही रस पिऊ नये; तसेच ताजी किंवा सुकी द्राक्षेही खाऊ नयेत.
त्या वेगळेपणाच्या विशेष काळात त्याने द्राक्षापासून बनविलेला कोणताच पदार्थ खाऊ नये. एवढेच नव्हे तर त्याने द्राक्षाच्या बिया किंवा द्राक्षाचे सालपट देखील खाऊ नये.
स्वत:ला वेगळे केलेल्या त्या काळात नाजीराने आपले केस कापू नयेत. त्याच्या नवसाचा काळ संपेपर्यंत त्याने पवित्र राहावे. त्याने आपले केस लांब वाढू द्यावेत; ते केस त्याने देवाला केलेल्या विशेष नवसाची खूण आहे. स्वत:ला वाहवून घेतलेल्या नवसाचा काळ संपेपर्यंत त्याने आपले केस लांब वाढू द्यावेत.
“वेगळेपणाच्या त्या काळात नाजीराने परमेश्वराला वाहून घेतल्यामुळे प्रेताजवळ जाऊ नये.
त्याचा स्वत:चा बाप, आई, भाऊ किंवा बहीण ह्यातून कोणी मरण पावल्यास त्याने त्यांनाही शिवू नये; तो शिवेल तर तो अपवित्र होईल. आपण पूर्णपणे परमेश्वराच्या सेवेसाठी स्वत:ला वेगळे केले आहे, हे त्याने दाखवावे
व वेगळे राहाण्याचा पूर्णकाल त्याने परमेश्वराला संपूर्णपणे वाहून घ्यावे. तोपर्यंत त्याने परमेश्वराचीच सेवा करावी.
“एखाद्या वेळी असे होईल की नाजीराबरोबर असलेला एखादा माणूस एकाएकी मरण पावला; आणि जर नाजीराने त्याला स्पर्श केला तर तो अशुद्ध होईल जर असे झाले तर नाजीराने आपल्या नवसाची खूण असलेल्या आपल्या डोक्याचा केसांचे मुंडण करावे. ते मुंडण त्याने सातव्या दिवशी करावे कारण त्या दिवशी तो पवित्र होईल.
आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले आणून दर्शनमंडपाच्या दारापाशी ती याजकाला द्यावीत.
मग याजकाने एकाचा पापार्पण म्हणून व दुसऱ्याचा होमार्पण करावा. हे पापार्पण म्हणजे त्याच्या पापाबद्दलचे प्रायश्चित होय; कारण तो प्रेताजवळ गेला होता. त्याचवेळी त्या नाजीराने पुन्हा नव्याने देवाची सेवा करण्यासाठी विशेष नवस म्हणून आपल्या डोक्याचे केस देवाला अर्पण करावेत.
याचा अर्थ त्या माणसाने परमेश्वराच्या सेवेसाठी वेगळे होण्यासाठी स्वत:ला परमेश्वराला द्यावे. त्याने एक वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणून द्यावा. तरी पण त्याचे नाजीरपणाचे आधीचे दिवस वाया जातील. त्याने आता नव्याने नवस करुन नाजीरपणाचा वेगळा वेळ द्यावा कारण नाजीरपणाच्या पहिल्या काळात त्याचा प्रेताला स्पर्श झाला होता.
“मग त्याच्या नाजीरपणाच्या नवसाचे दिवस पूर्ण झाल्यावर त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी जावे.
तेथे त्याने पुढीलप्रमाणे अर्पणे करावीत. त्याने एक वर्षाचा निर्दोष मेंढा होमबली म्हणून आणावा: एक वर्षाची निर्दोष मेंढी पापबली म्हणून आणावी; आणि शांत्यार्पणासाठी एक दोषहीन मेंढा आणावा.
एक टोपलीभर बेखमीर भाकरी म्हणजे तेलात मळलेल्या मैद्याच्या पोळ्या व वरुन तेल लाविलेल्या चपात्या त्याच प्रमाणे त्या बरोबर अर्पणाचा भाग म्हणून अन्नार्पणे व पेयार्पणे आणावीत.
“मग ही सर्व अर्पणे याजकाने परमेश्वराला अर्पण करावीत; त्याने पापबली व होमबली परमेश्वराला अर्पावेत;
तशीच बेखमीर भाकरीची टोपलीही परमेश्वराला अर्पण करावी; मग शांत्यार्पणासाठी परमेश्वराकरिता मेंढा अर्पावा व त्या बरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण अर्पण करावे.
“मग नाजीराने निवास मंडपाच्या दारापाशी जावे; तेथे त्याने परमेश्वरासाठी नवस म्हणून वाठविलेल्या आपल्या केसाचे मुंडण करावे. ते केस त्याने शांत्यापर्णाच्या खाली असलेल्या जाळावर टाकावेत.
“नाजीराने आपल्या केसाचे मुंडण केल्यावर याजकाने त्याला मेंढ्याचा शिजविलेला फरा व टोपलीतून एक बेखमीर पोळी व एक बेखमीर चपाती द्यावी.
मग याजकाने ते ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे. हे सर्व पदार्थ पवित्र आहेत व ते याजकासाठी आहेत. त्याच प्रमाणे मेंढ्याचे ऊर व मांडीही परमेश्वरासमोर ओवाळावी; हे सर्व पदार्थ पवित्र आहेत व ते याजकासाठी आहेत. त्या नंतर नाजीर झालेला होता तो माणूस द्राक्षारस पिण्यास मोकळा आहे.
“जर एखादा माणूस नाजीर होऊन परमेश्वराची सेवा करण्यास वेगळा होण्याचा नवस करावयाचे ठरवील तर त्याने ही सर्व अर्पणे परमेश्वरासाठी अवश्य द्यावीत; पण एखादा माणूस ह्याही पेक्षा अधिक अर्पणे देऊ शकत असेल व जर त्याने काही अधिक द्यावयाची शपथ घेतली असेल तर मग त्याने आपली शपथ पूर्ण करावी. नाजीर होण्याच्या नवसाची शपथ घेण्याविषयी हा नियम आहे.”
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“अहरोन व त्याच्या मुलांना इस्राएल लोकांना ह्याप्रमाणे आशीर्वाद देण्यास सांग; त्यांनी म्हणावे:
परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो;
परमेश्वर आपला मुख प्रकाश तुजवर पाडो व तुजवर दया करो;
परमेश्वर आपले मुख तुजकडे करो व तुला शांति देवो.”
मग परमेश्वर म्हणाला, “इस्राएल लोकांना आशीर्वाद देताना अहरोन व त्याच्या मुलांनी अशा प्रकारे माझ्या नांवाचा उपयोग करावा; म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”

7

मोशेने पवित्र निवास मंडप उभा करण्याचे काम संपविले व त्याच दिवशी परमेश्वराला तो समर्पित केला. त्याने पवित्र निवास मंडप, त्यातील सर्व सामान तसेच वेदी व तिच्या सोबत वापरावयाची उपकरणे ही सर्व तेलाच्या अभिषेकाने पवित्र केली. त्यावरुन त्या वस्तू फकत परमेश्वराच्या उपासनेकरिताच वापरावयाच्या आहेत हे दिसले.
त्यानंतर जे इस्राएल लोकांचे आपापल्या वंशाचे प्रमुख व कुळांचे पुढारी होते त्यांनी अर्पणे आणिली; हेच लोक शिरगणतीच्या कामात प्रमुख होते.
त्यांनी परमेश्वरासाठी झाकलेल्या सहा गाड्या भरुन व बारा बैलांनी त्या ओढीत आणिलेली आपापली अर्पणे आणिली. प्रत्येक पुढाऱ्याने एक बैल दिला व दोघांनी मिळून एक गाडी दिली. ही अर्पणे परमेश्वराला देण्यासाठी त्यांनी पवित्र निवास मंडपासमोर आणिली.
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“तू त्यांच्या देणग्या घे; दर्शनमंडपाच्या कामासाठी त्यांचा उपयोग होईल; त्या लेवी लोकांना दे, त्यांच्या कामात त्यांची मदत होईल.”
मोशेने त्या गाड्या व बैल घेऊन लेवी लोकांना दिले.
त्याने दोन गाड्या व चार बैल गेर्षोनी वंशाच्या लोकांना दिले; त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती.
त्याने चार गाड्या व आठ बैल मरारी वंशाच्या लोकांना दिले; त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती. अहरोन याजकाचा मुलगा इथामर हा ह्या सर्व लोकांच्या कामाबद्दल जबाबदार होता.
मोशेने कहाथी वंशाच्या लोकांना बैल किंवा गाड्या दिल्या नाहीत; कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यावर वाहून नेण्याचे काम त्यांना देण्यात आले होते.
मोशेने वेदीचा तेलाने अभिषेक केला. त्याच दिवशी इस्राएल लोकांच्या प्रमुखांनी वेदीला समर्पण करण्यासाठी आपली अर्पणे आणिली; त्यांनी आपली अर्पणे परमेश्वराला वेदीपाशी दिली.
परमेश्वराने मोशेला सांगितले, “प्रत्येक दिवशी एका प्रमुखाने आपले अर्पण वेदीला समर्पण करण्यासाठी आणावे.”
मोशेने वेदीला तेलाने अभिषेक करुन तिचे समर्पण करण्याच्या वेळी इस्राएल लोकांच्या प्रमुखांनी ही अर्पणे आणिली: चांदीची बारा ताटे, चांदीचे बारा कटोरे, सोन्याची बारा धूपपात्रे.
प्रत्येक चांदीच्या ताटाचे वजन एकशेतीस शेकेल व प्रत्येक चांदीच्या कटोऱ्याचे वजन सत्तर शेकेल होते. पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे चांदीची ताटे व चांदीचे कटोरे मिळून त्यांचे एकूण वजन जवळ जवळ ‘दोन हजार चारशे’ शेकेल होते.
अधिकृत वजनाप्रमाणे, प्रत्येकी चार औंस वजन असलेले, धुपाने भरलेले 12सोन्याचे चमचे त्या 12 चमच्यांचे एकूण वजन सुमारे 3 पौंड होते.
होमार्पणासाठी बारा गोऱ्हे, बारा मेंढे व एक एक वर्षाची बारा नर असलेली कोंकरे एवढे पशू होते; आणि त्यांच्या बरोबर अर्पिण्यासाठी अन्नार्पणेही होती; आणि परमेश्वराला पापार्पण वाहण्यासाठी बारा बकरे होते;
इस्राएलांच्या प्रमुखांनी शांत्यापर्णासाठीही पशू अर्पण केले. त्यांची एकूण संख्या, चोवीस गोऱ्हे, साठ मेंढे, साठ बकरे व एक एक वर्षाची साठ नर असलेली कोंकरे एवढी होती. मोशेने वेदीला तेलाचा अभिषेक केल्यावर त्यांनी अशा प्रकारे समर्पणे केली.
मोशे परमेश्वराशी बोलण्यासाठी दर्शनमंडपात गेला त्यावेळी त्याने परमेश्वराची वाणी त्याच्याशी बोलताना ऐकली. ती, पाणी आज्ञापटाच्या कोशावरील कोशावरील पवित्र दयासनावरुन दोन करुब दूतांच्या दरम्यान असलेल्या भागातून येत होती. अशा प्रकारे देव मोशेबरोबर बोलला.

8

परमेश्वर मोशेला म्हणाला,
“मी तुला दाखविलेल्या जागेवर सात दिवे ठेवण्यास अहरोनास सांग, म्हणजे त्यांचा प्रकाश दीपवृक्षा समोरच्या जागेवर पडेल.”
परमेश्वराने मोशेद्वारे दिलेली आज्ञा अहरोनाने मानून त्याने तसे केले; त्याने त्या दिव्यांची तोंडे योग्य दिशेकडे करुन ते योग्य ठिकाणी ठेविले, त्यामुळे दीपवृक्षासमोरील भागावर त्यांचा उजेड पडला.
परमेश्वराने मोशेला दाखविल्याप्रमाणे दीपवृक्ष त्यांच्या बैठकीपासून तर त्याच्या सोनेरी पानापर्यंत घडीव सोन्याचा केला होता.
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“लेवी लोकांना इतर इस्राएल लोकांपासून वेगळे कर; व त्यांना शुद्ध कर.
त्यांना शुद्ध करण्यासाठी पापार्पणातील पवित्र पाणी त्यांच्यावर शिंपड म्हणजे त्या पाण्यामुळे ते शुद्ध होतील. मग त्यांनी आपल्या अंगावरील केस काढावेत आणि आपले कपडे धुवावेत; त्यामुळे ते शुद्ध होतील.
“लेवी लोकांनी एक गोऱ्हा घ्यावा; त्या सोबत अर्पिण्यासाठी तेलात मळलेल्या पिठाचे अन्नार्पण घ्यावे; मग त्यांनी पापार्पणासाठी आणखी एक गोऱ्हा घ्यावा.
तू लेवी लोकांना दर्शनमंडपासमोरील अंगणात आण व मग सर्व इस्राएल लोकांना तेथे एकत्र जमव
मग लेवी लोकांना परमेश्वरासमोर आण; तेव्हा इस्राएल लोकांनी त्यांच्या डोक्यावर आपले हात ठेवावे.
नंतर अहरोनाने त्यांना परमेश्वराला समर्पित करावे. अशा रितीने लेवी लोक पवित्र परमेश्वराची सेवा कराण्यास पात्र होतील.
“मग लेवी लोकांना आपले हात गोऱ्ह्यांच्या डोक्यावर ठेवण्यास सांग एक गोऱ्हा परमेश्वरासाठी पापार्पण म्हणून व दुसरा होमार्पण म्हणून होईल. ह्या अर्पणामुळे ते लेवी लोक शुद्ध होतील.
मग लेवी लोकांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या समोर उभे राहण्यास सांग. मग त्यांचे ओवाळणीचे अर्पणा प्रमाणे ते परमेश्वराला अर्पण कर.
त्यामुळे ते लेवी पवित्र होतील. ते इतर इस्राएल लोकापेक्षा वेगळे असतील, व ते माझे लोक होतील.
“तेव्हा तू लेवी लोकांना शुद्ध कर आणि ओवाळणीचे अर्पणा प्रमाणे परमेश्वराला त्यांना समर्पित कर. तू हे केल्यानंतर त्यांनी दर्शनमंडपात येऊन आपले काम करावे.
इस्राएल लोकांनी लेवी लोक मला द्यावेत. ते माझे होतील. पूर्वी मी प्रत्येक इस्राएलास सांगितले होते की प्रत्येक घरातून प्रथम जन्मलेला मुलगा मला द्यावा. परंतु आता इतर इस्राएलातील प्रथम जन्मलेल्या मुलांच्या ऐवजी मी लेवी लोक घेत आहे.
इस्राएलात प्रथम जन्मलेला प्रत्येक नर माझा आहे; मग तो माणसापैकी असो किंवा पशूपैकी असो, तो माझाच आहे; कारण मी मिसर देशातील सर्व प्रथम जन्मलेली मुले व पशू मारुन टाकिले आणि म्हणून प्रथम जन्मलेले मुलगे मी माझ्याकरता निवडून घेतले.
परंतु आता इस्राएल लोकातील सर्व प्रथम जन्मलेल्या ऐवजी मी लेवी लोक घेतले आहेत.
इस्राएल लोकातून मी लेवी लोक निवडले आहेत आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना मी ते दान म्हणून देत आहे. दर्शनमंडपात लेवी लोकांनी सर्व इस्राएल लोकाकरिता काम करावे अशी माझी इच्छा आहे. ते इस्राएल लोकांसाठी असलेली प्रायाश्चिताची अर्पणे करतील त्यामुळे इस्राएल लोक शुद्ध होतील. मग इस्राएल लोक पवित्रस्थानाजवळ आले तरी त्यांना भारी आजार किंवा त्रास होणार नाही.”
तेव्हा मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वराची आज्ञा मानून परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे त्यांनी लेवी लोकाकरिता सर्वकाही केले.
लेवी लोकांनी स्नान केले व, आपले कपडे धुतले. तेव्हा अहरोनाने त्यांना ओवळणी च्या अर्पणाप्रमाणे परमेश्वराला अर्पिले, आणि त्यांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करुन त्याने त्यांना शुद्ध केले.
त्यानंतलेवी लोक सेवा करण्यास दर्शनमंडपात आले. अहरोन व त्याच्या मुलांनी त्यांच्यावर देखरेख केली; कारण ते लेवी लोक करीत असलेल्या सेवेबद्दल जबाबदार होते. परमेश्वराने मोशेकडून अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी लेवी लोकांचे सर्व काही केले.
मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
‘लेवी लोकासाठी विशेष आज्ञा अशी आहे की पंचवीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या प्रत्येक लेवी माणसाने दर्शनमंडपातील सेवा करण्यात भाग घ्यावा.
परंतु लेवी माणूस पन्नास वर्षांचा होईल तेव्हा त्याने आपल्या सेवेतून मोकळे व्हावे; त्याने सेवा करण्याची गरज नाही.
त्या वर्षाच्या अथवा त्याहून मोठे असलेल्या लेवी माणसांनी पाहिजे तर दर्शनमंडपात सेवा करणाऱ्या आपल्या बंधूंना त्यांच्या कामात मदत करावी; परंतु त्यांनी स्वत: सेवा करु नये. लेवी लोकांना सेवा करण्यास निवडून घेताना तू हा नियम पाळावा.”

9

मिसरमधून इस्राएल लोक बाहेर आल्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनायच्या रानात मोशेबरोबर बोलला. परमेश्वर म्हणाला,
“इस्राएल लोकांना ठरलेल्या वेळी वल्हांडण सण पाळण्यास सांग.
ह्या महिन्यात चौदाव्या दिवशी सूर्य मावळल्यानंतर अंधार पडण्या अगोदर-संधी प्रकाशात-त्यांनी वल्हांडण सणाचे भोजन करावे. त्यांनी ते ठरलेल्यावेळी आणि वल्हांडण सण पाळण्याच्या नियमाप्रमाणे करावे.”
तेव्हा मोशेने इस्राएल लोकांना वल्हांडण सण पाळावयास सांगितले.
तेव्हा परमेश्वराने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सीनायच्या वाळवंटात संधीप्रकाशात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी हा सण पाळला; परमेश्वराने मोशेकडून दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.
परंतु काही लोकांना त्या दिवशी वल्हांडण सण पाळता येईना कारण प्रेताला शिवल्यामुळे ते अशुद्ध झाले होते. म्हणून ते त्या दिवशी मोशे व अहरोन ह्यांच्याकडे गेले.
ते लोक मोशेला म्हणले, “एका माणसाच्या प्रेताला आमचा स्पर्श झाला व आम्ही अशुद्ध झालो. त्यामुळे ठरलेल्या वेळी परमेश्वराला अर्पणे करण्यास याजकांनी आम्हाला बंदी केली. तेव्हा इतर इस्राएल लोकाबरोबर आम्हाला अर्पणे करिता येत नाहीत!”
मोशे त्यांना म्हणाला, “ह्या संबंधी परमेश्वराचे काय म्हणणे आहे, हे मी त्याला विचारितो.”
“तू इस्राएल लोकांना हे सर्व सांग की हा नियम तुम्हा करिता व तुमच्या वंशजाकरिता आहे; प्रेताला स्पर्श झाल्यामुळे एखादा माणूस अशुद्ध झाला असेल किंवा एखादा माणूस अशुद्ध झाला असेल किंवा एखादा माणूस त्यावेळी दूरच्या प्रवासात असेल व म्हणून त्याला ठरलेल्यावेळी वल्हांडण सण पाळता येत नसेल तरी;
त्याला वल्हांडण सण पाळता येईल; त्याने तो दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी संधी प्रकाशात साजरा करावा. त्यावेळी त्याने अर्पण केलेले कोंकरु, बेखमीर भाकर व कडू भाजीपाला हे खावे;
त्याने भोजनातील काहीही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये; तसेच त्याने कोंकऱ्याचे कोणतेही हाड मोडू नये. त्याने वल्हांडण सणाचे सर्व नियम पाळावेत.
परंतु जर कोणी शुद्ध आहे आणि दूरच्या प्रवासात नाही व तो सण पाळू शकतो तर अशा माणसाने वल्हांडण सण ठरलेल्या वेळी पाळला नाही तर त्याला आपल्या लोकातून काढून टाकावे. तो अपराधी आहे म्हणून त्याला अवश्य शिक्षा व्हावी! कारण त्याने योग्य वेळी परमेश्वराला दान दिले नाही.
तुमच्यामध्ये राहाणाऱ्या एखाद्या विदेशी माणसाला तुमच्याबरोबर वल्हांडण सण पाळण्याची व परमेश्वराला अर्पण देण्याची इच्छा असेल तर त्याला तसे करण्यास परवानगी आहे. परंतु तो त्याने वल्हांडण सणाचे सर्व नियम पाळून साजरा करावा. प्रत्येकसाठी स्वदेशी किंवा परदेशी सणाचे नियम सारखेच आहेत.”
ज्या दिवशी पवित्र निवास मंडप म्हणजे कराराचा कोश असलेला तंबू उभा करण्यात आला त्या दिवशी परमेश्वराच्या ढगाने त्याच्यावर छाया केली; रात्री तो पवित्र निवास मंडपावरील ढग अग्नि सारखा दिसला.
तो ढग सतत पवित्र निवास मंडपावर असे आणि रात्री तो अग्निसारखा दिसे.
जेव्हा तो ढग पवित्र निवास मंडपावरील जागेवरुन हलत असे तेव्हा इस्राएल लोकही तळ हलवून त्याच्याप्रमाणे जात असत आणि जेव्हा तो थांबत असे तेव्हा त्याच ठिकाणी ते आपला तळ ठोकीत असत. अशा प्रकारे ते तळ ठोकीत असत.
अशा प्रकारे तळ कधी हलवावा व कधी थांबून तळ कोठे ठोकावा हे परमेश्वर इस्राएल लोकांना दाखवीत असे. जोपर्यंत ढग पवित्र निवास मंडपावर राही तोपर्यंत इस्राएल लोक आपला मुक्काम तेथेच ठेवीत.
कधी कधी ढग पवित्र निवास मंडपावर बरेच दिवस राही तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळून मुक्काम हलवीत नसत.
कधी कधी ढग थोडेच दिवस पवित्र निवास मंडपावर राही, तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळीत. ढग हालला की ते ढगामागे जात असत.
कधी कधी ढग फकत रात्रीचाच पवित्र निवास मंडपावर राही व सकाळी तो हाले. तेव्हा इस्राएल लोक आपले सामान घेऊन त्याच्यामागे जात असत.
ढग जर पवित्र निवास मंडपावर दोन दिवस, किंवा महिनाभर किंवा वर्षभर राहिला तर लोक परमेश्वराची आज्ञा मानून तेथेच राहात असत आणि ढग हाले पर्यंत तेथून हालत नसत, मग ढग जेव्हा आपल्या जागेवरुन हाले तेव्हा लोकही तळ हलवीत.
तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा मानीत, परमेश्वर दाखवी तेथेच ते तळ देत आणि परमेश्वर जेव्हा हालण्यास आज्ञा देई तेव्हा लोक तळ हलवून ढगाच्या मागे जात. लोक लक्ष देऊन परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञा पाळीत.

10

परमेश्वर मोशेला म्हणाला,
“चांदीचे दोन घडीव कर्णे बनव. लोकांना एकत्र जमविण्यासाठी आणि तळ कधी हलवावा हे सांगण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.
तू जर दोन्ही कर्णे बराच वेळपर्यंत वाजविले तर मग सर्व लोकांनी दर्शन मंडपासमोरील अंगणात जमावे.
परंतु बराच वेळ एकच कर्णा वाजविला तर मग फकत इस्राएलांच्या बारा वंशाच्या प्रमुखांनीच तुला भेटावयास यावे.
“कर्ण्यांचा थोडा गजर झाला म्हणजे लोकांनी आपला तळ हलवावा हे सांगण्याचा तो एक मार्ग होईल. पहिल्याच वेळी जेव्हा तू कर्ण्याचा थोडा गजर करशील तेव्हा दर्शनमंडपाच्या पूर्वेकडील छावण्यातील वंशानी पुढे चालण्यास सुरवात करावी.
दुसऱ्या वेळी थोडाच वेळ तू कर्णा वाजवशील तेव्हा दक्षिणेकडील छावण्यातील वंशानी पुढे निघण्यास सुरवात करावी.
परंतु विशेष कारणासाठी मंडळी एकत्र जमावावयाची असेल तर कर्णे वेगळ्या प्रकारे म्हणजे एकाच सरळ सारख्याच सुरात वाजवावेत.
फकत अहरोनाच्या याजक असलेल्या मुलांनीच कर्णे वाजवावीत. तुम्हाला पिढ्यान्पिढ्याचा कायमचा विधीनियम आहे.
“जर तुम्ही तुमच्या देशातच शत्रूशी लढत असाल, तर त्यांच्याशी लढावयास जाण्यापूर्वी तुम्ही मोठमोठ्याने कर्णे वाजवावेत. परमेश्वर तुमचा कर्ण्यांचा आवाज ऐकेल आणि तो तुमच्या शत्रूपासून तुमचे रक्षण करील.
तसेच तुम्ही सणाच्या व इतर आनंदाच्या प्रसंगी व नवीन चंद्राच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी किंवा महिन्याच्या पहिल्या दिवशी-तुमची होमार्पणे, शांत्यार्पणे वाहताना तुम्ही कर्णे वाजवावेत; तुमच्या परमेश्वराला तुमची आठवण करुन देण्याचा हा एक विशेष मार्गच आहे; हे तुम्ही करावे अशी मी तुम्हास आज्ञा देतो. मी तुमचा देव परमेश्वर आहे.”
इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या विसाव्या दिवशी कराराचा कोश असलेल्या पवित्र निवास मंडपावरील ढग वर गेला.
तेव्हा इस्राएल लोकांनी आपला प्रवास सुरू केला. त्यांनी सीनायचे रान सोडले आणि ढग पारानाच्या रानात थांवेपर्यंत ते प्रवासकरीत गेले.
छावणी हलवण्याची इस्राएल लोकांची ही पहिलीच वेळ होती. परमेश्वराने त्यांना मोशेकडून दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी हे केले.
यहुदाच्या छावणीतील तीन गट पहिल्याने निघाले. त्यांच्या निशाणा मागे ते चालले. पहिला गट यहुदाच्या कुळाचा होता. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन त्यांचा सेनानायक होता.
त्यानंतर इस्साखारचे कूळ निघाले. सुवाराचा मुलगा नथनेल त्यांचा नेता होता.
आणि मग जबुलूनाचे कूळ निघाले. हेलोनाचा मुलगा अलीयाब त्यांचा नेता होता.
मग पवित्र निवास मंडप उतरविण्यात आला आणि गेर्षोन व मरारी वंशाचे लोक पवित्र निवास मंडप घेऊन निघाले. तेव्हा ह्या वंशाचे लोक नंतरच्या रांगते होते.
त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीतील तीन गट निघाले. लोक त्यांच्या निशानामागे चालले होते. त्यातील पहिला गट रऊबेन कुळाचा होता. शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांचा सेनानायक होता.
त्यानंतर शिमोन कुळाचे लोक निघाले. सुरीशदैचा मुलगा शलूमीयेल हा त्यांचा सेनानायक होता.
नंतर गाद वंशाच्या दलाचे लोक निघाले. रगुवेलाचा मुलगा एल्यासाप त्यांचा सेनानायक होता.
मग कहाथी लोक पवित्र स्थानातील पवित्र वस्तू घेऊन निघाले. ते अशावेळी जाऊन पोहोंचले की त्यांच्या येण्याओगोदर इतर लोकांनी पवित्र निवास मंडप उभा करुन तयार ठेवला होता.
त्यानंतर एफ्राइम वंशाच्या छावणीतील तीन गट निघाले. लोक त्यांच्या निशाणामागे चालले होते. त्यात पहिला गट एफ्राइम कुळाचा होता. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांचा सेनानायक होता.
त्यानंतर मनश्शे कुळाचे लोक निघाले. पदाहसुराचा मुलगा गमलीयेल त्यांचा सेनानायक होता.
मग बन्यामीन कुळाचे लोक निघाले. गिदोनीचा मुलगा अबीदान त्यांचा सेनानायक होता.
छावण्यांच्या रागेतील सर्वात शेवटची तीन दले दान वंशाची होती. ती पुढे गेलेल्या दलांचे संरक्षण करणारी पिछाडीची तुकडी होती. तिच्यात पहिले दान कुळाचे लोक होते. ते त्यांच्या निशाणामागे चालले होते. अम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर त्यांचा सेनानायक होता.
त्यानंतर आशेर कुळाचे लोक निघाले. आक्रानाचा मुलगा पगीयेल त्यांचा सेनानायक होता.
मग नफताली कुळाचे लोक निघाले. एनानाचा मुलगा अहीरा त्यांचा सेनानायक होता.
इस्राएल लोक ठिक ठिकाणाहून प्रवास करिताना ह्या क्रमाने निघत.
मोशेचा सासरा रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याला मोशे म्हणाला, “देवाने आम्हाला वचन दिलेल्या देशात आम्ही जात आहोत. तू आमच्याबरोबर चल. आम्ही तुझ्याशी चांगले वागू; इस्राएल लोकांना उत्तम गोष्टी देण्याचे परमेश्वराने वचन दिले आहे.”
परंतु होबाबाने उत्तर दिले, “नाही, मी तुमच्याबरोबर येणार नाही. मला माझ्या देशात व माझ्या लोकात परत गेले पाहिजे.”
मग मोशे त्याला म्हणाला, “मी विनंती करितो की तू आम्हाला सोडून जाऊ नको; कारण ह्या रानाची आमच्यापेक्षा तुला अधिक माहिती आहे. तू आमचा वाटाड्या होऊ शकतोस.
तू आमच्याबरोबर येशील तर परमेश्वर आम्हाला ज्या ज्या चांगल्या गोष्टी देईल त्यात आम्ही तुला वाटा देऊ.”
मग होबाब मान्य झाला. आणि परमेश्वराच्या पर्वतापासून ते प्रवास करीत निघाले. याजकांनी परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश घेतला व ते लोकांच्यापुढे चालले. मुक्कामासाठी जागा शोधताना तीन दिवस तो पवित्र कोश त्यांनी वाहिला.
प्रत्येक दिवशी परमेश्वराचा ढग त्यांच्यावर राहून त्यांना मार्ग दाखवीत असे.
लोक जेव्हा पवित्र कराराचा कोश उचलून मुक्काम हलवीत तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, ऊठ तुझ्या शत्रूंची सर्व दिशांना पांगापांग होवो, तुझे सर्व शत्रू तुजपासून पळून जावोत.”
आणि जेव्हा पवित्र कराराचा कोश त्याच्या जागी ठेवला जाई तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या लाखो लोकांकडे परत ये.”

11

मग इस्राएल लोक आपल्या त्रासाबद्दल परत तक्रार करु लागले. ती परमेश्वराने ऐकली व ती ऐकल्यावर त्याचा राग भडकला. परमेश्वरापासूनचा अग्नि त्यांच्यात पेटला आणि त्याने छावणीच्या कडेचा काही भाग जाळून टाकिला.
तेव्हा लोकांनी मोशेकडे मदतीसाठी आरडाओरड केली. मोशेने परमेश्वराला विनंती केली तेव्हा अग्नि शमला.
त्यामुळे त्या ठिकाणाचे नांव तबेरा असे पडले. लोकांनी त्या ठिकाणाला तसे नांव दिले कारण परमेश्वराच्या अग्निमुळे छावणीचा भाग जळून गेला.
जे विदेशी इस्राएल लोकाबरोबर राहात होते, त्यांना इतर काही पदार्थ खावेसे वाटू लागले. लवकरच इस्राएल लोकांनी पुन्हा कुरकुर करण्यास सुरवात केली. लोक म्हणाले, “आम्हांला मांस खावयास पाहिजे.
मिसरमध्ये असताना खाल्लेल्या माश्यांची आम्हाला आठवण येते; तेथे ते आम्हाला फुकट खावयास मिळत. त्याचप्रमाणे तेथे आम्हाला काकड्या, खरबूजे, भाजी, कांदे, लसूण असा चांगला भाजीपाला मिळत आसे.
परंतु आता आम्ही कमजोर झालो आहोत. मान्न्याशिवाय आम्हाला येथे काही ही खावयास मिळत नाही!”
(हा मान्ना लहान धण्यासारखा होता, आणि तो झाडाच्या डिंकासारखा दिसे.
लोक तो गोळा करीत, तो उखळात कुटीत, किंवा भांड्यात शिजवीत किंवा दळीत व त्याच्या भाकरी करी. उत्तम तेलात भाजलेल्या गोड पुऱ्या सारखी त्याची चव लागे.
रात्री दव पडल्यामुळे जमीन ओली झाल्यावर मान्ना जमिनीवर पडत असे.)
मोशेने लोकांची कुरकुर ऐकली. प्रत्येक कुटुंबातील लोक आपापल्या तंबूसमोर बसून कुरकुर करीत होते. त्यामुळे परमेश्वराचा राग भयंकर भडकला आणि त्यामुळे मोळे खिन्न झाला.
मोशेने परमेश्वराला विचारले, “परमेश्वरा, तू माझ्यावर हे संकट का आणिले? मी तुझा दास आहे. माझे काय चुकले? तुला एवढे रागावण्यासारखे मी काय केले? ह्या सर्व लोकांची जबाबदारी तू माझ्यावर का टाकलीस?
तुला माहीत आहे की मी काही ह्या सर्व लोकांचा बाप नाही, की मी ह्यांना जन्म दिला नाही. परंतु परिचारिका-जशी लहान बाळाला छातीशी धरते तशी मी त्यांची काळजी घेतली पाहिजे अशी सक्ति तू माझ्यावर का करतोस? तू आमच्या वाडबडिलांना वचन दिलेल्या देशात त्यांना घेऊन जाण्याची सक्ति माझ्यावर का करतोस?
एवढ्या लोकांना पुरेल एवढे मांस माझ्याजवळ नाही! आणि त्यांची तर माझ्यामागे कुरकुर चालूच आहे. ते म्हणतात, ‘आम्हाला खावयास मांस दे!
मी एकटा ह्या सर्वांची काळजी घेऊ शकत नाही. हे ओझे माझ्यासाठी फारच जड आहे.
त्यांचा त्रास मी सहन करण्याचे काम चालू ठेवावे असा जर तुझा विचार असेल तर मग तू आजच मला मारुन टाक. तू मला दास समजत असशील तर मग आता मला मरु दे. मग माझ्या मागचा सर्व त्रास संपून जाईल!
तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल मंडळीतील सत्तर वडील मजकडे आण. मंडळीचे नेते असलेल्या ह्या लोकांना दर्शनमंडपाच्या दारापाशी आण; व तुझ्याबरोबर त्यांना उभे कर.
मग मी खाली येऊन तेथे तुझ्याशी बोलेन. मग तुझ्यावर असलेल्या आत्म्यातून काही भाग मी त्यांनाही देईन. मग लोकांची काळजी घेण्यास ते तुला मदत करतील. ह्या प्रकारे इस्राएल लोकांची जबाबदारी केवळ तुझ्या एकट्यावर राहणार नाही.
तू ह्या गोष्टी लोकांना सांग: उद्या तुम्ही स्वत: शुद्ध राहा म्हणजे तुम्हाला मांस खावयास मिळेल. परमेश्वराने तुमचे रडगाणे ऐकले आहे. ‘आम्हाला मांस खाण्यास पाहिजे! आम्ही मिसरमध्ये होतो ते बरे होते,’ असे तुम्ही म्हणाला ते शब्दही परमेश्वराने ऐकले आहेत. तेव्हा आता परमेश्वर तुम्हाला मांस देईल आणि तुम्ही ते खाल.
तुम्ही ते एक, किंवा दोन, किंवा पाच, किंवा दहा दिवसच नव्हे तर वीस दिवस देखील खाल.
येवढेच नव्हे तर तुम्ही ते पूर्ण महिनाभर खाल. तुम्हाला त्याचा तिटकारा येईपर्यंत ते खाल. हे असे होईल कारण तुम्ही आपल्या परमेश्वराविरुद्ध कुरकुर केली. परमेश्वर तुम्हामध्ये राहतो आणि तुम्हाला काय पाहिजे ते त्याला माहीत आहे; परंतु तुम्ही त्याच्या विरुद्ध ओरड केली आणि म्हणाला, ‘आम्ही का बरे मिसर सोडले?”‘
मोशे म्हणाला, “परमेश्वरा येथे सहा लाख लोक आहेत आणि तू म्हणतोस की ‘ह्याना पूर्ण महिनाभर पुरेल एवढे मांस मी खावयास देईन!’
आम्ही जरी सर्व शेरडेमेंढरे व गुरेढोर कापली तरी ह्या सर्व लोकांना महिनाभर खाण्यास तेवढेही पुरे पडणार नाहीत.”
परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “परमेश्वराचा हात असमर्थ तोकडा पडला आहे काय? मी माझे म्हणणे खरे करुन दाखवीन हे तुला दिसेल.”
तेव्हा मोशे लोकांशी बोलण्याकरिता बाहेर गेला. परमेश्वर जे बोलला ते त्याने त्यांना सांगितले. मग मोशेने मंडळीच्या सत्तर वडिलांना (नेत्यांना) एकत्र जमविले; त्याने त्यांना तंबू भोंवती उभे राहण्यास सांगितले.
मग परमेश्वर ढगातून खाली आला आणि मोशेशी बोलला. मोशेवर परमेश्वराचा आत्मा होता. त्यातून काही घेऊन परमेश्वराने ते त्या सत्तर वडिलावर (नेत्यावर) ठेवला. तो आत्मा आल्यावर ते संदेश सांगू लागले. परंतू त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगीतला नाही.
त्यातील दोन वडील (नेते) एलदाद व मेदाद छावणीच्या बाहेर गेले नाहीत. त्यांची नांवे वडीलांच्या (नेत्यांच्या) यादीत होती. परंतु ते छावणीतच राहिले; त्यामुळे आत्मा त्यांच्यावरही आला आणि ते छावणीतच संदेश सांगू लागले.
तेव्हा एका तरुणाने पळत जाऊन मोशेला हे सांगितले. तो म्हणाला, “एलदाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत.”
तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा मोशेला म्हणाला, “मोशे, माझे स्वामी तुम्ही त्यांना बंदी घाला.” (यहोशवा तरुण असल्यापासून मोशेचा मदतनीस होता.)
मोशेने त्याला उत्तर दिले, “ह्याच्या योगाने माझ्या नेतेपणाला कमीपणा येईल असे तुला वाटते काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने त्या सर्वांवर आपला आत्मा ठेविला असता तर किती बरें होते.”
मग मोशे व इस्राएलांचे नेते छावणीमध्ये परत गेले.
मग परमेश्वराने समुद्रावरुन जोरदार वारा वाहावयास लाविला. त्या वाऱ्याने लावे पक्षी त्या भागात वाहून आणिले. ते लावे पक्षी सर्व छावणीच्या भोंवती उडत राहिले. ते इतके होते की छावणीचे अंगण व सारा परिसर त्यांनी भरुन गेला. त्यांचा जमिनीपासून तीन फूट वरपर्यंत थर साचला. माणूस एक दिवसभरात जितका दूर चालत जाईल तेथ पर्यंत तो थर होता.
लोक बाहेर पडले व त्यांनी दिवसभर व रात्रभर लावे पक्षी गोळा केले आणि त्यांनी पूर्ण दुसरा दिवसभरही ते गोळा केले. कोणत्याही माणसाने गोळा केलेले पक्षी कमीत कमी साठ बुशेल भरले. मग लोकांनी लावे पक्षांचे मांस सर्व छावणी सभोंवती पसरवले.
लोकांनी मांस खाण्यास सुरवात केली परंतु परमेश्वराचा राग भयंकर भडकला. ते मांस त्यांच्या तोंडात होते तोच म्हणजे ते पूर्ण खाऊन होण्यापूर्वी परमेश्वराने त्यांना भयंकर आजारी पाडले व मारुन टाकिले.
म्हणून लोकांनी त्या ठिकाणाला किब्रोथ-हत्तव्वा असे नांव दिले. कारण ह्याच ठिकाणी, ज्या लोकांना मांस खाण्याची अतिशय कडक इच्छा झाली होती त्यांना पुरण्यात आले.
किब्रोथ हत्तव्वापासून लोकांनी हसेरोथपर्यंत प्रवास केला व तेथे त्यांनी मुक्काम केला.

12

मिर्याम व अहरोन मोशेविरुद्ध बोलू लागले. त्यांनी त्याच्यावर टीका केली कारण त्याने एका इथिओपीयन-कुशी-स्त्रीशी लग्न केले. मोशेने त्या इथिओपीयन-कुशी-स्त्रीशी लग्न केले ते योग्य केले नाही असे त्यांना वाटले.
ते स्वत:शीच म्हणाले, “परमेश्वराने लोकांशी बोलण्यासाठी मोशेचा उपयोग केला. पण मोशे काय असा एकच नव्हे. परमेश्वर आमच्याद्वारेही बोलला आहे!” परमेश्वराने हे ऐकले.
(मोशे फार नम्र माणूस होता. त्याने कधी अभिमान धरला नाही किंवा बढाई मारली नाही पृथ्वीवरील कोणत्याही माणसापेक्षा मोशे अधिक नम्र होता.)
तेव्हा परमेश्वर आला आणि मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांच्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, “तुम्ही तिघे आत्ताच्या आता दर्शनमंडपापाशी या!” तेव्हा मोशे, अहरोन व मिर्याम दर्शनमंडपापाशी गेले.
परमेश्वर एका उंच ढगातून खाली आला दर्शनमंडपाचा दारापाशी उभा राहिला. परमेश्वराने हाक मारली, “अहरोन व मिर्याम!” तेव्हा अहरोन व मिर्याम त्याच्याकडे गेले.
परमेश्वर म्हणाला, “माझे ऐका!” तुमच्यातील संदेष्ट्यांना मी परमेश्वर दृष्टांतातून दर्शन देतो, मी त्यांच्याशी स्वप्नात बोलतो
परंतु मोशेचे तसे नाही. मोशे माझ्या सर्व घरण्यात विश्वासू आहे.
मी त्याच्याशी बोलताना समोरासमोर बोलतो. मी त्याच्याशी दाखल्याने किंवा गुप्त अर्थ असलेल्या गोष्टींनी बोलत नाही-त्याला समजाव्यात अशा गोष्टी मी त्याला स्पष्टपणे दाखवितो. आणि मोशे परमेश्वराचे रुप स्पष्टपणे बघतो. तर असे असताना माझा सेवक मोशे ह्याच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत तुम्हाला कशी झाली?”
परमेश्वराचा राग त्यांच्यावर खूप भडकला आणि तो त्यांना सोडून निघून गेला.
ढग पवित्र निवास मंडपापासून वर गेला. तेव्हा अहरोनाने वळून मिर्यामकडे पाहिले. तिचे अंग बफर्ासारखे पांढरे झाले होते. तिला भयंकर त्वचेचा रोग झाला होता!
म्हणून अहरोन मोशेला विनंती करुन म्हणाला, “माझे स्वामी, आम्ही केलेल्या मूर्खपणाच्या पापाबद्दल आमची क्षमा करा.
मेलेल्या जन्मलेल्या बाळाच्या चामड्यासारखे तिचे चामडे होऊ देऊ नका.” (कधी कधी आपले अर्धे चामडे खाऊन टाकल्याप्रमाणे एकादे बाळ जन्मते.)
म्हणून मोशेने परमेश्वराला विनंती केली, “देवा, तिला ह्या रोगापासून बरे कर.”
परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “जर तिचा बाप तिच्या तोंडावर थुंकला असता तर तिला सात दिवस लाज वाटली असती ना! तेव्हा सात दिवस तिला छावणीच्या बाहेर काढ मग ती बरी होईल; मग तिने परत छावणीत यावे.
म्हणून त्यांनी तिला सात दिवस छावणीच्याबाहेर काढले आणि ती छावणीत परत येईपर्यंत लोकांनी आपला मुक्काम हलविला नाही.
त्यानंतर लोकांनी हसेरोथ सोडले आणि पारानाच्या रानापर्यंत त्यांनी प्रवास केला आणि तेथे रानातच त्यांनी आपला तळ ठोकला.”

13

परमेश्वर मोशेला म्हणाला,
“कनान देश हेरण्यासाठी काही लोकांना पाठव. हाच देश मी इस्राएल लोकांना देणार आहे. त्यांच्या बारा वंशानुसार प्रत्येकी एका नेत्याला पाठव.”
तेव्हा मोशेने परमेश्वराची आज्ञा मानून, लोक पारानच्या वाळवंटात असताना हे नेते पाठविले.
त्यांची नांवे अशी आहेत: रऊबेन वंशातला जक्कुराचा मुलगा शम्मुवा.
शिमोन वंशातला होरीचा मुलगा शाफाट.
यहुदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब.
इस्साखार वंशातला योसेफाचा मुलगा इगाल.
एफ्राईम वंशातला नूनाचा मुलगा होशा.
बन्यामीन वंशातला सोदीचा मुलगा पलटी,
जबुलून वंशातला सोदीचा मुलगा गद्दीयेल,
योसेफ वंशातला (मनश्शे) - सूसीचा मुलगा गद्दी,
दान वंशातला गमल्लीचा मुलगा अम्मीयेल,
आशोर वंशातला मीकाएलाचा मुलगा सतूर,
नफताली वंशातला बाप्सीचा मुलगा नहब्बी.
आणि गाद वंशातला माकीचा मुलगा गऊवेल.
मोशेने देश हेरावयास पाठविलेल्या लोकांची ही नांवे होती. “(मोशेने नूनाचा मुलगा होशा ह्याचे नांव यहोशवा असे ठेविले.)
मोशेने कनान देश हेरण्यास पाठविताना लोकांना सांगितले की तुम्ही येथून नेगेबमधून निघा आणि मग डोंगराळ प्रदेशात जा.
देश कसा आहे? तेथील लोक कसे आहेत! ते बलवान आहेत किंवा दुबळे आहेत? ते थोडे आहेत किंवा फार आहेत? ते पाहा व समजून घ्या.
ते राहतात तो देश कसा आहे? तो चांगला आहे किंवा वाईट आहे? ते लोक कशा प्रकारच्या नगरात राहतात? संरक्षणासाठी त्या नगरांभोवती कोट आहेत का? त्या नगरांची संरक्षण व्यवस्था बलवान आहे का? ह्या सर्व गोष्टी पाहा व समजून घ्या. तेथील जमीन पीक घेण्यास
योग्य आहे का? त्या प्रदेशात झाडे आहेत का? तेथील काही फळे बरोबर घेऊन या.” (हे पहिली द्राक्षे पिकण्याच्या वेळी घडले.)
म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले. त्यांनी सीन वाळवंटापासून रहोब आणि लेबोहामाथपर्यंतच्या प्रदेशाचा शोध घेतला.
त्यांनी नेगेवमधून त्या प्रदेशात प्रवेश केला आणि ते हेब्रोनला गेले. (हेब्रोन शहर मिसर देशातल्या सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले होते.) अहीमन शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज तेथे राहात होते.
नंतर ते लोक अष्कोलच्या खोऱ्यात गेले. तेथे त्यांनी द्राक्षाच्या वेलीची एक फांदी तोडली. त्या फांदली द्राक्षाचा घड लागलेला होता. त्यांनी ती फांदी एका खांबावर ठेवली आणि दोघे जण ती आपल्या मधोमध ठेवून घेऊन गेले. त्यांनी बरोबर काही डाळींबे व अंजीर ही घेतली.
त्या जागेला अष्कोल खोरे असे म्हणतात कारण तिथे इस्राएल लोकांनी द्राक्षाचा घड तोडला होता.
त्या लोकांनी त्या प्रदेशाचा 40 दिवस शोध घेतला. नंतर ते आपल्या छावणीत परत गेले.
इस्राएल लोकांची छावणी पारानच्या वाळवंटात कादेशजवळ होती ते लोक मोशे, अहरोन आणि इस्राएलच्या सर्व लोकांजवळ गेले. त्यांनी मोशे, अहरोन आणि इतर लोकांना त्यांनी पाहिलेल्या गोष्टीविषयी सांगितले आणि त्या प्रदेशातली फळे त्यांना दाखवली.
ते लोक मोशेला म्हणाले, “तू आम्हाला पाठवलेस त्या प्रदेशात आम्ही गेलो. तो प्रदेश अनेक चांगल्या गोष्टींनी भरलेला आहे. त्या प्रदेशात होणारी ही काही फळे पाहा.
पण तेथे राहणारे लोक खूप शक्तिशाली आहेत. शहरे खूप मोठी आहेत. शहरांचे रक्षण चांगल्या प्रकारे होते. काही अनाकांच्या वंशाजानाही आम्ही पाहिले.
अमालेकी लोक नेगेबमध्ये राहतात. हित्ती, यबूसी आणि अमोरी डोंगराळ भागात राहतात. आणि कनानी लोक समुद्राजवळ आणि यार्देन नदीच्या काठावर राहतात.”
मोशेजवळच्या लोकांना गप्प बसायला सांगून कालेब म्हणाला, “परत जाऊन तो प्रदेश आपण घ्यायला पाहिजे. आपण तो प्रदेश सहज घेऊ शकू.”
पण जे लोक त्याच्याबरोबर तेथे गेले होते ते म्हणाले, “आपण त्यांच्याशी लढू शकणार नाही. ते आपल्यापेक्षा खूप शक्तिशाली आहेत.
आणि त्या माणसांनी इस्राएलच्या सर्व लोकांना सांगितले की त्या प्रदेशातल्या लोकांचा पराभव करण्याइतके शक्तिशाली आपण नाहीत. ते म्हणाले, “आम्ही जो प्रदेश पाहिला तो शक्तिशाली लोकांनी भरलेला आहे. ते लोक तिथे जाणाऱ्या कुठल्याही माणसाचा सहज पराभव करण्याइतके शक्तिमान आहेत.
आम्ही तिथे खूप नेफीलीम लोक पाहिले. (अनाकाचे वंशज नेफीलीम लोकांपासून आलेले आहेत) त्यांनी आमच्याकडे आम्ही जणू नाकतोडे आहोत अशा नजरेने पाहिले. होय! त्यांच्या दृष्टीने आम्ही नाकतोडेच होतो.”

14

त्या रात्री छावणीतले सगळे लोक जोरजोरात आक्रोश करायला लागले.
इस्राएल लोकांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध तक्रारी केल्या. सगळे लोक एकत्र आले आणि मोशेला व अहरोनाला म्हणाले, “आम्ही मिसरमध्ये किंवा वाळवंटात मरुन जायला हवे होते. या नवीन प्रदेशात मारले जाण्यापेक्षा ते अधिक चांगले झाले असते.
या नवीन प्रदेशात युद्धात जाण्यासाठीच परमेश्वराने आम्हाला इथे आणले का? शत्रू आम्हाला मारून टाकील आणि आमच्या बायका मुलांना घेऊन जाईल. मिसर देशात परत जाणेच आमच्या दृष्टीने जास्त बरे आहे.”
नंतर लोक एकमेकांना म्हणाले, “आपण आता दुसरा नेता निवडू आणि मिसर देशात परत जाऊ.”
तिथे जमलेल्या सर्व लोकांसमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले.
यहोशवा आणि कालेब यांनी आपले कपडे फाडले (तक्रारी ऐकून झालेल्या दु:खप्रदर्शनासाठी) नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब हे ही या प्रदेशाच्या शोधात गेलेल्या लोकांपैकी होते.
या दोघांनी तिथे जमलेल्या इस्राएल लोकांना सांगितले, “आम्ही जो प्रदेश बघितला तो खूप चांगला आहे.
तो प्रदेश चांगल्या चांगल्या गोष्टींनी संपन्न आहे. आणि जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या प्रदेशात नेईल आणि तो प्रदेश आपल्याला देईल.
म्हणून परमेश्वराविरुद्ध जाऊ नका. त्या प्रदेशातल्या लोकांची भीती बाळगू नका. आपण त्यांचा पराभव करु शकू. त्यांच्याकडे कसलेही संरक्षण नाही. सुरक्षित राहण्यासाठी काहीही नाही. परंतु आपल्याजवळ परमेश्वर आहे. म्हणून घाबरु नका.”
सर्व लोक यहोशवाला आणि कालेबला दगडांनी ठार मारण्याची भाषा बोलू लागले. परंतु परमेश्वराची प्रभा दर्शन मंडपावर दिसू लागली. तेथून ती सर्व लोकांना दिसली.
परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे लोक किती वेळ माझ्याविरुद्ध जाणार आहेत? त्यांचा माझ्यावर विश्वास नाही असे ते दाखवितात ते माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला नकार देतात. मी त्यांना खूप शक्तिशाली चिन्हे दाखवली तरीही ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. मी त्यांच्या मध्ये खूप मोठमोठ्या गोष्टी केल्या आहेत.
मी त्यांना एखाद्या भयानक आजारने मारून टाकीन. मी त्यांचा नाश करीन. मी तुझा उपयोग करुन दुसरे राष्ट्र निर्माण करीन. तुझा देश या लोकांपेक्षा मोठा आणि शक्तिमान असेल.”
नंतर मोशे परमेश्वराला म्हणाला, “जर तू असे केलेस तर ते मिसर मधील लोक ऐकतील तुझ्या लोकांना मिसरमधून बाहेर आणण्यासाठी तू तुझ्या महान शक्तीचा उपयोग केलास हे त्यांना माहीत आहे.
मिसरमधल्या लोकांनी कनानच्या लोकांना हे सांगितले आहे. तू परमेश्वर आहेस हे त्यांना अगोदरच माहीत झालेले आहे. तू आपल्या लोकांबरोबर असतोस हे त्यांना माहीत झाले आहे. लोकांनी तुला पाहिले हे त्यांना माहीत आहे. लोकांना खास ढगाविषयी माहिती आहे. तुझ्या लोकांना मार्ग दाखविण्यासाठी तू त्या ढगाचा उपयोग करतोस हे त्या लोकांना माहीत आहे. रात्री त्या ढगाचा अग्नी होतो आणि तुझ्या लोकांना मार्ग दाखवतो हे ही त्यांना माहीत आहे.
म्हणून आता तू या लोकांना मारू नकोस. जर तू त्यांना मारलेस तर सर्व देशांना ही बातमी कळेल व ते म्हणतील.
“परमेश्वर त्या लोकांना त्याने वचन दिलेल्या प्रदेशात आणू शकत नव्हता म्हणून परमेश्वराने त्यांना वाळवंटात मारून टाकले.’
“प्रभू, म्हणून आता तू तुझी शक्ती दाखव. तू, ‘मी ती दाखवीन’ असे म्हणाला होतास त्याप्रमाणे दाखव.
तू म्हणालास, ‘परमेश्वराला रागवायला वेळ लागतो. तो महान प्रीतिने भरलेला आहे. परमेश्वर अपराधांची व अधर्माची क्षमा करतो पण जे लोक अपराधी आहेत त्यांना परमेश्वर नेहमी शिक्षा करतो. त्यांच्या मुलांना व नातवंडांना शिक्षा करतो आणि पंतवंडाना देखील त्या वाईट गोष्टी बद्दल शिक्षा करतो.’
आता तुझे दिव्य प्रेम या लोकांना दाखव. त्यांच्या पापाची क्षमा कर. त्यांनी मिसर सोडल्यापासून आतापर्यंत तू जसा त्यांना क्षमा करीत आला आहेत तशीच आताही क्षमा कर.”
परमेश्वराने उत्तर दिले, “तू सांगितलेस त्याप्रमाणे मी लोकांना क्षमा करीन.”
पण मी तुला सत्य सांगतो. मी नक्कीच जिवंत आहे आणि माझी प्रभा नक्कीच साऱ्या पृथ्वीवर भरून आहे. हे जसे खरे आहे तसेच खरेपणाने मी तुला वचन देतो.
मी मिसर देशातून ज्या लोकांना बाहेर काढले त्यांच्यापैकी कोणीही कनान देश कधीही बघणार नाही. त्या लोकांनी मिसर देशात माझा पराक्रम आणि मी केलेल्या महान गोष्टी पाहिल्या. आणि वाळवंटात ज्या महान गोष्टी मी केल्या त्याही त्यांनी बघितल्या. परंतु त्यांनी माझी आज्ञा पाळली नाही आणि माझी दहादा परीक्षा पाहिली.
मी त्यांच्या पूर्वजांना वचन दिले. मी त्यांना तो प्रदेश देण्याचे वचन दिले. पण त्यांच्यापैकी जे लोक माझ्याविरुद्ध गेले ते कधीही त्या प्रदेशात पाऊल टाकणार नाहीत.
पण माझा सेवक कालेब वेगळा होता. तो माझे अनुकरण पूर्णपणे करतो. म्हणून मी त्याला त्याने आधी पाहिलेल्या प्रदेशात घेऊन जाईन. आणि त्याच्या वंशजांना तो प्रदेश मिळेल.
अमालेकी आणि कनानी लोक खोऱ्यात रहात आहेत. म्हणून उद्या तुम्ही ही जागा सोडली पाहिजे. तांबड्या समुद्राकडे रस्त्यावरच्या वाळवंटात परत जा.”
परमेश्वर मोशेला आणि अहरोनला म्हणाला,
“हे वाईट लोक किती काळ माझ्याविरुद्ध तक्रार करीत राहणार आहेत? मी त्यांच्या तक्रारी आणि कुरकुरी ऐकलेल्या आहेत.
म्हणून तू त्यांना सांग, ‘ज्याविषयी तुम्ही तक्रार करत. त्या सर्व गोष्टी परमेश्वर तुम्हाला करील. तुम्हाला पुढील गोष्टी होतील.
तुम्ही या वाळवंटात मराल. वीस वर्षांचा किंवा त्याहून मोठा असलेला आणि माझ्या लोकापैकी असलेला प्रत्येक जण मरेल. तुम्ही माझ्याविरुद्ध, परमेश्वराविरुद्ध तक्रार केली आहे.
म्हणून जो प्रदेश देण्याचे वचन मी तुम्हाला दिले त्या प्रदेशात तुमच्यापैकी कोणीही प्रवेश करणार नाही आणि कोणीही राहाणार नाही. फक्त यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा त्या प्रदेशात जातील.
त्या प्रदेशातील लोक तुमची मुले नेतील अशी भीती तुम्हाला वाटली आणि त्याविरुद्ध तुम्ही तक्रार केली. पण मी तुम्हाला सांगतो की मी ती मुले त्या प्रदेशात आणीन. तुम्ही ज्या गोष्टींचा स्वीकार करायला नकार दिला त्या गोष्टींचा ते उपभोग घेतील.
आणि तुमच्याबद्दल बोलायचे तर तुम्ही या वाळवंटात मराल.
“तुमची मुले इथे या वाळवंटात 40 वर्षे भटकणारे मेंढपाळ असतील. त्यांना दु:ख भोगावे लागेल कारण तुम्ही माझ्याशी इमानदार नव्हता. या वाळवंटात जोपर्यंत तुम्ही मरणार नाही तोपर्यंत त्यांना दु:ख भोगावे लागेल.
तुम्हाला तुमच्या पापाबद्दल 40 वर्षे दु:ख भोगावे लागेल. (त्या माणसांना तो प्रदेश शोधायला 40 दिवस लागले. त्या प्रत्येक दिवसासाठी एक वर्ष) मी तुमच्या विरोधात असणे ही किती भयानक गोष्ट आहे हे तुम्हाला समजेल.
“मी परमेश्वर आहे आणि मी बोललो आहे. मी वचन देतो की या दुष्ट माणसांना मी या सर्व गोष्टी करीन. माझ्याविरुद्ध जाण्यासाठी ते लोक एकत्र आले म्हणून ते सर्व या वाळवंटात मरतील.”
मोशेने ज्या लोकांना नवीन प्रदेश शोधण्यासाठी पाठवले होते त्याच लोकांनी परत येऊन इस्राएल लोकांमध्ये तक्रारी पसरावयाला सुरुवात केली. ते लोक म्हणाले की त्या प्रदेशात जाण्याइतके आपले लोक शक्तिवान नाहीत.
इस्राएल लोकांमध्ये संकटे पसरविण्यास तेच लोक जबाबदार होते म्हणून परमेश्वराने त्या लोकांना मारण्यासाठी आजार निर्माण केला.
यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे ही तो प्रदेश शोधायला पाठवलेल्या लोकांत होते परंतु परमेश्वराने त्या दोघांना वाचवले. ज्या आजाराने इतर सर्वजण मेले, तो आजार त्या दोघांना झाला नाही.
मोशेने या सर्व गोष्टी इस्राएल लोकांना सांगितल्या. लोक खूप दु:खी झाले.
दुसऱ्या दिवशी पहाटे लोकांनी डोंगरावर असलेल्या त्या प्रदेशात जायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “आम्ही पाप केले आहे. आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही याचे आम्हाला वाईट वाटते. परमेश्वराने वचन दिलेल्या प्रदेशात आम्ही जाऊ.”
पण मोशे म्हणाला, “तुम्ही परमेश्वराची आज्ञा का पाळत नाही? तुम्हाला यश मिळणार नाही.
त्या प्रदेशात जाऊ नका. परमेश्वर तुमच्याबरोबर नाही म्हणून तुमचा सहज पराभव होऊ शकेल.
अमालेकी आणि कनानी लोक तेथे तुमच्याविरुद्ध लढतील. तुम्ही परमेश्वरापासून दूर गेला आहात म्हणून युध्दाच्या वेळी तो तुमच्याबरोबर नसेल आणि तुम्ही सर्व युद्धात मारले जाल.”
परंतु लोकांनी मोशेवर विश्वास ठेवला नाही. ते उंच डोंगरावरच्या प्रदेशात गेले. परंतु मोशे आणि परमेश्वराचा आज्ञापटाचा कोश त्यांच्याबरोबर गेला नाही.
डोंगरावरच्या प्रदेशात राहणारे अमालेकी आणि कनानी लोक खाली आले आणि त्यांनी इस्राएल लोकांवर हल्ला केला. त्यांनी इस्राएल लोकांचा सहज पराभव केला आणि हर्मापर्यंत त्यांचा पाठलाग केला.

15

परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग.” मी तुम्हाला एक प्रदेश वस्ती करण्यासाठी देत आहे. तुम्ही जेव्हा तिथे प्रवेश कराल तेव्हा
तुम्ही परमेश्वराला खास होमार्पणे द्या. त्याच्या सुवासाने परमेश्वरास आनंद होईल. तुम्ही तुमच्या गायी, मेंढ्या आणि बकऱ्या यांचा उपयोग होमार्पण यज्ञ नवस स्वखुशीने द्यावयाच्या देणाग्या किंवा नेहमीच्या यज्ञातला भाग म्हणून उपयोग कराल.
“एखादा माणूस जेव्हा त्याची अर्पणे आणतो तेव्हा त्याने परमेश्वराला धान्यसुध्दा अर्पण केले पाहिजे. हे धान्यार्पण आठ कप सपीठ 1/4 हिंनभर तेलात मिसळून केलेले असले पाहिजे.
प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही छोटी बकरी/कोकरु अर्पण कराल तेव्हा त्याच्याबरोबर 1/4 कप द्राक्षारस पेयार्पण केला पाहिजे.
“जर तुम्ही मेंढा अर्पण करणार असाल तर त्याच्या बरोबर धान्यार्पणही केले पाहिजे. हे धान्यार्पण सोळा कप सपीठ 1/3 हिन तेलात मिसळून दिले पाहिजे.
आणि तुम्ही 1/4 कप द्राक्षारस पेयार्पण केला पाहिजे. त्याच्या सुवास परमेश्वराला आनंदित करेल.
“जेव्हा तुम्ही लहान बैल होमार्पण म्हणून अर्पण कराल किंवा शांत्यार्पण म्हणून द्याल किंवा परमेश्वराला दिलेले खास वचन म्हणून अर्पण कराल.
तेव्हा त्या गोऱ्ह्या बरोबर तुम्ही धान्यार्पणसुध्दा आणले पाहिजे. हे धान्यार्पण 24 कप सपीठ 2 कप तेलात मिसळलेले असले पाहिजे.
त्याच्याबरोबर 2 कप 1/2 हिन द्राक्षारस पेयार्पण केला पाहिजे. हे अर्पण होमार्पण असेल त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील.
तुम्ही परमेश्वराला जो बैल, मेंढा, मेंढी किंवा बकरी यांचे अर्पण कराल ते याप्रमाणे तयार करायला पाहिजे.
तुम्ही जो प्राणी अर्पण कराल त्या प्रत्येका बरोबर हे ही अर्पण करा.
“अशाप्रकारे इस्राएलच्या प्रत्येक नागरिकाने परमेश्वराला आनंदित करण्यासाठी होमार्पण केले पाहिजे.
परदेशी लोक तुमच्यातच राहतील. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी त्यांनीही या प्रमाणेच होमार्पण केले पाहिजे.
हेच नियम सर्वाना लागू आहेत. इस्राएलचे लोक आणि परदेशी लोक तुमच्या देशात राहतात. त्यांना हे नियम सर्वकाळ लागू राहतील. तुम्ही आणि तुमच्याबरोबर राहणारे इतर लोक परमेश्वरापुढे समान आहात.
याचा अर्थ असा की तुम्ही सारख्याच नियमाचे व विधींचे पालन केले पाहिजे. हे नियम व विधी इस्राएल लोकांसाठी आणि तुमच्यात राहणाऱ्या इतर लोकांसाठी आहेत.”
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांना या गोष्टी सांग: मी तुम्हाला दुसऱ्या प्रदेशात नेत आहे.
जेव्हा तुम्ही तेथे पिकणारे अन्न खाल तेव्हा त्यातला थोडा भाग परमेश्वराला अर्पण करा.
तुम्ही धान्य गोळा करुन ते दळाल आणि त्याचे भाकरीसाठी पीठ कराल. त्या पिठाचा पहिला भाग तुम्ही नेहमी परमेश्वराला अर्पण केला पाहिजे. हे मळणीच्या वेळी धान्यार्पण करतात त्याप्रमाणे हे अर्पण केले पाहिजे.
हा नियम सर्वकाळ राहील. त्या पीठाचा पहिला भाग तुम्ही नेहमी परमेश्वराला अर्पण केला पाहिजे.
“जर तुम्ही काही चूक केली आणि परमेश्वराने मोशेला दिलेल्या एखाद्या आज्ञेचे पालन करायला विसरलात तर तुम्ही काय कराल?
परमेश्वराने त्या आज्ञा तुम्हाला मोशे मार्फत दिल्या आहेत ज्या दिवसापासून त्या दिल्या तेव्हापासून त्या लागू आहेत. आणि त्या सदैव राहतील.
तेव्हा जर तुम्ही चूक केलीत आणि या आज्ञांचे पालन करायला विसरलात तर तुम्ही काय कराल? जर इस्राएलच्या सर्व लोकांनी मिळून चूक केली तर त्यानी सर्वांनी मिळून एक गोऱ्हा परमेश्वराला होमार्पण केला पाहिजे. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. गोऱ्ह्याबरोबर धान्यार्पण आणि पेयार्पण करायला पाहिजे. तुम्ही पापार्पणासाठी बकराही अर्पण केला पाहिजे.
“म्हणून याजकाने लोकांना शुद्ध करण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. त्याने या गोष्टी इस्राएलच्या सर्व लोकांसाठी केल्या पाहिजेत. ते पाप करीत आहेत हे लोकांना माहित नव्हते. पण जेव्हा ते त्यांना समजेल तेव्हा त्यांनी परमेश्वरासाठी भेट आणली. त्यांनी होमार्पण आणि पापार्पण आणले म्हणून लोकांना क्षमा केली जाईल.
इस्राएलाच्या सर्व लोकांना आणि त्यांच्यात राहणाऱ्या इतर लोकांना क्षमा केली जाईल. त्यांना क्षमा करण्यात येईल. कारण आपण चूक करीत आहोत हे त्यांना माहीत नव्हते.
“पण जर फकत एकाच माणसाने चूक केली तर त्याने एक वर्ष वयाची बकरी आणली पाहिजे. ती बकरी पापासाठी अर्पण केली जाईल.
याजक त्या माणसाला शुद्ध करण्यासाठी काही गोष्टी करील. त्या माणसाने चूक केली आणि परमेश्वरापुढे पाप केले. पण याजकाने त्याला शुद्ध केले तर त्याला क्षमा केली जाईल.
जो माणूस चूक करतो आणि पाप करतो त्याच्यासाठी हा नियम आहे. इस्राएलच्या कुटुंबात जन्मलेल्या लोकांसाठी व तुमच्या घरात राहणाऱ्या परदेशी लोकांसाठी सारखेच नियम आहेत.
पण जर एखाद्याने पाप केले आणि आपण चूक करीत आहो हे त्याला कळत असले, तर तो माणूस परमेश्वराविरुद्ध आहे. त्या माणसाला त्याच्या लोकांपासून वेगळे काढून टाकले पाहिजे. इस्राएलाच्या वंशात जन्मलेल्या माणसासाठी किंवा तुमच्यात राहणाऱ्या परदेशी माणसासाठी सारखाच नियम आहे.
परमेश्वराचा शब्द महत्वाचा आहे असा विचार त्या माणसाने केला नाही आणि त्याने परमेश्वराची आज्ञा मोडली. तर त्या माणसाला तुमच्या समूहापासून वेगळे केलेच पाहिजे. तो माणूस अपराधी आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे.”
या वेळी इस्राएल लोक अजून वाळवंटात रहात होते. एका माणसाला जळणासाठी लाकूड सापडले म्हणून तो ते गोळा करीत होता. परंतु तो शब्बाथचा दिवस होता. इतरांनी त्याला ते करताना पाहिले.
ज्या लोकांनी त्याला लाकडे गोळा करताना पाहिले त्यांनी त्याला मोशे व अहरोनाकडे आणले आणि सर्व लोक भोवती गोळा झाले.
त्यांनी त्या माणसाला तिथेच ठेवले कारण त्याला काय शिक्षा द्यायची ते त्यांना माहीत नव्हते.
नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तो माणूस मेला पाहिजे. तेव्हा सर्व लोकांनी त्याच्यावर छावणीबाहेर दगडमार करावा.”
म्हणून लोक त्याला छावणीबाहेर घेऊन गेले आणि त्याला दगडमार करुन मारले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले.
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांशी बोल. त्यांना या गोष्टी सांग: माझ्या आज्ञा तुमच्या लक्षात राहाण्यासाठी मी तुम्हाला काहीतरी देईन. दोऱ्याचे खूपसे तुकडे एकत्र बांधा आणि ते तुमच्या कपड्याच्या एका टोकाला बांधून ठेवा. त्या प्रत्येक गोंड्याला एक निळा दोरा बांधा. या गोष्टी तुम्ही नेहमी अंगावर बाळगा.
तुम्ही या गोंड्याकडे बघून परमेश्वराने दिलेल्या सगव्व्या आज्ञा लक्षात ठेवू शकाल. म्हणजे तुम्ही आज्ञा पाळाल. तुम्ही आज्ञा विसरुन काहीही चूक करणार नाही आणि तुमच्या शरीराला व डोव्व्यांना हव्या असलेल्या गोष्टी करणार नाही.
माझ्या सगव्व्या आज्ञा पाळायच्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवाल. म्हणजे तुम्ही परमेश्वराचे खास लोक व्हाल.
मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्हाला मिसर देशातून आणणारा मीच आहे. तुमचा देव होण्यासाठी मी हे केले. मीच तुमचा देव परमेश्वर आहे.”

16

कोरह, दाथान, अबीराम आणि ओन मोशेच्या विरुद्ध गेले. (कोरह इसहारचा मुलगा होता. इसहार कहाथचा मुलगा होता आणि कहाथ लेवीचा मुलगा होता. दाथान आणि अबीराम भाऊ होते आणि ती अलीयाबाची मुले होती ओन पेलेथचा मुलगा होता. दाथान, अबीराम आणि ओन रऊबेन वंशातील होते.)
या चार माणसांनी इस्राएल मधून 250 माणसे एकत्र जमविली आणि ते मोशेविरुद्ध उठले. ते लोकांनी निवडलेले नेते होते, हे सर्व लोकांना माहीत होते.
ते मोशे विरुद्ध बोलण्यासाठी समुहाने आले. ते लोक मोशेला आणि अहरोनला म्हणाले, “तुम्ही फारच अधिकार दाखवता आता पुरे झाले! इस्राएलचे इतर लोक ही पवित्र आहेत. त्यांच्यात अजूनही परमेश्वर राहतो. तुम्ही परमेश्वराच्या इतर लोकांपेक्षा स्वत:ला अधिक महत्वाचे समजत आहात.”
जेव्हा मोशेने या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्याने त्याचे तोंड जमिनीपर्यंत लवविले. तो गार्विष्ठ नाही हे त्याला दाखवायचे होते.
मग मोशे कोरह व त्याच्या सर्व अनुयायांना म्हणाला, “उद्या सकाळी परमेश्वर कोण खरोखर त्याचा माणूस आहे ते दाखवील. कोण खरा पवित्र आहे ते परमेश्वर दाखवील आणि परमेश्वर त्या माणसाला त्याच्या जवळ आणिल. परमेश्वर त्या माणसाची निवड करील आणि त्याला स्वत: जवळ आणिल.
म्हणून कोरह तू आणि तुझ्या अनुयायांनी हे करायला हवे:
उद्या अग्नी आणि ऊद-धूप काही खास भांड्यात ठेवा. नंतर ती भांडी परमेश्वरासमोर आणा. खरोखरच जो पवित्र असेल त्याची परमेश्वर निवड करील. लेवीच्या वंशजांनो तुम्ही फार पुढे गेलात. तुम्ही चूक केलीत.”
मोशे कोरहला आणखी म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो तुम्ही माझे ऐका
तुमची निवड इस्राएलच्या देवाने केली आहे आणि तुम्हाला खास दर्जा दिला आहे म्हणून तुम्ही आनंदी असायला हवे. तुम्ही इस्राएलच्या इतर लोकांपेक्षा वेगळे आहात. परमेश्वराने तुम्हाला खास कामासाठी, इस्राएल लोकांना परमेश्वराची भक्ती करायला मदत व्हावी म्हणून त्याच्या पवित्र निवास मंडपात त्याच्या जवळ आणले. हे पुरेसे नाही का?
परमेश्वराने लेवीच्या वंशजांना याजकांच्या मदतीसाठी जवळ आणले. परंतु आता तुम्हीच याजक व्हायचा प्रयत्न करीत आहात.
तुम्ही आणि तुमचे अनुयायी एकत्र आलात आणि परमेश्वराच्या विरुद्ध गेलात. अहरोनाने काही चूक केली का? नाही. मग तुम्ही अहरोनाविरुद्ध का तक्रार करीत आहात.”
नंतर मोशेने दाथान, अबीराम, ह्या अलियावाच्या मुलांना बोलावले पण ते दोघे म्हणाले, “आम्ही येणार नाही.
तू आम्हाला वाळवंटात दूध आणि मध असलेल्या प्रदेशातून आणले आहेस. तू आम्हाला वाळवंटात ठार मारायला आणले आहेस. आणि आता आमच्यावर तुझी अधिक सत्ता आहे हे तुला दाखवायचे आहे.
आम्ही तुझ्या मागे का यावे? तू आम्हाला चांगल्या गोष्टींनी समृद्ध असलेल्या नवीन प्रदेशात आणले नाहीस. देवाने कबूल केलेला प्रदेश तू आम्हाला दिला नाहीस. तू आम्हाला शेते व द्राक्षमळे दिले नाहीस तू ह्या लोकांना गुलाम करणार आहेस का? नाही. आम्ही येणार नाही.”
म्हणून मोशेला खूप राग आला. तो परमेश्वराला म्हणाला, “मी या लोकांच्या बाबतीत काहीही वाईट केले नाही. मी त्यांच्या कडून काहीही घेतले नाही-साधा गाढव देखील नाही! परमेश्वरा, त्यांची अर्पणे स्विकारु नकोस.”
नंतर मोशे कोरहला म्हणाला, “उद्या तू आणि तुझे अनुयायी परमेश्वरापुढे उभे राहतील. तिथे तू अहरोन आणि तुझे अनुयायी असतील.
तुम्ही प्रत्येकाने एक भांडे आणावे त्यात ऊद-धूप टाकावा आणि ते परमेश्वराला द्यावे. नेत्यांसाठी 250 भांडी असतील आणि एकेक भांडे तुझ्यासाठी व अहरोनासाठी असेल.”
म्हणून प्रत्येकाने भांडे आणले आणि त्यात उद धूप जाळला, नंतर ते दर्शन मंडपाच्या दारात उभे राहिले. मोशे आणि अहरोनसुद्धा तिथे उभे राहिले.
कोरहनेसुद्ध तंबूच्या दारात लोक जमा केले. नंतर प्रत्येकाला परमेश्वराची प्रभा दिसली.
परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला,
“या लोकांपासून दूर जा. मला आता त्यांचा नाश करायचा आहे.”
पण मोशे आणि अहरोन जमिनीवर पालथे पडले आणि ओरडले, “कृपा करुन या सगळयांवर रागावू नकोस, सर्वाच्या आत्म्यांच्या देवा! फकत एका माणसाने पाप केले आहे!”
नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
“सर्व लोकांना कोरह, दाथान, व अबीराम यांच्या तंबूपासून दूर जायला सांग.”
मोशे उभा राहिला आणि दाथान व अबीराम यांच्याकडे गेला. इस्राएलचे सर्व वडिलधारी त्याच्या मागे गेले.
मोशेने सर्व लोकांना बजावले, “या दुष्टांच्या तंबू पासून दूर जा. त्यांच्या कोणत्याही वस्तूला हात लावू नका. जर तुम्ही हात लावला तर त्यांच्या पापामुळे तुमचाही नाश होईल.”
म्हणून लोक कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबू पासून दूर गेले. दाथान आणि अबीराम त्यांच्या तंबूकडे गेले. ते त्यांच्या तंबू बाहेर आपल्या बायका, मुले आणि तहान्या मुलांबरोबर उभे राहिले.
नंतर मोशे म्हणाला, “परमेश्वराने मला मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी करायला पाठवले आहे या बद्दलचा पुरावा मी तुम्हांला दाखवीन. या गोष्टी करण्याची कल्पना माझी नव्हती हेही मी तुम्हांला दाखवीन.
हे इथले लोक मरतील. पण ते जर सामान्य रीतीने मेले-जशी माणसे नेहमी मरतात-तर त्यावरून असे दिसेल की परमेश्वराने मला खरंच पाठवल नाही.
पण जर परमेश्वराने या लोकांना वेगव्व्या नव्या रीतीने मारले-तर तुम्हांला कळेल की त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले होते. हा पुरावा आहे: धरती दुभागेल आणि त्या लोकांना आपल्या पोटात घेईल. ते जिवंतपणीच त्यांच्या कबरेत जातील. आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जाईल.”
जेव्हा मोशेचे बोलणे संपले तेव्हा त्या लोकांच्या पायाखालची जमीन दुभागली.
धरतीने जणू आपले तोंड उघडून त्यांना गिळून टाकले. कोरहची सगळी माणसे, त्याचे संपूर्ण घराणे आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जमिनीत गेली.
ते लोक जिवंतपणी कबरेत गेले आणि त्यांची सगळी चीजवस्तूही त्यांच्या बरोबर गेली. नंतर जमीन पूर्ववत झाली. ते नष्ट झाले-लोकांतुन नाहीसे झाले.
इस्राएल लोकांनी नाश होत असलेल्या लोकांचे आक्रोश ऐकले म्हणून ते सर्व सैरावैरा धावू लागले आणि म्हणाले, “पृथ्वी आपल्यालासुद्धा गिळून टाकील.”
नंतर परमेश्वराकडून अग्नी आला. त्याने उद-धूप जाळणाऱ्या 250 लोकांचा नाश केला.
परमेश्वर मोशेला म्हणाला:
म्हणून याजक एलाजारने लोकांनी आणलेली काशाची सर्व भांडी गोळा केली. ते सगळे लोक जळून गेले पण त्यांची भांडी मात्र होती. नंतर एलाजारने काही माणसांना भांडी ठोकून त्यांचा पत्रा करायला सांगितले. नंतर त्याने धातूचा पत्रा वेदीवर ठेवला.
परमेश्वराने मोशेला जशी आज्ञा केली होती तसेच त्याने केले. अहरोनच्या वंशातीलच कोणी तरी परमेश्वरासमोर उद-धूप जाळू शकतो, दुसऱ्या कोणी परमेश्वरासमोर उद-धूप जाळला तर तो कोरह आणि त्याच्या अनुयायांप्रमाणे मरेल. हे इस्राएल लोकांनी लक्षात ठेवायची ही एक खूण होती.
दुसऱ्या दिवशी इस्राएलच्या सर्व लोकांनी मोशे आणि अहरोनविरुद्ध तक्रार केली. ते म्हणाले, “तुम्ही परमेश्वराची माणसे मारली.”
मोशे आणि अहरोन दर्शन मंडपाच्या दारात उभे होते. लोक मोशे आणि अहरोन विरुद्ध तक्रार करायला एकत्र जमले. पण जेव्हा त्यांनी दर्शन मंडपाकडे पाहिले तेव्हा ढंगानी त्याला झाकून टाकले आणि तिथे परमेश्वराचे तेज दिसू लागले.
नंतर मोशे आणि अहरोन तंबूच्या पुढच्या भागात आले.
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“त्या लोकांपासून दूर जा म्हणजे मी त्यांचा नाश करीन ताबोडतोब. मोशे आणि अहरोन यांनी त्यांचे चेहरे जमिनीपर्यंत लववून दंडवत घातले.”
नंतर मोशे अहरोनला म्हणाला, “तुझे तांब्याचे भांडे आणि थोडासा अग्नी वेदीवरुन घे. नंतर त्यावर उद-धूप टाक. लवकर लोकांकडे जा आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी काहीतरी कर. परमेश्वर त्यांच्यावर रागावला आहे. आजार पसरायला सुरुवात झाली होती.”
पण त्या आजारामुळे 14,700 लोक मेले. यात कोरहमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा समावेश नाही.
भयानक आजार थांबला आणि अहरोन दर्शन मंडपाच्या दाराशी असलेल्या मोशेकडे गेला.

17

परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांशी बोल. त्यांच्या कडून चालण्यासाठी वापरतात
तशा बारा काठ्या घे. बारा वंश प्रमुखांकडून प्रत्येकी एक काठी घे. प्रत्येक माणसाचे नाव त्याच्या त्याच्या काठीवर लिही.
लेवीच्या काठीवर अहरोनचे नाव लिही. प्रत्येक वंश प्रमुखासाठी एकेक काठी असलीच पाहिजे.
या काठ्या दर्शन मंडपात आज्ञापटाचा कोशाच्या वेदीजवळ ठेव. हीच मी तुला भेटण्याची जागा आहे.
खरा याजक म्हणून मी एका माणसाची निवड करीन. मी कोणाची निवड केली ते तुला कळेल कारण त्याच्या काठीला पालवी फुटायला लागेल. याप्रमाणे मी लोक तुझ्या आणि माझ्याविरुद्ध तक्रारी करतात ते बंद पाडीन.”
म्हणून मोशे इस्राएलच्या लोकांशी बोलला. प्रत्येक वंश प्रमुखाने त्याला काठी दिली. त्या 12काठ्या होत्या. प्रत्येक वंश प्रमुखाकडून एकेक काठी आली. एक काठी अहरोनची होती.
मोशेने त्या काठ्या कराराच्या मंडपात परमेश्वरा पुढे ठेवल्या.
दुसऱ्या दिवशी मोशेने मंडपात प्रवेश केला. लेवी वंशाकडून आलेल्या अहरोनच्या काठीला पाने फुटली असल्याचे त्याला दिसले. त्या काठीला फांद्याही फुटल्या होत्या आणि बदामही लागले होते.
म्हणून मोशेने परमेश्वराच्या जागेतून सगव्व्या काठ्या आणल्या. मोशेने त्या काठ्या इस्राएल लोकांना दाखवल्या. त्या सर्वांनी काठ्यांकडे पाहिले आणि प्रत्येकाने आपली काठी परत घेतली.
नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनची काठी परत मंडपात आज्ञापटाचा कोशाजवळ ठेब. जे लोक नेहमी माझ्याविरुद्ध जातात त्यांच्यासाठी ही ताकिदीची खूण असेल. मी त्यांच्या नाश करु नये म्हणून माझ्या विरुद्ध तक्रारी करणे यामुळे बंद होईल.”
मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले.
इस्राएलचे लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरणार आहोत हे आम्हाला माहित आहे आम्ही हरवलो आहोत. आमचा सगव्व्यांचा नाश होणार आहे.
जो कोणी माणूस नुसता परमेश्वराच्या पवित्र स्थानाजवळ येईल त्याचा नाश होईल. आम्ही मरणार हे खरे आहे का?”

18

परमेश्वर अहरोनला म्हणाला, “या पवित्र जागेविरुद्ध काही वाईट गोष्टी केल्या तर तू, तुझी मुले, तुझ्या वडिलांच्या कुटुंबातले सगळे लोक त्याला जबाबदार रहाल. तू आणि तुझी मुले याजकांविरुद्ध केलेल्या वाईट गोष्टींबद्दल जबाबदार राहाल.
तुझ्या कुळातील इतर लेवी लोकांना आण. तुझ्याबरोबर आणि कराराच्या मंडपात काम करण्यासाठी ते तुला आणि तुझ्या मुलांना मदत करतील.
लेवी वंशातील लोक तुझ्या सत्तेखाली आहेत. मंडपात जे जे काम करायचे आहे ते ते लोक करतील. परंतु त्यांनी पवित्र स्थानाजवळ आणि वेदीजवळ जाता काम नये. जर ते गेले तर ते मरतील आणि तू सुद्धा मरशील.
ते तुझ्या बरोबर असतील आणि तुला मदत करतील. ते दर्शन मंडपाची काळजी घ्यायला जबाबदार असतील. मंडपात जे काही काम करायचे असेल ते सर्व ते करतील. तू जेथे असशिल तेथे दुसरा कोणीही येऊ नये.
“पवित्र जागेची आणि वेदीची काळजी घेण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. इस्राएल लोकांवर मला पुन्हा रागवायचे नाही.
इस्राएल मधल्या सर्व लोकांतून मीच लेवी लोकांना निवडले. ते तुझ्यासाठी एक भेट आहे. त्या लोकांना मी तुला दिले. ते परमेश्वराची सेवा करतील आणि दर्शन मंडपात काम करतील.
पण अहरोन फकत तू आणि तुझ्या मुलांनीच याजकाचे काम केले पाहिजे. वेदीजवळ फकत तुम्हीच जाऊ शकता. अति पवित्र स्थानाच्या पडद्याआड फकत तुम्हीच जाऊ शकता. मी तुला एक भेट देत आहे - याजक म्हणून तू करावयाची सेवा. माझ्या पवित्र स्थानाजवळ दुसरा कोणी आला तर त्याला मारुन टाकले जाईल.”
नंतर परमेश्वर अहरोनला म्हणाला, “लोक मला ज्या खास भेटी देतात त्यांची जबाबदारी मी स्वत: तुझ्यावर टाकली आहे. इस्राएलाचे लोक ज्या पवित्र भेटी मला देतात त्या सर्व मी तुला दिल्या आहेत. तू आणि तुझी मुले त्या वाटून घेऊ शकता. त्या नेहमीच तुमच्या राहतील.
लोक होमार्पण, धान्यार्पण, पापार्पणे आणि अपराधासाठी करावयाची अर्पणे इत्यादी बऱ्याच गोष्टी आणतील. ती अर्पणे पवित्र आहेत. सर्वात पवित्र अर्पणातला ने जळलेला भाग तुझा असेल. त्या सगव्व्या गोष्टी फकत तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी असतील.
त्या गोष्टी फकत पवित्र जागेतच खा. तुझ्या कुटुंबातला प्रत्येक पुरुष ते खाऊ शकतो. पण ती अर्पणे पवित्र आहेत हे तू लक्षात ठेव.
“आणि इस्राएलचे लोक ओवाळणीची अर्पणे म्हणून जी अर्पणे देतील ती सुद्धा तुझीच असतील. मी ती तुला, तुझ्या मुलांना आणि मुलींना देत आहे. हा तुझा वाटा आहे. तुझ्या कुटुंबातला प्रत्येक शुद्ध माणूस ती खाऊ शकेल.
“आणि मी तुला सर्वात चांगले जैतूनाचे तेल. नवीन द्राक्षारस आणि धान्य देत आहे. या गोष्टी इस्राएलचे लोक मला परमेश्वराला देतात. कापणीच्या वेळी या गोष्टी ते प्रथम गोळा करतात.
लोक जेव्हा कापणीच्या वेळी धान्य गोळा करतात तेव्हा प्रथम गोळा केलेले धान्य ते परमेश्वराकडे आणतात. म्हणून मी या गोष्टी तुला देतो आणि तुझ्या कुटुंबातील शुद्ध माणसे ते खाऊ शकतात.
“इस्राएलमधून ज्या ज्या गोष्टी परमेश्वराला देण्यात येतात त्या तुझ्या आहेत.
“स्त्रिचे पहिले मूल आणि जनावराचे पहिले पाडस परमेश्वराला अर्पण केलेच पाहिजे. ते मूल तुझे असेल. जन्माला आलेले पहिले पाडस जर अशुद्ध असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. जर ते मूल असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. ते मूल परत त्या कुटुंबाचे होईल.
मूल एक महिन्याचे झ्याल्यानंतर त्यांनी पैसे दिले पाहिजेत. त्याची किंमत दोन औंस चांदी इतकी असेल. तू चांदी मोजायला अधिकृत मोजमापच वापरले पाहिजेस. अधिकृत मोजमापानुसार एक शेकेल म्हणजे 20 गेरा.
“परंतु तू प्रथम जन्मलेल्या गाय, मेंढी आणि बकरीसाठी पैसे देऊ नकोस. ते प्राणी पवित्र आहेत. त्यांचे रकत वेदीवर शिंपड आणि त्यांची चरबी जाळून टाक. ही अग्नीत दिलेली अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला संतोष देतो.
पण या प्राण्यांचे मांस तुझे असेल. ओवाळणीचा ऊर तुझा असेल आणि इतर अर्पणातली उजवी मांडी तुझीच असेल.
लोक ज्या पवित्र गोष्टी मला अर्पण करतात त्या मी परमेश्वर तुला देतो. तो तुझा वाटा आहे. मी तो तुला, तुझ्या मुलांना व मुलींना देत आहे. हा नियम सदैव अस्तित्वात राहील. तो परमेश्वराबरोबर केलेला पवित्र करार आहे. तो मोडता येणार नाही. मी तुला आणि तुझ्या वंशजांना असे वचन देतो.”
परमेश्वर अहरोनाला आणखी म्हणाला, “तुला कुठलीही जमीन मिळणार नाही आणि जे दुसऱ्या लोकांचे आहे ते तुला मिळणार नाही. मी परमेश्वर तुझा हिस्सा आहे. इस्राएल लोकांना मी वचन दिल्याप्रमाणे जमीन मिळेल. पण मी मात्र तुझी भेट आहे.
“इस्राएलाचे लोक त्यांच्या जवळच्या सर्व गोष्टीतला दहावा हिस्सा देतील. म्हणून तो दहाव्वा भाग मी लेवीच्या सर्व वंशजांना देतो. ते दर्शन मंडपात जे काम करतील त्याचा हा मोबदला आहे.
परंतु इस्राएलच्या इतर लोकांनी कधीनी दर्शन मंडपाजवळ जाता कामा नये. ते जर गेले तर त्यांना मारून टाकण्यात यावे.
लेवीचे जे वंशज दर्शन मंडपात काम करतात ते त्याच्याविरुद्ध केलेल्या पापाला जबाबदार असतील. हा नियम नेहमी अस्तीत्वात राहील. मी इस्राएल लोकांना जी जमीन देण्याचे वचन दिले आहे ती जमीन लेवीना मिळणार नाही.
परंतु इस्राएल लोकांजलऴ जे आहे त्याच्या दहावा भाग ते मला देतील. आणि तो दहावा भाग मी लेवी लोकांना देईन. म्हणून मी लेवी लोकांबद्दल असे बोललो: त्या लोकांना मी इस्राएल लोकांना जी जमीन देणार आहे ती मिळणार नाही.”
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“तू लेवी लोकांशी बोल आणि त्यांना सांग: इस्राएलाचे लोक त्यांच्या जवळ जे जे आहे त्या सगव्व्याचा दहावा भाग परमेश्वराला देतील. तो दहावा भाग लेवी लोकांचा असेल. पण त्याचा दहावा भाग तू परमेश्वराला अर्पण केला पाहिजेस.
पिक काढल्यानंतर तुला धान्य देण्यात येईल आणि द्राक्षारसही देण्यात येईल. म्हणून ती तुझी परमेश्वराला देण्यात येणारी अर्पणे असतील.
याप्रमाणे तू सुद्धा इस्राएलाचे लोक देतात तशी परमेश्वराला अर्पणे देशील. इस्राएलचे लोक परमेश्वराला जे देतात त्याच्या दहावा भाग ते तुला देतील आणि त्यातला दहावा भाग तू याजक अहरोनाला देशील.
इस्राएलचे लोक जेव्हा त्यांच्याकडे असलेल्या गोष्टीतील दहावा भाग तुला देतील तेव्हा तू त्यातला सर्वात चांगला आणि पवित्र भाग निवडायला पाहिजेस आणि तो दहावा भाग तू परमेश्वराला अर्पण केला पाहिजेस.
“मोशे लेवी लोकांना सांग: इस्राएलचे लोक त्यांच्या कापणीचा आणि द्राक्षारसाचा दहावा भाग त्यांना देतील. तेव्हा तुम्ही त्यातला सर्वात चांगला भाग परमेश्वराला द्यावा.
उरलेले तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्यांनी खावा. तुम्ही दर्शन मंडपात जे काम करता त्याबद्दलची ही मजुरी आहे.
आणि जर तुम्ही सर्वांत चांगला दहावा भाग परमेश्वराला द्याल तर तुम्ही कधीही अपराधी होणार नाही. तुम्हाला हे नेहमी आठवेल की त्या भेटी म्हणजे इस्राएल लोकांकडून पवित्र अर्पणे होत आणि तुम्ही मरणार नाही.”

19

परमेश्वर मोशेशी आणि अहरोनाशी बोलला. तो म्हणाला,
“परमेश्वराने इस्राएल लोकांना जी शिकवण दिली तिचे हे नियम आहेत. काहीही दोष नसलेली एक लाल गाय घ्या. त्या गायीला कसलीही इजा झालेली नसावी आणि त्या गायीने मानेवर कधीही जू घेतलेले नसावे.
ती गाय याजक एलाजारला द्या. एलाजार ती गाय छावणी बाहेर नेईल आणि तिथे तिला मारील.
नंतर एलाजार, हा याजक थोडे रकत आपल्या बोटावर घेईल आणि काही रकत दर्शनमंडपाकडे शिंपडेल. त्याने असे सात वेळा केले पाहिजे.
नंतर संपूर्ण गाय त्याच्या समोर जाळली पाहिजे. कातडी, मास रकत आणि आतडे सर्वकाही जळले पाहिजे.
नंतर याजकाने गंधसरूची एक काठी, एजोबाची फांदी व लाल दोरी घ्यावी. याजकाने या गोष्टी गाय जळत असलेल्या जाळात फेकाव्या.
याजकाने स्वत:ला आणि त्याच्या कपड्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे. आणि मगच छावणीत परत यावे. याजक संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.
ज्या माणसाने गायीला जाळले असेल त्याने स्वत:ला धुवावे. स्वत:चे कपडेही पाण्याने स्वच्छ धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.
“नंतर जो माणूस शुद्ध असेल तो गायीची राख गोळा करेल. तो ती राख छावणीच्या बाहेर स्वच्छ जागी ठेवील. शुद्ध होण्याचा जेव्हा लोक खास विधी करतात त्यावेळी त्यांना या राखेचा उपयोग करता येईल. एखाद्याचे पाप नाहीसे करण्यासाठी सुध्दा या राखेचा उपयोग करण्यात येईल.
“ज्या माणसाने गायीची राख गोळा केली असेल त्याने त्याचे कपडे धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. हे नियम नेहमी अस्तित्वात असतील.” हा नियम इस्राएलच्या सर्व नागरिकांसाठी आहे आणि तुमच्या बरोबर जे परदेशी लोक रहात आहेत त्यांच्यासाठीही हा नियम आहे.
जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील.
त्याने स्वत:ला तिसऱ्या दिवशी व नंतर सातव्या दिवशी खास पाण्याने धुवावे. जर त्याने असे केले नाही तर तो अशुद्धच राहील.
जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो अशुद्ध होईल. जर माणूस अशुद्ध असताना पवित्र निवास मंडपात गेला तर मंडपही अशुद्ध होईल. म्हणून त्या माणसाला इस्राएल लोकांपासून दूर ठेवावे. जर अशुद्ध माणसावर खास पाणी शिंपडले नाही तर तो अशुद्ध राहील.
“जे लोक त्यांच्या मंडपात मरतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. जर एखादा माणूस त्याच्या मंडपात मेला तर त्या मंडपातले सगळे लोक आणि सगव्व्या वस्तू अशुद्ध होतील. ते सात दिवस अशुद्ध राहतील.
आणि झाकण नसलेले प्रत्येक भांडे अशुद्ध होईल.
जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील. जर ते प्रेत बाहेर उघड्यावर असेल किंवा तो माणूस युद्धात मारला गेला असेल तरच हे लागू आहे. आणि जर एखाद्याने मेलेल्या माणसाच्या अस्थींना हात लावला तरी तो माणूस सात दिवस अशुद्ध होईल.
“त्या माणसाला पुन्हा स्वच्छ करण्यासाठी जाळलेल्या गायीची राख तुम्ही वापरली पाहिजे. एखाद्या भांड्यात राखेवर ताजे पाणी टाका.
शुद्ध माणसाने एजोबाची काठी घेऊन ती पाण्यात बुडवावी. नंतर ते पाणी तंबूवर, भांड्यावर आणि मंडपातल्या माणसांवर शिंपडावे. जो प्रेताला हात लावली त्याच्या बाबतीत हे करावे. तुम्ही हे प्रत्येकाला करा. जो युद्धात कबरेला हात लावील किंवा मेलेल्या माणसाच्या हाडांना हात लावील त्याच्या बाबतीत हे करा.
“नंतर शुद्ध माणसाने हे पाणी तिसऱ्या व सातव्या दिवशी अशुद्ध माणसाच्या अंगावर शिंपडावे. तो माणूस सातव्या दिवशी शुद्ध होईल. त्याने त्याचे कपडे पाण्यात धुवावे. तो संध्याकाळी शुद्ध होईल.
“एखादा माणूस अशुद्ध झाल्यांनंतर पुन्हा शुद्ध झाला नाही तर त्याला इस्राएल लोकांपासून वेगळे ठेवावे. त्या माणसावर ते खास पाणी शिंपडले नाही आणि तो शुद्ध झाला नाही तर तो पवित्र निवास मंडपही अशुद्ध करील.
तुमच्यासाठी हा नियम सदैव असेल. ज्या माणसावर पाणी शिंपडणे त्या माणसाने स्वत:चे कपडे सुद्धा धुतले पाहिजेत. कुठल्याही माणसाने त्या खास पाण्याला स्वर्श केला तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
जर त्या अशुद्ध माणसाने दुसऱ्या कोणाला स्पर्श केला तर तो माणूस सुद्धा अशुद्ध होईल. तो माणूस संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

20

इस्राएलचे लोक सीनच्या वाळवंटात पहिल्या महिन्यात आले. त्यांनी कादेशला मुक्काम केला. मिर्याम तेथे मरण पावली आणि तिला तेथेच पुरण्यात आले.
त्या ठिकाणी लोकांना पुरेसे पाणी नव्हते. म्हणून ते मोशे आणि अहरोनजवळ तक्रार करण्यासाठी एकत्र आले.
लोकांनी मोशेशी वाद घातला. ते म्हणाले, “आमचे भाऊ जसे परमेश्वरा समोर मेले तसेच आम्हीरी मरायला हवे होते.
तू परमेश्वराच्या लोकांना या वाळवंटात का आणलेस? आम्ही आणि आमची जनावरे इथे मरावी असं तुला वांटत का?
तू आम्हाला मिसर देशातून का आणलेस? तू आम्हाला या वाईट ठिकाणी का आणलेस? इथे धान्य नाही. इथे अंजीर, द्राक्षे किंवा डाळिंबही नाहीत आणि इथे पिण्यास पाणीही नाही.”
म्हणून मोशे आणि अहरोन लोकांची गर्दी सोडून दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वाराशी गेले. त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला आणि त्यांना परमेश्वराचे तेज दिसले.
परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला:
“चालण्याची खास काठी घे. तुझा भाऊ अहरोन याला आणि त्या लोकांना बरोबर घे आणि खडकाजवळ जा. लोकांसमोर खडकाशी बोल. नंतर त्या खडकातून पाणी वाहू लागेल आणि तू ते पाणी त्या लोकांना आणि त्यांच्या जनावरांना देऊ शकशील.
चालण्याची काठी पवित्र निवास मंडपात परमेश्वरासमोर होती. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने काठी घेतली.”
मोशे आणि अहरोन यांनी लोकांना त्या खडकासमोर भेटायला सांगितले. नंतर मोशे म्हणाला, “तुम्ही लोक नेहमी तक्रारी करीत असता. आता माझे ऐका. मी आता या खडकातून पाणी काढीन.”
मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकावर दोन वार केले. खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली.
पण परमेश्वर मोशेला आणि अहरोनला म्हणाला, “इस्राएलचे सगळे लोक एकत्र जमले होते. पण तू मला मान दिला नाहीस. पाणी निर्माण करण्याची शक्ती माझ्यामुळे आली हे तू लोकांना दाखवले नाहीस. तुझा माझ्यावर विश्वास आहे हे तू लोकांना दाखवले नाहीस. मी वचन दिल्याप्रमाणे त्या लोकांना तो प्रदेश देईन. पण तू त्यांना तिथे घेऊन जाणार नाहीस.”
त्या जागेला मरीबा असे नांव पडले. इस्राएल लोकांनी परमेश्वराबरोबर जिथे वाद घातला तीच ती जागा होती. याच जागेवर परमेश्वराने त्यांना तो किती पवित्र आहे ते दाखवले होते.
मोशे कादेशला होता तेव्हा त्याने अदोमच्या राजाकडे काही लोकांना एक निरोप देऊन पाठवले. तो निरोप होता: “तुझे भाऊ, इस्राएलचे लोक तुला म्हणतात: आमच्यावर जी जी संकटे आली त्याबद्दल तुला माहिती आहेच.
खूप खूप वर्षापूर्वी आमचे पूर्वज मिसर देशात गेले. आणि तिथे आम्ही अनेक वर्षे राहिलो. मिसर देशाचे लोक आमच्याशी फार दुष्टपणे वागले.
पण आम्ही परमेश्वराकडे मदतीची याचना केली. परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकली आणि आमच्या मदतीसाठी देवदूताला पाठविले. परमेशवराने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले. “आता आम्ही कादेशमध्ये आहोत. इथे तुझा प्रदेश सुरु होतो.
कृपा करुन आम्हाला तुझ्या प्रदेशातून जाऊ दे. आम्ही कोठल्याही शेतातून वा द्राक्षाच्या मव्व्यातून जाणार नाही. आम्ही तुझ्या विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही राजरस्त्यांच्या बाजूने फक्त जाऊ. आम्ही रस्ता सोडून डावीकडे अथवा उजवीकडे वळणार नाही. तुझ्या देशातून बाहेर येईपर्यंत आम्ही रस्त्यावरच राहू.”
परंतु अदोमच्या राजाने उत्तर दिले, “तुम्ही आमच्या देशातून जाणार नाही. जर तुम्ही आमच्या देशातून जायचा प्रयत्न केला तर आम्ही येऊन तुमच्याशी तलवारीने युद्ध करु.
इस्राएल लोकांनी उत्तर दिले, “आम्ही मुख्य रस्त्यावरुन जाऊ. जर आमची जनावरे तुमचे पाणी प्यायले तर आम्ही तुम्हाला त्याचा मोबदला देऊ. आम्हाला फकत तुमच्या देशातून जायचे आहे. आम्हाला तो प्रदेश आमच्यासाठी घ्यायची इच्छा नाही.”
पण अदोमने पुन्हा उत्तर दिले, “आम्ही तुम्हाला आमच्या देशातून जाण्याची परवानगी देणार नाही.” नंतर अदोमच्या राजाने मोठी आणि शक्तिशाली सेना गोळा केली आणि तो इस्राएल लोकांशी लढण्यासाठी गेला.
अदोमाने इस्राएल लोकांना त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. आणि इस्राएलचे लोक तोंड फिरवून दुसऱ्या रस्त्याने निघून गेले.
इस्राएलचे सर्व लोक कादेशहून होर पर्बताकडे गेले.
होर पर्वत अदोमच्या सरहद्दीजवळ होता. परमेश्वर मोशेला आणि अहरोनला म्हणाला,
“अहरोनची मरण्याची आणि त्याच्या पूर्वजांजवळ जाण्याची वेळ आली आहे. मी इस्राएल लोकांना ज्या प्रदेशात नेण्याचे वचन दिले होते तिथे अहरोन जाणार नाही. मोशे मी हे सांगत आहे कारण तुम्ही मी मरिबाच्या पाण्याजवळ दिलेल्या आज्ञा पूर्णपणे पाळल्या नाहीत.
आता अहरोनला आणि त्याचा मुलगा एलाजार यांना घेऊन होर पर्वतावर जा.
अहरोनाचे खास कपडे त्याच्या जवळून घे आणि ते कपडे त्याचा मुलगा एलाजार याला घाल. अहरोन तिथे त्या पर्वतावर मरुन पडेल आणि तो त्याच्या पूर्वजांकडे जाईल.”
मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली. मोशे, अहरोन आणि एलाजार होर पर्वतावर गेले. इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्यांना जाताना पाहिले.
मोशेने अहरोनाचे खास कपडे काढले व ते एलाजारला घातले. नंतर अहरोन पर्वतावर मेला. मोशे आणि एलाजार पर्वतावरुन खाली आले.
इस्राएलाच्या सर्व लोकांना अहरोन मेला हे कळले. म्हणून त्यांनी 30 दिवस दुखवटा पाळला.

21

अरादचा कनानी राजा नेगेबमध्ये राहात होता. इस्राएल लोक अथारीम वरून जात आहेत हे त्याने ऐकले. म्हणून राजा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी बाहेर पडला आणि त्याने त्यांच्यातील काही लोकांना कैद केले.
नंतर इस्राएल लोकांनी परमेश्वरला खास वचन दिले: “परमेश्वरा या लोकांचा पराभव करायला आम्हाला मदत कर. जर तू हे केले तर आम्ही तुला त्यांची शहरे देऊ. आम्ही त्यांचा संपूर्ण नाश करु.”
परमेश्वराने इस्राएल लोकांचे म्हणणे ऐकले आणि त्याने इस्राएल लोकांना कनानी लोकांचा पराभव करायला मदत केली. इस्राएल लोकांनी कनानी लोकांचा व त्यांच्या शहरांचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्या प्रदेशाला हर्मा असे नाव पडले.
इस्राएल लोकांनी होर पर्वत सोडला व ते तांबड्या समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले. अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी असे केले. परंतु लोक अधीर झाले.
त्यांनी मोशेविरुद्ध व देवविरुद्ध तक्रार करायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “तू आम्हाला ह्या वाळवंटात मरण्यासाठी मिसर देशातून बाहेर का आणलेस? इथे भाकरी नाही, पाणी नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत.”
तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये विषारी साप सोडले. साप लोकांना चावले आणि बरेच इस्राएल लोक मेले.
लोक मोशेकडे आले आणि म्हणाले, “आम्ही तुझ्या विरुद्ध आणि परमेश्वराविरुद्ध बोललो तेव्हा आम्ही पाप केले हे आम्हाला माहीत आहे. तू परमेश्वराची प्रार्थना कर. हे साप आमच्या मधून काढून टाक.” तेव्हा मोशेने लोकांसाठी परमेश्वराची प्रार्थना केली.
परमेश्वर मोशेला म्हणाला, “एक पितळेचा साप कर आणि तो खांबावर ठेव. साप चावल्यानंतर जर एखाद्याने खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तर तो माणूस मरणार नाही.”
मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली त्याने पितळेचा साप बनवला व तो खांबावर ठेवला. नंतर जेव्हा जेव्हा एखाद्या साप चावलेल्या माणसाने त्या खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तेव्हा तो जिवंत राहिला.
इस्राएल लोक तो प्रदेश सोडून ओबोथ येथे आले.
नंतर ओबोथ सोडून त्यांनी इये-आबारीमला मवाबाच्या पूर्वेकडे वाळवंटात तळ दिला.
तो सोडून ते जरेद खोऱ्यात आले व तिथे तळ दिला.
ते तेथूनही निघाले आणि आर्णोन नदीत्या पैलतीरावरच्या वाळवंटात त्यांनी तळ दिला. या नदीचा उगम आमोऱ्याच्या सरहद्दीवर आहे. या नदीचे खोरे हीच मवाब आणि अमोरी यांची सरहद्द होती.
म्हणून ‘परमेश्वराचे युद्ध’ या पुस्तकात त पुढील शब्द लिहिले आहेत: “...आणि सुफातला वाहेब व आर्णोनची खोरी.
आणि आर व रस्त्यांपर्यंतचे दऱ्यांजवळचे डोंगर हे प्रदेश मवाबच्या सरहद्दीवर आहेत.”
इस्राएल लोकांनी तो प्रदेश सोडला व ते बएर येथे गेले. ही जागा विहिरीने युकत होती. या ठिकाणी परमेश्वराने मोशेला सांगितले, “इथे लोकांना एकत्र आण. व मी त्यांना इथे पाणी देईन.”
नंतर इस्राएलचे लोक हे गाणे गाऊ लागले: “विहिरींनो पाण्याने भरून जा. त्या संबंधी गाणे गा.
महान लोकांनी ही विहीर खणली. त्यांनी ही विहीर त्यांच्या राजदंडानी व काठ्यांनी खणली, ही वाळवंटातील भेट आहे.” म्हणून लोकांनी त्या विहिर असलेल्या प्रदेशाला “मत्ताम” म्हटले.
लोक मत्तानहून नाहालीयेलला गेले. नंतर ते नाहीलयेलासहून बामोथला गेले.
लोक बामोथहून मवाबाच्या खोऱ्यात गेले. या जागी पिसगा पर्वताच्या उंच माथा वाळवंटाकडे जातो. (पिसगा पर्वताच्या उंच माथ्यावरुन वाळवंट दिसते)
इस्राएल लोकांनी काही माणसे आमोऱ्याचा राजा सीहोन याच्याकडे पाठवली. ते राजास म्हणाले,
“आम्हाला तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या. आम्ही कुठल्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळयातून जाणार नाही. आम्ही तुमच्या कुठल्याही विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही केवळ राजामार्गवरुनच जाऊ.”
पण सिहोन राजाने इस्राएल लोकांना त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. राजाने आपले सैन्य गोळा केले आणि तो वाळवंटाकडे कूच करीत निघाला. तो इस्राएल लोकांबरोबर युद्ध करण्यासाठी निघाला होता. याहसला राजाच्या सैन्याने इस्राएल लोकांशी युद्ध केले.
पण इस्राएल लोकांनी राजाला मारले. नंतर त्यांनी अर्णोन आणि यब्बोक नद्यांच्या मधला प्रदेश घेतला. त्यांनी अम्मोनी लोकांच्या सरहद्दीपर्यंतचा प्रदेश घेतला, ते त्या सरहद्दीवर थांबले कारण आम्मोनी लोक तिचे रक्षण करीत होते.
इस्राएल लोकांनी सगळी अम्मोनी शहरे घेतली आणि तिथे रहायला सुरुवात केली. त्यांनी हेशबोन शहराचा व आजुबाजूच्या लहान शहरांचाही पराभव केला.
हेशबोनमध्ये अमोऱ्यांचा राजा सीहोन रहात होता. पूर्वी सीहोनने मवाबच्या राजाशी युद्ध केले होते. सीहोनने आर्णोन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला होता.
त्यावरुन गायक हे गाणे गातात: “जा व हेशबोन पुन्हा बांधा सीहोनचे शहर भक्कम करा.
हेशबोनमधून आग निघाली आहे. आग सीहोनच्या शहरातून निघाली आहे. त्या आगीत मवाबमधले आर शहर बेचिराख झाले. अर्णोन नदीच्या वरचे डोंगर आगीत जळाले.
मवाब, तुझ्या दृष्टीने हे वाईट आहे. कमोशचे लोक नष्ट झाले. त्याची मुले पळून गेली. त्याच्या मुलींना अमोऱ्याचा राजा सीहोन याने कैद करुन पकडून नेले.
पण आम्ही अमोरी लोकांचा पराभव केला. आम्ही त्यांची शहरे उध्वस्त केली. हेशबोन पासून दीबोनपर्यंत नाशीम पासून मेदबाजवळच्या नोफापर्यंत.”
तेव्हा इस्राएल लोकांनी अमोरी लोकांच्या प्रदेशात तळ ठोकला.
3मग मोशेने याजेर शहर बघण्यासाठी काही लोकांना पाठवले. मोशेने हे केल्यानंतर इस्राएल लोकांनी ते शहर जिंकले. त्यांनी त्या शहरालगतची छोटी शहरेही घेतली. जे अमोरी लोक तिथे रहात होते त्यांना इस्राएल लोकांनी तिथून जायला भाग पाडले.
नंतर इस्राएल लोक बाशानच्या रस्त्याला लागले. बाशानचा राजा ओग याने त्याचे सैन्य घेतले व तो इस्राएल लोकांशी लढण्यासाठी निघाला. तो त्यांच्याबरोबर एद्रई येथे लढला.
पण परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या राजाची भीती बाळगू नकोस. मी तुला त्याचा पराभव करायची परवानगी देईन. तू त्याचे सगळे सैन्य व त्याचा सगळा प्रदेश घेशील. तू हेशबोनमध्ये राहाणाऱ्या अमोऱ्यांचा राजा सीहोन ह्याचे जे केलेस तेच याचेही कर.”
म्हणून इस्राएल लोकांनी ओगचा व त्याच्या सैन्याचा पराभव केला. त्यांनी त्याला व त्याच्या मुलांना आणि त्याच्या सैन्याला मारून टाकले. इस्राएल लोकांनी त्याचा सर्व प्रदेश घेतला.

22

नंतर इस्राएल लोक मवाबमधल्या यार्देन नदीच्या खोऱ्याकडे निघाले. यरिहोच्या पलिकडे असलेल्या यार्देन नदीजवळ त्यांनी तळ दिला.
मवाबचा राजा मिद्यानींच्या नेत्यांना म्हणाला, “गाय जशी शेतातले सगळे गवत खाऊन टाकते तसेच हे लोक आपला नाश करतील.” त्यावेळी सिप्पोराचा मुलगा बालाक मवाबचा राजा होता.
त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलवायला काही माणसे पाठवली. बलाम फरात नदीकाठी पथोर शहरात रहात होता. इथेच बलामचे लोक रहात असत. बालाकाचा निरोप हा होता: “एका नवीन राष्ट्राचे लोक मिसर मधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. त्यांनी माझ्याजवळच तळ ठोकला आहे.
ये आणि मला मदत कर. मला एकट्याला हे लोक खूप भारी आहेत. तुझ्याजवळ खूप शक्ति आहे हे मला माहीत आहे. जर तू एखाद्याला आशीर्वाद दिलास तर त्याच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात. आणि जर एखाद्याला शाप दिलास तर त्याच्या बाबतीत वाईट गोष्टी घडतात. म्हणून ये आणि या लोकांविरुद्ध बोल. कदाचित त्यानंतर मी त्यांचा पराभव करु शकेन. मी त्यांना माझा देश सोडायला भाग पाडू शकेन.”
मवाब आणि मिद्यानचे पुढारी बलामशी बोलायला गेले. त्याच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांनी बरोबर पैसै नेले. नंतर त्यांनी बालाक काय म्हणाला ते बलामाला सांगितले.
बलाम त्यांना म्हणाला, “रात्री इथे रहा. मी परमेश्वराशी बोलेन आणि तो काय उत्तर देतो ते तुम्हाला सांगेन.” मवाबचे पुढारी त्या रात्री बलामबरोबर राहिले.
देव बलामकडे आला आणि त्याने विचारले, “तुझ्याकडे हे कोण लोक आले आहेत?”
बलाम देवाला म्हणाला, “सिप्पोरचा मुलगा बालाकने, मवाबच्या राजाने यांना माझ्याकडे एक निरोप देऊन पाठवले आहे.
तो निरोप हा: एका नवीन राष्ट्राचे लोक मिसरमधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. म्हणून ये आणि त्या लोकांविरुद्ध बोल. नंतर कदाचित मी त्या लोकांचा पराभव करु शकेन. आणि त्यांना माझ्या देशातून जायला भाग पाडू शकेन.”
पण देव बलामला म्हणाला, “त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. तू त्या लोकांविरुद्ध बोलू नकोस. ती माझा आशीर्वाद मिळालेली माणसे आहेत.”
दुसऱ्या दिवशी बलाम उठला आणि बालाकच्या पुढाऱ्यांना म्हणाला, “तुम्ही तुमच्या देशात परत जा. परमेश्वर मला तुमच्या बरोबर जाऊ देणार नाही.”
त्यामुळे मवाबचे पुढारी बालाककडे परत गेले आणि त्यांनी त्याला हे सांगितले. ते म्हणाले, “बलामने आमच्या बरोबर यायला नकार दिला.”
म्हणून बालाकने बलामकडे दुसरे पुढारी पाठवले. यावेळी त्याने पहिल्या वेळेपेक्षा खूप जास्त पुढारी पाठवले. हे पुढारी पहिल्या पुढाऱ्यांपेक्षा अधिक महत्वाचे होते.
ते बलामकडे गेले आणि म्हणाले, “बालाक, सिप्पोराचा मुलगा तुला हे सांगतो: तुझ्या इथे येण्याच्या आड कुठलीही गोष्ट येऊ देवू नको.
मी जे सांगतो ते तू केलेस तर मी तुला नक्कीच मान देईन आणि तू मला जे काही विनवशिल ते मी करीन पण तू ये व या लोकांविरुद्ध माझ्यासाठी बोल.”
बलामने बालाकाच्या पुढाऱ्यांना उत्तर दिले. तो म्हणाला, “मी माझ्या देवाची, परमेश्वराची आज्ञा पाळली पाहिजे. मी त्याच्या आज्ञे विरुद्ध काहीही करु शकत नाही. परमेश्वराने सांगितल्या खेरीज मी कुठलीही लहान-मोठी गोष्ट करणार नाही. बालाकाने मला त्याचे सुंदर घर सोन्या चांदीने भरुन दिले तरीही मी काही करणार नाही.
परंतु आजच्या रात्रीपुरते तुम्ही इथे मागच्या सारखे राहू शकता. आणि परमेश्वर मला काय सांगतो ते मला रात्रीतून कळू शकेल.”
त्या रात्री देव बलामकडे आला. देव म्हणाला, “तुला घेऊन जाण्यासाठी हे लोक पुन्हा आले आहेत. म्हणून तू त्यांच्या बरोबर जाऊ शकतोस. पण मी जे सांगेन तेवढेच तू कर.”
दुसऱ्या दिवशी सकाळी बलाम उठला आणि त्याने आपल्या गाढवीवर खोगीर घातले. नंतर तो मवाबच्या पुढाऱ्यांबरोबर चालला.
बलाम त्याच्या गाढवीवर बसला होता. त्याचे दोन नोकर त्याच्याबरोबर होते. बलाम प्रवास करीत होता तेव्हा देव त्याच्यावर रागावला. परमेश्वराचा दूत रस्त्यावर बलामपुढे येऊन उभा राहिला. देवदूत बलामला थांबवणार होता.
बलामच्या गाढवीने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात उभे असलेले पाहिले. देवदूताने हातात तलवार घेतली होती. म्हणून गाढवी रस्ता सोडून शेतात गेली. बलामला देवदूत दिसू शकला नाही. म्हणून तो गाढवीवर खूप रागावला. त्याने गाढवीला मारले आणि जबरदस्तीने रस्त्यावर आणले.
नंतर परमेश्वराचा दूत रस्ता जिथे अरुंद होता तिथे थांबला. हा दोन द्राक्षांच्या मव्व्यांच्या मधला भाग होता. रस्ताच्या दोन्ही बाजूला भिंती होत्या.
गाढवीने पुन्हा परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून ती एका भिंतीला चिकटून चालू लागली त्यामुळे बलामचा पाय भिंतीला लागून चिरडला गेला. म्हणून बलामने गाढवीला पुन्हा मारले.
नंतर परमेश्वराचा दूत दुसऱ्या ठिकाणी उभा राहिला. अरुंद रस्ता असलेले हे दुसरे ठिकाण होते. येथे वळायला सुद्धा मुळीच जागा नव्हती गाढवीला त्याला वळसा घालून जाणे शक्य नव्हते.
गाढवीने परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून बलाम तिच्यावर बसला असतानाच ती खाली बसली त्यामुळे बलाम खूप रागावला आणि त्याने गाढवीला त्याच्या चालण्याच्या काठीने मारायला सुरुवात केली.
नंतर परमेश्वराने गाढवीला बोलते केले. गाढवी बलामला म्हणाली, “तू माझ्यावर का रागावला आहेस? मी तुला काय केले आहे? तू मला तीन वेळा मारलेस.”
बलामने गाढवीला उत्तर दिले, “तू मला मूर्ख बनवलेस. जर माझ्या हातात तलवार असती तर मी तुला मारुन टाकले असते.”
पण गाढवी बलामला म्हणाली, “बघ मी तुझीच गाढवी आहे. खूप वर्षे तू माझ्यावर बसत आला आहेस. आणि या पूर्वी मी असे काही केले नाही हे तुला माहीत आहे.” ‘हे खरे आहे’ बलाम म्हणाला.
नंतर परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले, तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत दिसला. तो रस्त्यात तलवार घेऊन उभा होता. त्याने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात जमिनीपर्यंत वाकून नमस्कार केला.
परमेश्वराच्या दूताने बलामला विचारले, “तू तुझ्या गाढवीला तीनदा का मारलेस? तुला थांबवण्यासाठी मी आलो आहे. पण अगदी ऐनवेळी
तुझ्या गाढवीने मला पाहिले आणि ती दूर गेली. असे तीन वेळा घडले. जर गाढवी वळली नसती तर आतापर्यंत मी तुला मारले असते आणि तुझ्या गाढवीला जिवंत राहू दिले असते.”
तेव्हा बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “मी पाप केले आहे. तू रस्त्यात उभा आहेस हे मला माहीत नव्हते. मी जर चूक करीत असेन तर मी घरी परत जाईन.”
तेव्हा परमेश्वराचा दूत बलामला म्हणाला, “नाही! तू या लोकांबरोबर जाऊ शकतोस. पण सावध रहा. मी जे सांगेन तेच शब्द बोल.” म्हणून बलाम बालाकाने पाठवलेल्या पुढाऱ्यांबरोबर गेला.
बलाम येत असल्याचे बालाकाला समजले. म्हणून तो बलामला भेटायला अर्णोन नदी जवळच्या मवाबच्या शहरात गेला. ते त्याच्या देशाच्या उत्तर सरहद्दीवर होते.
जेव्हा बालाकाने बलामला पाहिले तेव्हा तो त्याला म्हणाला, “मी तुला आधीच यायला सांगितले होते. हे खूप खूप महत्त्वाचे आहे असे मी तुला सांगत होतो. तू माझ्याकडे का आला नाहीस? आता मी तुला कदाचित पैसे देऊ शकणार नाही.”
बलामने उत्तर दिले, “पण आताच मी येथे आलो आहे. मी आलो आहे पण तू सांगितलेल्या गोष्टी मला कदाचित करता येणार नाहीत. परमेश्वर देव जेवढे सांगेत तेवढेच मी बोलू शकतो.
नंतर बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हसोथ येथे गेला.
बालाकाने काही गुरे व मेंढ्या बळी म्हणून मारल्या. त्याने थोडे मास बलामला दिले आणि थोडे त्याच्याबरोबर असलेल्या पुढाऱ्यांना दिले.
दुसऱ्या दिवशी सकाळी बालाक बलामला घेऊन बामोथबाल शहरी गेला. तेथून त्यांना इस्राएल लोकांच्या तळाचा शेवटचा भाग दिसू शकत होता.

23

बलाम म्हणाला, “इथे सात वेद्या बांधा आणि माझ्यासाठी सात बैल आणि सात मेंढे तयार ठेवा.”
बलामने एक मेंढा व एक बैल प्रत्येक वेदीवर मारला.
नंतर बलाम बालाकाला म्हणाला, “या वेदीजवळ थांब. मी दुसरीकडे जातो. नंतर परमेश्वर माझ्याकडे येईल आणि मी काय बोलायचे ते मला सांगेल.” नंतर बलाम उंच जागी गेला.
देव त्या जागी बलामकडे आला आणि बलाम म्हणाला, “मी सात वेद्या तयार केल्या आहेत. आणि प्रत्येक वेदीवर मी एकेक मेंढा व बैल बळी दिला आहे.”
नंतर परमेश्वराने काय बोलायचे ते बलामला सांगितले. परमेश्वर म्हणाला, “बालाकाकडे परत जा आणि मी सांगतो तेच त्याला जाऊन सांग.”
तेव्हा बलाम बालाकाकडे परत गेला. बालाक अजूनही वेदीजवळ उभा होता. आणि मवाबचे सर्व पुढारी तेथे त्याच्याजवळ उभे होते.
नंतर बलामने हे सांगितले: पूर्वेकडच्या अराम पर्वतावरुन मवाबचा राजा बालाक याने मला येथे आणले. बालाक मला म्हणाला, “ये, माझ्यासाठी याकोब विरुद्ध बोल. ये इस्राएल लोकांविरुद्ध बोल.”
पण देव त्या लोकांच्या विरुद्ध नाही. म्हणून मी देखील त्यांच्या विरुद्ध बोलू शकत नाही. परमेश्वराने त्यांचे काही वाईट व्हावे असे म्हटले नाही म्हणून मी सुद्धा तसे करु शकत नाही.
मी त्या लोकांना पर्वतावरुन बघू शकतो. मी त्यांना उंच डोंगरावरुन बघतो. ते लोक एकटे राहतात. ते दुसऱ्या देशाचा भाग नाहीत.
याकोबची माणसे कोण मोजू शकेल? ते धुळीच्या कणांइतके असंख्य आहेत. त्यांचा चौथा हिस्सा देखील कोणी मोजू शकणार नाही. मला चांगल्या माणसाप्रमाणे मरु दे. त्यांच्या प्रमाणेच माझ्या आयुष्याचा शेवट सुखी होऊ दे.
बालाक बलामला म्हणाला, “तू हे काय केलेस? माझ्या शत्रूंविरुद्ध बोलण्यासाठी मी तुला येथे आणले. पण तू तर त्यांना आशीर्वाद दिलास.”
पण बलाम म्हणाला, “परमेश्वर जे सांगले तेच मी बोलायला पाहिजे.”
नंतर बालाक त्याला म्हणाला, “म्हणून माझ्याबरोबर दुसऱ्या जागी ये. तिथून तुला ह्यातील आणखी बरेच लोक दिसू शकतील. तू त्या सगव्व्यांना बघू शकणार नाहीस. पण त्यांचा काही भाग तुला दिसू शकेल. कदाचित त्या जागेवरुन तू त्यांच्याविरुद्ध माझ्यासाठी काही बोलू शकशील.”
तेव्हा बालाक बलामला पिसगाच्या माथ्यावरील सोकिमाच्या माव्व्यावर घेऊन गेला. तेथे बालाकने सात वेद्या बांधल्या. नंतर बालाकने प्रत्येक वेदीवर एक बैल आणि एक मेंढा बळी दिला.
तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, “या वेदीजवळ थांब. मी तिकडे जाऊन देवाला भेटून येतो.”
परमेश्वर बलामकडे आला आणि काय बोलायचे ते त्याने त्याला सांगितले. नंतर परमेश्वराने बलामला बालाकाकडे जायला सांगितले. आणि त्याने सांगितलेलेच बोलायला सांगितले.
म्हणून बलाम बलाकाकडे परत गेला. बालाक वेदीजवळच उभा होता. मवाबचे पुढारी त्याच्या जवळ होते. बालाकने बलामला येताना पाहिले. आणि तो म्हणाला, “परमेश्वराने काय सांगितले?”
नंतर बलाम या गोष्टी म्हणाला, “बालाका उभा रहा आणि मी काय सांगतो ते ऐक. सिप्पोरेच्या मुला, बालाका, मी सांगतो ते ऐक:
देव माणूस नाही. तो खोटे बोलणार नाही. देव म्हणजे काही माणूस नाही. त्याचे निर्णय बदलणार नाहीत. जर परमेश्वराने सांगितले की तो एखादी गोष्ट करील. तर तो ती करीलच. जर परमेश्वराने वचन दिले तर तो ते वचन दिलेली गोष्ट करीलच.
परमेश्वराने मला त्या लोकांना आशीर्वाद द्यायला सांगितले, परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला. म्हणून मी ते बदलू शकत नाही.
देवाला याकोबाच्या माणसात काही चूक दिसली नाही. इस्राएल लोकांमध्ये देवाला पाप दिसले नाही. परमेश्वर त्यांचा देव आहे आणि तो त्यांच्या बरोबर आहे. थोर राजा त्यांच्या बरोबर आहे.
देवाने त्या लोकांना मिसर देशातून आणले. ते रानबैला इतके शक्तिमान आहेत.
याकोबाच्या माणसांचा पराभव करु शकेल अशी कोणतीही शक्ति नाही. इस्राएल लोकांना थोपवू शकेल अशी कोणतीही जादू नाही. लोक याकोबाबद्दल आणि इस्राएल लोकांबद्दल असे म्हणतील: ‘देवाने केलेल्या महान गोष्टी बघा.’
ते लोक सिंहासारखे शक्तिमान आहेत. ते सिंहासारखे उठत आहेत. तो सिंह शत्रूला खाऊन टाकल्या खेरीज विश्रांती घेणार नाही. तो सिंह त्याच्याविरुद्ध असलेल्या लोकांचे रक्त प्यायल्या खेरीज विश्रांती घेणार नाही.”
नंतर बालाक बलामला म्हणाला, “त्या लोकांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी व्हाव्यात असे तू म्हटले नाहीस. पण त्यांच्या बाबतीत वाईट घडावे असेही तू म्हटले नाहीस.”
बलाम उत्तरला, “मी तुला आधीच सांगितले होते की परमेश्वर जे सांगले तेच मला बोलता येईल.”
नंतर बालाक बलामला म्हणाला, “तेव्हा माझ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी ये. कदाचित देव आनंदी होईल आणि तुल्या त्या लोकांना शाप द्यायची परवानगी देईल.”
म्हणून बालाक बलामला घेऊन पौर पर्वताच्या माथ्यावर गेला. या पर्वतावरुन वाळवंट दिसते.
बलाम म्हणाला, “इथे सात वेद्या बांध. नंतर सात बैल आणि सात मेंढे बळी देण्यासाठी तयार कर.”
बलामने सांगितल्याप्रमाणे बालाकाने साऱ्या गोष्टी केल्या. बालाकाने वेदीवर बैल आणि मेंढे बळी दिले.

24

इस्राएलला आशीर्वाद द्यायची परमेशवराची इच्छा आहे हे बलामने पाहिले. म्हणून त्याने ते कुठल्याही प्रकारची जादू वापरुन थांबवायचा प्रयत्न केला नाही. पण तो वळला आणि त्याने वाळवंटाकडे पाहिले.
बलामने वाळवंटाच्या कडे पाहिले आणि त्याला इस्राएलचे सगळे लोक दिसले. त्यांनी आपापल्या भागात आपापल्या गंटासह तळ दिला होता. नंतर देवाचा आत्मा बलामावर आला.
आणि बलामने हे शब्द उच्चारले: “हा निरोप बौराचा मुलगा बलाम याच्याकडून आहे. मला ज्या गोष्टी स्पष्ट दिसतात त्याविषयी मी बोलतो.
मी हा निरोप देवाकडून ऐकला. सर्वशक्तिमान देवाने मला जे दाखविले ते मी पाहिले. मला जे दिसले त्याबद्दल मी नतमस्तक होऊन सांगत आहे.
“याकोबाच्या माणसांने तुमचे तंबू सुंदर आहेत. इस्राएल लोकांनो तुमचीघरे सुंदर आहेत.
तुम्ही झऱ्याच्या काठी लावलेल्या बागेसारखे आहात. नदीकाठी वाढणाऱ्या बागे प्रमाणे तुम्ही आहात. तुम्ही परमेश्वराने लावलेल्या, गोड सुगंध असणाऱ्या झुडपाप्रमाणे आहात. पाण्याजवळ वाढणाऱ्या सुंदर झाडाप्रमाणे तुम्ही आहात.
तुमच्याकडे नेहमी भरपूर पाणी असेल. तुमचे बी वाढण्यासाठी लागणारे पाणी तुमच्याकडे भरपूर असेल. तुमचा राजा अगागच्या राजापेक्षा थोर असेल. तुमचे राज्य खूप महान असेल.
“देवाने त्या लोकांना मिसरमधून आणले. ते रानटी बैलासारखे शक्तिशाली आहेत. ते त्यांच्या सर्व शत्रूंचा पराभव करतील. ते त्यांची हाडे मोडतील आणि त्यांचे बाण तोडतील.
“इस्राएल सिंहासारखा आहे. तो वेटोळे करून झोपला आहे. होय. तो लहान सिंहाप्रमाणे आहे आणि त्याला उठवायची कोणीही इच्छा धरत नाही. जो माणूस तुला आशीर्वाद देईल त्याला आशीर्वाद मिळेल. जो माणूस तुझ्या विरुद्ध बोलेल त्याच्यावर संकटे येतील.”
बालाक बलामवर खूप रागावला. तो बलामला म्हणाला, “मी तुला माझ्या शत्रूंविरुद्ध बोलण्यासाठी बोलावले, पण तू त्यांना आशीर्वाद दिलास. तू त्यांना तीन वेळा आशीर्वाद दिलास.
आता इथून जा. घरी जा. मी तुला चांगला मोबदला देईन असे म्हटले होते. परंतु परमेश्वराने तुझे इनाम हिरावून घेतले.”
बलाम बालाकाला म्हणाला, “तूच माझ्याकडे माणसे पाठविलीस. त्या माणसांनी मला येण्याबद्दल विचारले. पण मी त्यांना म्हणालो,
“बालाक मला त्याचे सोन्या-चांदीने भरलेले घर देऊ शकेल. पण मी परमेश्वराने आज्ञा केलेल्या गोष्टीच बोलेन. मी स्वत: काहीही चांगले अथवा वाईट करु शकत नाही. परमेश्वर जेवढी आज्ञा देईल तेव्हढीच मी बोलतो.’ तुला या गोष्टी नक्कीच आठवत असतील की मी हे तुझ्या माणसांना सांगितले होते.
आता मी माझ्या माणसांकडे परत जात आहे. पण मी तुला एक इशारा देतो. इस्राएलचे हे लोक भविष्यात तुला आणि तुझ्या लोकांना काय करतील ते सांगतो.”
नंतर बलामने या गोष्टी सांगितल्या: “हा निरोप बौरचा मुलगा बलाम याचा आहे. मला ज्या गोष्टी स्पष्ट दिसतात त्याबद्दल मी बोलतो.
मी हा निरोप देवाकडून ऐकला. परात्पर देवाने मला जे शिकविले ते मी शिकलो. सर्वशक्तिमान देवाने मला जे दाखविले ते मी पाहिले. मला जे स्पष्ट दिसते ते मी नतमस्तक होऊन सांगतो.
“मला परमेश्वर येताना दिसतो, पण एवढ्यात नाही. तो मला एवढ्या लवकर येताना दिसत नाही. याकोबच्या घराण्यातून एक तारा उदय पावेल इस्राएल मधून एक राजा निघेल. तो राजा मवाबच्या लोकांना चिरडून टाकील. सेथच्या सर्व मुलांचा तो चुराडा करील.
इस्राएल सर्वशक्तिमान बनेल. त्याला अदोमचा प्रदेश मिळेल. त्याला सेईरचा, त्याच्या शत्रूचा प्रदेश मिळेल.
“याकोबाच्या घराण्यातून नवा राजा येईल. त्या शहरात जे लोक जिवंत राहिले असतील त्यांचा तो नाश करील.”
नंतर बलामने अमालेकी लोकांना पाहिले आणि तो हे म्हणाला: “सर्व अमालेकी बलिष्ठ आहेत. पण अमालेकचा सुद्धा नाश होईल.”
नंतर बलामने केनी लोकांना पाहिले आणि तो म्हणाला: “उंच पर्वतावर असलेल्या पक्षाच्या घरट्याप्रमाणे तुमचा प्रदेश सुरक्षित आहे असे तुम्हाला वाटते.”
पण केनी लोकांचासुद्धा नाश होईल. परमेश्वराने काईनाचा जसा नाश केला त्याप्रमाणे. अश्शूर तुला बंदिवान करील.”
नंतर बलाम हे शब्द बोलला: “देव जेव्हा असे करतो तेव्हा कोणीही जिवंत रहात नाही.
कित्तीच्या किनाऱ्यावरुन बोटी येतील. त्या अश्शूर आणि एबेर याचा नाश करतील. पण त्या बोटींचासुद्धा नाश होईल.”
नंतर बलाम उठला आणि त्याच्या घरी परत गेला आणि बालाकही मार्गस्थ झाला.

25

इस्राएल लोक शिद्दीमात रहात असताना त्यांनी मवाबच्या बायकांबरोबर लैंगिक पाप करायला सुरुवात केली.
परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या सर्व लोकांच्या पुढाऱ्यांना आण, नंतर त्यांना मारून टाक म्हणजे सर्व लोकांना दिसेल. त्यांची प्रेते परमेश्वरासमोर ठेव. नंतर परमेश्वर सर्व इस्राएल लोकांना त्याचा राग दाखवणार नाही.”
मोशे इस्राएलच्या न्यायधिशांना म्हणाला, “तुमच्यापैकी प्रत्येकाने अशा कुटुंब प्रमुखाला शोधले पाहिजे की ज्याने लोकांना बआलपौरट्ठ्या खोट्या देवताची उपासना करायला भाग पाडले. नंतर तुम्ही त्या माणसांना मारून टाका.”
त्यावेळी मोशे आणि इस्राएलची वडीलधारी मंडळी (पुढारी) दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वाराशी जमले होते. एका इस्राएली माणसाने एक मिद्यानी स्त्री त्यांच्यासमोर आपल्या भाऊंच्या घरी आणली. मोशे आणि इतर वडील धारी (पुढारी) यांनी ते पाहिले आणि ते खूप दु:खी झाले.
फिनहास हा एलाजारचा मुलगा आणि याजक अहरोन याचा नातू होता. फिनहासने या माणसाला त्या स्त्रीला आणताना पाहिले. म्हणून फिनहासने तंबू सोडला व त्याने त्याची बरची घेतली
त्याने त्या इस्राएली माणसाचा त्याच्या तंबूपर्यंत पाठलाग केला. नंतर त्याने त्या इस्राएली माणसाला व मिद्यानी स्त्रीला तिच्या मंडपात मारण्यासाठी बरचीचा उपयोग केला. त्याने बरची त्या दोघांच्या शरीरात खुपसली. त्यावेळी इस्राएल लोकांमध्ये खूप मोठा आजार पसरला होता. पण फिनहासने त्या दोघांना मारल्यानंतर त्या आजाराचा प्रसार थांबला.
या आजारामुळे एकून 24000 लोक मेले.
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“माझ्या लोकांविषयी माझ्या भावना तीव्र आहेत. ते फक्त माझेच असावेत असे मला वाटते. एलाजारच्या मुलांने याजक अहरोनच्या नातवाने इस्राएल लोकांना माझ्या रागापासून वाचवले. माझ्या लोकांबद्दलच्या त्या भावना दाखवून त्याने हे केले म्हणून मला आधी वाटत होते त्याप्रमाणे मी आता त्या लोकांना मारणार नाही.
फिनिहासला सांग की मी त्याच्याबरोबर शांतिचा करार करीत आहे.
तो करार हा आहे: तो आणि त्याच्या नंतरचे त्याचे वंशज याजक होतील. कारण आपल्या देवाबद्दलच्या त्याच्या भावना खूप तीव्र होत्या. आणि त्याने ज्या गोष्टी केल्या त्यामुळे इस्राएलचे लोक शुद्ध झाले.
मिद्यानी स्त्री बरोबर जो इस्राएली माणूस मारला गेला होता त्याचे नाव जिम्री होते. तो सालूचा मुलगा होता. तो शिमोनी वंशातील एका घराण्याचा प्रमुख होता.”
आणि मारल्या गेलेल्या मिद्यानी स्त्रीचे नाव कजबी होते. ती सूरची मुलगी होती. सूर मिद्यानी कुटुंबाचा प्रमुख होता व पुढारी होता.
परमेश्वर मोशेला म्हणाला:
“तू त्यांना ठार मारले पाहिजेस. मिद्यानचे लोक तुझे शत्रू आहेत.
तू त्यांना ठार मारले पाहिजेस. त्यांनी अगोदरच तुम्हाला त्यांचे शत्रू केले आहे त्यांनी तुला पिओर येथे फसवले आहे. आणि त्यांनी तुला कजबीच्या बाबतीतही नीचपणाने फसवले. ती मिद्यानच्या पुढाऱ्याची मुलगी होती. पण इस्राएल लोकांमध्ये आजार पसरला तेव्हा ती मारली गेली. बआल पौर या खोट्या देवतेची लोकांना फसवून उपासना करायला लावली म्हणून तो आजार इस्राएल लोकांमध्ये पसरला होता.”

26

मोठ्या आजारानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला:
तो म्हणाला, “इस्राएल लोकांची मोजणी करा, 20 वर्षाचे आणि 20 वर्षावरील सगव्व्या पुरुषांची मोजणी करा आणि त्यांची वंशाप्रमाणे यादी करा. तेच पुरुष इस्राएलच्या सैन्यात काम करू शकतील.”
त्या वेळी लोकांनी मवाबमधील यार्देन नदीच्या खोऱ्यात तळ दिला होता. तो यरीहोंच्या पलिकडे यार्देन नदीजवळ होता. तेव्हा मोशे आणि याजक एलाजार लोकांशी बोलले, ते म्हणाले,
“वर्षावरील प्रत्येक माणूस तुम्ही मोजा. परमेश्वराने मोशेला ही आज्ञा केली आहे.” मिसरमधून आलेल्या इस्राएल लोकांची ही यादी आहे.
जे लोक रऊबेनच्या कुळातून आले (रऊनबेन हा इस्राएलचा (याकोब) पहिला मुलगा होता.) ती कुळे म्हणजे: हनोखचे हनोखी कूळ, पल्लूचे पल्लूवी कूळ.
हेस्रोनचे हेस्रोनी कूळ, कर्मीचे कर्मी कूळ.
रऊबेनच्या वंशातील ही कुळे. त्यात एकूण 43,730 पुरुष होते.
पल्लूचा मुलगा अलियाब.
अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहोरानाच्या विरुद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहला पाठींबा दिला.
त्यावेळी धरती दुंभगली आणि तिने कोरह आणि त्याचे पाठिराखे यांना गिळकृंत केले. आणि 250 माणसे मेली. तो इस्राएलच्या इतर लोकांना इशारा होता.
परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मेले नाहीत.
शिमोनाच्या कुळातलीही काही कुळे नमुवेलाचे नमुवेली कूळ. यामीनाचे यामीनी कूळ. याकीनाचे याकीनी कूळ.
जेरहाचे जेरही कूळ. शौलाचे शौली कूळ.
ही शिमोनी कूळातील कूळे. ते एकूण 22,200 होते.
गाद कुळातून जी कुळे निर्णाण झाली ती अशी: सफोनाचे सफोनी कूळ. हग्गीचे हग्गी कूळ. शूनीचे शूनी कूळ.
आजनीचे आजनी कूळ. एरीचे एरी कूळ.
अरोदचे अरोदी कूळ. अरलीचे अरेली कूळ.
गादच्या कूळातील ही कूळे. त्यात एकूण 40,500 पुरुष होते.
पेरेसच्या कुळातील ही कूळे: हेस्रोनचे हेस्रोनी कूळ, हामूलचे हामूली कूळ.
ही यहुदाच्या कुळातील कुळे. त्यात एकूण 76,500 पुरुष होते.
इस्साखारच्या कुळातील काही कुळे अशी: तोलाचे तोलाई कूळ पूवाचे पुवाई कूळ.
याशूबचे याशूबी कूळ, शिम्रोनचे शिम्रोनी कूळ.
इस्साखारच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 64,300 पुरुष होते.
जुबुलूनच्या कुळातील कुळे: सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ.
जुबुलूनच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 60,500 पुरुष होते.
योसेफची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली.
मनश्शेच्या कुळातील कुळे: माखीरचे माखीरी कूळ (माखीर गिलादचा बाप होता.) गिलादचे गिलादी कूळ.
गिलादची कूळे होती: इयेजेराचे इयेजेरी कूळ, हेलेकचे हेलेकी कूळ.
अस्रियेलाचे अस्रियेली कूळ. शेखेमाचे शेखेमी कूळ.
शमीदचे शमीदाई कूळ व हेफेरचे हेफेरी कूळ.
हेफेरचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती-फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण 52,700 पुरुष होते.
एफ्राइमच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती: शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ.
एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानचे कूळ एरानी.
ही एफ्राइमच्या कुळातील कुळे: त्यात 32,500 पुरुष होते. ते सगळे योसेफच्या कुळातील होते.
बेन्यामीनच्या कुळातील कुळे होती: बेलाचे बेलाई कूळ. आशबेलाचे आशबेली कूळ. अहीरामचे अहीरामी कूळ.
शफूफामचे शफूफामी कूळ. हुफामचे हुफामी कूळ.
बेलाची कुळे होती: अर्दचे अर्दी कूळ नामानचे नामानी कूळ.
ही सगळी कुळे बन्यामीनच्या कुळातील. त्यांतील पुरुषांची संख्या 45,600 होती.
दानच्या कुळातील कुळे होती: शूहामचे शूहामी कूळ. हे कूळे दानच्या कुळातील होते.
शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या 64,400 होती.
आशेरच्या कुळातील कुळे होती: इम्नाचे इम्नाई कूळ. इश्वीचे इश्वी कूळ. बरीयाचे बरीयाई कूळ.
बरीयाच्या कुळातील कुळे होती: हेबेरचे हेबेराई कूळ. मलकीएलचे मलकीएली कूळ.
(आशेरला सेरा नावाची मुलगी होती)
ही सगळे लोक आशेरच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या 53,400 होती.
नफतालीच्या कुळातील कुळे होती: यहसेलचे यहसेली कूळ. गूनीचे गूनी कूळ.
येसेरचे येसेरी कूळ व शिल्लेमचे शिल्लेमी कूळ.
ही नफतालीच्या कुळातील कुळे. त्यातील पुरुषांची संख्या 45,400 होती.
म्हणजे इस्राएलमधील एकूण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती.
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“जमिनीचे भाग करुन ते लोकांना दिले जातील. प्रत्येक कुळातील गणती केलेल्या सर्व लोकांना पुरेशी इतकी जमीन मिळेल.
मोठ्या कुळाला जास्त जमीन मिळेल आणि लहान कुळाला कमी जमीन मिळेल. त्यांना जी जमीन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या माणसांच्या समप्रमाणात असेल.
पण तू कुठल्या कुळाला कुठली जमीन द्यायची ते ठरवण्यासाठी चिठ्ठ्याफासे टाक. प्रत्येक कुळाला त्याच्या जमिनीचा भाग मिळेल आणि त्या जमिनीला त्या कुळाचे नाव दिले जाईल.
प्रत्येक लहान अणि मोठ्या कुळाला जमीन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्या टाकशील.
त्यांनी लेव्याच्या कुळातील कुळांचीही गणती केली. लेव्याच्या कुळातील कुळे ही होती: गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ. कहाथचे कहाथी कूळ मरारीचे मरारी कूळ.
लेव्याच्या कुळात ही कूळे सुद्धा होती: लीब्नी कूळ. हेब्रोनी कूळ. महली कूळ. मूशी कूळ. कोरही कूळ. अम्राम कोहाथच्या कुळातील होता.
अम्रामच्या बायकोचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम.
नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते.
पण नादाब व अबीहू मेले. ते मेले कारण त्यांनी परमेश्वराने परवानगी न दिलेल्या अग्नीने अर्पणे केली.
लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या 23000 होती. परंतु यांची गणती इस्राएलच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांना जमीन दिली त्यात यांना हिस्सा मिळाला नाही.
मोशे आणि याजक एलाजार यांनी ते यार्देन नदीच्या खोऱ्यात मवाब येथे होते तेव्हा लोक मोजले. हे यरीहोच्या पलिकडे यार्देन नदीजवळ होते.
खूप वर्षापूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मेले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते.
कारण इस्राएल लोकांना तुम्ही वाळवंटात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. ते होते यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनचा मुलगा यहोशवा.

27

सलाफहाद हेफरचा मुलगा होता. हेफर गिलादचा मुलगा होता. गिलाद माखिरचा मुलगा होता. माखिर मनश्शेचा मुलगा होता. मनश्शे योसेफचा मुलगा होता. सलाफहादला पाच मुली होत्या. त्यांची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
या पाच स्त्रिया दर्शन मंडप प्रवेशद्वारापाशी गेल्या आणि मोशे, याजक एलाजार, पुढारी आणि इस्राएलचे लोक यांच्यासमोर जाऊन उभ्या राहिल्या. त्या पाच मुली म्हणाल्या,
“आम्ही वाळवंटातून प्रवास करीत असताना आमचे वडील गेले. त्यांना नैसर्गिक मरण आले. ते कोरहाच्या समूहाला मिळण्यांपैकी नव्हते (कोरह हा परमेश्वराच्या विरुद्ध जाणाऱ्यापैकी होता.) पण आमच्या वडिलांना एकही मुलगा नव्हता.
याचा अर्थ असा की आमच्या वडिलांचे नाव पुढे चालू राहणार नाही. आमच्या वडिलांचे नाव पुढे चालू राहणार नाही हे योग्य नाही. त्यांचे नाव संपून जाईन कारण त्यांना मुले नाहीत. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो की आमच्या वडिलांच्या भावांना जी जमीन मिळेल त्यातली थोडी आम्हाला द्या.”
तेव्हा मोशेने परमेश्वराला त्याने काय करायला हवे ते विचारले.
परमेश्वर त्याला म्हणाला,
“सलाफहादच्या मुलींचे म्हणणे बरोबर आहे. त्यांच्या वडिलांच्या भावांना मिळणाऱ्या जमिनीत त्यांचाही वाटा असायला पाहिजे. म्हणून त्यांच्या वडिलांना जी जमीन मिळाली असती ती त्यांना दे.”
“इस्राएल लोकांसाठी हा नियम कर: ‘जर एखाद्याला मुलगा नसला आणि तो मेला तर त्याच्या मुलींना त्याचे सर्व काही मिळावे.
जर त्याला मुलीही नसल्या तर त्याची मिळकत त्याच्या भावांना मिळावी.
जर त्याला भाऊही नसला तर त्याच्या वस्तू त्याच्या वडिलांच्या भावाला मिळाव्या.
जर त्याच्या वडिलांना भाऊ नसेल तर त्याची सगळी मिळकत घरातल्या सगव्व्यात जवळच्या नातेवाईकाला मिळावी.”‘ इस्राएल लोकांमध्ये हा कायदा असावा अशी आज्ञा परमेशवराने मोशेला केली. हा इस्राएली लोकांचा कायदा व्हावा.
नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “यार्देन नदीच्या पूर्वेकडच्या वाळवंटातील डोंगरावर जा. मी इस्राएल लोकांना जी जमीन देणार आहे ती तुला तेथे दिसेल.
तू ही जागा बघितल्यानंतर तू तुझ्या भावाप्रमाणे. अहरोनाप्रमाणे मरशील.
जेव्हा लोक त्सीनच्या वाळवंटात पाण्यासाठी रागावले होते तेव्हा तुम्ही दोघांनी. तू आणि अहरोनाने माझ्या आज्ञा पाळायला नकार दिला. तुम्ही मला मान दिला नाही आणि लोकांना मी पवित्र आहे असे दाखवले नाही.” (हे त्सीनच्या वाळवंटात कादेश जवळ मरिबाच्या पाण्याजवळ घडले.)
मोशे परमेश्वराला म्हणाला,
“लोक काय विचार करतात ते परमेश्वर देवाला कळते.
परमेश्वरा, मी प्रार्थना करतो की तू या लोकांसाठी नेता निवडशील.”
तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “नूनाचा मुलगा यहोशवा. तो खूप शहाणा आहे. त्याला नवीन नेता कर.
त्याला याजक एलाजार आणि इतर लोकांसमोर उभे रहायला सांग आणि नंतर त्याला नेता कर.
“लोकांना असे दाखव की तू त्याला नेता करीत आहेस. नंतर सर्व लोक त्याच्या आज्ञा पाळतील.
जर यहोशवाला काही निर्णय घ्यायचे असतील तर तो याजक एलाजारकडे जाईल. एलाजार उरीमचा उपयोग करुन परमेशवराचे उत्तर माहीत करुन घेईल. नंतर यहोशवा आणि इस्राएलचे सर्व लोक देवाच्या सांगण्याप्रमाणे करतील. जर तो म्हणेल की, ‘युद्ध करा,’ तर ते युद्ध करतील. आणि त्याने सांगितले की ‘घरी जा’, तर ते घरी जातील.”
मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली. त्याने यहोशवाला एलाजारच्या आणि लोकांच्या पुढे उभे राहाण्यास सांगितले.
नंतर मोशेने तो नवीन नेता आहे हे दाखवण्यासाठी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. परमेश्वराने त्याला जसे सांगितले होते तसेच त्याने केले.

28

नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
इस्राएल लोकांना ही आज्ञा दे. योग्यवेळी धान्यार्पणे आणि बळी न विसरता मला अर्पण करायला त्यांना सांग. अग्नी बरोबर देण्याची ती अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करतो.
अग्नीबरोबरची अर्पणे त्यांनी परमेश्वराला दिलीच पाहिजेत. त्यांनी रोज एक वर्षाची दोन कोकरे दिली पाहिजेत. ती दोषरहित असली पाहिजेत.
एक कोकरू सकाळच्या वेळी आणि दुसरे संधिप्रकाशाच्या वेळी अर्पण करावे.
शिवाय आठ कप पीठ पाव कप हीन तेलात मिसळून केलेले धान्यार्पणही द्यावे.”
(ही रोजची अर्पणे देणे त्यांनी सीनाय पर्वतावर सुरु केले. ही अग्नी बरोबर दिलेली अर्पणे होती. त्यांचा सुवास परमेश्वराला प्रसन्न करीत असे.)
“लोकांनी धान्यार्पणाबरोबरच दिली जाणारी पेयाअर्पणेसुद्धा द्यावीत. त्यांनी एक पाव द्राक्षाचा रस प्रत्येक मेंढी बरोबर द्यावा. हे पेय वेदीवर एका पवित्र जागेवर ओतावे. ती परमेश्वराला द्यावयाची भेट आहे.
दुसरी मेंढी संधिप्रकाशाच्या वेळी अर्पणे करावी. ही शिजवलेली असावी हे अर्पण सकाळच्या अर्पणाप्रमाणेच द्यावे. तसेच त्याबरोबरची पेयार्पणेही करावीत. हे होमार्पण असेल. त्याचा सुवास परमेश्वराला आनंद देतो.”
“शब्बाथच्या वेळी तुम्ही एक वर्षाच्या दोन मेंढ्या दिल्या पाहिजेत. त्या दोषरहित असाव्यात. तुम्ही 16 कप पीठ हीन तेलात मिसळून केलेले धान्याचे अर्पण आणि पेयाचे अर्पणही दिले पाहिजे.
विश्रांतीच्या दिवसाचे हे खास अर्पण आहे. रोज देण्यात येणारे अर्पण आणि पेयार्पणा व्यतीरिक्त हे अर्पण आहे.”
“प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही परमेश्वराला खास होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, 1 मेंढा आणि 1 वर्षाच्या सात मेंढ्या असतील. त्या मेंढ्या दोषरहित असाव्यात.
प्रत्येक बैलाबरोबर तुम्ही 24 कप पीठ हीन तेलात मिसळून अर्पण करा. आणि मेंढ्याबरोबर 16 कप पीठ हीन तेलात मिसळून द्या.
प्रत्येक मेंढीबरोबर आठ कप पीठ हीन तेलात मिसळून अर्पण करा. ही अग्नीबरोबर द्यायची अर्पणे असतील. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करतो.
तसेच प्रत्येक बैलाबरोबर 2 हिन द्राक्षारस, 1 1/2 हिन द्राक्षारस प्रत्येक मेंढ्याबरोबर आणि 1 हिन प्रत्येक कोकराबरोबर अर्पण करा. ही होमार्पणे प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक महिन्याला अर्पण केली पाहिजेत.
प्रत्येक दिवशी करण्यात येणाऱ्या अर्पणा व्यतिरिक्त तुम्ही 1 बकरा परमेश्वराला अर्पण केला पाहिजे. तो पापार्पण म्हणून द्यावा.
“परमेश्वराचा वल्हांडण महिन्याच्या 14 व्या दिवशी असेल.
बेखमीर भाकरीचा सण महिन्याच्या 15 व्या दिवशी सुरु होतो. हा सण सात दिवस असेल. खमीराशिवाय (यीस्ट) केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता.
या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही खास सभा बोलावली पाहिजे. त्या दिवशी तुम्ही कुठलेही काम करायचे नाही.
तुम्ही परमेश्वराला होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, 1 मेंढा आणि 1 वर्षाची सात कोकरे असतील. ती दोषरहित असावीत.
तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. तुम्हाला शुद्ध करण्यासाठी देण्यात येणारे ते पापार्पण असेल.
ही अर्पणे नेहमीच्या सकाळच्या अर्पणाव्यतिरिक्त करायची आहेत.
“त्याचबरोबर सात दिवस दररोज ही होमार्पणे आणि पेयार्पणे तुम्ही परमेश्वराला दिली पाहिजेत. त्यांच्या सुवासाने परमेश्वराला आनंद होईल. ही अर्पणे म्हणजे लोकांचे अन्न असेल. ही अर्पणे नेहमीच्या होमार्पणाव्यतिरिक्त असतील.
नंतर या सणाच्या सातव्या दिवशी तुम्ही एक खास सभा घ्याल. तुम्ही त्या दिवशी काहीही काम करणार नाही.
“पहिल्या फळाच्या हंगामाच्या सणाला (सप्ताहांचा सण) परमेश्वराला धान्यार्पणे देण्यासाठी नवीन धान्य वापरा. त्यावेळी तुम्ही एक खास सभाही बोलवा त्या दिवशी तुम्ही काहीही काम करायचे नाही.
तुम्ही होमार्पणे द्यावे. अग्नीबरोबर दिलेली ही अर्पणे असतील. तुम्ही दोन बैल, एक मेंढा व 1 वर्षाची साकोकरे अर्पण करा. हि सर्व दोषरहित असावीत.
तुम्ही प्रत्येक बैलाबरोबर 24 कप पीठ तेलात मिसळून द्यावे. 16 कप पीठ मेंढ्याबरोबर
व आठ कप पीठ प्रत्येक कोकऱ्या बरोबर द्यावे.
स्वत:ला शुद्ध करण्यासाठी तुम्ही एक बकरा बळी द्या.
रोजच्या होमार्पणाशिवाय व धान्यर्पणाशिवाय तुम्ही ही अर्पणे द्या. प्राणी आणि पेय दोषरहित आहेत याची खात्री करा.

29

“सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी खास सभा असेल. त्या दिवशी तुम्ही काहीही काम करणार नाही. हा कर्णा वाजवण्याचा दिवस आहे.
तुम्ही होमार्पणे द्याल. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही एक बैल, एक मेंढा आणि एक वर्षांची सात कोकरे अर्पण करा. ती सर्व दोषरहित असावीत.
तुम्ही 24 कप पीठ तेलात मिसळून बैलाबरोबर, 16 कप पीठ
मेंढ्याबरोबर व आठ कप पीठ प्रत्येक कोकराबरोबर अर्पण कराल.
एक बकरासुद्धा पापार्पण म्हणून द्या. त्यामुळे तुम्ही शुद्ध व्हाल.
अमावास्याचे होमार्पण आणि धान्यार्पण ही नेहमीच्या अर्पणांव्यरिरिक्त असतील. आणि ही रोजच्या धान्यार्पणे व पेयार्पणे यांच्या व्यतिरीक्त असतील. हे सर्व नियमाप्रमाणे केले पाहिजे. ही सर्व अग्नीबरोबर करावयाची अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करील.
“सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी एक खास सभा बोलावण्यात येईल. त्या दिवशी तुम्ही अन्न घ्यायचे नाही आणि काही कामही करायचे नाही.
तुम्ही होमार्पणे द्यायची. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही एक बैल, एक मेंढा आणि एक वर्ष वयाचे सात कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असले पाहिजेत.
त्याबरोबर तुम्ही 24 कप पीठ तेलात मिसळून बैलाबरोबर, 16 कप पीठ
मेंढ्या बरोबर आणि आठ कप पीठ प्रत्येक कोकरा बरोबर अर्पण केले पाहिजे.
पापार्पण म्हणून तुम्ही एक बकराही अर्पण कराल. प्रायश्चित्ताच्यादिवशी करावयाच्या पापार्पणाबरोबरच ही अर्पणे द्यायची. तसेच रोजच्या बळीच्या, धान्याच्या व पेयाच्या अर्पणाबरोबर ही अर्पणे करावीत.
“सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एक खास सभा असेल. तो मंडपाचा सण असेल. त्या दिवशी तुम्ही काहीही काम करायचे नाही आणि परमेश्वरासाठी सात दिवसांची खास सुट्टी साजरी करायची.
तुम्ही होमार्पणे करावीत. ही अग्नीबरोबर करावयाची अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही 13 बैल, 2 मेंढे,
कोकरे अर्पण कराल. ते सर्व दोषरहित असले पाहिजेत. 14तुम्ही 24 कप पीठ तेलात मिसळून प्रत्येक बैलाबरोबर, 16 कप पीठ प्रत्येक मेंढ्याबरोबर व
आठ कप पीठ प्रत्येक कोकरा बरोबर अर्पण करावे.
तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. रोजच्या अर्पणाव्यातिरिक्त आणि त्याबरोबरच्या धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यातिरिक्त ही अर्पणे असतील.
“या सुट्ठीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही 12 बैल, 2 मेंढे आणि 1 वर्षाचे 14 कोकरे अर्पण करावेत. ती दोषरहित असावी.
बैल, मेंढे आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्य प्रमाणात धान्यार्पण आणि पेयार्पण केले पाहिजे.
एक बकरा पापार्पण म्हणून द्यावा. ही सर्व रोजच्या बळीच्या व धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असली पाहिजे.
“या सुट्ठीच्या तिसऱ्या दिवशी तुम्ही 11 बैल, 2 मेंढे आणि एक वर्षाचे 14 कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असले पाहिजेत.
बैल, मेंढे आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पण केले पाहिजे.
पापार्पण म्हणून एक बकराही द्यावा. हे सर्व रोजच्या बळीच्या व धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.
“सुट्ठीच्या चौथ्या दिवशी तुम्ही 10 बैल, 2 मेंढे व 1 वर्षाचे 14 कोकरे अर्पण करवेत. ते निर्दोष असले पाहिजेत.
बैल, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पणही केले पाहिजे.
एक बकरा पापार्पण म्हणून दिला पाहिजे. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.
“सुट्ठीच्या पाचव्या दिवशी तुम्ही 9 बैल, 2 मेंढे व एक वर्षाचे 14 कोकरे अर्पण केले पाहिजे. ते दोषरहित असावेत
बैल, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पण ही केले पाहिजे.
एक बकरा पापार्पण म्हणून दिला पाहिजे. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणा व्यतिरिक्त असले पाहिजे.
“सुट्ठीच्या सहाव्या दिवशी तुम्ही 8 बैल, 2 मेंढे व एक वर्षांचे 14 कोकरे अर्पण केले पाहिजेत. ते दोषरहित असावेत.
बैल, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण, व पेयार्पणही केले पाहिजे.
एक बकरा पापार्पण म्हणून द्यावा. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.
“सुट्ठीच्या सातव्या दिवशी तुम्ही 7 बैल, 2 मेंढे व एक वर्षांचे 14 कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असावेत.
बैल, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पणही केले पाहिजे.
एक बकरा पापार्पण म्हणून द्यावा. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.
“या सुट्ठीच्या आठव्या दिवशी तुमच्यासाठी एक खास सभा भरवावी. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये.
तुम्ही होमार्पण करावे. ते अग्नीबरोबर करायचे अर्पण असेल. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही एक बैल, 1 मेंढा व एक वर्षाचे सात कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असावेत.
प्रत्येक बैल, मेंढा व कोकरा यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पण दिले पाहिजे.
एक बकरा पापार्पण म्हणून दिला पाहिजे. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.
“या खास सुट्टीत तुम्ही होमार्पण व पेयार्पण ही नवस व शांत्यर्पणाची अर्पणे म्हणून आणली पाहिजेत. ही सर्व अर्पणे तुम्ही परमेश्वराला करावीत. ही सर्व अर्पणे तुम्हाला परमेश्वराला खास भेट द्यायची असेल किंवा परमेश्वराला काही खास वचन दिले आहे म्हणून द्यावयाच्या अर्पणाव्यतिरिक्त असतील.”
मोशेने परमेश्वराच्या या सर्व आज्ञा इस्राएल लोकांना सांगितल्या.

30

मोशे इस्राएलच्या सर्व वंशप्रमुखांशी बोलला. त्याने त्यांना परमेश्वराकडून आलेल्या आज्ञांबद्दल सांगितले:
“जर एखाद्याला देवाला काही खास वचन द्यायचे असेल किंवा त्याने देवाला खास वस्तू द्यायचे वचन दिले असेल तर त्याला ती गोष्ट करु द्या. पण त्या माणसाने जे वचन दिले असेल तेच नेमके केले पाहिजे.
“एखादी तरुण स्त्री असून तिच्या वडिलांच्या घरात रहात असेल आणि तिने परमेश्वराला खास वस्तू देण्याचे वचन दिले असेल.
जर तिच्या वडिलांनी या वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले तर त्या स्त्रीने वचनाप्रमाणे केले पाहिजे.
पण जर तिच्या वडिलांनी वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले नाहीत तर ती तिच्या वचनातून मुक्त होईल. तिने जे वचन दिले ते तिला पूर्ण करावे लागणार नाही.
“तिला तिच्या वडिलांनी तिला मना केले म्हणून परमेश्वर तिला माफ करील.
तिच्या नवऱ्याने त्या वचनाबद्दल ऐकले आणि तो त्याच्याशी सहमत झाला तर त्या रत्रीने पचनाची पूर्तता केली पाहिजे.
पण जर नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि तो सहमत झाला नाही तर तिला वचन पूर्ण करण्याची गरज नाही. तिच्या नवऱ्याने वचन मोडले-तिने जे सांगितले ते पूर्ण करण्याची त्याने परवानगी दिली नाही-म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील.
“विधवा किंवा घटस्फोटिता स्त्रीने परमेश्वराला वचन दिले असेल तर तिने वचनाप्रमाणे केले पाहिजे.
लग्न झालेल्या स्त्रीने परमेश्वराला काही वचन दिले असेल.
तिच्या नवऱ्याने त्यावचनाबद्दल ऐकले आणि त्याची पूर्णता करण्याची त्याने तिला परवानगी दिली तर तिने त्याप्रमाणे केले पाहिजे.
पण जर तिच्या नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि त्याने तिला त्याप्रमाणे करण्याची परवानगी दिली नाही तर तिने वचनाप्रमाणे वागण्याची गरज नाही. तिने काय वचन दिले होते त्याला महत्व नाही. तिचा नवरा वचन मोडू शकतो. तिच्या नवऱ्याने वचन मोडले तर परमेश्वर तिला क्षमा करील.
लग्न झालेल्या स्त्रीने परमेश्वराला काही वचन दिले असेल किंवा काही गोष्टी सोडण्याचे वचन तिने दिले असेल किंवा तिने देवाला काही खास वचन दिले असेल.
नवरा यापैकी कुठल्याही वचनाला मनाई करु शकतो. किंवा त्यापैकी कुठल्याही वचनाची पूर्णता करण्याची परवानगी तो देऊ शकतो.
पण जर नवऱ्याने वचनांबद्दल ऐकले आणि त्यांच्यावर त्याने बंदी आणली तर तिने दिलेले वचन मोडण्याला तो जबाबदार असेल.”
परमेश्वराने मोशेला या आज्ञा दिल्या. या एक पुरुष आणि त्याची बायको यांच्याबद्दलच्या आज्ञा आणि वडील व वडीलांच्या घरी राहणारी मुलगी यांच्याबद्दलच्या या आज्ञा आहेत.

31

परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला:
“मी इस्राएल लोकांना मिद्यान्यांचा सूड घ्यायला मदत करीन. मोशे, तू त्यानंतर मरशील.”101
तेव्हा मोशे लोकांशी बोलला. तो म्हणाला, “तुमच्यातल्या काहींची सैनिक म्हणून निवड करा. परमेश्वर त्यांचा उपयोग मिद्यान्याचा सूड घेण्यासाठी करील.
इस्राएलच्या प्रत्येक वंशातून 1000 लोक निवडा.
म्हणजे इस्राएलमधून 12,000 सैनिक होतील.”
मोशेने त्या 12,000 लोकांना लढाईवर पाठवले. त्याने त्यांच्याबरोबर याजक एलाजारचा मुलगा फिनहास याला पाठवले. फिनहासने बरोबर पवित्र गोष्टी, रणशिंगे आणि तुताऱ्या घेतल्या.
लोक परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मिद्यान्यांबरोबर लढले. त्यांनी सर्व मिद्यानी पुरुषांना मारले.
त्यांनी जे लोक मारले त्यांत अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा हे मिद्यानाचे राजे होते. त्यांनी बौराचा मुलगा बलामलांही तलवारीने मारले.
इस्राएल लोकांनी मिद्यानाच्या स्त्रियांना व मुलांना कैद करुन नेले. त्यांनी त्यांच्या गायी. मेंढ्या व इतर गोष्टीही नेल्या.
त्यांनी त्यांची सर्व शहरे व खेडीही जाळली.
त्यांनी त्यांची सर्व माणसे. पशू घेतले आणि त्यांना
मोशे, याजक एलाजार आणि इस्राएलच्या इतर लोकांकडे आणले. त्यांनी युद्धात ज्या गोष्टी घेतल्या त्या सर्व इस्राएलींच्या तळावर आणल्या. इस्राएलचा एक तळ यार्देन नदीच्या खोऱ्यात मवाबमध्ये होता. हा तळ यार्देन नदीच्या पूर्वेला यरीहोपलीकडे होता.
नंतर मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी सैनिकांना भेटण्यासाठी छावणीबाहेर गेले.
मोशे सैनिकांच्या प्रमुखावर खूप रागावला. तो युद्धावरुन परतलेल्या 1000 सैनिकांच्याप्रमुखावर आणि 100 सैनिकांच्या प्रमुखावर खूप रागावला.
मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही स्त्रियांना जिवंत का ठेवले?
या स्त्रिया इस्राएलच्या पुरुषांसाठी वाईट आहेत. लोक परमेश्वरा पासून दूर जातील. बलामच्या वेळी झाले तसे होईल. परमेश्वराच्या लोकांना पुन्हा रोगराई येईल.
आताच मिद्यानाच्या सर्व मुलांना ठार मारा आणि पुरुषाबरोबर राहिलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका. कुठल्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध असलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका.
आणि नंतर तुमच्या पैकी ज्यांनी दुसऱ्यांना मारले असेल त्यांनी सात दिवस तळाच्या बाहेर राहावे.
तुम्ही प्रेताला केवळ हात जरी लावला असला तरीही तुम्ही बाहेर राहावे. तिसऱ्या दिवशी तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या कैद्यांना शुद्ध करा. हीच गोष्ट पुन्हा सातव्या दिवशीही करा.
तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. लाकूड, लोकर आणि चामडे यांपासून बनवलेल्या वस्तू धुवा. तुम्ही शुद्ध झालेच पाहिजे.”
नंतर याजक एलाजार सैनिकांशी बोलला. तो म्हणाला, “परमेश्वराने मोशेला सांगितले ते हे नियम आहेत. युद्धावरुन परत आलेल्या सैनिकांसाठी हे नियम आहेत. तुम्ही सोने, चांदी, तांबे,
सातव्या दिवशी तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. नंतर तुम्ही शुद्ध व्हाल त्यानंतर तुम्ही तळावर येऊ शकता.”
नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
“सैनिकांनी जे कैदी, प्राणी आणि इतर गोष्टी युद्धावरुन आणल्या आहेत त्यांची मोजदाद एलाजार याजक, तू आणि नेत्यांनी करावी.
नंतर युद्धावर गेलेल्या सैनिकांत आणि इस्राएलच्या इतर लोकांत त्यांची वाटणी करा.
युद्धावर गेलेल्या सैनिकांच्या हिश्श्यातून काही भाग वेगळा करा. तो भाग परमेश्वराचा आहे. परमेश्वराचा 500 वस्तूत 1 वस्तू असा भाग आहे. त्यांत माणसे, गायी, गाढवे व मेंढ्या यांचा समावेश आहे.
युद्धावरून सैनिकांनी आणलेल्या लुटीचा त्यांच्यातला अर्धा भाग घ्या. नंतर त्या वस्तू याजक एलाजारला द्या. तो भाग परमेश्वराचा आहे.
नंतर लोकांच्या अर्ध्या भागातील प्रत्येक 50 वस्तू मधील एक वस्तू घ्या. त्यात माणसे, गायी, गाढवं, बकऱ्या व इतर प्राणी यांचा समावेश आहे. तो भाग लेवी लोकांना द्या. कारण लेवी लोक परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपाची काळजी घेतात.”
म्हणून मोशे आणि एलाजारने परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले.
सैनिकांनी 675000 बकऱ्या,
72,000 गायी,
81,000 गाढवे
आणि 32,000 स्त्रियां आणल्या. (यांत कोणत्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध न आलेल्या स्त्रियांचाच फक्त समावेश आहे)
युद्धावर गेलेल्या सैनिकांना 337500 मेंढ्या मिळाल्या.
त्यांनी 675 मेंढ्या परमेश्वराला दिल्या.
सैनिकांना 36,000 गायी मिळाल्या. त्यांतील 72 गायी त्यांनी परमेश्वराला दिल्या.
सैनिकांना 30,500 गाढवे मिळाली. त्यांतील 61 गाढवें त्यांनी परमेश्वराला दिले.
सैनिकांना 16,000 स्त्रीया मिळाल्या. त्यांपैकी 32 त्यांनी स्त्रीया परमेश्वराला दिल्या.
मोशेने परमेश्वराच्या या सर्व भेटी त्याच्या आज्ञेनुसार याजक एलाजारला दिल्या.
नंतर मोशेने लोकांतल्या हिश्श्याच्या अर्ध्या भागाची मोजणी केली. हा युद्धावर गेलेल्या सैनिकांकडून मोशेने घेतलेला अर्धा भाग होता.
लोकांना 337,500 मेंढ्या.
36,000 गायी,
गाढवे 30,500
आणि 16,000 स्त्रिया मिळाल्या.
प्रत्येक 50 वस्तूमागे मोशेने एक वस्तू परमेश्वरासाठी घेतली. त्यांत पशू आणि माणसे याचा समावेश होता. नंतर त्याने या वस्तू लेवींना दिल्या. कारण त्यांनी परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपाची काळजी घेतली.
नंतर सैनिकांचे पुढारी (1000 सैनिकांचे व 100 सैनिकांचे पुढारी) मोशेकडे आले.
त्यांनी मोशेला सांगितले, “आम्ही तुझ्या सेवकांनी आमचे सैनिक मोजले. आम्ही एकही सैनिक सोडला नाही.
म्हणून आम्ही प्रत्येक सैनिकाकडून परमेशवराची भेट आणत आहोत. आम्ही सोन्याच्या वस्तू आणत आहोत-बाजूबंद, बांगड्या, आंगठ्या, कुड्या आणि हार. आम्हाला शुद्ध करण्यासाठी या परमेशवराच्या भेटी आहेत.”
मोशेने सोन्याच्या सर्व वस्तू घेतल्या आणि त्या याजक एलाजारला दिल्या.
हजार आणि शंभर सैनिकावरच्या प्रमुखांनी जे सोने परमेश्वरला दिले त्याचे वजन 420 पौंड होते.
सैनिकांनी त्यांना युद्धात मिळालेल्या इतर वस्तू स्वत:जवळ ठेवल्या.
मोशे आणि एलाजार यांनी हजार आणि शंभर सैनिकांवरच्या प्रमुखांकडून सोने घेतले. नंतर त्यांनी ते सोने दर्शन मंडपात ठेवले. ही भेट म्हणजे इस्राएल लोकांनी परमेश्वराला आठवणी खातर दिलेली भेट होती.

32

रऊबेन आणि गाद या घराण्यांकडे खूप गायी होत्या. त्यांनी याजेर व गिलाद येथील जमिनी पाहिल्या. ही जमीन आपल्या गायींसाठी चांगली आहे असे त्यांना वाटले.
म्हणून रऊबेन व गाद यांच्या घराण्यातील लोक मोशेकडे आले. ते मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी यांच्याशी बोलले.
जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तो प्रदेश आम्हाला देण्यात यावा असे आम्हाला वाटते. आम्हाला यार्देन नदीच्या पलिकडे नेऊ नका.”
रऊबेन आणि गादच्या घराण्यातील लोकांना मोशे म्हणाला, “स्वत: इथे राहून तुम्ही तुमच्या भावाना लढायला पाठवाल का?
तुम्ही इस्राएल लोकांना का निरूत्साहित करीत आहात? तुम्ही त्यांना नदी पार करण्याच्या इच्छेपासून परावृत कराल आणि परमेश्वराने त्यांना दिलेली जमीन तुम्ही घ्याल.
तुमच्या वाडवडिलांनी हीच गोष्ट माझ्याबाबतीत केली होती. कादेश-बर्ण्याला मी काही हेरांना जमीन बघण्यासाठी पाठवले.
ते लोक अष्कोल खोऱ्यापर्यंत गेले. त्यांनी जमीन बघितली आणि त्या लोकांनी इस्राएल लोकांना परमेश्वराने दिलेल्या प्रदेशात जाण्याच्या इच्छेपासून परावृत केले.
परमेश्वर त्या लोकांवर खूप रागावला. परमेश्वराने ही शपथ घेतली:
‘मिसर देशातून आलेल्या 20 वर्षांवरील कुठल्याही माणसाला हा प्रदेश बघू दिला जाणार नाही. मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना वचन दिले होते. त्याना मी ही जमीन द्यायचे कबूल केले होते. परंतु त्यांनी मला मनापासून अनुसरले नाही. म्हणून त्यांना हा प्रदेश मिळणार नाही.
फक्त यफुन्नेचा मुलगा कारेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे मनापासून परमेश्वराला अनुसरले.”
“परमेश्वर इस्राएल लोकांवर खूप रागावला होता. म्हणून परमेशवराने त्यांना 40 वर्षे वाळवंटात ठेवले. ज्या लोकांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले त्या लोकांना परमेश्वराने मरण येईपर्यंत तिथे ठेवले.
आणि आता तुमच्या वाडवडिलांनी जी गोष्ट केली तीच तुम्ही करीत आहात. पाप्यांनो परमेश्वराने त्याच्या लोकांवर आणखी रागवावे अशी तुमची इच्छा आहे का?
जर तुम्ही परमेश्वराची भक्ति करायचे सोडले तर परमेश्वर इस्राएल लोकांना अधिक काळ वाळवंटात ठेवील आणि नंतर तुम्ही त्या सर्व लोकांचा नाश कराल.”
पण रऊबेनच्या आणि गादच्या घराण्यातील लोक मोशेकडे गेले. ते म्हणाले, “आम्ही या जागेवर आमच्या मुलांसाठी शहरे आणि आमच्या जनावरांसाठी गोठे उभारू.
त्यामुळे आमची मुले या ठिकाणी राहाणाऱ्या इतर लोकांपासून सुरक्षित राहतील. पण आम्ही इस्राएलच्या इतर लोकांना मदत करण्यासाठी आनंदाने येऊ. आम्ही त्यांना त्यांच्या प्रदेशात आणू.
इस्राएलमधल्या प्रत्येकाने त्याच्या वाट्याची जमीन घेतल्याशिवाय आम्ही परत येणार नाही.
यार्देन नदीच्या पश्चिमेकडची कुठलीही जमीन आम्ही घेणार नाही. आमच्या वाट्याची जमीन यार्देन नदीच्या पूर्वेला आहे.”
तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, “जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर हा प्रदेश तुमचा होईल. परंतु तुमच्या सैनिकांनी परमेश्वरासमोर लढाईत उतरले पाहिजे.
तुमच्या सैन्याने यार्देन नदी पार करून शत्रु सैन्याला या प्रदेशातून हाकलले पाहीजे.
सगळा प्रदेश घेण्यासाठी परमेश्वराने आपल्याला मदत केली की तुम्ही घरी जाऊ शकता. नंतर परमेश्वराला आणि इस्राएलला तुम्ही पापी आहात असे वाटणार नाही. नंतर परमेश्वर तुम्हाला ही जमीन देईल.
पण जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हाला शासन होईल याची खात्री बाळगा.
तुमच्या मुलांसाठी शहरे बसवा आणि जनावरांसाठी गोठे बांधा. पण तुम्ही वचन दिल्याप्रमाणे सारे काही करा.”
नंतर रऊबेन आणि गादच्या कुटुंबातील लोक मोशेला म्हणाले, “आम्ही तुझे नोकर आहोत. तू आमचा मालक आहेस म्हणून तू जे सांगतोस ते आम्ही करु.
आमच्या बायका, मुले आणि आमची सर्व जनावरे गिलाद शहरात राहतील.
पण आम्ही, तुझे नोकर यार्देन नदी पार करु. आम्ही परमेश्वरापुढे लढाईस जाऊ. जसे आमचा धनी सांगत आहे.”
याप्रमाणे त्यांनी वचन दिले. ते मोशे, याजक एलाजार, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएलचे सर्व कुटुंबप्रमुख या सर्वांनी ते ऐकले.
मोशे त्यांना म्हणाला, “गाद आणि रऊबेनचे लोक यार्देन नदी पार करतील. ते लढाईत परमेश्वराच्या पुढे चालतील. ते तुम्हाला प्रदेश जिंकायला मदत करतील आणि तुम्ही गिलादचा प्रदेश त्यांच्या वाटेचा भाग म्हणून द्याल.
पण ते तुमच्या सैन्याबरोबर जाण्यात अपयशी ठरले तर कनानमध्ये तुमच्यामध्ये त्यांना जमीन मिळेल.”
गाद आणि रऊबेनच्या लोकांनी उत्तर दिले. “आम्ही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही करण्याचे वचन देतो.
आम्ही यार्देन नदी पार करु आणि लढाईत परमेश्वरापुढे कनानच्या प्रदेशात जाऊ. आमच्या देशाचा प्रदेश यार्देन नदीच्या पूर्वेला आहे.”
तेव्हा मोशेने ती जमीन गादच्या, रऊबेनच्या लोकांना आणि मनश्शेच्या कुटुंबातील अर्ध्या लोकांना दिली. (मनश्शे योसेफचा मुलगा होता.) त्या प्रदेशात अमोऱ्याचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग यांच्या राज्याचा त्या भूमीत समावेश होता. त्यांत आजुबाजूच्या प्रदेशातील शहरे होती.
गादच्या लोकांनी दीबोन, अटारोथ, अरोएर,
अटारोथ-शोफान, याजेर यागबहा,
बेथनिम्रा आणि बेथ-हारान ही शहरे वसवली. त्यांनी शहराभोवती तटबंदी उभारली आणि त्यांच्या जनावरांसाठी गोठे बांधले.
रऊबेनच्या लोकांनी हेशबोन, एलाले, किर्याथाईम.
नबो व बाल-मौन आणि सिबमाह ही शहरे वसवली. त्यांनी पुन्हा वसवलेल्या शहरांना जुनीच नावे दिली. पण नेबो आणि बाल-मोनचे नांव त्यांनी बदलले.
माखीरच्या कुटुंबातील लोक गिलादला गेले (माखीर मनश्शेचा मुलगा होता.) त्यांनी त्या शहराचा पराभव केला. तेथे राहणाऱ्या आमोरी लोकांचा त्यांनी पराभव केला.
मोशेने गिलाद मनश्शेच्या कुटुंबातील माखीरला दिले. म्हणून त्याचे कुटुंब तेथे राहिले.
मनश्शेच्या कुटुंबातील याईर याने छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्यांना याईरची शहरे असे म्हटले.
नोबहने कनाथ व त्याच्या आसपासच्या छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्या जागेला आपले नाव दिले.

33

मोशे आणि अहरोन यांनी इस्राएल लोकांना मिसरामधून लहान लहान टोव्व्यांनी बाहेर काढले. त्यांनी ज्या ज्या देशांतून प्रवास केला ते या प्रमाणे:
त्यांनी जेथे जेथे प्रवास केला त्याबद्दल मोशेने लिहिले आहे. परमेश्वराला जे हवे होते तेच मोशेने लिहिले. ते ज्या ठिकाणी गेले ती ठिकाणे आणि तेथून ते कधी गेले त्या वेळा या प्रमाणे:
पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस सोडले. वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्राएलचे लोक विजयोत्सवात हात वर करुन बाहेर पडले. मिसर देशाच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाहिले.
मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले.
इस्राएल लोकांनी रामसेस सोडले आणि ते सुक्कोथला गेले.
ते सुक्कोथहून एथामला गेले. लोकांनी तेथे वाळवंटाच्या काठावर तंबू ठोकले.
त्यांनी एथाम सोडले आणि ते पीहहीरोथला गेले. ते बाल-सफोन जवळ होते. लोकांनी मिगदोलसमोर तंबू ठोकले.
लोकांनी पीहहीरोथ सोडले आणि ते समुद्रामधून चालत गेले. ते वाळवंटाकडे गेले. नंतर ते तीन दिवस वाळवंटातून चालत होते. लोकांनी मारा येथे तळ दिला.
लोकांनी मारा सोडले व ते एलिमला जाऊन राहिले. तिथे 12 पाण्याचे झरे होते आणि 70 खजुराची झाडे होती.
लोकांनी एलिम सोडले व त्यांनी तांबड्या समुद्राजवळ तंबू ठोकले.
त्यांनी तांबडा समुद्र सोडला आणि त्सीन वाळवंटात तळ दिला.
त्सीन वाळवंट सोडून ते दफकाला आले.
लोकांनी दफका सोडले व ते आलूश येथे राहिले.
लोकांनी आलूश सोडले व रफिदिमला तळ दिला. त्या जागी पिण्यासाठी पाणी नव्हते.
1लोकांनी रफिदिम सोडले व त्यांनी सीनाय वाळवंटात तळ दिला.
त्यांनी सीनाय वाळवंट सोडले व किब्रोथ-हत्तव्वा येथे तळ दिला.
किब्रोथ-हत्तव्वा येथून ते हसेरोथला राहिले.
हसेरोथ येथून त्यांनी रिथमाला तंबू ठोकले.
रिथमा सोडून ते रिम्मोन-पेरेसला आले.
रिम्मोन-पेरेस सोडल्यावर त्यांनी लिब्नाला तळ दिला.
लोकांनी लिब्ना सोडले व रिस्सा येथे तळ दिला.
रिस्सा सोडून ते कहेलाथा येथे तळ दिला.
लोकांनी कहेलाथा सोडले व त्यांनी शेफेर पर्वतावर तंबू ठोकले.
शेफेर पर्वत सोडून लोक हरादांत आले.
लोकांनी हरादा सोडले व मकहेलोथ येथे तळ दिला.
मकहेलोथ सोडून ते तहथाला आले.
लोकांनी तहथा सोडले व ते तारहला आले.
तारह सोडून त्यांनी मिथकाला तळ दिला.
लोकांनी मिथका सोडले व हशमोना येथे तंबू ठोकले.
हशमोना सोडून ते मोसेरोथला आले.
त्यांनी मोसेरोथ सोडले व बनेयाकानला तळ दिला.
बनेयाकान सोडून ते होर-हागिदगादला आले.
होर-हागिदगाद सोडून त्यांनी याटबाथाला तंबू ठोकले.
याटबाथा येथून ते अब्रोनाला आले.
अब्रोनाहून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला.
लोकांनी एसयोन-गेबेर सोडले व त्यांनी त्सीन वाळवंटात कादेश येथे तंबू ठोकले.
लोकांनी कादेश सोडले व त्यांनी होरला तंबू ठोकले. अदोम देशाच्या सीमेवरील हा एक पर्वत होता.
याजक अहरोनने परमेश्वराची आज्ञा पाळली व तो होर पर्वतावर गेला. अहरोन त्याजागी मरण पावला. हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याचा चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याचा पहिला दिवस होता.
अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो 123 वर्षाचा होता.
कनान देशातील नेगब जवळ अराद शहर होते. अर्द येथे असलेल्या कनानी राजाने इस्राएलचे लोक येत असल्याबद्दल ऐकले.
लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू ठोकले.
त्यांनी सलमोना सोडले व ते पुनोनला आले.
पूनोन सोडून त्यांनी ओबोथला तळ दिला.
लोकांनी ओबोथ सोडले व ते इये-अबारिमला आले. हे मवाब देशाच्या सीमेवर होते.
मग ईयीमाहून (इये-अबारिम) ते दीबोन-गादला आले.
लोकांनी दीबोन-गाद सोडले व अलमोन दिबलाथाईमला आले.
अलमोन-दिलाथाईमहून त्यांनी नबोजवळच्या अबारीम पर्वतावर तंबू ठोकले.
लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरीहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते.
त्यांनी यार्देन नदीच्या यार्देन खोऱ्यात तंबू ठोकले. त्यांचे तंबू बेथ-यारीमोथापासून अकाशीयाच्या शेतापर्यंत होते.
त्या ठिकाणी परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
“इस्राएल लोकांशी बोल, त्यांना या गोष्टी सांग: तुम्ही यार्देन नदी पार कराल. तुम्ही कनान देशात जाल.
तिथे जे लोक तुम्हाला आढळतील त्यांच्यापासून तुम्ही तो प्रदेश घ्याल. तेव्हा तुम्ही त्यांच्या कोरीव पुतळयांचा आणि मूर्तीचा नाश करा. त्यांच्या उंचावरच्या पुजेच्या ठिकाणांचा नाश करा.
तुम्ही तो प्रदेश घ्या आणि तिथेच रहा. कारण मी हा प्रदेश तुम्हाला देत आहे. तो तुमच्या कुटुंबाचा होईल.
तुमच्यातील प्रत्येक कुळाला जमिनीचा काही भाग मिळेल. तुम्ही चिठ्ठया टाकून कोणाला कुठली जमीन मिळते ते ठरवाल. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल. लहान कुळाला लहान भाग मिळेल. चिठ्यां कुठल्या कुळाला कुठली जमीन मिळाली ते कळेल. प्रत्येक कुळाला त्याचा स्वत:चा जमिनीचा तुकडा मिळेल.
“तुम्ही त्या लोकांना जबरदस्तीने बाहेर काढा, जर तुम्ही त्यांना तिथेच राहू दिले तर ते तुमच्यावर अनेक संकटे आणतील. ते तुमच्या डोव्व्यातील कुसळासारखे आणि शरीरातल्या काट्यासारखे बोचतील. तुम्ही ज्या देशात रहाल त्या देशात ते अनेक संकटे आणतील.
मी तुमच्याबाबत काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवले आहे. आणि जर तुम्ही त्यांना त्या देशात राहू दिले तर मी ते सर्व तुमच्याबाबतीत करीन.”

34

परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला,
“इस्राएल लोकांना ही आज्ञा दे: तुम्ही कनान देशात येत आहात. तुम्ही त्या देशाचा पराभव करा. तुम्ही सर्व कनान देश घ्या.
दक्षिणे कडे अदोमजवळच्या त्सीन वाळवंटाचा काही भाग तुम्हाला मिळेल. तुमची दक्षिणेकडची सीमा मृत समुद्राच्या दक्षिण टोकापासून सुरु होईल.
तेथून अक्रब्बीम चढावाचे दक्षिण टोक पार करुन ती त्सीन वाळवंटातून कादेश-बर्ण्याला जाईल. आणि नंतर हसर-अद्दारपर्यंत जाऊन असमोनाला पोहोचेल.
असमोनहून ती मिसर देशाच्या नदीपर्यंत जाईल आणि भूमध्यसमुद्रात तिची समाप्ती होईल.
तुमची पश्चिमेकडची सीमा म्हणजे भूमध्यसमुद्र (महासमुद्र).
तुमची उत्तरेकडची सीमा भूमध्यसमुद्रात सुरु होईल व होर पर्वताकडे जाईल (लेबानान मध्ये).
होर पर्वतावरुन ती लेबो-हमासला जाईल व तेथून सदादला.
नंतर ती सीमा जिप्रोनला जाईल व हसर-एनानला ती संपेल. तेव्हा ती तुमची उत्तर सीमा.
तुमची पूर्व सीमा एनानजवळ सुरु होईल व ती शफामपर्यंत जाईल.
शफामपासून ती अईनच्या पूर्वेकडे रिब्लाला जाईल. ती सीमा गालीली तलावाजवळच्या पर्वतांच्या रांगापर्यंत जाईल.
आणि नंतर ती यार्देन नदीच्या काठाने जाऊन मृतसमुद्रात तिची समाप्ती होईल. तुझ्या देशाच्या या सीमा आहेत.”
तेव्हा मोशेने इस्राएल लोकांना या आज्ञा दिल्या, “तुम्हाला हा प्रदेश मिळेल. तुम्ही नऊ कुळात आणि मनश्शेच्या अर्ध्या कुळात जमिनीची विभागणी करण्यासाठी चिठ्ठ्या टाकाल.
रऊबेन आणि गादची कुळे आणि मनश्शेच्या अर्ध्या कुळांनी आधीच त्यांची जमीन घेतली आहे.
त्या अडीच कुळानी यरीहोजवळ यार्देन नदीच्या पूर्वेकडची जागा घेतली आहे.”
नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
“जमिनीची विभागणी करण्यासाठी तुला या माणसांची मदत होईल: याजक एलाजार आणि नूनाचा मुलगा यहोशवा.
आणि सर्व कुळांचे प्रमुख. प्रत्येक कुळाचा एक प्रमुख असेल. ते लोक जमिनीची विभागणी करतील.
प्रमुखांची ही नावे आहेत: यहुदाच्या वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब.
शिमोनेच्या कुटुंबातील अम्मीहुदाचा मुलगा शमुवेल.
बन्यामिनच्या कुटुंबातील किसलोनच्या मुलगा अलीदाद.
दानी कुटुंबातील यागलीचा मुलगा बुक्की.
योसेफच्या वंशातील मनश्शेच्या कुटुंबातील एफोदचा मुलगा हन्नीएल.
एफ्राईम कुटुंबातील शिफटानचा मुलगा कमुवेल.
जबुलून वंशातील पर्नाकचा मुलगा अलीसाफान.
इस्साखार वंशातील अज्जानचा मुलगा पलटीयेल.
आशेरी वंशातील शलोमीचा मुलगा अहीहूद.
आणि नप्ताली वंशातील अम्मीहुदाचा मुलगा पदाहेल.”
परमेश्वराने कनानच्या भूमीची इस्राएल लोकांमध्ये वाटणी करण्यासाठी या माणसांची निवड केली.

35

परमेश्वर मोशेशी बोलला. हे मवाबमधील यार्देनच्या खोऱ्यात यहीहोसमोर यार्देन नदीजवळ घडले. परमेश्वर म्हणाला,
“इस्राएल लोकांना सांग की त्यांनी त्यांच्या भागातील काही शहरे लेवी लोकांना दिली पाहिजेत. इस्राएल लोकांनी काही शहरे आणि त्याच्या आजूबाजूची कुरणे लेवी लोकांना दिली पाहिजेत.
लेवी लोक त्या शहरात राहू शकतील आणि लेवी लोकांच्या गायी आणि इतर जनावरे शहराभोवतालच्या कुरणात चरु शकतील.
तुम्ही तुमच्या प्रदेशातील किती भाग लेवी लोकांना देणार?
शहरांच्या तटबंदीपासून 1500 फूट भाग लेवी लोकांच्या मालकीचा असेल. 3000 फूट पूर्वेला आणि 3000 हात दक्षिणेला, 3000 हात फश्चिमेला आणि 3000 हात उत्तरेपर्यंतची जागा लेवींना मिळेल. (शहर या सर्व प्रदेशाच्या मध्यभागी असेल)
त्यापैकी सहा शहरे शरणपुरे असतील. जर एखाद्या माणसाने चुकून कुणाला मारले तर तो माणूस संरक्षणासाठी त्या शहरात जाऊ शकतो. त्या सहा शहरांखेरीज आणखी 42 शहरे तुम्ही लेवींना द्या.
म्हणजे तुम्ही एकूण 48 शहरे लेवींना द्या. त्या शहरांभोवतालची जमीनही तुम्ही लेवींना द्या.
इस्राएलच्या मोठ्या कुटुंबांना जमिनीचे मोठे तुकडे मिळतील आणि लहान कुळांना लहान तुकडे मिळतील. म्हणून मोठी कुळे जास्त शहरे आणि लहान कुळे थोडी शहरे लेवींना देतील.”
नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
“लोकांना या गोष्टी सांग: तुम्ही लोक यार्देन नदी पार करुन कनानच्या प्रदेशात जाल.
तेव्हा तुम्ही शरणपुरे निवडा. जर एखाद्याने चुकून कुणाला ठार मारले तर तो संरक्षणासाठी त्यापैकी एखाद्या शहरात जाऊ शकतो.
तेथे तो माणूस बदला घेणाऱ्या मृत माणसाच्या कुटुंबियांपासून सुरक्षित राहू शकतो. त्या माणसाचा कोर्टात न्याय होईपर्यंत तो तेथे सुरक्षित राहू शकतो.
अशी 6 संरक्षक शहरे असतील.
यापैकी तीन शहरे यार्देन नदीच्या पूर्वेला असतील आणि तीन शहरे कनानच्या प्रदेशात यार्देन नदीच्या पश्चिमेला असतील.
ही शहरे इस्राएलच्या नागरिकांसाठी, परदेशी नागारिकासाठी आणि प्रवाशांसाठी शरणपुरे असतील. यांच्यापैकी कुणीही चुकून कुणाला ठार मारले तर ते संरक्षणसाठी या शहरात जाऊ शकतात.
“जर एखादा माणूस कुणाला मारण्यासाठी लोखंडी शस्त्राचा उपयोग करत असेल तर त्याने मेले पाहिजे.
आणि जर एखाद्याने दगड घेऊन कुणाला मारले तर त्यानेसुध्दा मेले पाहिजे. (पण त्या दगडाचा आकार एखाद्याला मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडाएवढा असला पाहिजे.)
आणि जर एखादा माणूस कुणाला मारण्यासाठी लाकडाच्या तुकड्याचा उपयोग करीत असेल तर तो माणूस सुद्धा मेला पाहीजे. (हा लाकडाचा तुकडा म्हणजे सामान्यत: कोणाला तरी मारण्यासाठी उपयोगात आणतात तसे लाकडाचे शस्त्र असले पाहिजे.)
मेलेल्या माणसाच्या कुटुंबातील कुणीही त्या खुन्याचा पाठलाग करुन त्याला ठार मारू शकतो.
“एखादा माणूस अपघाताने दुसऱ्याला मारू शकेल. मेलेल्या माणसाचा त्याने द्वेष केला नाही त्याला त्याने चुकून मारले असेल. किंवा त्याने एखादी वस्तू चुकून फेकली असेल आणि ती चुकून एखाद्याला लागून तो मेला-तर त्याने ते विचारपूर्वक केले असे नाही.
किंवा एखाद्या माणसाने दगड फेकला आणि तो त्याला न दिसलेल्या माणसाला लागला व तो मेला तर त्या माणसाने योजनापूर्वक मारले असे नाही. तो माणूस मेलेल्या माणसाचा द्वेष करत नव्हता. तो केवळ योगायोगाने मेला.
जर असे घडले तर काय करायचे ते समाजाने ठरवायचे. मेलेल्या माणसाच्या कुटुंबातील एखादा माणूस त्याला मारु शकतो की नाही ते लोक न्यायालयाने ठरवायचे.
जर लोकांनी खुन्याचे त्या कुटुंबापासून रक्षण कराचये असे ठरवले तर समाजाने खुन्याला संरक्षक शहरात परत न्यावे आणि जोपर्यंत मुख्य याजक मरत नाही तोपर्यंत खुन्याने तिथेच रहावे.
एखाद्या माणसाने चुकून कोणाला मारले असेल तर त्याने मुख्य याजक मरेपर्यंत शरणपुरातच राहिले पाहिजे. मुख्य याजक मेल्यानंतर तो माणूस त्याच्या स्वत:च्या प्रदेशात जाऊ शकतो.
तुम्हा लोकांच्या सर्व शहरांमध्ये हाच नियम सदैव लागू राहील.
“मारणाऱ्याला मरणाची शिक्षा जर साक्षीदार असेल तरच दिली जाईल. जर एकच साक्षीदार असेल तर कोणालाही मरणाची शिक्षा दिली जाणार नाही.
जर एखादा माणूस खुनी असेल तर त्याला मारलेच पाहिजे. पैसे घेऊन त्याची शिक्षा बदलू नका. त्या खुन्याला मारलेच पाहिजे.
“जर एखाद्याने कुणाला मारले आणि तो संरक्षक शहरात पळून गेला तर घरी जाण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेऊ नका. मुख्य याजक मरेपर्यंत त्याने शरणापुरातच राहिले पाहिजे.
“तुमच्या प्रदेशाला निष्पाप रक्ताने भ्रष्ट करु नका जर एखाद्याने कुणाचा खून केला तर त्या अपराधासाठी असलेली एकमेव शिक्षा म्हणजे त्या खुन्याला ठार मारणे. त्याशिवाय त्याप्रदेशाची त्या अपराधपासून सुटका होऊच शकत नाही.
मी परमेश्वर आहे. मी तुमच्या देशांत इस्राएल लोकांबरोबर राहीन. मी तिथे राहणार आहे. म्हणून ती जागा निष्पाप लोकांच्या रक्ताने अशुद्ध करु नका.”

36

मनश्शे योसेफचा मुलगा होता. माखिर मनश्शेचा मुलगा होता. गिलाद माखिरचा मुलगा होता. गिलादच्या कुटुंबातील प्रमुख लोक मोशेशी व इस्राएलच्या कुटुंबातील प्रमुखांशी बोलायला गेले.
ते म्हणाले, “परमेश्वराने आम्हाला चिठ्या टाकून आमची जमीन घेण्याची आज्ञा केली आहे. आणि परमेश्वराने सलाफहादची जमीन त्याच्या मुलींना द्यायची आज्ञा केली आहे. सलाफहाद आमचा भाऊ होता.
कदाचित दुसऱ्या कुटुंबातील एखादा माणूस सलाफहादच्या एका मुलीशी लग्न करील तर ती जमीन आमच्या कुटुंबातून जाईल. ती जमीन त्या दुसऱ्या कुटुंबाकडे जाईल का? चिठ्या टाकून मिळालेली आमची जमीन आम्हाला दुरावणार का?
लोक त्यांची जमीन विकतील सुद्धा. पण पन्नासव्या वर्षात सर्व जमीन ज्या कुटुंबाची होती त्या कुटुंबाला परत केली जाते त्यावेळी सलाफहादची जमीन कोणाला मिळेल? ती जमीन आमच्या कुटुंबाकडून कायमचीच जाईल का?”
मोशेने इस्राएल लोकांना ही आज्ञा केली: ही परमेश्वराची आज्ञा होती, “योसेफच्या कुटुंबातील ह्या लोकांचे म्हणणे बरोबर आहे.
सलाफहादच्या मुलींसाठी परमेश्वराची ही आज्ञा आहे: “जर तुम्हाला कोणशी लग्न करायचे असेल तर तुम्ही तुमच्या कुळातील कोणाशी तरी लग्न करा.
यामुळे इस्राएल लोकांमध्ये जमीन एका कुळाकडून दुसऱ्या कुळाकडे जाणार नाही. आणि प्रत्येक इस्राएली माणसाला त्याच्या पूर्वजांकडून मिळालेली जमीन ठेवता येईल.
आणि जर एखाद्या स्त्रीला तिच्या वडिलांकडून जमीन मिळाली तर तिने तिच्या कुळातील एखाद्याशीच लग्न केले पाहिजे. यामुळे प्रत्येकाला पूर्वजांकडून मिळालेली जमीन ठेवता येईल.
तेव्हा इस्राएल लोकांमध्ये जमीन एक कुळाकडून दुसऱ्या कुळाकडे जाऊ शकणार नाही. प्रत्येक इस्राएली माणूस त्याच्या पूर्वजांकडून मिळालेली जमीन जवळ बाळगू शकेल.”
सलाफहादच्या मुलींनी परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञांचे पालन केले.
म्हणून सलाफहादच्या महाला, तिरसा, होग्ला, मिल्का व नोआ यांनी त्यांच्या चुलत भावांशी लग्न केले.
त्यांचे नवरे मनश्शेच्या कुळातील होते. म्हणून त्याची जमीन त्यांच्या वडिलांच्या कुळाकडेच राहिली.
परमेश्वराने यार्देन नदीजवळ मवाबमधील पलीकडे मोशेला दिलेल्या या आज्ञा आहेत.

Lizenz
CC-0
Link zur Lizenz

Zitationsvorschlag für diese Edition
TextGrid Repository (2025). Christos Christodoulopoulos. Numbers (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A7D3-D